Friday, April 25, 2014

मराठेशाहीतील स्त्रियांची पत्रे

मराठेशाहीत राजघराण्यातील स्त्रिया राजकारणात सक्रिय भाग घेत नसल्या तरी पडद्यामागून सूत्रे हलवीत असत; प्रसंगोपात रणांगणावरही जात असत. त्यांचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांच्याइतका पत्रव्यवहार अन्य-मोगल अथवा राजपूत इतिहासातील स्त्रियांनी केलेला दिसत नाही. ही पत्रंच आज महत्त्वाचा दस्तावेज आहेत.

इतिहासलेखनाचे एक विश्वसनीय साधन म्हणून पत्र-वाङ्मयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अस्सल पुराव्याखेरीज इतिहास रचला जाणार नाही. एकूण मराठी पत्रवाङ्मय विपुल प्रमाणात उपलब्ध असून ५० हजाराहून अधिक पत्रे इतिहास संशोधकांनी आणि विविध संस्थांनी अभ्यासकांना उपलब्ध करून दिली आहेत. तुलनात्मकदृष्टय़ा पाहावयाचे झाल्यास मराठीइतका पत्रवाङ्मय-संभार अन्य कोणत्याही भारतीय भाषेत प्रसिद्ध झाला नाही आणि मराठेशाहीतील स्त्रियांइतका पत्रव्यवहार अन्य-मोगल अथवा राजपूत इतिहासातील स्त्रियांनी केलेला दिसत नाही. मराठेशाहीतील राजकारणात स्त्रियांना प्रवेश नव्हता, असे म्हणता येणार नाही. अर्थात या काळात राजघराण्यातील स्त्रिया राजकारणात सक्रिय भाग घेत नसल्या तरी पडद्यामागून सूत्रे हलवीत असत; एवढेच नव्हे तर प्रसंगोपात रणांगणावरही जात असत. शिवमाता जिजाबाई, छत्रपती संभाजींची पत्नी येसूबाई, छत्रपती राजारामांची पत्नी महाराणी ताराबाई, छत्रपती शाहूंच्या राण्या, प्रमुख मराठी सरदारांच्या स्त्रिया, पेशव्यांच्या स्त्रिया यांनी समकालीन राजकारणात भाग घेऊन आपली मते पत्रद्वारा व्यक्त केली आहेत. मुत्सद्देगिरी, असहायता, स्वाभिमान, धर्मपरायणता, राजकीय डावपेच इत्यादी अनेक स्वभावविशेष या स्त्रियांच्या पत्रांतून व्यक्त झालेले आहेत. 

या पत्रसंभारात शिवमाता जिजाबाईंचे एखादेच पत्र मिळते. अर्थात तेही शिवाजी महाराज मोहिमांत गुंतलेले असताना रयतेच्या तक्रारींचा निवारा करण्यासाठी लिहिलेले हुकूमवजा पत्र असून ते दि. २ जानेवारी १६५७ रोजी लिहिले आहे. त्या पत्रात त्या म्हणतात, ''आज रख्तरबाने राजेश्री जिजाबाईसाहेब दामदौलहू बजानेवू हुद्देदारांनी व देसमुखांनी व मोकदमानी मौजे पासांबे पेठ जिजापूर सुभासबा खमसैन अलफ वेदमूर्ती राजेश्री विनायकभट जोसी त्यासी साहेबी मेहरबान होऊनु मिरासी अजरा मऱ्हामतेलंकराचे लेकरी दिधला असे पेठमजकुराची बिता सदरहू मिरासीपणे तुम्हास दिधली असे ती तुम्ही सुखी मिरासपणाचा कारभार करीत जाऊन पेठेचे मामुरी करणे म्हणोन वेदमूर्ति जोसी यास दिधली असे.. तेणेप्रमाणे साहेब चालवतील मो।''

छत्रपती संभाजींची पत्नी येसूबाई यांच्यावर दुर्दैवाचा फार मोठा घाला पडला होता. मोगलांनी रायगड किल्ला १६८९ मध्ये हस्तगत केला आणि येसूबाईसह सर्व कबिला मोगलांच्या नजरकैदेत तेव्हापासून खडतर जीवन व्यतीत करीत होता. मोगलांच्या बंदिवासातील या राजमातेने १७०५ मध्ये अहमदनगरच्या किल्ल्यातून चिंचवडच्या मोरया गोसाव्यांकडे कर्जाची याचना करणारे जे पत्र लिहिले आहे ते भावना हेलावून सोडणारे असून प्रस्तुत पत्र म्हणजे स्त्रियांनी लिहिलेल्या पत्राचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून दाखविता येईल. विनयशीलता, वडिलांबद्दलचा आदर, संयम इत्यादी राजमातेचे विविध गुण या पत्रातील प्रौढ भाषेतून व्यक्त झालेले दिसतात. येसूबाई लिहितात, ''श्रीमत परमपूज्य तपोनिधी मुक्तिदायक सकलगुणांलंकरण देवमान्य वरदा मूर्तीपरायण राजमान्यराजेश्री.. विशेष आमचे वर्तमान तरी स्वामीपासी सत्यच लेखन केले पाहिजे.. नगरी साहुकारांचे पाच सात सहस्र ब्रह्मस्व (कर्ज)जाले. आता कोण्ही देत नाही. मागितल्यास पैकियास तगादे लाविले आहेत. त्याच्यामुळे बहुत कष्टी होतो. तो दु:खसागर स्वामीस काय म्हणून ल्याहावा.. महाराज कैलासवासी गेल्या जागाईत आपणावरी हा कसाला (संकट) प्राप्त झाला. इंगळास वोळंबे (वाळवी) लागले.. विशेष ल्याहावे तरी आपण अज्ञान, मूल असे लिहिता येत नाही अथवा ज्ञानही नाही. त्याहीवरी आपणांजवळी कोण्ही शाहणा कारकून नाही, अवाक्षराची क्षमा केली पाहिजे.''

मराठय़ांच्या इतिहासात एक राजकारणी, कर्तृत्ववान व रणरागिणी म्हणून ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, त्या करवीर संस्थानच्या संस्थापिका व छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराबाई यांनी पतीच्या निधनानंतर अल्पकाळात युद्धक्षेत्र असो वा राज्यकारभार असो, या दोन्हींवर जबरदस्त पकड बसविली. सर्वानी मराठी राज्यासाठी संघटित व्हावे, ही त्यांची तळमळ होती. या संदर्भात त्यांनी कान्होजी झुंझारराव यास दि. १७ नोव्हेंबर १७०० रोजी पाठविलेले पत्र पाहिले, तर त्यांच्या धोरणाची, मनसुब्याची कल्पना येते. प्रस्तुत पत्रात त्या लिहितात, ''कान्होजी झुंझारराव मरल देशमुख यास कोकणात हबशाने बहुत बलवल मांडल्याकारणाने त्यास बरा नतीजा पावावयाबद्दल रा. मल्हारराव यास सात हजार फौजेनिशी आज कुंभारली घाटे उतरोन चिपळुणास आले. त्यास सामील व्हावयाबद्दल आम्ही हमाल घेऊन स्वार होऊन गेलो. ऐशास हे पत्र तुम्हास पावेल ते क्षणी आपला अवघा जमाव, एक माणूस टाकून न देता सारा जमाव घेऊन बहुत सिताबाने येऊन सामील होणे. एक घटकेचा उजूर (उशीर)न करणे. आजचे प्रसंगी जो मसलत चुकवील, तो म्हणेजा गनिमादाखल असे समजोन बहुत सिताबाने येणे. उजूर केलिया साऱ्या मसलतीची बदनामी तुम्हावरी होईल, हे समजून लिहिल्याप्रमाणे वर्तणूक करणे.''
औरंगजेबाशी मुकाबला करताना त्यांनी ऊन, वारा, पाऊस या नैसर्गिक अडचणींचा कधी विचार केला नाही. प्रसंगोपात लष्करी तळावरच मुक्काम ठोकून ताराबाई राहिल्या. त्यामुळे लष्कराच्या व अधिकाऱ्यांच्या मनात त्यांच्याविषयी प्रेमभावना व आदर निर्माण झाला होता. किल्ल्यावरील राजमंडळातही त्यांनी विश्वास निर्माण केला होता. या संदर्भात त्यांनी जानेवारी १७०२ मध्ये प्रतापराव मोरे यास लिहिलेले एक पत्र बोलके आहे. या पत्रात त्या प्रतापराव मोरे यांची स्तुती करून पुढे लिहितात, ''संताजी पांढरे यांनी धाडस करून मलकापूरजवळचे मोगलांचे ठाणे काबीज केले आणि त्यांच्या फौजांना सळो की पळो करून सोडले. त्यामुळे विशाळगड मोगलांना घेता आला नाही. तसेच तिकडच्या इतर किल्ल्यांना धक्का लागला नाही. हे श्रेय तुमचे होय.''

