Showing posts with label Powada. Show all posts
Showing posts with label Powada. Show all posts

Tuesday, April 15, 2014

मुंबईचा पोवाडा


ई. सन १७९० च्या आसपास मल्हारी नावाचा दक्षिणेतील एक मराठा शाहीर मुंबईत आला. मुंबईचे वैभव पाहून याच्या कवीमनावर फार परिणाम झाला, आणि याने दख्खनी बोलीत चार कडव्यांची एक सुंदर लावणी तयार केली.

या लावणीचं कवन खुद्द गवर्नर साहेबांसमोर करण्यात आलं. मुंबईचं इतकं सुंदर आणि विस्तृत वर्णन ऐकून त्यांनी मल्हारी शाहीरास ३०० रु बक्षीस म्हणून दिले. पण देताना शाहीरास परत आपल्या गावी जाण्यास सांगितले. हेतू असा होता की हे विस्तृत वर्णन इंग्रजांच्या शत्रूंच्या, म्हणजेच फ्रेंच आणि मराठे यांच्या, कानी पडू नये.

आपल्यासाठी यां लावणीतील आरमाराच्या वर्णनाचा उतारा इथे देत आहे.

बावडीकुं बंब बांधकर पाणी भेजवता जहाजोमें ||
हजारो आरमार खडी देखत तमासा बंदरमें ||
कांटेसे तोफा चढाकर उतार लेते किल्लेमें ||
पहाडसारिखे जहाज बनाते कारखाना गोदीमें ||
सो हत्तीसें काम ना हुवे सो एक आदमीने करना ||
उसमेंसें जहाज निकल कर बडे पानीमे ले जाना ||२||

मुंबई शहर गुलजार मुंबादेवी है ठिकाणा ||
इंग्रजकी साहेबी चलता उप्पर किल्ला नमुना ||
अजब तऱ्होंका टापु मुंबई जरा है दखनमें ||
शिव शंकर पैगंबर देव रहेते है ते बसतीमें ||