पेशव्यांचे आणि महाराणी ताराबाई यांचे सख्य कधीच नव्हते. पेशव्यांपासून सरदारांची मने परावृत्त करण्याच्या उद्देशाने लिहिलेले एक पत्र महाराणी ताराबाईंचे असून प्रस्तुत पत्र बरेच काही सांगून जाते. या पत्रात त्या लिहितात, ''तुम्ही एकनिष्ठ सेवक विश्वासू हे जाणून चिरंजीव कैलासवासी याणी तो जागा तुमच्या वडिलांच्या स्वाधीन केला त्यामध्ये'' ''तुम्ही अधिकोत्तर सेवकपणाची रीत केली. यावरून तुम्हावर साहेब बहुत खुश आहेत. सालमारी मुल्लकाची खराबी जाहली. किल्ल्याची बेगमी नाही. कर्जदार जालो म्हणून तपासिले लिहिले. येसियास तुम्ही कार्यकर्ते आहा. साहेब तुमचे उर्जित करतील आणि कर्जवामाचीही वाट होईल, तुम्ही कोणेविसी चित्तांत दुसरा अर्थ न आणणे, तुमची निष्ठा जाणून मरातब योजिला आहे. त्याची सनद करून मागाहून पाठविली जाईल. प्रस्तुत राजश्री पंतप्रधान (बाळाजी बाजीराव) या प्रांते येणार म्हणून वार्ता आहे. येसियास आपले जागियाची बंदोबस्त करून बहुत सावधपणे राहणे. चार लोक व पतके सरदार यांस मायेत घेऊन गाहा करून अवघे येकदील होऊन साहेबाचा जागा जतन होऊन तुमचे सेवेचा मजुरा होये तो आर्थ कराल हा निशा साहेबाचा आहे, तरी आज्ञा केली हा मार चित्तांत आणून वर्तणूक करणे म्हणजे साहेब तुम्हावर कृपाळू होऊन ऊर्जित करतील आणि सर्व आर्थ तुमचे मनोदयानुरूप घडोन येईल हा निशा असोन देणे.''

रामराजे यांना दत्तक घेण्यास सर्वात मोठा विरोध सकवरबाई या शाहूंच्या लाडक्या राणीचा होता. आणि त्यांनी कोल्हापूच्या छत्रपती संभाजी राजांची त्याकरिता फौजेसह मदत मागितली. तेव्हा महाराणी ताराबाईनी जे राजकारण केले ते त्यांच्या चाणाक्ष बुद्धीचे द्योतक होते. छत्रपती संभाजीराजे फौजेनिसी सातारकडे निघाले, तेव्हा बाळाजी बाजीरावांच्या फौजेने त्यास वारणेजवळ अडकून ठेवले. दरम्यान छत्रपती शाहू महाराजांचे निधन झाले (१५ डिसेंबर १७४९). तेव्हा या दत्तक प्रकरणास वेगळे वळण लागले. तत्संबंधी महाराणी ताराबाई लिहितात, ''सकबार राहिल्यास राज्याचा डोहणा करेल, राज्य बुडवील, कोणाचे पाय भुईस लागू देणार नाही. या करिता बरोबर राहील तर फार चांगले. सहगमनाचा विचार कळेस तसा तिने करावा. मग पुढे विचार करणे तो करावा मग पुढे विचार करणे तो करावा. करवीरहून संभाजीस आणावयाचे सर्वाचे सल्लेस येणार नाही आणि मीही सल्ला देत नाही. माझे सुनेचा मुलगा पानगावास आहे. त्यास आणून गादीवर बसवावा, दुसरे काय?''

दुसरे संभाजीराजे (करवीर) व त्यांची पत्नी राणी जिजाबाई यांनी बुद्धिपुरस्सर पेशव्यांशी (बाळाजी बाजीराव) सलोख्याचे संबंध ठेवण्याच्या दृष्टीने करवीर सरकारकडून सतत पत्रव्यवहार चालू ठेवला होता. हेतू असा की पेशव्यांनी गुप्तरीत्या केलेल्या कराराचा त्यांना विसर पडू नये. याच संदर्भात छत्रपती शाहू महाराजांच्या निधनानंतर (१७४९) जिजाबाईंनी सदाशिवरावभाऊंना लिहिलेल्या पत्रात कराराची आठवण देऊन त्वरा करण्याचे सुचीविले आहे. त्या लिहितात, ''अविलंबे कार्ये दृष्टीस पडावे, लौकिक उत्तम दिसोन, यशास पात्र तुम्ही व्हावे. साहेबी सर्वाविसी येख्तयारी आपणावर टाकावी, ऐसे कित्येक मनोदय साहेबी कल्पून गत वर्षांपासून वेदशास्त्रसंपन्न राजश्री भटजीस लागोपाठ रवाना केले. ऐसे असता साहेबाचे प्रत्ययास गोष्ट दिसू नये. तेव्हा साहेब मध्यस्थ होऊन हुजूर वचन गुंतविले, याचा लौकिक कोणा प्रकारचा होणार? हा अर्थ चित्तात आणून तदनुरूप या उपरी पूर्व संदर्भाच्या (गुप्त कराराच्या) विचारानरूप अंगेजणी करून स्वराज्यकर्तव्यार्थ.''
जिजाबाईंचे राज्यकारभारात बारीक लक्ष असे. एखाद्या सेवकाने गैरकृत्य केले वा टंगळमंगळ केली आणि कामास नकार दिला, तर त्या त्यास योग्य धडा देत.
''पेसवी बोली जाहली आहे व करारबाज यादी लिहून दिल्या आहेत. त्याप्रमाणे निदर्शनास साहेबाचे यावे, हुजूर विनंती केली आहे ती सत्यता होऊन राज्य उपयोगी मनसबा घडे ते करावे. ऐसे राजश्री बालाजी पंडित प्रधान यांस तुम्ही सांगोन त्वरेने करवावे. या गोष्टीचे तुम्हास आगाध कोणते आहे. सविस्तर वेदशास्त्रसंपन्न राजश्री श्रोत्री याजबद्दल आज्ञा सांगोन पाठविली आहे व पंडित मशारविल्हे यास आज्ञापत्र सादर असे त्यावरून साद्यंत कळेल. साहेब मध्यस्त तुमची निष्ठा दृढतर हा भरवसा साहेबास हुजून विनंती करून तीन संस्थानची ताकीदपत्रे घेऊन पाठविली आहेत. साहेबाचा तुमचा करारवजा कोणे प्रकारचा आहे. राज्यविसी पंडित मशारविल्हे यांचे मांडीचे उसे केले आहे. हाही अर्थ ध्यानात आहे. सारांश गोष्ट पूर्वसंदर्भाप्रमाणे हुजूर निदर्शनास साहेबी आणून द्यावे आणि यशास पात्र तुम्ही व्हावे, हा अर्थ चित्तात आणावा.''

तेव्हा 'पूर्वसंदर्भाच्या अन्वयानुरूप' जिजाबाईंनी पेशव्यांना अनेकदा स्मरण करून देणारी पत्रे लिहिली. 'स्वराज्याविषयी तुमच्या मांडीचे उसे केले आहे,' असे भावनात्मक आवाहन करूनही, नानासाहेब कोणतीच गोष्ट जिजाबाईंच्या मनासारखी करेनात. याचा पुनरुचार जिजाबाईंनी इ.स. १७५९ मध्ये बाळाजी बाजीरावांना लिहिलेल्या एका पत्रात केला आहे, ''साहेबाचा पडदा सेवकासी नव्हता म्हणून लिहिले ते खरे. आपल्याशी पडदा स्वप्नीही नाही. आपण बंधूच आहात.'' याच वेळी सदाशिवराव भाऊ यांच्यावर मुजफरजंगाने हल्ला करून त्यांना ठार मारण्याचा यत्न केला; पण भाऊसाहेब त्यातून वाचले, ही वार्ता जिजाबाईंना जेव्हा कळली, त्या वेळी नानासाहेबांना त्यांनी मुद्दाम पत्र पाठवून भाऊसाहेबांच्या जिवावरील अरिष्ट टळल्याबद्दल एक सुरेख व मराठी भाषेचा नमुना ठरावे असे पत्र दि. ७ नोव्हेंबर १७५९ रोजी लिहिले. त्या पत्रात त्या आनंद व्यक्त करताना लिहतात, ''प्रारंभापासून मुजफरजंग याचा मजकूर सर्वमासी हतबल असून पुन्हा आपण त्याचा संग्रह केला, वृश्चिक आपले गुण टाकीत असते की काय काडीचा मनुष्य, लक्षाची हानी केली होती. कुलीणास ईश्वर कसे उपेक्षील? याकरिता ज्यांचा तो फजित पावला. या उपरी सर्व प्रकारे करून आपले शरीर संवरक्षण करून साहेबास संतोषित जावे. प्रस्तुत राजश्री सदाशिवराव पंडित यासी तुस्त पाठविला आहे.'' वरील पत्रावरून असे लक्षात येते, की जिजाबाईंचे पेशव्यांशी सलोख्याचे सबंध असले तरी त्यातून राजकारणाची दृष्टी सुटलेली नव्हती.
जिजाबाईंचे राज्यकारभारात बारीक लक्ष असे. एखाद्या सेवकाने गैरकृत्य केले वा टंगळमंगळ केली आणि कामास नकार दिला, तर त्या त्यास योग्य धडा देत. त्या दत्तक पुत्रास राज्यारोहणानंतर काही महिन्यांनी नृस्िंाहवाडीस देवदर्शनासाठी घेऊन चालल्या होत्या. आपल्या गैरहजेरीत भगवंतराव अमात्य यांनी करवीर राज्याची व्यवस्था पाहावी, अशी त्यांनी आज्ञा दिली. भगवंतरावांना ही जोखीम नको होती. त्यांनी सांगितले की, 'हे काम आपणाकडून होणार नाही.' अर्थात ही अमर्यादा होती; तथापि त्यांनी अमात्यांना स्वाभिनापूर्वक कळविले, की ''आपण काम न कराल, तर फार मोठी अडचण होईल, अशातला भाग नाही; तसे तुम्ही समजूही नये. हे काम सामान्य कुणबिणींकडूनसुद्धा चालविता येईल.'' आणि आश्चर्याची बाब म्हणजे त्यांनी हा अभिनव प्रयोग केला. त्यांनी यशवंतराव शिंदे यांना कारभाराचे काम सांगितले व गंगू, रंगू, भागू, नागू आणि लिंगू अशा पाच सुज्ञ कुणबिणी पसंत करून शिरोळे, आळते, वडगाव वगैरे ठिकाणी कामे नेमून देऊन रवाना केल्या. त्यांनी व्यवस्थित आज्ञांचे पालक केले, अशी वदंता त्या वेळी प्रसृत झाली. 
पश्चिम किनाऱ्यावर इंग्रजांचे प्राबल्य वाढत होते. त्यांनी काही तरी कुरापत काढून सिंधुदुर्ग दि. १ मे १७६५ रोजी घेतला. करवीर राज्याचा हा किनाऱ्यावरील प्रमुख किल्ला पडल्यानंतर इंग्रजांना पायबंद घलण्यासाठी जिजाबाईंनी आपल्या परीने अथक प्रयत्न केले. कोंकणातील अन्य किल्लेदारांना पत्रे लिहून सावधनतेचा इशारा दिला; तरीसुद्धा यानंतर इंग्रजांनी पुन्हा एक किल्ला यशवंतगडही ताब्यात घेतला. या घटनेबद्दल जिजाबाईंनी सावंतवाडीकरांचा कारभारी जिवाजी विश्राम यास दि. १२ मार्च १७६६ रोजी एक पत्र पाठवून नापसंती व्यक्त केली आहे. या पत्रात त्यांनी 'कोवळा मोड आहे तो मोडल्याने उत्तम, भारी जाहलेने सर्वाचे वाईट होईल,' असा इशारा दिला आहे. इंग्रजी सत्ता पुढे वरचढ होईल, याची जाण त्यांना होती; म्हणून त्यांनी हा इशारा त्या वेळी दिला. 