- मुंबईचा पोवाडा. शाहीर मल्हारी. लेखन साल अंदाजे ई. सन १७९०

Sunday, May 6, 2012

Powada on Baji Prabhu Deshpande

चौक १
जयोऽस्तु ते श्रीमहन्‌मंगले शिवास्पदे शुभदे ।
स्वतंत्रते भगवति त्वामहम् यशोयुतां वंदे ॥१॥
स्वतंत्रते भगवती या तुम्ही प्रथम सभेमाजीं ।
आम्ही गातसों श्रीबाजीचा पोवाडा आजी ॥२॥
चितूरगडिंच्या बुरुजानो त्या जोहारासह या ।
प्रतापसिंहा प्रथितविक्रमा या हो या समया ॥३॥
तानाजीच्या पराक्रमासह सिंहगडा येई ।
निगा रखो महाराज रायगड की दौलत आयी ॥४॥
जरिपटका तोलीत धनाजी संताजी या या ।
दिल्लीच्या तक्ताचीं छकलें उधळित भाऊ या ॥५॥
स्वतंत्रतेच्या रणांत मरुनी चिरंजीव झाले ।
या ते तुम्ही राष्ट्रवीरवर या हो या सारे ॥६॥
चाल
घनदाट सभा थाटली । गर्जना उठली ।
घोर त्या कालीं । जय छत्रपतींचा बोला ।
जय स्वतंत्रतेचा बोला । जय भवानी की जय बोला ।
तुम्ही मावळे बोल हर हर महादेव बोला ।
चला घालुं स्वांत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥१॥
चौक २
हर हर गर्जुनि वीर मावळे सर्व सज्ज असती ।
परंतु कोठें चुकले बाजी यांत कां न दिसती ॥१॥
हाय हाय तो म्लेंछासंगें घडित बसे साची ।
स्वदेशभूच्या पायासाठीं बेडी दास्याची ॥२॥
ऐकुनियां शिवहृदय हळहळे म्हणे दूत हो जा ।
बोधुनि वळवा वीर बाजि तो तुम्ही राष्ट्रकाजा ॥३॥
चाल
शिवदूत तेधवां जाती । बाजिला वदती ।
सोड रे कुमती । कां म्लेंच्छ कसाई भजसी ।
कां दास्य-नरकिं तूं पचसी । कां जिणें तुच्छ हें नेसी ।
स्वदेश नाहीं, स्वराज्य नाहीं, धिक या देहाला ।
चला घालुं स्वातत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥२॥
चौक ३
बाजीराया म्लेंछ सबळ हा दोष न काळाचा ।
ना देवाचा ना धर्माचा किंवा नशिबाचा ॥१॥
देशद्रोही चांडाळांचा भरला बाजार ।
गुलमगिरी जे देती त्यांसी निष्ठा विकणार ॥२॥
तुम्हीच ना स्वातंत्र्य चिरियलें या पोटासाठीं ।
तुम्हीच ना रे भूमातेच्या नख दिधलें कंठीं ॥३॥
चाल
हो सावध बाजीराया । दास्यिं कां काया ।
झिजविशी वाया । तुज भगवान्‌ श्री शिवराजा ।
स्वातंत्र्य प्राप्तिच्या काजा । बोलावी तिकडे जा जा ।
देशभक्तिची सुधा पिउनि घे प्रायश्चित्ताला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥३॥
चौक ४
शिवदूताचे बोल ऐकतां बाजी मनिं वदला ।
काळसर्प मीं कसा उराशी मित्र म्हणुनि धरिला ॥१॥
घरांत शिरला चोर तया मी मानुनिया राजा ।
बंड बोलिलों शिवरायाच्या परमपूत काजा ॥२॥
माता माझी कष्टविली मीं राजनिष्ठ त्यासी ।
या पाप्यानें युद्ध मांडिलें देशरक्षकांशीं ॥३॥
चाल
जा सांगा शिवभूपाला । अशा अधमाला ।
राजनिष्ठाला । त्वां आधीं शतधा चिरणें ।
तुज करवीं घडतां मरणें । पावेन शुद्धि मग मानें ।
तुझ्या करींच्या तरवारीच्या घेइन जन्माला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥४॥
चौक ५
देशभूमिच्या कसायासि कां इमान मी देऊ ।
भाकरि देतो म्हणुनि तयाच्या चाकरीस राहूं ॥१॥
कवणाची भाकरी बंधु हो चाकरि कवणाची ।
भाकर दे भूमाता चाकरि तिच्या घातकांची ॥२॥
राज्य हिसकलें देश जिंकला त्या पर अधमाशीं ।
राजनिष्ठ मी राहुनि कवण्या साधित नरकासी ॥३॥
चाल
ही गुलामगिरिची गीता । राजनिष्ठता ।
ह्यापुढें आतां । मद्देशचि माझा राजा ।
तो प्राण देव तो माझा । मी शरण शिवा सांग जा ।
राख उडाली प्रदीप्त बाजी वैश्वानल ठेला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥५॥
चौक ६
लोट धुळीचा सुटला अवचित दीन शब्द उठला ।
लगट करुनि शिद्दिनें पन्हाळा गड वेढुनि धरिला ॥१॥
लक्ष्मीचे मृदु कमल शारदा सुंदरिचा वीणा ।
स्वतंत्रतेचा कलिजा अडके गडांत शिवराणा ॥२॥
अफझल्याच्या वधा स्मरोनी फाजल सुत त्याचा ।
करितो पण कीं शिवभूपाला जिवंत धरण्याचा ॥३॥
चाल
बापासि तुझ्या जो खडे । चारि रोकडे ।
जाशि त्याकडे । जीवंत धरुं तरि साचा ।
जीवंत पवन धरण्याचा । अभ्यास आधिं कर याचा ।
खुशाल हरिणा मग तूं धावें धरण्या वणव्याला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥६॥
चौक ७
बाजि लागला शिवभूपाच्या थोडा कानाला ।
हातीं भाला एक मावळा गडाखालिं आला ॥१॥
शिद्दि पाहतां चुकुनि हात तरवारीला गेला ।
दाबुनि त्याला मुजरा केला धीट नीट वदला ॥२॥
शिवाजि राजा जिवंत येतो तुमच्या गोटाला ।
उद्यां सकाळीं करुं गड खालीं कळवी तुम्हांला ॥३॥
चाल
ऐकुनी शिद्दि बहु फुगला । रिपूजन भुलला ।
परस्पर वदला । अजि खान, खानखानाजी ।
हुए शिकस्त मराठे हैं जी । फिर लढना क्यौं कर आजी ।
चलो शराब उडायें ताजी । आप लेवजी, नहीं आप लेवजी ।
आप गाजि आप तो रणगाजी । झिंगविला अरि सर्प फुंकुनी पुंगी गुंगविला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥७॥
चौक ८
गुगवोनि अरि सर्प शिवा गारोडि गडावरि तो ।
प्रहर रात्र उलटतां मराठी जादू मग करितो ॥१॥
कृष्णपक्षिच्या काळ्या काळ्या रात्रीं त्या दडल्या ।
गर्द झाडिला भिउनि चांदण्या बाहेरि न पडल्या ॥२॥
अशा तमीं किलकिलें दार का तटावरी झालें ।
बाजि निघाले श्री शिव आले आले शत भाले ॥३॥
भाला खांद्यावरी मराठा घोडयावरि स्वारी ।
भरतां घोडा थै थै नाचे तोंचि शीळ झाली ॥४॥
चाल
वीर हो टाच घोडयाला । बाण हा सुटला ।
हटविणें त्याला । रिपु तुडवित व्हा व्हा पार ।
चौक्यासि तुम्हा दावील । काजवा चोर कंदील ।
गेला गडतळ गेला सत्तर मैल भूप आला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥८॥
चौक ९
तुरी शिद्धिच्या हातीं देउनि सुटता शिवनृपती ।
अब्रह्मण्यम् कितिक भाबडीं भोळिं भटें वदतीं ॥१॥
अब्रह्मण्यम् यांत कायरे दोष कोणता तो ।
आला ठक ठकवाया उलटा भला ठकविला तो ॥२॥
साप विखारी देश जननिला ये घ्याया चावा ।
अवचित गांठुनि फसवुनि भुलवुनि असाच ठेचावा ॥३॥
चाल
ये यथा प्रपद्यंते माम् । भजाम्यहं तान् ।
तथैव; धीमान् । भारतीं कृष्ण वदला हें ।
अधमासि अधम या न्यायें । रक्षिलें राष्ट्र शिवरायें ।
राष्ट्ररक्षका सावध हो रिपु हुडकित तुज आला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥९॥
चौक १०
हात जोडितों पाया पडतों बाजि तुझ्या राया ।
गड अवघड रांगणा तिथें तुम्ही जाणें या समया ॥१॥
राष्ट्रदेविचा हस्त कुशल तूं तरि लाखों भाले ।
अम्हासारिखे मिळतील; चिरतिल चरचर रिपु सारे ॥२॥
जाऊं काय मी बाजि मृत्युमुखिं ढकलुनि तुम्हाला ॥
कधीं शिवा जातिचा मराठा मृत्यूला भ्याला ॥३॥
चढा गड तुम्ही यशोदायिनी तोफ पांच करा ।
तोंवरि लढवूं गनीम अडवूं खिंड करुं निकरा ॥४॥
चाल
वसुदेव तूंचि शिवराया । कंस कपटा या ।
करुनियां वाया । स्वातंत्र्य कृष्ण चिन्मूर्ती ।
जा घेउनि अपुल्या हातीं । गड गोकुळांत नांदो ती ।
गडीं चालला शिव तो खिंडित दीन शब्द उठला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥१०॥
चौक ११
आले आले गनीम खिंडिंत चवताळुनि आले ।
झाले झाले सज्ज मराठे सरसावुनि भाले ॥१॥
संख्या दुप्पट रिपुची, परि ते निकरानें लढती ।
हर हर गर्जुनि समर रंगणीं तुटोनियां पडती ॥२॥
खङगाचे खणखणाट त्या मधिं शर सणसण येती ।
मारण मराणावीण नेणती वीर रणीं रंगती ॥३॥
चाल
तो हर हर एकचि झाला । वदति रे चला ।
म्लेंछ हा हटला । चला चढवा नेटाचा हल्ला ।
वीरश्रीचा करा रे हल्ला । निकराचा चालु द्या हल्ला ।
मारित हाणित हटवित म्लेंछा खिंडिपार केला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपुवरी घाला ॥११॥
चौक १२
म्लेंछ हटवितां बाजी वळुनी गडाकडे पाहे ।
श्री शिव चाले मागे बघुनियां वीर गर्जताहे ॥१॥
गडांत जाईल राष्ट्रदेविचा जिवलग शिवराणा ।
तोंवरि लढवूं खिंड शूर हो हा अपुला बाणा ॥२॥
त्या वाण्याच्या आधिं रणांगणि जरी घडे मरणें ।
पुनर्जन्म घेउनी तत्क्षणीं पुनः पुन्हा लढणें ॥३॥
चाल
रघुराया रावणहरणा । कंसमर्दना ।
भो जनार्दना । लाडक्या देश जननीचे ।
स्वातंत्र्य रक्षणीं साचे । हे प्राण दान जरि अमुचे ।
पवित्र हे जरि त्वत्प्रिय हे जरि दे तरि सुयशाला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥१२॥
चौक १३
आले आले गनीम चालुनि पुनरपि तों आले ।
झाले जाले सज्ज पुनरपी उठावले भाले ॥१॥
दीन दीन रण शब्दा हर हर महादेव भिडला ।
भिडला ओष्ठीं दंत मस्तकीं खङग वक्षिं भाला ॥२॥
हल्ला चढवित परस्परावरि पुनः पुन्हा लढती ।
नटती योद्धे समरभाजनीं वीररसा लुटिती ॥३॥
चाल
कचरला मराठी भाला । बाजि तों आला ।
तोलुनी धरिला । रणिं रंग पुन्हा ये साचा ।
गर्जती मराठे रिपुचा । घ्या सूड म्लेंच्छ मत्तांचा ।
उगवावा सूड देशाचा । आणि सूड स्वातंत्र्याचा ।
भोसका कटयारी बरच्या । करा माळा रिपुच्या आंतडयाच्या ।
लावा उटया त्यांच्या रक्ताच्या । त्याचा मस्तक चेंडू साचा ।
समररंगणीं चेंडूफळीचा डाव भरा आला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥१३॥
चौक १४
डाव उलटला म्लेंच्छावरी तो पुन्हा परत हटला ।
जय झाला परि वीर मराठा बहुतांशी पडला ॥१॥
तिकडे गडिंच्या तोफा अजुनी पांच कां न सुटती ।
वीर मराठे सचिंत आशाबद्ध सर्व बघती ॥२॥
तशांत घेउनि ताजी टोळी फाजलखां येतो ।
धन्य बाजिची; पुन्हा उसळुनी अशनी सम पडतो ॥३॥
खिंड तोफ तिज मधुनी सुटला गोळा श्री बाजी ।
रणीं तळपतो वीरश्रीचा रणनवरा बाजी ॥४॥
चाल
तों गोळी सूं सूं आली । अहो त्या काळीं ।
मर्मिं ती घुसली । श्री बाजी विव्हळ पडला ।
मागुती कांहिंसा उठला । बेहोष वीर परि वदला ।
तोफे आधीं न मरे बाजी सांगा मृत्यूला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥१४॥
चौक १५
थांबा बाजी जखम तरि पुरी बांधूं द्या थांबा ।
हर हर रणिंचा ऐकुनि वीरा उसळुं नका थांबा ॥१॥
जखम कुठें रे असे फक्त मी तृषाक्रांत थोडा ।
रिपुरक्ताते पितों घटघटा सोडा मज सोडा ॥२॥
खरी जखम भू-आईस माझ्या, फोडी हंबरडा ।
ओढुनि अरिची अंतडी बांधुया पट्टि तिला सोडा ॥३॥
भले मराठे लढा तसेची आलो मी सोडा ।
प्रखर आपुली भूक शमविण्या रिपु नरडी फोडा ॥४॥
चाल
होईल तोफ शिवबाची । क्षणीं दो क्षणिंची ।
तोवरी साची । खिंड लढवाची ।
फेडाया ऋण या भूचें । अजि उष्ण बिंदु रक्ताचे ।
द्या मुद्दल मोजुनि साचें । व्याज तिला स्वातंत्र्य देउनी फेडा कर्जाला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥१५॥
चौक १६
काय वाजलें ? बाजीराया बार न गडिं झाला ।
शिला कोसळे, पान सळसळे, पक्षी ओरडला ॥१॥
लढा तरी मग वीर चला हो रणांत घुसलों मी ।
रक्तें मढवूं लढवूं खिंडिची तसू तसू भूमी ॥२॥
शपथ तुम्हाला वृक्ष, पक्षि, जल, शिला तेज, वारे ।
मरतां आम्ही तोफेपूर्वी लढा तुम्ही सारे ॥३॥
देहबंध तो तुटला बाजीराय धरे पडला ।
वीरवराचा विव्हल आत्मा नयनाशीं भिडला ॥४॥
चाल
तों बार धडाधड झाले । प्राण परतले ।
हास्य मुख केलें । हा पहिला बार शिवाचा ।
हा दुसरा स्वतंत्र्याचा । हा तिसरा चवथा साचा ।
बार पांचवा धडाडला जय गर्जुनि प्राण दिला ।
चला घालुं स्वातंत्र्य संगरीं रिपूवरीं घाला ॥१६॥
चौक १७
दिव्य द्युतिचा चकचकाट आकाशीं कोंदटला ।
रथ श्रीमती स्वतंत्रतेचा भूवरती आला ॥१॥
ऊठ चितोडा ऊठ देविला उत्थापन द्याया ।
प्रतापसिंहा प्रथित विक्रमा उठि मंगल समया ॥२॥
भूमातेच्या तान्ह्या उठि कां वीतचिंत व्हाना ? ।
असे कुशल रांगण्यांत तुमचा जिवलग शिवराणा ॥३॥
स्वांतत्र्याचा पोवाडा हा ऐकाया आलां ।
उठा सर्व स्वातत्र्यवीरवर जयमंगल बोला ॥४॥
चाल
श्री स्वतंत्रता भगवती । बाजिला नेती ।
आपुल्या रथीं । गंधर्व तनन तैं करिती ।
दुंदुभी नभीं दुमदुमती । श्री बाजी स्वर्गा जाती ।
करी चराचर विश्व बाजिच्या जयजयकाराला ।
चला घालुं स्वांत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥१७॥
चौक १८
चला मराठे रणीं पहुडले जे आणिक सुर ते ।
पावन खिंडिंत बसून तीसह जाति नभः पंथें ॥१॥
श्री बाजीचें रक्त पेरिलें खिंडिंत त्या काळा ।
म्हणुन रायगडिं स्वातंत्र्याचा थोर वृक्ष झाला ॥२॥
अहो बंधु हो पूर्वज ऐसे स्वतंत्र रणगाजी ।
स्वतंत्र त्या पूर्वजां शोभतां वंशज कां आजी ॥३॥
विनवि विनायक समजुनि घ्यावें यांतिल अर्थाला ।
चरण घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥४॥
स्वदेश नाहीं स्वराज्य नाहीं धिक् या देहाला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥५॥

Thursday, March 8, 2012

Powada on Chhatrapati Shivaji Maharaj

 

Hi Friends,
Mahatma Jyotiba Phule had written Powade on various topics to educate the illiterate people. Following is the Powada written by Jyotiba on the great Chhatrapati Shivaji Maharaj, this throws the light on History as was known at that time.


चौक १
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥ध्रु०॥
लंगोटयांस देई जानवीं पोषींदा कूणब्याचा । काल तो असे यवनांचा ॥
शिवाजीचा पिता शहाजी पुत्र मालोजीचा । असे तो डौल जहागिरीचा ॥
पंधराशें एकूणपन्नास साल फळलें । जुन्नर तें उदयासी आलें ॥
शिवनेरी किल्ल्यामध्यें बाळ शिवाजी जन्मलें । जिजीबाईस रत्‍न सांपडलें ॥
हातापायांचीं नखं बोटं शुभ्र प्याजी रंगीलें । ज्यांनीं कमळा लाजिवलें ॥
वरखालीं टिर्‍या पोटर्‍या गांठी गोळे बांधले । स्फटिकापरि भासले ॥
सान कटी सिंहापरी छाती मांस दुनावलें । नांव शिवाजी शोभलें ॥
राजहौंसी उंच मान माघें मांदे दोंदीलें । जसा का फणीवर डोले ॥
एकसारखे शुभ्र दंत चमकूं लागले । मोतीं लडीं गुंतविलें ॥
रक्तवर्ण नाजूक होटीं हासूं छपिवले । म्हणोन बोबडें बोले ॥
सरळ नीट नाक विशाळ डोळ्या शोभलें । विषादें मृग वनीं गेले ॥
नेत्र तीखे बाणी भवया कमठे ताणीले । ज्यांनी चंद्रा हाटिवलें ॥
सुंदर विशाळ भाळवटी जावळ लोंबलें । कुरळे केंस मोघीले ॥
आजानबाहू पायांपेक्षां हात लांबलेले । चिन्ह गादिचें दिसलें ॥
जडावाचीं कडीं तोडे सर्व अलंकार केले । धाकटया बाळा लेविवलें ॥
किनखाबी टंकोचें मोतीं घोसानें जडलें । कलाबतुचे गोंडे शोभले ॥
लहान कुंची पैरण बिरडी बंद लावले । डाग लाळीचे पडलेले ॥
हातापायांचे आंगठे चोखी मुखामधी रोळे । पायीं घुंगरुं खुळखुळे ॥
मारी पाठोपाठ लाथाबुक्या आकाश शोभले । खेळण्यावर डोळे फिरवीले ॥
मजवर हा कसा खेळणा नाहीं आवडले । चिन्ह पाळणीं दिसलें ॥
टाहीपेटे रडूं लागला सर्व घाबरले । पाळण्या हलवूं लागले ॥
धन्य जिजाबाई जिनें जो जो जो जो जो केलें । गातों गीत तिनें केलें ॥
चाल
जो जो जो जो जो जो गाऊ, जी जी जी जी जीजी गाऊं ।
चला वेरुळास जाऊं, दौलताबादा पाहूं ॥
मूळ बाबाजीस ध्याऊं, कीर्ति आनंदाने गाऊं ।
सरदारांत उमराऊ, सोबतीस जाधवराऊ ॥
पाटील होते गांवोगाऊ, पुत्रावरी अती जीऊ ।
थोर विठोजी नांव घेऊं, सान मालोजी त्याचा भाऊ ।
दीपाबाई त्यास देऊं, छंदाजोगा गिती गाऊं ॥
चाल
मालोजी राजा । तुझा बा आजा ॥
यवनी काजा । पाळिल्या फौजा ॥
लाविल्या ध्वजा । मारिल्या मौजा ॥
वेळेस मुक्का । साधल्या बुक्का ॥
विचारी पक्का । जाधवा धक्का ॥