पेशवेकालीन राजकारणी स्त्रियांमध्ये रघुनाथराव पेशव्यांची पत्नी आनंदीबाई, खंडेराव होळकरांची पत्नी अहिल्याबाई, नानासाहेब पेशव्यांची पत्नी गोपिकाबाई, खंडेराव दाभाडय़ांची पत्नी उमाबाई आदींचा विशेष उल्लेख करावा लागेल. 
उत्तर पेशवाईत प्रसिद्धीस आलेली एक प्रमुख राजकारणी स्त्री म्हणजे राघाबोदादांची पत्नी आनंदीबाई! 'शंभर राजकारणे करतील' असा बाईचा लौकिक होता. 'ध'चा 'मा' करणारी एक कारस्थानी स्त्री म्हणून इतिहास तिला अधिक ओळखतो. आनंदीबाई कोपरगावला बंदिवासात असताना त्यांची जी दिनचर्या लिहून ठेवली आहे त्यावरून आनंदीबाईच्या स्वभावाचे यथार्थ दर्शन घडण्यास बरीच मदत होते. या दिनचर्येतील नोंदी आनंदीबाईच्या बोलण्यातील भाव पाहून केल्या आहेत. तिच्या अन्त:करणाची ॠजुता आणि मनाचा कणखरपणा आपल्याला दिनचर्या आणि तिच्या इतर पत्रांवरून दिसून येतो. आनंदीबाई नाना फडणिसांनी लादलेल्या जाचास कंटाळून आपला राग व्यक्त करताना रामायण-महाभारतातील दृष्टांत आणि दाखले देतात. यावरून यांचा वाचनाचा व्यासंग चांगला होता, हे दिसते. वाचनात जशा त्या प्रवीण होत्या, तशाच त्या लिहिण्यातही मोठय़ा हुशार होत्या, हे त्यांच्या अनेक पत्रांवरून दिसते. महत्त्वाची पत्रे त्या स्वत: लिहीत असत. त्यांनी स्वत: लिहिलेल्या पत्रांपैकी नाना फडणविसांना पाठविलेले एक पत्र फारच बोलके आहे, त्या पत्रात नानांची कानउघाडणी करताना त्या लिहितात-
''आम्ही होऊन (पत्र) पाठवावे, तर कारणाखेरीज आम्हास पत्र पाठवितात म्हणौन तुम्हीच हसाल, हा काळ समजोन पत्रे न पाठविली. हल्ली पत्राचे कारण की तुम्ही तीन पिढय़ांचे दौलतीतील फडणीस असौन दौलताची तो गती जाली ती जाली. हल्ली यवनाक्रांत ब्राह्मणी दौलत फितुरांनी होऊ पाहते. तुमच्या चित्तातील उगीच अढी जात नाही, आणि ब्राह्मणी तो बुडत चालली! या दौलतेत पूर्वी कारभारी जाले, त्यांनी ब्राह्मणी स्थापली व दौलतेची वृद्धी केली हा काळ प्रस्तुत श्रीसत्तेने आला! इंग्रज बुंदेलखंडापर्यंत दोन कंपू आले, आणिकही मागून येणार. या बारीक मोठा विचार जो करणे तो तुम्हीच करणे.. त्यापक्षी दोन्ही गोष्टींचा आंदेशा करून ब्राह्मणपण राहे ते करणे''
बारभाईचा कारभार बाईंना नापसंत होता आणि सखारामबापू यांच्यावर तिचा विश्वास नव्हता. गृहकलहामुळे ब्राह्मणी राज्य बुडणार अशी तिला वाटणारी भीती तिने लिहिलेल्या या पत्रांतून व्यक्त होते. उपरोध, त्वेष यांनी ही पत्रे भरलेली आहेत. सखारामबापूंच्या पत्रात बाई लिहितात, ''हे कालचक्र विपरीत आहे. परंतु आम्हास हाच भरवसा आहे की, तुम्ही कालचक्रासही फिरवाल, हे जाणून तुम्हांस पत्र लिहिले आहे. तरी ब्राह्मणी दौलत नीट राहून हुजूराचाही संतोष राहून सर्व गोष्टी बऱ्या होतील त्या कराव्या, न केल्या जन्मभर चांगले केले, आणि शेवटी म्हातारपणी इंग्रजांच्या घरात ब्राह्मणी दौलत घातली हे अपेश येई तो अर्थ न करावा.. सारांश हाच की इंग्रजांच्या हाती ब्राह्मण न चालता, दौलतीचा बंदोबस्त होऊन यावा. विशेष लिहावे तरी तुमचे दशांशही आम्हास समजत नाही. परंतु यश अपेश याचे धनी तुम्ही.. आम्ही लिहून विशेष तो नाही, तुम्ही मोजीतही नाही, परंतु आकार दिसत चालला, यास्तव सूचना लिहिली आहे.'' या पत्रात सखाराम बापूंनी वृद्धापकाळी लग्न केल्याबद्दल आनंदीबाईने कसा टोमणा मारला आहे तो पाहा; 'नवी भावजय लाडकी केली तिचे नाव काय ठेवले व दुसरी करावयाची कधी हा मजकूर विशेष लिहिला होता त्याचे उत्तर काहीच आले नाही'. आनंदीबाई अखेरीस एक माताच होती. दुसऱ्या बाजीरावाची आरवाचगिरी, फार खेळणे, व्रात्यपणा बाईंना मुळीच पसंत नव्हता. आपली व्यथा तिने थोडय़ाच पण प्रभावी शब्दांत बोलून दाखविली आहे. 'बाजीराव थोर झाले असता, अद्यापी मर्यादेची तऱ्हा नाही.'
एक वर्षी नाशिकच्या भागात पाऊस कमी पडल्याने भयंकर दुष्काळ पडला. तेव्हा गोपिकाबाईंनी तेथील शेतकऱ्यांची जकात माफ करावी, म्हणून माधवरावांना पत्र धाडले. बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे यांची पत्नी गोपिकाबाई तत्कालीन पेशवे कुटुंबात ज्येष्ठ आणि कर्त्यां होत्या. पेशव्यांची पत्नी म्हणून त्यांना घरात आणि घराबाहेर मान मिळे. पेशवेकालीन स्त्रियांमध्ये खुद्द गोपिकाबाईंनी लिहिलेली पत्रे उपलब्ध असून त्यांची संख्या तत्कालीन इतर कोणत्याही पेशवे घराण्यातील कर्त्यां स्त्रीने लिहिलेल्या पत्रांपेक्षा जास्त आहे. बाईंचा हा पत्रव्यवहार म्हणजे तपशीलवार इतिहासच होय. नानासाहेबांच्या हयातीत गोपिकाबाईंनी राजकारणात विशेष लक्ष घातले नाही; मात्र त्यांच्या हालचाली पडद्यामागून चालल्या होत्या आणि भाऊ साहेबांविषयीचा मत्सर त्यातून स्पष्टपणे दृग्गोचर होत असे. नानासाहेबांच्या मृत्यूनंतर मात्र त्या मुलाच्या म्हणजे थोरले माधवराव, यांच्या राजकारणात सक्रिय झाल्या. त्यांना आपल्या महत्त्वाकांक्षी लालसेला काही वाव मिळेल असे वाटले; परंतु एकूण तात्कालीन राजकारणाने वेगळीच दिशा घेतली आणि माधवरावांच्या तेजस्वी नेतृत्वापुढे आणि स्वतंत्र वृत्तीमुळे त्यांची डाळ फारशी शिजली नाही; तथापि त्यांचा करारीपणा आणि प्रसंगोपात माधवरावास सल्ला देण्याचे काम चालू होते. निजामाने पुण्यावर स्वारी करण्याचा मानस व्यक्त केला आणि कारभाऱ्यास पत्र लिहिले की, ''आम्हास खंडणी दिली तर पुणे राखू, नाहीतर जाळून टाकू'' यावर गोपिकाबाईंनी त्यास सणसणीत उत्तर धाडले की ''तुमचे वैरी तिकडेच गेले आहेत. त्याकडे काय असेल ते पाहून घेणे. आम्हास खंडणी देण्यास गाठ पडत नाही. पुण्याचे काय करणार ते सुखरूप करणे.'' या सुमारास पेशवे निजामावर चालून गेले होते आणि राक्षसभुवनच्या लढाईत (१० ऑगस्ट १७६३) त्याचा सपशेल पराभव झाला. माधवराव प्रारंभी आईचा सल्ला शिरसावंद्य मानीत; पण गोपिकाबाई गंगापुरास विरक्त जीवन व्यतीत करतानाही त्यांची राजकारणाविषयीची आसक्ती कमी झाली नव्हती. गोपिकाबाईंचे बंधू मल्हारराव रास्ते, गोपाळराव पटवर्धन, त्रिंबकराव पेठे वगैरे सरदार मंडळी माधवरावांनी घालून दिलेला शिरस्ता व नियम पाळीत नसत. मल्हाररावांनी तर राघोबांचा पक्ष घेऊन जानोजी भोसल्यास पेशव्यांविरुद्ध फितविले. तसेच रास्तेमामा हे सरंजामाप्रमाणे पदरी फौज ठेवीनात. तेव्हा माधवरावांनी त्यांचा सरंजाम जप्त केला व त्यास भर दरबारात शासन केले. गोपिकाबाईंना जेव्हा ही गोष्ट कळली, तेव्हा त्यांनी माधवरावांना पत्र लिहिले, ''पाहिजे तर त्यांचा सरंजाम जप्त करावा, पण त्यांचा पाणउतारा करू नये. जाहीर शासन करू नये. आपली मांडी आपणच उघडी करून दाखवू नये.''