शेशाप्पा नायका । ठेविचा पैका ।
द्रव्याची गर्दी । चांभारगोंदी ॥
देवळें बांधी । तळीं ती खांदी ॥
आगळी बुद्धि । गुणानें निधि ॥
लिहिलें विधि । लोकांस बोधी ॥
संधान साधी । जसा पारधी ॥
भविषी भला । कळलें त्याला ॥
सांगोनी गेला । गादी बा तुला ॥
चाल
उपाय नाहीं जाणोन चाकर झाला यवनाचा । शिपाई होता बाणीचा ॥
खोटया दैवा कोण खोडी बेत देवाजीचा । पवाडा गातो शिवाजीचा ॥
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥१॥
चौक २
वडील बंधु संभाजीनें लळे पुरवीले । धाकटयासवें खेळले ॥
उभयतांचें एक चित्त तालमींत गेले । फरीगदग्या शिकले ॥
आवडीनें खमठोकीं कुस्ती पेंचानें खेळे । पवित्रे दस्तीचे केले ॥
द्वादशवर्षी उमर आली नाहीं मन धालें । घोडी फिरवूं लागले ॥
आट्टल घोडेस्वार भाला बोथाटी शीकले । गोळी निशान साधले ॥
कन्या वीर जाधवाची जिनें भारथ लावलें । पुत्रा नीट ऐकविलें ॥
अल्पवयाचे असतां शिकार करुं लागले । माते कौतुक वाटलें ॥
नित्य पतीचा आठव डोंगर दुःखाचे झाले । घर सवतीनें घेतले ॥
छाती कोट करुन सर्व होतें साटिवलें । मुखमुद्रेनें फसविले ॥
चतुर शिवाजीनें आईचें दुःख ताडिले । पित्यास मनीं त्यागिले ॥
पुत्राचे डोळे फिरले माते भय पडलें । हीत उपदेशा योजिलें ॥
मनीं पतिभक्ति पुता बागेमधीं नेलें । वृक्षछायीं बसीवलें ॥
पूर्वजांचे स्मरण करुन त्यास न्याहाळीलें । नेत्रीं पाणी टपटपलें ॥
या क्षेत्राचे धनी कोणकोणी बुडविले । सांगतें मुळीं कसें झालें ॥
क्षेत्रवासी म्हणोन नांव क्षत्रिय धरलें । क्षेत्रीं सुखी राहिले ॥
अन्यदेशिचे दंगेखोर हिमालयीं आले । होते लपून राहिले ॥
पाठीं शत्रु भौती झाडी किती उपासी मेले । गोमासा भाजून धाले ॥
पाला फळें खात आखेर ताडपत्रा नेसले । झाडी उल्लंघून आले ॥
लेखणीचा धड शीपाया सैनापति केलें । मुख्य ब्रह्मा नेमलें ॥
बेफाम क्षत्रिय होते अचूक टोळ उतरले । कैदी सर्वांस केलें ॥
सर्व देशीं चाल त्याचें गुलाम बनीवले । डौलानें क्षुद्र म्हणाले ॥
मुख्य ब्रह्म राजा झाला जानें कायदे केले । त्याचे पुढें भेद केले ॥
ब्रह्मा मेल्यावर परशराम पुंड माजले । उरल्या क्षत्रिया पिडीले ॥

महारमांग झाले किती देशोधडी केले । ब्राह्मण चिरंजीव झाले ॥
देश निक्षत्रिय झाल्यामुळें यवना फावलें । सर्वांस त्यांहीं पिडीलें ॥
शुद्र म्हणती तुझ्या हृदयीं बाण टोचले । आज बोधाया फावलें ॥
गाणें गातें ऐक बाळा तुझ्या आजोळीं शिकले । बोलीं नाहीं मन धालें ।
चाल
क्षेत्र क्षत्रियांचें घर, तुझे पितृ माहावीर । सुखा नसे त्यांच्या पार,
आल्या गेल्याचें माहेर ॥ शीखराकार डोंगर, नानावल्ली तरुवर ॥
परीं खोरीं वाहे नीर खळखळे निरंतर । झाडा फुलें झाला भार,
सुगंधी वाहे लहर । पक्षी गाती सोळा स्वर, मंजूळ वाणी मनोहर ॥
नदी नाले सरोवर, शोभे कमळांचा भार । भूमी अती काळसर,
क्षेत्र देई पीका फार ॥ धाव घेती दंगेखोर, दिला क्षेत्रियास मार ।
दास केले निरंतर, ब्रह्मा झाला मनीं गार ॥ लोभी मेले येथें फार, विधवा झाल्या घरोघर ।
उपाय नाहीं लाचार, स्त्रिया वंदी पाटावर ॥ दुसरा झाला शीरजोर, परशा तोबा कठोर ।
मार त्याचा अनीवार, केला क्षत्रियां संव्हार ॥ क्षत्रिय केले जरजर, भये कांप थरथर ।
दुःखा नाहीं त्यांच्या पार, ठाव नाहीं निराधार ॥ बहु केले देशापर, बाकी राहि मांगमाहार ।
निःक्षेत्रीं झाल्यावर, म्लेंच्छें केलें डोकें वर । आले सिंधुनदावर, स्वार्‍या केल्या वारोंवार ।
गातें कटावांत सार, लक्ष देई अर्थावर ।
चाल
काबुला सोडी । नदांत उडी ॥
ठेवितो दाढी । हिंदूस पीडी ॥
बामना बोडी । इंद्रियें तोडी ॥
पिंडीस फोडी । देवळें पाडी ॥
चित्रास तोडी । लेण्यास छेडी ॥
गौमांसी गोडी । डुकरां सोडी ॥
खंडयास ताडी । जेजूरी गडी ॥
भुंग्यास सोडी । खोडीस मोडी ॥
मूर्तीस काढी । काबूला धाडी ॥
झाडीस तोडी । लुटली खेडीं ॥
गडास वेढी । लावली शीडी ॥
हिंदूस झोडी । धर्मास खोडी ॥
राज्यास बेडी । कातडी काढी ॥
गर्दना मोडी । कैलासा धाडी ॥
देवळें फोडी । बांधीतो माडी ॥
उडवी घोडी । कपाळा आढी ॥
मीजास बडी । ताजीम खडी ॥
बुरखा सोडी । पत्‍नीस पीडी ॥
गायनीं गोडी । थैलीतें सोडी ॥
चाल
माताबोध मनीं हसतां राग आला यवनांचा ।
बेत मग केला लढण्याचा ॥ तान्हाजी मालुसरे बाजी फसलकराचा ।
स्नेह येशजी कंकाचा ॥ मित्रा आधीं ठेवी जमाव केला मावळ्यांचा ।
पूर करी हत्यारांचा ॥ मोठया युक्तीनें सर केला किल्ला तोरण्याचा ।
रोविला झेंडा हिंदूचा ॥ राजगड नवा बांधला उंच डोंगराचा ।
भ्याला मनीं विजापुरचा । दुसरा भ्याला मेला बेत नव्हता पूर्वीचा ।
दादोजी कोंडदेवाचा ॥ मासा पाणीं खेळे गुरु कोण असे त्याचा ।
पवाडा गातो शिवाजीचा ॥ कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा ।
छत्रपती शिवाजीचा ॥२॥
चौक ३
जाहागीरचा पैसा सारा लावी खर्चास । चाकरी ठेवी लोकांस ॥
थाप देऊन हातीं घेई चाकण किल्ल्यास । मुख्य केले फिङ्‌र्गोजीस ॥
थोडया लोकांसहीत छापा घाली सुप्यास । कैद पाहा केलें मामास ॥
सुप्यासोबत हातीं घेतलें तीनशें घोडयास । करामत केली रात्रीस ॥
मुसलमानां लाच देई घेई कोंडाण्यास । सिंहगड नांव दिलें त्यास ॥
पुरंधरी जाई जसा भला माणूस न्यायास । कैद पाहा केलें सर्वांस ॥
गांव इनाम देऊन सर्वां ठेवी चाकरीस । मारलें नाहीं कोणास ॥
वाटेमधीं छापा घालून लुटी खजीन्यास । सांठवी राजगडास ॥
राजमाचीं लोहगडीं लढे घेई तिकोण्यास । बाकी चार किल्ल्यांस ॥
मावळ्यांस धाडी कोकणीं गांव लुटायास । धूर्त योजी फितूरास ॥
सन्मान कैद्यां देई पाठवि वीजापूरास । मुलान्या सुभेदारास ॥
विजापुरीं मुसलमाना झाला बहु त्रास । योजना केली कपटास ॥
करनाटकीं पत्र पाठवी बाजी घोरपडयास । कैद तुम्ही करा शहाजीस ॥
भोजनाचें निमित्त केलें नेलें भोसल्यास । दग्यानें कैद केलें त्यास ॥
थेट शहाजी कैदी आणिला विजापूरास । खुशी मग झाली यवनास ॥
चिरेबंदी कोठडीमध्यें बंद केलें त्यास । ठेविलें भोक वार्‍यास ॥
शहाजीला पिडा दीली कळलें शिवाजीस । ऐकून भ्याला बातमीस ॥
पिताभक्ति मनीं लागला लागला शरण जायास । विचारी आपला स्त्रियेस ॥
साजे नांव सईबाई स्त्री सुचवी पतीस । ताडा दंडीं दुसमानास ॥
स्त्रीची सुचना सत्य भासली लिहिलें पत्रास । पाठवी दिल्ली मोगलास ॥
चाकर झालों तुमचा आतां येतों चाकरीस । सोडवा माझ्या पित्यास ॥
मोलग थैली गेली थेट मुसलमानास ठेविले किल्ल्यावर त्यास ॥
बाजी शामराज का लाजला जात सांगायास । धरुं पाही शिवाजीस ॥
धेड म्हणावा नाक नाही द्यावा कोणास । अडचण झाली बखरीस ॥
सिद्धिस बेत गेला नाहीं अंतीं भ्याला जिवास । काळें केलें महाडास ॥
शाहाजीचा बाजी आखेर घेईल बक्षीस । हा पाजी मुकला जातीस ॥
करनाटकीं आज्ञा झाली शाहाजीस । यवन भ्याला सिंहास ॥
वर्षे चार झालीं शिवला नाहीं कबजास । पिताभक्ति पुत्रास ॥
चंद्रराव मोर्‍यास मारी घेई जावळीस । दुसरे वासोटा किल्ल्यास ॥
प्रतापगड बांधी पेशवा केला एकास । नवे योजी हुद्यास ॥
आपली बाकी काढी धाडी पत्र तगाद्यास । चलाखी दावी मोंगलांस ॥
रात्रीं जाऊन एकाएकीं लुटी जुन्नरास । पाठवी गडी लुटीस ॥
आडमाग करी हळूंच गेला नगरास । लुटी हत्तीघोडयांस ॥
उंच वस्त्रे, रत्‍नें होन कमती नाहीं द्रव्यास । चाकरि ठेवि बारगिरांस ॥
समुद्रतीरीं किल्ले घेई पाळी गलबतांस । चाकरी ठेवि पठाणास ॥
सिद्दि पेशव्या आपेश देई घेई यशास । उदासी लाभ शिवाजीस ॥
आबझूलखान शूर पठाण आला वांईस । शोभला मोठा फौजेस ॥
हातीं बारा हजार घोडा त्याचे दिमतीस । कमी नाहीं दारुगोळीस ॥
कारकुनाला वचनीं दिलें हिवरें बक्षीस । फितविलें लोभी ब्राह्मणांस ॥
गोपीनाथ फसवी पठाणा आणि एकांतास । चुकला नाहीं संकेतास ॥
मातेपायीं डोई ठेवी, लपवी इत्यारास । बरोबर आला बेतास ॥
समीप येतां शिवाजी जसा भ्याला व्याघ्रास । कमी करी आपल्या चालीस ॥
गोपीनाथ सुचना देई भोळ्या यवनास । भ्याला तुमच्या शिपायांस ॥
वर भेटभाव वाघनख मारीं पोटास । भयभित केलें पठाणास ॥
पोटीं जखम सोसी केला वार शिवाजीस । झोंबती एकमेकांस ॥
हातचलाखी केली बिचवा मारी शत्रूस । पठाण मुकला प्राणास ॥
स्वामीभक्ती धाव घेई कळले शिपायास । राहिला उभा लढण्यास ॥
त्याची धोप घेई शिवाजी बचवी आपल्यास । तान्हाजी भिडे बाजूस ॥
दांती दाढी चावी तोडी घेई धनी सूडास । घाबरें केलें दोघांस ॥