गोपिकाबाईंच्या कानावर मुली विकून लोक पैसे जमवितात, ही वार्ता आली, तेव्हा त्यांनी नाना फडणविसांना पत्र पाठवून कळविले की, ''समुद्रतीरी व देशामध्ये कितीका स्थळी कन्येचा विक्रये करून द्रव्य घेत आहेत. याप्रमाणे अनाचार प्रवृत्त झाला आहे. यांस श्रीमंतांसारखे ब्राह्मण प्रभू असता व तुम्हासारखे ज्ञाने सन्मार्गवर्ती, विवेकी मंत्री असता, हा मार्ग अनुचित, योग्य नव्हे. त्यास या अर्थी श्रीमंतास विनंती करून याचा बंदोबस्त करावा'' असेच एक वर्षी नाशिकच्या भागात पाऊस कमी पडल्याने भयंकर दुष्काळ पडला. तेव्हा गोपिकाबाईंनी तेथील शेतकऱ्यांची जकात माफ करावी, म्हणून माधवरावांना पत्र धाडले. त्याचे उत्तर माधवरावांनी तात्काळ पाठविले, ते मार्मिक व कार्यक्षम शासनकर्त्यांच्या गुणांचे दिग्दर्शन करणारे असेच आहे. 
गोपिकाबाईंचे माधवरावांवर अपरंपार प्रेम होते आणि माधवरावांचेही आईवर तेवढेच प्रेम होते, तथापि आईचा सल्ला राज्य कारभारात अडचणीचा वाटल्यास तो नम्रपणे बाजूला सारीत. गोपिकाबाईंना माधवरावांची प्रकृती बरी नसल्याची वार्ता इ.स. १७६९च्या पावसाळय़ात कळाली. तेव्हा त्यांना बरे वाटावे म्हणून त्यांनी नाना फडणविसांना पुढील पत्र लिहिले. ''ब्राह्मण लावले ते अनुष्ठान संपेपर्यंत वाडय़ातच राहू द्यावेत. त्यांनी यजमानास आरोग्य होण्याविषयी प्रार्थना करीत जावी. आठ-पंधरा दिवस जास्त लागले तरी हरकत नाही. कमी पडू न द्यावे. उत्तम परीक्षेने ब्राह्मण लावावे.'' गोपिकाबाई अत्यंत कर्तव्यदक्ष होत्या. सवाई माधवरावांचे त्यांना एकदा पत्र आले होते की, 'मी लहान, कसे वागावे ते लिहून पाठवावे' तेव्हा त्याला उत्तर म्हणून गोपिकाबाईंनी एक तेराकलमी प्रदीर्घ पत्र धाडले. त्या पत्रात त्या लिहितात-
''दिवसातील एकूण घटिका ४१ कलमे १३, उपदेश, दिनचर्या, अभ्यास व वर्तणूक याबाबतीतील कलमबंदी पाठविली आहे'' ''श्रीयासह चिरंजीव राजश्री सवाई माधवराव प्रधान यांसा प्रती गोपिकाबाई मुक्काम नाशिक आशीर्वाद उपरी. तुम्ही पत्र पाठविले ते पावले, 'मी लहान वडिली सर्वत्याग करून श्रीक्षेत्री वास केला आहे. त्यास सर्व माहीत, यास्तव कोणे रीतीने चालावे, हे सर्व ल्याहावयास आज्ञा व्हावी, म्हणोन लिहिले,' त्यास सूर्यग्रहण, संधी अन्वये कृष्णपक्ष होऊन लोप जाहला होता, ती हल्ली पुण्योदये करून दुष्टांचा संहार व सुष्टांचे पालग्रहणार्थ तुम्ही या कुळात जन्म घेऊन पुरंदर येथे उदयास आला, त्या पक्षी इकडून लिहावयाचे कारण दिसत नाही. परंतु मानवी देह आणि तुम्ही लिहिले, त्यापेक्षा तूर्त चालावयाचे, जे सुचले ते लिहिले आहे. तपशील कलमबंदी''
या कलमबंदीतील तपशील पाहता गोपिकाबाईंचे हे सविस्तर पत्र पेशवाईतील पेशव्याचे दैनंदिन जीवन कसे होते, याचा पत्ररूप दाखला आहे. पत्रलेखनाचा हा तत्कालीन एक उत्कृष्ट नमुनाही म्हणता येईल. या पत्रात आदर्श राजपुत्राचे जीवन कसे आसावे, त्याने कसे आचरण ठेवावे, कसे बोलावे, कुणाशी बोलावे इत्यादीविषयींचा सुरेख उपदेश आहे. ते संपूर्ण पत्र म्हणजे एक आज्ञापत्रच होय. 
सासवा-सुनांचे सख्य ही एक सामान्यत: दुर्मीळ गोष्ट होय. गोपिकाबाईने आपल्या सुनेविषयी केलेली ही नाजूक पत्ररूप तक्रार पाहा- ''तुम्हांकडून कागद सर्वदा येत असतात; परंतु तुमचे खासपत्र सुखसंतोषाचे येत नाही, यावरून अपूर्व भासते, तरी सर्वदा पत्र पाठवून कुशलार्थ लिहून संतोषवित जावे' वरकड चिरंजीव दादा याचे जेवणास फराळास जपत जावे.' ''आपणास पत्रे लिहावयास अवकाश होत नाही. तस्मात येथे आम्हांजवळ होता तेव्हा आपली माया मुलांलेकरांवर वाटली गेली होती. आता तेथे दादावरच माया राहिली. इकडील विसरलासें दिसते. परंतु ऐसें नसावे, येकायेकीच मित्रपणास अंतर न पडावें,''असे गोपिकाबाई आपल्या आनंदीबाई या जावेस पत्रांतर नाही म्हणून लिहितात.
मल्हारराव होळकरांची सून अहिल्याबाई ही बाणेदारपणा, धार्मिकवृत्ती व परोपकार या गुणांविषयी इतिहासात अमर झाली आहे. हत्यारबंद सैनिक नर्मदा पार करून दक्षिणेकडे सरकारचे दस्तकाखेरीज आपल्या मुलुखात येऊ नयेत, यासंबंधीच्या स्पष्ट आज्ञा तिने आपल्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. नाना फडणविसाच्या वकिलाला तिने दिलेल्या उत्तरावरून तिचा बाणेदारपणा दिसून येतो. आहिल्याबाईच्या तोंडचे शब्द नानाच्या वकिलाने टिपून कळविले आहेत. ''तुमचे मानस असेल की बाईस चहूकडून उपद्रव जाल्याने सारेच बंदोबस्त आपण केल्यावर बाईनीं काय करावयाचें आहे? परंतु तुम्हांसही कळलें असू द्या, मी सुभेदाराची सून आहे. केवळ तुकोजीबाबाच दौलतीचे धनी आणि मी कशांत काहीं नाही असे समजू नका.. आज काल पाटीलबाबांचा दम तुकोजीबुवा फार राखतात आणि पाटील बाबांच्याही चित्तांत फार फंद असेल तर उभयतांही फौजसुद्धा मजवर चालून यावे. सुभेदारांचे पुण्यप्रतापे येथेही कोणी बांगडय़ा लेऊन बसले नाही, श्री मरतड समर्थ आहे.''
पहिल्या होळकर- इंग्रज युद्धात होळकरांच्या सैन्याचा खर्च वाजवीपेक्षा जास्त झाला; तरीसुद्धा अहिल्याबाईंनी कळविले, ''लढाईचे काम पडले आहे. कामकाजात कमी पडू नये. खर्चाची तरतूद केली आहे.'' त्याच सुमारास बडोद्याहून इंग्रज सुरतेकडे आले. तेव्हा बाईनी पुण्यास कळविले, ''बळकट फौजेची गरज आहे श्रीमंत फौजेची उपेक्षा करतात, श्रीमंतांनी शिलेदारांचा बहुजुरातीचा पुष्कळ भरणा करून जागोजागी फौजा पाठवून जेथल्या तिथे दहशत पडेल असे करावे. भिल्लांस व गुलजरखानास अभय पत्रे दिली, तर ते वाटा बंद करतील'' आहिल्याबाईंना इंग्रज वसई घेण्याचा विचार करीत आहेत, असे समजताच त्या लिहितात, ''सरकारी फौज व फ्रान्सीसी मुंबईस लावावे. फौज व आंग्रे याना वसईची पुस्त पन्हाई करावी. या तरतुदी श्रीमंतानी केल्याच असतील'' मुंबई व सुरत येथील इंग्रजास एकत्र येऊ देऊ नये, ही त्यांची मुत्सद्देगिरी दिसते. शत्रूचा शत्रू हा आपला मित्र या न्यायाने फ्रेंचांना हाताशी धरण्याचा मार्ग त्यांनी सुचविला होता. 
वरील काही प्रमुख स्त्रियांखेरीज इतर अनेक स्त्रियांची पत्रे उपलब्ध आहेत; पण त्या सर्वाचा किंबहुना आणखी काहींचा परामर्श घेणे अतिव्याप्त होईल. तथापि छत्रपती रामराजांना सांभाळणारी एक सामान्य स्त्री-दर्याबाई निंबाळकर हिच्या पत्राचा उल्लेख तत्कालीन राजकारणात त्याही कशा सामील असत, याचे उत्तम उदाहरण होय. दर्याबाई निंबाळकरने १७५० मध्ये नानासाहेब पेशव्यांना लिहिलेले हे पत्र असून या मराठमोळा बाई आपल्या भावना कशा व्यक्त करतात याची कल्पना येईल, ''पत्री आज्ञा निरोपिली की, तुमचे आमचे इमान उजवल, इतकिया उपरी आम्हांवर शब्द न ठेवणें. त्यास आम्ही कायवाचा मन तुमचे पक्षीचे म्हणवितो.. आमचें नाव तुफान तेथील कारभारी आपणास लिहिताती''
 - डॉ. सुरेश देशपांडे 
(साभार : लोकप्रभा ) 