नांव सय्यदबंधू साजे शोभा आणी बखरीस । लाथाळी जीवदानास ॥
तान्हाजीला हूल देई मारी हात शिवाजीस । न्याहाळी प्रेतीं धण्यास ॥
उभयतांसीं लढतां मुकला आपल्या प्राणास । गेला जन्नत स्वर्गास ॥
छापा घाली मारी करी कैद बाकी फौजेस । पठाणपुत्र खाशा स्त्रियेस ॥
चार हजार घोडा लूट कमी नाहीं द्रव्यास । दुसर्‍या सरंजामास ॥
अलंकार वस्त्रें देई सर्व कैदी जखम्यांस । पाठवि विजापूरास ॥
वचनीं साचा शिवाजी देई हिवरें बक्षीस । फितुर्‍या गोपीनाथास ॥
नाचत गात सर्व गेले प्रतापगडास । उपमा नाहीं आनंदास ॥
चाल
शिवाचा गजर जयनामाचा झेंडा रोविला ॥
क्षेत्र्याचा मेळा मावळ्याचा शिकार खेळला ॥
मातेपायीं ठेवी डोई गर्व नाहीं काडीचा ।
आशिर्वाद घेई आईचा ॥ आलाबला घेई आवडता होता जिजीचा ।
पवाडा गातो शिवाजीचा ॥ कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा ।
छत्रपती शिवाजीचा ॥३॥
चौक ४
लढे रांगणीं विशाळगडीं घेई पन्हाळ्यास । केले मग शुरु खंडणीस ॥
रुस्तुल जमाना आज्ञा झाली विजापूरास । नेमिला कोल्हापूरास ॥
स्वार तीन हजार घेई थोडया पायदळास । आला थेट पन्हाळ्यास ॥
मार देत शिवाजी पिटी कृष्णा पैलतडीस । अती जेर केलें त्यास ॥
खंडणी घेत गेला भिडला विजापूरास । परत मग आला गडास ॥
राजापुर दाभोळ लुटी भरी खजीन्यास । मात गेली विजापुरास ॥
सिद्दी जोहरा नेमी मोठी फौज दिमतीस । सावंत सिद्दी कुमकेस ॥
बंदोबस्त करी शिवाजी राही पन्हाळ्यास । करी मग जमा बेगमीस ॥
वारंवार छापे घाली लुटी भौंती मुलखास । केलें महाग दाण्यास ॥
त्रासानें खवळून वेढा घाली शिवाजीस । कोंडिले गडीं फौजेस ॥
चार मास लोटले शिवाजी भ्याला वेढयास । योजना करी उपायास ॥
कोंकणामधीं सिद्दी झोडी रघुनाथास । उपद्रव झाला रयतेस ॥
फासलकर बाजीराव पडले वाडीस । दुःख मग झालें शिवाजीस ॥
सिद्दी जोहरा निरोपानें गोंवी वचनास । खुशाल गेला भेटीस ॥
वेळ करुन गेला उरला नाहीं आवकास । कच्चा मग ठेवी तहास ॥
सिद्दीस लाडी गोडी मधी मान डुकलीस । गेला थाप देऊन गडास ॥
सिद्धया पोटीं खुष्याली जाई झोपीं सावकास । हयगय झाली जप्तीस ॥
तों शिवाजी पळून गेला घेई पाठी रात्रीस । फसविलें मुसलमानास ॥
सिद्दी सकाळीं खाई मनीं लाडू चुरमुर्‍यास । स्वार दळ लावी पाठीस ॥
चढत होता खिंड शिवाजी गांठलें त्यास । बंदुका लावी छातीस ॥
बाजीपरभु मुख्य केला ठेवि मावळ्यास । एकटा गेला रांगण्यास ॥
स्वामीला वेळ दिला बाजी भिडला शत्रूस । हरवी नित्य मोगलास ॥
दोन प्रहर लढे वाट दिली नाहीं त्यास । धन्य त्याच्या जातीस ॥
मोठी मोगल फौज दाखल झाली साह्यास । खवळला बाजी युद्धास ॥
अर्धे लोक उरले सरला नाहीं पाउलास । पडला परभू भूमीस ॥

तो शिवाजी सुखी पोहंचला कान सुचनेस । अंती मनीं हाच ध्यास ॥
बार गडीं ऐकून सुखी म्हणे आपल्यास । नीघून गेला स्वर्गास ॥
सय्यद मागें सरे जागा देई बाजीरावास । पाहून स्वामीभक्तीस ॥
विजापुरीं मुसलमान करी तयारीस । खासा आला लढण्यास ॥
कराडास डेरे दिले घेई बहू किल्ल्यांस । वश करी चाचे लोकांस ॥
दळव्यासीं लडून घेई शृंगारपुरास । मारलें पाळेगारांस ॥
लोकप्रीतिकरितां करी गुरु रामदासास । राजगडीं स्थापी देवीस ॥
मिष्ट अन्न भोजन दिलें सर्वां बक्षीस । केली मग मोठी मजलस ॥
तानसैनी भले गवय्या बसवी गायास । कमी नाहीं तालस्वरास ॥
चाल
जीधर उधर मुसलमानी । बीसमिलाही हिंमानी ॥
सच्चा हरामी शैतान आया । औरंगजीब नाम लिया ॥
छोटे भाइकूं कैद हूल दिया । बडे भाईकी जान लिया ॥
छोटेकूंबी कैद किया । लोक उसके फितालिया ॥
मजला भाई भगा दिया । आराकानमें मारा गया ॥
सगे बापकूं कैद किया । हुकमत सारी छिनलीया ॥
भाईबंदकूं इजा दिया । रयत सब ताराज किया ॥
मार देके जेर किया । खाया पिया रंग उडाया ॥
आपण होके बेलगामी । शिवाजीकू कहे गुलामी ॥
आपण होके ऐशआरामी । शिवाजीकूं कहे हरामी ॥
बरे हुवा करो सलामी । हिंदवाणी गाव नामी ॥
चाल
आदी आंत न । सर्वां कारण ॥
जन्ममरण । घाली वैरण ॥
तोच तारण । तोच मारण ॥
सर्व जपून । करी चाळण ॥
नित्य पाळण । लावी वळण ॥
भूतीं पाहून । मनीं ध्याईन ॥
नांव देऊन । जगजीवन ॥
सम होऊन । करा शोधन ॥
सार घेऊन । तोडा बंधन ॥
चाल
सरनौबती डंका हुकूम पालेकराचा । घेई मुजरा शाईराचा ॥
सुखसोहळे होतां तरफडे सावंत वाडीचा । पवाडा गातो शिवाजीचा ॥
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥४॥
चौक ५
सावंत पत्र लिही पाठवी विजापूरास । मागे फौज कुमकेस ॥
बाजी घोरपडा बल्लोळखान येती साह्यास । शिवाजी करी तयारीस ॥
त्वरा करुन गेला छापा घाली मुधोळांस । मारिलें बाजी घोरपडयास ॥
भाऊबंद मारिलें बाकी शिपाई लोकांस । घेतलें बाप सूडास ॥
सावंताची खोड मोडून ठेवी चाकरीस । धमकी देई पोर्च्युग्यास ॥
नवे किल्ले बांधी डागडुजी केली सर्वांस । बांधिलें नव्या जाहाजास ॥
जळीं सैनापती केले ज्यास भीती पोर्च्युग्यीस । शोभला हुद्दा भंडार्‍यास ॥
विजापूरचा वजीर गुप्त लिही शिवाजीस । उभयतां आणलें एकीस ॥
व्यंकोजी पुत्रा घेई शाहाजी आला भेटीस । शिवाजी लागे चरणास ॥
शाहाजीचे सद्‌गुण गाया नाहीं आवकास । थोडेसे गाऊ अखेरीस ॥
सुखसोहळे झाले उपमा लाजे मनास । उणें स्वर्गी सुखास ॥
अपूर्व वस्तू घेऊन जाई विजापूरास । भेट मग देई यवनास ॥
पराक्रमी शिवाजी पाळी पाऊण लक्षास । साजे यवनी स्नेहास ॥
विजापूरचा स्नेह होता लढे मोगलास । घेतले बहूतां किल्ल्यास ॥
सर्व प्रांतीं लूट धुमाळी आणिलें जेरीस । घावरें केलें सर्वांस ॥
संतापानें मोंगल नेमी शाइस्तेखानास । जलदि केली घेई पुण्यास ॥
चाकणास जाऊन दावी भय फिङ्‌र्गोजीस । फुकट मागे किल्ल्यास ॥
मास दोन लढला घेऊन सर्व फौजेस । खान खाई मनास ॥
अखेर दारु घालून उडवी एका बुर्जास । वाट केली आंत जायास ॥
वारोंवार हल्ले गर्दी करुं पाहे प्रवेश । शाइस्ता पठाण पाठीस ॥
मागें पळति सर्व कोणी मानिना हुकूमास । भीति आंतल्या मर्दास ॥
लागोपाठ मार देत हटवि पठाणास । खचला खान हिंमतीस ॥
प्रातःकाळीं संतोषानें खाली केले किल्ल्यास । देई मुसलमानास ॥
फिङर्गोजीला भेट देती खुषी झाली यवनास । देऊन मान सोडी सर्वांस ॥
शिवाजीची भेट घेतां सन्मान दिला त्यास । वाढवी मोठया पदवीस ॥
फिड्‌र्गोजीचें नांव घेतां मनीं होतो उल्हास । पीढीजाद चाकरीस ॥
येशवंतशिंग आले घेऊन मोठया फौजेस । मदत शाईस्तेखानास ॥
सरनौबत भौती लुटी नगरी मुलखास । जाळून पाडिला ओस ॥
पाठी लागून मोंगल भारी त्याच्या स्वारांस । जखमा केल्या नेटाजीस ॥
राजगड सोडून राहीला सिंव्हगडास पाहून मोगलसेनेस ॥
जिजाबाईचें मुळचें घर होतें पुण्यास । खान राही तेथें वस्तीस ॥
मराठयांस चौकी बंदी गांवांत शिरण्यास । होता भीत शिवाजीस ॥
लग्नवर्‍हाडी रुपें केला पुण्यांत प्रवेश । मावळे सोबत पंचवीस ॥
माडीवर जाऊन फोडी एका खिडकीस । कळालें घरांत स्त्रीयांस ॥
शाइस्त्यास कळतां दोर लावी कठडयास । लागला खालीं जायास ॥
शिवाजीनें जलदी गांठून वार केला त्यास । तोडीलें एका बोटास ॥
स्त्रिपुत्रां सोडून पळे पाठ दिली शत्रूस । भित्रा जपला जिवास ॥
आपल्या पाठिस देणें उणें शिपायगिरीस । उपमा नाहीं हिजडयास ॥
सर्व लोकांसहित मारिलें खानपुत्रास । परतला सिंहगडास ॥
डौलानें मोंगल भौती फिरवी तरवारीस । दावी भय शिवाजीस ॥
समीप येऊं दिले हुकूम सरबत्तीस । शत्रू पळाला भिऊन मारास ॥
करनाटकी बदली धाडी शाइस्तेखानास । मुख्य केलें माजमास ॥
राजापुरीं जाई शिवाजी जमवी फौजेस । दावी भय पोर्च्यूग्यास ॥
सर्व तयारी केली निघाला नाशिक तीर्थास । हुल कसी दिली सर्वांस ॥
मध्यरात्रीं घेई बरोबर थोडया स्वारांस । दाखल झाला सुर्तेस ॥
यथासांग साहा दिवस लुटी शहरास । सुखी मग गेला गडास ॥
बेदनूराहून पत्र आलें देई वाचायास । आपण बसे ऐकायास ॥
शिपायाचे बच्चे शाहाजी गेले शिकारीस । लागले हरणापाठीस ॥
घोडया ठेंच लागे उभयतां आले जमीनीस । शाहाजी मुकला प्राणास ॥
पती कैलासा गेले कळलें जिजीबाईस । पार मग नाहीं दुःखास ॥
भुमी धडपडे बैसे रडून गाई गुणांस । घेई पुढे शिवाजीस ॥
चाल
अतीरुपवान बहु आगळा । जैसा रेखला चित्री पूतळा ॥
सवतीवर लोटती बाळा । डाग लाविला कुणबी कुळा ॥
सवतीला कसें तरी टाळा । कज्जा काढला पती मोकळा ॥
खर्‍या केंसानें कापि का गळा । नादीं लागला शब्द कोकिळा ॥
मूख दुर्बळ राही वेगळा । अती पिकला चिंतेचा मळ ॥
झाला शाहाजी होता सोहळा । मनीं भूलला पाहूनी चाळा ॥
बहुचका घेती जपमाळा । जाती देऊळा दाविती मोळा ॥
थाट चकपाक नाटकशाळा । होती कोमळा जशा निर्मळा ॥
खर्‍या डंखिणी घाली वेटोळा । विषचुंबनीं देती गरळा ॥
झाला संसारीं अती घोटाळा । करी कंटाळा आठी कपाळा ॥
मनीं भिऊन पित्याच्या कुळा । पळ काढला गेले मातुळा ॥
छातीवर ठेवल्या शिळा । नाहीं रुचला सवत सोहळा ॥
चाल
कमानीवर । लावले तीर ॥
नेत्रकटार । मारी कठोर ॥
सवदागर । प्रीत व्यापार ॥
लावला घोर । सांगतें सार ॥
शिपाई शूर । जुना चाकर ॥