Friday, April 18, 2014

जीवनाविषयीच्या ओल्या उमाळ्याची कविता - इंदिरा संत

इंदिरा संत यांच्या समग्र कवितेचा वेध घेणारा संग्रह पॉप्युलर प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. कवयित्री अरुणा ढेरे यांनी तो संपादित केला आहे. या संग्रहास ढेरे यांनी लिहिलेल्या विचक्षण प्रस्तावनेतील संपादित अंश..…. 

इंदिरा संत हे नाव मराठी कवितेच्या क्षेत्रात प्रथम आले ते सत्तर-बहात्तर वर्षांपूर्वी. १९४० साली 'सहवास' हा त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. मात्र, हा त्यांचा स्वतंत्र संग्रह नव्हता. कवी ना. मा. संत आणि कवयित्री इंदिरा संत या पती-पत्नींचा मिळून तो सिद्ध झाला होता. १९३५ साली ते दोघे विवाहबद्ध झाले आणि मधल्या पाच वर्षांच्या परस्परसहवासाच्या सगळ्या आनंदखुणा वागवीत 'सहवास' आला.

मात्र, इंदिराबाईंची निजखूण उमटली ती 'सहवास'मध्ये नव्हे. ती उमटली 'शेला' या त्यांच्या पहिल्या स्वतंत्र काव्यसंग्रहात. १९५१ साली 'शेला' प्रसिद्ध झाला आणि इंदिरा या नावाची वीजरेघ जाणत्या रसिकांच्या मनात लखलखून उमटली. तिची तीक्ष्ण चमक मर्मज्ञ समीक्षकांनाही दृष्टिआड करता आली नाही.
'शेला'नंतर त्यांचे आणखी आठ संग्रह आले. 'मेंदी' हा दुसरा संग्रह 'शेला'पाठोपाठ चारच वर्षांनी १९५५ मध्ये प्रसिद्ध झाला आणि 'मृगजळ' तर अवघ्या दोनच वर्षांच्या अंतराने १९५७ मध्ये प्रसिद्ध झाला. पुढच्या संग्रहांची प्रकाशनाची गती थोडी संथ झाली. रंगबावरी (१९६४), बाहुल्या (१९७२), गर्भरेशीम (१९८२), चित्कळा (१९८९), वंशकुसुम (१९९४) आणि निराकार (२०००) असे संग्रह सहा-सात वर्षांच्या अंतराने पुढे प्रसिद्ध होत राहिले.

वयाच्या सोळाव्या-सतराव्या वर्षी म्हणजे १९३०-३१ साली इंदिराबाईंच्या कवितालेखनाची सुरुवात झाली. तेव्हापासून 'शेला' हा त्यांचा पहिला स्वतंत्र काव्यसंग्रह प्रसिद्ध होईर्पयचा काळ हा मराठी कवितेतले जुने नामवंत अस्तंगत होण्याचा आणि नवे कवी उदयाला येण्याचा मोठा गजबजता काळ होता. ज्येष्ठ कवी एकापाठोपाठ एक दृष्टिआड होत होते आणि याच दोन दशकांत आधुनिक मराठी कवितेचे सामथ्र्य आणि सौंदर्य प्रकट करणारी विविधगुणी कविता घेऊन अनेक नवे प्रतिभावंत कवीही पुढे आले. 'प्रतिभा', 'जीवनसंगीत' आणि 'दूधसागर' हे बा. भ. बोरकरांचे तीन संग्रह या काळात प्रसिद्ध झाले. पु. शि. रेगे ('फुलोरा' आणि 'दोला'), संजीवनी ('संजीवनी') आणि बा. सी. मर्ढेकर ('शिशिरागम') या कवींचे पहिलेवहिले संग्रह याच काळात प्रसिद्ध झाले. नव्या कवितेची सृजनशील गजबज हे या काळाचे वैशिष्टय़च म्हटले पाहिजे.

इंदिराबाईंच्या कवितेतले नवेपण 'शेला'मध्ये जे प्रथम प्रकटले त्याचे स्वरूप समजून घेण्याआधी या गजबजत्या सर्जक काळाच्या पाश्र्वभूमीवर 'सहवास'चा विचार करणे अगत्याचे आहे. कारण इंदिराबाईंच्या विशिष्ट गुणभारित कवितेच्या प्रातिभ क्षमतांची अर्धस्फुट, पण निश्चित चाहूल 'सहवास'मध्ये लागते आहे. 'सहवास' हा रविकिरण मंडळाच्या छायेतला संग्रह आहे असे सर्वसाधारणपणे मानले जाते. यशवंत आणि माधव जूलियन हे इंदिराबाईंचे आवडते कवी होते. आणि 'सहवास'ला प्रस्तावना आहे तीही यशवंतांचीच आहे.

संत पती-पत्नी त्यांच्या पहिल्यावहिल्या संयुक्त संग्रहाच्या अभिप्रायासाठी रविकिरण मंडळाकडे वळलेले दिसतात. रविकिरण मंडळाच्या छायेतला संग्रह याच भावनेने यशवंतांनी त्याचे स्वागत केले आहे. फर्गसन महाविद्यालयातले विद्यार्थीजीवन, महाविद्यालयामागच्या टेकडीवरचे विहार, तिथल्या कवि-कातळावर रंगलेल्या गप्पा, फुलत जाणारे प्रेम आणि घरच्या विरोधातून झालेला विवाह ही संत दाम्पत्याची पाश्र्वभूमी रविकिरण मंडळाच्या इतिहासातल्या नोंदी पुढे नेणारी होती. विशेषत: श्री. बा. रानडे आणि मनोरमाबाई या दोघांची आठवण यशवंतांना 'सहवास'चे स्वागत करताना येणे स्वाभाविक होते. ते दोघेही कविवृत्तीचे होते आणि प्रेमविवाहानंतर दोघांनीही 'श्री-मनोरमा' या नावाने एकत्रित कवितासंग्रह प्रसिद्ध केला होता. यशवंतांनी साहजिकच या दोघांची आठवण केली आहे आणि इंदिराबाईंची कविता मनोरमाबाईंइतकीच गोड असल्याचा अभिप्राय दिला आहे. इंदिराबाईंच्या किंवा मनोरमाबाई, पद्मा, संजीवनी, शान्ताबाई यांच्या प्रारंभकाळातल्या कवितांमधल्या गोडव्याचा पोत सर्वसाधारणपणे सारखा वाटतो. या कवयित्रींच्या कवितेतला गोडवा त्यांनी व्यक्त केलेल्या आधुनिक जीवनदृष्टीचा आणि काव्यदृष्टीचा आहे. रविकिरण मंडळामध्ये त्यांची कडी काहीशी अडकते ती आधुनिकतेच्या जाणिवेमुळे.

विसाव्या शतकाचा प्रारंभकाळ हा शिकू लागलेल्या स्त्रियांच्या जीवनात चहूबाजूंनी मोकळेपणाचे वारे शिरण्याचा काळ होता. या वाऱ्याने काही लिहित्या स्त्रियांच्या जाणिवांचे पदर उलगडले. स्वतच्या प्रतिमेकडे, कुटुंबाकडे, नातेसंबंधांकडे पारंपरिकापेक्षा स्वतंत्र दृष्टीने पाहण्याचे भान त्यांना आले. त्यामुळे नव्या वळणाची आणि नवा आशय असणारी कविता त्यांच्याकडून लिहिली गेली. हा निराळेपणा आधुनिकतेचा परिणाम म्हणून आलेला होता आणि त्याचे नाते त्या कवयित्रींच्या जीवनानुभवाशी होते. रविकिरण मंडळाशी त्यांचे पुसटसे नाते होते ते अभिव्यक्तीच्या पद्धतीमुळे. 
'सहवास'मध्ये ना. मा. संतांच्या पंचवीस कविता आहेत आणि इंदिराबाईंच्या सदतीस! या कविता बहुतांश प्रीतीच्या कविता आहेत. इंदिराबाईंनी पूर्ववयात जे अनुभवले, पाहिले-साहिले, ते मनातळाशी तसेच आहे. वडिलांच्या वियोगाचे दुख आहे. तापट काकांनी दिलेल्या मनस्तापाचा क्षोभ आहे. वेळोवेळी कुस्करल्या गेलेल्या मनोभावांचे, अपेक्षाभंगांचे, नकारांचे, अन्याय-अपमानांचे सल आहेत. पण प्रियकराच्या सहवासाने त्यावर फुंकर घातली गेली आहे. वय तरुण आहे आणि प्रेम करण्याची शिक्षा म्हणून काकांनी हातावर तप्तमुद्रा उमटवली तरी मनाजोगती साथसोबत मिळाली आहे आणि मनाचा भार तिथे हलका करता येतो आहे.

कोठे खोल तळात पूर्वस्मृतिचे ज्वालामुखी जागृत
त्यांची साहुनि आच नित्य मन हे आतूनिया पोळले

अशी कबुली देतानाच आतले ते कढत रसायन वर आणणे प्रियकरालाही साहवणार नाही म्हणून तो ज्वालामुखी तसाच निद्रिस्त ठेवण्याची त्यांची धडपड आहे. 'कधी कुठे न भेटणार, कधि न काही बोलणार' या व्रताचा उच्चार पुढच्या संग्रहात झाला असला तरी व्रताची सुरुवात मात्र 'सहवास'मध्येच झाली आहे.
मनोरमाबाई, संजीवनीबाई वा पद्माताईंच्या कवितेत दिसतात तसे 'सहवास'मधल्या कवितेत प्रीतिभावनेचे अगदी नाजूक खेळ दिसतात; पण त्या खेळात गुंतलेले अतिसूक्ष्म, अतिखोल आणि अतितरल असे मनोभाव मात्र एकटय़ा इंदिराबाईंच्याच कवितेत अगदी प्रारंभीच्या त्या कवितेतसुद्धा प्रकट होतात.
मातीखालून हरळीची मुळे पुढे सरसरत जावीत तशा या कविता 'शेला'पाशी पोचतात असे वाटते. म्हणूनच की काय, 'शेला'मध्ये काही मोजक्या कविता 'सहवास'मधून निवडून घेतलेल्याच आहेत. 'सहवास'मध्ये आलेल्या कवितांचा लेखनकाळ म्हणजे इंदिराबाईंच्या ऐन तरुणपणाची दहा वष्रे. त्यांच्या वयाच्या पंधराव्या-सोळाव्या वर्षांपासून पंचविसाव्या वर्षांपर्यंतच्या कविता या संग्रहात आहेत. तरी आश्चर्य असे वाटते की, त्यांच्या पूर्ववाचनाची सावली या संग्रहातल्या आशयावर तर कुठे नाहीच, पण अभिव्यक्तीवरही फारशी दाट नाही. 

त्यांचे वडील गेले ते त्यांच्या वयाच्या सातव्या वर्षी. पण वडील असतानाच धार्मिक पुस्तके त्यांच्या ओळखीची झाली होती. रोज रात्री आईबरोबर बसून वडिलांनी वाचलेली आख्याने ऐकण्याची सवय झाली होती. ऐकून ऐकून काही आर्या, काही श्लोक पाठही झाले होते. रोज संध्याकाळी वडील वेगवेगळी स्तोत्रे म्हणायला लावत. सकाळी आई भूपाळ्या म्हणवून घेई. कवितेशी त्यांची ओळख अशी पारंपरिक रचनांमधून झाली. आर्या वृत्त आवडीचे झाले आणि प्राथमिक स्वरूपात कवितेचा- म्हणजे कविता रचण्याचा नादही लागला. शाळेत भेंडय़ा लावताना वृत्त-छंदांमधून कविता रचण्याइतकी कवितेशी सलगी वाढली आणि 'फुलांची परडी' या नावाने स्वरचित कवितेची वहीदेखील झाली.
वडील गेले आणि सुखकारक होते ते सारेच चित्र बदलले. उग्र आणि तापट अशा काकांच्या धाकात वाढत असताना त्यांच्या विरोधामुळे कवितेची वही लपवूनच ठेवावी लागली. पण तिच्यात गुंतलेला जीव काही तिच्यावेगळा झाला नाही. पुढे कविता थोडी जाणती झाली ती फर्गसन महाविद्यालयात शिकत असताना. इथेच तिचा रसिकांशी आणि कवी-समीक्षकांशी संबंध आला. 'ज्योत्स्ना', 'संजीवनी'सारख्या संकलन-नियतकालिकांतून कविता प्रसिद्ध झाल्या. ना. मा. संत भेटले आणि कवितांनी परस्परप्रेमाचे रंग आणखी गडद केले.
इंदिराबाईंनी लिहून ठेवलेली या काळातली एक आठवण त्यांच्या स्वतंत्र कविताकुळीची ओळख देणारी आहे. कोल्हापूरला असताना माधव जूलियनांशी त्यांचा परिचय झाला. माधवरावांनी आपण होऊनच तो करून घेतला आणि त्यांची कवितांची वही मोठय़ा आग्रहाने वाचायला नेली. त्या काळात बाईंचेच शब्द वापरायचे तर त्या 'मोठय़ा भावावर्तात' सापडल्या होत्या. प्रेम केले होते आणि प्रेमाला घरचा अर्थात् काकांचा तीव्र विरोध होता. फर्गसन महाविद्यालय सोडून कोल्हापुरात राजाराम कॉलेजमध्ये येणे भाग पडले होते. अशा काळात संतांची प्रेमभेट असलेली काळ्या रेशमाचे कव्हर असलेली ती सुंदर वही माधवरावांनी वाचायला नेली आणि दुसऱ्याच दिवशी ती परत केली तेव्हा तिच्यात तांबडय़ा पेन्सिलीने सर्वत्र चुका दाखवणाऱ्या खुणा होत्या आणि शेवटी शुद्धलेखन सुधारण्याची सूचना होती. 'आधी जे म्हणायचे ते गद्यात लिहून काढा आणि मग ते कवितेत आणा. ज्ञानेश्वरी वाचा. लावण्या वाचा. शब्दाला स्वतचे व्यक्तिमत्त्व असते हे ध्यानात ठेवा,' असा तोंडी उपदेशही त्यांनी केला. इंदिराबाईंनी लिहिले आहे, 'त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी सर्व वाचले; शब्दांच्या दृष्टीने वाचले. पण त्याचा काही फारसा परिणाम झालेला मला दिसून येत नाही. कोणता का शब्द असेना, त्यात जे तेज कवी निर्माण करतो, त्याने त्या शब्दाला व्यक्तिमत्त्व येते असे माझे त्यावेळी मत झाले.'
इंदिराबाई अशा तऱ्हेने माधव जूलियनांच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्या, किंवा यशवंतांच्या कविता आवडीने वाचत गेल्या, किंवा 'वाग्जयंती'सारखे संग्रह पुनपुन्हा चाळत राहिल्या तरी पूर्वकवींच्या किंवा रविकिरण मंडळाच्या प्रभावळीत त्या जाऊन बसल्या नाहीत. याचे कारण अगदी प्रथमपासूनची त्यांच्या कविवृत्तीची पृथगात्मता आणि त्या पृथगात्मतेची त्यांना असणारी स्पष्ट जाणीव. या पृथगात्मतेची वैशिष्टय़पूर्ण घडण बऱ्याच अंशी त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून म्हणजे त्यांच्या िपडधर्मातून झाली आहे आणि काही अंशी त्यांच्या बालपणीच्या परिसरातून झाली आहे.
तवंदी हे कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवरचे गाव. इंदिराबाईंचे बालपण तिथे गेले. साठ-सत्तर वर्षांपूर्वी खेडय़ातल्या माणसांचे ऐकणे, वाचणे आणि सगळ्याच कला त्यांच्या दैनंदिन व्यवहारात मिसळून गेलेल्या असायच्या. त्या कलांची जीवनाशी असलेली निकटता आणि त्यांचा उत्स्फूर्त आणि सहज असा आविष्कार यांचा ठसा इंदिराबाईंवर फार गाढपणे उमटला. निसर्गातल्या रंग-गंधांनी जीव माखला गेला. आकारांनी दृष्टीवर गारुड केले आणि आविष्काराची अनलंकृत, स्वाभाविक, तरीही प्रतिभासंपन्न अशी पद्धतही त्यांना मनापासून भावली. जीवनाच्या मुक्ततेचा, चतन्याचा, लयपूर्णतेचा आणि सहज-साधेपणाचा गाढ परिणाम मनावर झाला. पुढे तोच कवितेच्या गाभ्याशी राहिला. त्यांच्या पृथगात्मतेची ती एक वेधवंती खूण झाली.

'सहवास' ते 'शेला' हा दहा-अकरा वर्षांचा काळ इंदिराबाईंच्या आयुष्यातला फार सुखाचा आणि फार दुखाचाही काळ ठरला. फार मोठय़ा उलथापालथीचा काळ ठरला. घरचा तीव्र विरोध पत्करून संतांशी त्यांनी प्रेमविवाह केला होता. तीन मुले झाली होती आणि उभ्या जगात परस्परांना आपणच फक्त काय ते आहोत, अशा गाढ विश्वासावर दिवस सरत होते. ते जर तसेच जात राहिले असते तर इंदिराबाई कवयित्री म्हणून फारशा क्रियाशील राहिल्या असत्या असे वाटत नाही. 'माझे स्वप्न माझ्या हाती आले होते. आनंदाने मन भरलेले होते. कवितारचनेकडे माझे लक्ष नव्हते,' असे त्यांनी स्वतकडे वळून बघताना पुढे म्हटले आहे. त्या दहा वर्षांत अवघ्या बारा कविता आणि त्याही बऱ्याचशा अंशी मुलांभोवती केंद्रित अशा त्यांनी लिहिल्या. कविता ही त्या काळात गौण होती. जगण्याच्या केंद्रस्थानी ती आलेली नव्हती.
१९४६ साली संतांच्या आकस्मिक मृत्यूने मात्र संसार एकदम हेलपाटला. पुराचा जबरदस्त तडाखा बसून घरदार होत्याचे नव्हते व्हावे तशी अवस्था झाली. माहेर असून नसल्यासारखेच होते. सासरचेही कोणी नव्हते. तीन मुलांची ती आई अवघी तीसच वर्षांची होती. त्या अवघड आणि शोककारी प्रसंगात सहनशक्तीच्या शोधात इंदिराबाई कवितेकडे वळल्या आणि दोन्ही परस्परांमध्ये वितळून गेल्या. हे वितळणे एकप्रकारे काचेसारखे होते. भावनांचे अतिशय नितळ बिंब धरणारे आणि तरी अगदी कठीण, कणखर असणारे. 

'शेला' सर्वस्वी इंदिराबाईंचा असा पहिला संग्रह. स्वतंत्र असा बासष्ट कवितांचा संग्रह. मनोरमाबाईंच्या कवितेतल्या गोडव्याशी आणि रविकिरण मंडळाच्या शैलीशी काहीशा क्षीण स्वरूपातच, पण दृश्यमान असलेला पूर्वीचा बंध या संग्रहाने पुरा नाहीसा झाला आणि इंदिराबाईंच्या विविध भावावस्थांचे नकाशे-अगदी त्यांच्याच शैलीने कवितेत उमटून आले. ते एकाच मनप्रदेशाचे नकाशे होते आणि तो सारा प्रदेश दुखार्त वाऱ्याने झोडपून गेल्यासारखा झाला होता.
हे दुख तसे अगदी व्यक्तिगत होते. त्याला सामाजिक किंवा सांस्कृतिक दुखांचे परिमाण नव्हते. किंबहुना, एकूणच इंदिराबाईंच्या कवितेला- काही अपवाद वगळता (आणि तशा अपवादात्मक कवितांमध्ये कवितापण उणावलेलेच आहे, हे लक्षात घेता) सामाजिक, सांस्कृतिक सुखदुखाचे भान नाहीच म्हटले तरी चालेल. पतिनिधनाचे दुख फक्त त्यांचे असेच होते, पण ते खरे तर प्रीतीचे दुख होते. ज्याच्यावर जीव उपसून प्रेम केले तो सहचर त्यांनी कायमचा गमावला होता आणि पाण्याबाहेर काढलेल्या मासोळीसारखी त्यांची कविता जीव घाबरा होईपर्यंत तडफड करीत होती. वाचणाऱ्याला सहन होऊ नये इतकी ती तडफड निकराची होती.
'शेला'मधल्या याच अनुभवाचा विस्तार अधिक उचंबळून 'मेंदी'त आणि त्याहीपेक्षा जास्त उसळीने 'मृगजळ'मध्ये झाला आहे. इंदिराबाईंच्या एकूण कवितेत सर्वात उंच चढलेली कविता याच दोन संग्रहांमधली आहे. निसर्ग, प्रेम, विरह, दुख आणि एकाकीपण हे इंदिराबाईंच्या कवितेचे पंचप्राण आहेत असे म्हटले गेले आहे. पण 'शेला', 'मेंदी' आणि 'मृगजळ' या तीनही संग्रहांतल्या (आणि खरे तर पुढच्या सहा संग्रहांतल्याही) एकूण कवितांचे स्वरूप उलगडताना ही पंचप्राणांची कल्पना दूरच सारावी लागते. कारण यांपकी कोणताही एक भावघटक स्वतंत्रपणे इंदिराबाईंच्या कवितेत येत नाहीच. त्यांचे प्रेम म्हणजेच दुख आहे. दुखाच्या गाभ्यातच विरह आहे. विरहाची मिठी एकाकीपणाला आहे. आणि या सगळ्यात निसर्ग विरघळून एकजीव झालेला आहे.

Tuesday, April 15, 2014

मुंबईचा पोवाडा


ई. सन १७९० च्या आसपास मल्हारी नावाचा दक्षिणेतील एक मराठा शाहीर मुंबईत आला. मुंबईचे वैभव पाहून याच्या कवीमनावर फार परिणाम झाला, आणि याने दख्खनी बोलीत चार कडव्यांची एक सुंदर लावणी तयार केली.

या लावणीचं कवन खुद्द गवर्नर साहेबांसमोर करण्यात आलं. मुंबईचं इतकं सुंदर आणि विस्तृत वर्णन ऐकून त्यांनी मल्हारी शाहीरास ३०० रु बक्षीस म्हणून दिले. पण देताना शाहीरास परत आपल्या गावी जाण्यास सांगितले. हेतू असा होता की हे विस्तृत वर्णन इंग्रजांच्या शत्रूंच्या, म्हणजेच फ्रेंच आणि मराठे यांच्या, कानी पडू नये.

आपल्यासाठी यां लावणीतील आरमाराच्या वर्णनाचा उतारा इथे देत आहे.

बावडीकुं बंब बांधकर पाणी भेजवता जहाजोमें ||
हजारो आरमार खडी देखत तमासा बंदरमें ||
कांटेसे तोफा चढाकर उतार लेते किल्लेमें ||
पहाडसारिखे जहाज बनाते कारखाना गोदीमें ||
सो हत्तीसें काम ना हुवे सो एक आदमीने करना ||
उसमेंसें जहाज निकल कर बडे पानीमे ले जाना ||२||

मुंबई शहर गुलजार मुंबादेवी है ठिकाणा ||
इंग्रजकी साहेबी चलता उप्पर किल्ला नमुना ||
अजब तऱ्होंका टापु मुंबई जरा है दखनमें ||
शिव शंकर पैगंबर देव रहेते है ते बसतीमें ||

- मुंबईचा पोवाडा. शाहीर मल्हारी. लेखन साल अंदाजे ई. सन १७९०

Thursday, April 10, 2014

savarkaranche kisse

When Savarkar was studying law at the University College of London, there was a professor, whose last name was Peters, who felt animosity for Savarkar, and because never lowered his head towards him, their "arguments" were very common.
One day, Mr. Peters was having lunch at the dining room of the University and Savarkar came along with his tray and sat next to the professor. The professor, in his arrogance, said, "Mr Savarkar: you do not understand... a pig and a bird do not sit together to eat ", to which Savarkar replies, "You do not worry professor, I'll fly away ", and he went and sat at another table.
Mr. Peters, green of rage, decides to take revenge on the next test, but Savarkar responds brilliantly to all questions. Then, Mr. Peters asked him the following question, "Mr Savarkar, if you are walking down the street and find a package, and within it there is a bag of wisdom and another bag with a lot of money; which one will you take?"
Without hesitating, Savarkar responded, "the one with the money, of course".
Mr. Peters, smiling, said, "I, in your place, would have taken the wisdom,don't you think?"
"Each one take what one doesn't have", responded Savarkar indifferently.
Mr. Peters, already hysteric, writes on the exam sheet the word "idiot" and gives it to Savarkar. Savarkar takes the exam sheet and sits down. A few minutes later, Savarkar goes to the professor and says, "Mr. Peters, you signed the sheet, but you did not give me the grade."
-----------------------
Salute to the great son of our motherland VD Savarkar.
PRABODHAK