मोडक्या धीर । राखी नगर ॥
आमदानगर विजापूरकर ॥ मंत्री मुरार ॥
घेई विचार ॥ वेळनसार ।
देई उत्तर ॥ धूर्त चतुर ।
लढला फार ॥ छाती करार ॥
करी फीतूर ॥ गुणगंभीर ।
लाविला नीर ॥ होता लायक ।
पुंडनायक ॥ स्वामीसेवक ।
खरा भाविक ॥
चाल
सिंहगडावर गेला बेत केला क्रियेचा । बजावला धर्म पुत्राचा ॥
रायगडी जाई राही शोक करी पित्याचा । शत्रु होता आळसाचा ॥
दुःखामधीं सुरु बंदोबस्त करी राज्याचा । पवाडा गातो शिवाजीचा ॥
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा ॥ छत्रपती शिवाजीचा ॥५॥
चौक ६
सर्व तयारी केली राजपद जोडी नांवास । शिक्का सुरु मोर्तबास ॥
अमदानगरीं नटून पस्त केलें पेठेस । भौतीं औरंगाबादेस ॥
विजापूरची फौज करी बहुत आयास । घेई कोकणपट्टीस ॥
सावध शिवाजी राजे आले घेऊन फौजेस । ठोकून घेई सर्वांस ॥
जळीं फौज लढे भौती मारी गलबतास । दरारा धाडी मक्केस ॥
माल्वणीं घेऊन गेला अवचित फौजेस । पुकारा घेतो मोगलास ॥
जाहाजावर चढवी फौज गेला गोव्यास । लुटलें बारशिलोरास ॥
जलदी जाऊन गोकर्णी घेई दर्शनास । लुटलें मोंगल पेठांस ॥
पायवाटेनें फौज पाठवी बाकी लुटीस । आज्ञा जावें रायगडास ॥
स्वतां खासी स्वारी आज्ञा लोटा जाहाजास । निघाला मुलखीं जायास ॥
मोठा वारा सुटला भ्याला नाहीं तुफानास । लागले अखेर कडेस ॥
औरंगजीब पाठवी राजा जयशिंगास । दुसरे दिलीरखानास ॥
ठेवले मोगल अमीर येऊन पुण्यास । वेढिलें बहुतां किल्ल्यांस ।
मानकरी शिवाजी घेई बसे मसलतीस । सुचेना कांहीं कोणास ॥
बाजी परभू भ्याला नाहीं दिलीरखानास । सोडिलें नाहीं धैर्यास ॥
हेटकरी मावळे शिपाइ होते दिमतीस । संभाळी पुरंधरास ॥
चातुर्यानें लढे गुंतवी मोगल फौजेस । फुरसत दिली शिवाजीस ॥
फार दिवस लोटले पेटला खान इर्षेस । भिडला किल्लया माचीस ॥
बुर्जाखालीं गेला लागे सुरंग पाडायास । योजी अखेर उपायास ॥
हेटकरी मावळे जाती छापे घालण्यास । पिडीलें फार मोगलास ॥
मोगलाने श्रम केले बेत नेला सिद्धीस । काबीज केलें माचीस ॥
यशस्वी भोसले लागले निर्भय लुटीस । चुकले सावधपणास ॥
हेटकर्‍यांचा थाट नी मारी लुटार्‍यास । मोगल हटले नेटास ॥
बाजी मावळ्यां जमवी हातीं घेई खांडयास । भिडून मारी मोगलास ॥
मोगल पळ काढी पाठ दिली मावळ्यास । मर्द पाहा भ्याले उंद्रास ॥
लाजे मनीं दिलीरखान जमवी फौजेस । धीर काय देई पठाणास ॥
सर्व तयारी पुन्हा केली परत हल्ल्यास । जाऊन भिडला मावळ्यास ॥
बाजी मार देई पठाण खचले हिमतीस । हटती पाहून मर्दास ॥
पराक्रम बाजीचा पाही खान खोच मनास । लावीला तीर कमानीस ॥
नेमानें तीर मारी मुख्य बाजी परभूस । पाडिला गबरु धरणीस ॥
सय्यद बाजी ताजीम देती घेती बाजूस । सरले बालेकिल्ल्यास ॥
मोगल चढ करती पुन्हा घेती माचीस । धमकी देती मावळ्यास ॥
हेटकरी मारी गोळी फेर हटवि शत्रूस । पळवी इशानी कोणास ॥
वज्रगडाला शिडी लाविली आहे बाजूस । वरती चढवी तोफांस ॥
चढला मोगल मारी गोळे बालेकिल्ल्यास । आणले बहू खराबीस ॥
हेटकरी मावळे भ्याले नाहीं भडिमारास । मोगल भ्याला पाऊसास ॥
मोगल सल्ला करी शिवाजी नेती मदतीस । घेती यवनी मुलखास ॥
कुलद्रोही औरंगजीब योजी कपटास । पाठवि थैली शिवाजीस ॥
शिवाजीला वचन देऊन नेई दिल्लीस । नजरकैद करी त्यास ॥
धाडी परत सर्व मावळे घोडेस्वारांस । ठेविले जवळ पुत्रास ॥
दरबार्‍यां घरीं जाई देई रत्‍न भेटीस । जोडिला स्नेह सर्वांस ॥
दुखणें बाहाणा करी पैसा भरी हकीमास । गूल पाहा औरंगजीबास ॥
आराम करुन दावी शुरु दानधर्मास । देई खाने फकीरास ॥
मोठे टोकरे रोट भरी धाडी मशीदीस । जसा का मुकला जगास ॥
दानशूर बनला हटवि हातिमताईस । चुकेना नित्यनेमास ॥
औरंगजीबा भूल पडली पाहून वृत्तीस । विसरला नीट जप्तीस ॥
निरास कैदी झाला शिवाजी भास मोगलास । चढला मोठया दिमाखास ॥
पितापुत्र निजती टोकरी बदली रोटास । बाकी सोपी चाकरास ॥
जलदी करीती चाकर नेती टोकरास । करामत केली रात्रीस ॥
दिल्ली बाहेर गेले खुलें केले शिवाजीस । नेली युक्ती सिद्धीस ॥
मोगल सकाळीं विचकी दांत खाई होटांस । लावी पाठी माजमास ॥
चाल
औरंगजीबा धूर दीला । पुत्रासवें घोडा चढला ॥
मधींच ठेवी पुत्राला । स्वतां गोसावी नटला ॥
रात्रिचा दिवस केला । गाठलें रायगडाला ॥
माते चरणीं लागला । हळूच फोडी शत्रूला ॥
स्नेह मोगलाचा केला । दरारा देई सर्वांला ॥
चाल
हैद्राबादकर । विजापूरकर ॥
कापे थरथर । देती कारभार ॥
भरी कचेरी । बसे विचारी ॥
कायदे करी । निट लष्करी ॥
चाल
शिवाजीचा बेत पाहून जागा झाला गोव्याचा । बंदोबस्त केला किल्ल्याचा ॥
वेढा घालून जेर केला सिद्दी जंजिर्‍याचा । पवाडा गाती शिवाजीचा ॥
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥६॥
चौक ७
शिवाजी तों मसलत देई मित्र तान्हाजीला । बेत छाप्याचा सुचवीला ॥
तान्हाजीनें भाऊ धाकटा सोबत घेतला । मावळी हजार फौजेला ॥
सुन्या रात्रीं सिंहगड पायीं जाऊन ठेपला । योजिलें दोर शिडीला ॥
दोरीची शिडी बांधली शिपाई कमरेला । हळुच वर चढवीला ॥
थोडी चाहूल कळली सावध उदेबानाला । करी तयार लोकांला ॥
थोडया लोकांसवें तान्हाजी त्यांवर पडला । घाबरा गडकरी केला ॥
रणीं तान्हाजी पडे मावळे पळती बाजूला । सूर्याजी येऊन ठेपला ॥
धीर मोडक्या देई परत नेई सर्वांला । उगवी बंधू सूडाला ॥
उदेबान मारिला बाकिच्या राजपुत्राला । घेतलें सिंहगडाला ॥
गड हाती लागला तान्हाजी बळी घेतला । झालें दुःख शिवाजीला ॥
सिंहगडीं मुख्य केलें धाकटया सुर्याजीला । रुप्याचीं कडीं मावळ्याला ॥
पुरंधर माहूली घेई वरकड किल्ल्याला ॥ पिडा जंजिरी सिद्दयाला ॥
सुरत पुन्हां लुटी मार्गी झाडी मोगलाला । मोगल जेरदस्त केला ॥
कैद करी शिवाजी बाकी उरल्या फौजेला । त्यांमधीं अनेक स्त्रीयाला ॥
सुंदर स्त्रीया परत पाठवी नाहीं भाळला । लाजवी औरंगजीबाला ॥
सरनौबत वीर पाठवी खानदेशाला । शुरु केलें चौथाईला ॥
जलदी मोगल धाडी मोहबतखानाला । देई मोठया फौजेला ॥
औंढापट्टा घेऊन वेढी साल्हेर किल्ल्याला । धिंगाणा दक्षिणेंत केला ॥
गुजर उडी घाली सामना शत्रूचा केला । मोरोबा पठाण पंक्तीला ॥
लढतां पळ काढी दावी भ्याला मोगलाला । जसा खरा मोड झाला ॥
तों मराठे पळती मोगल गर्वानें फुगला । आळसानें ढिला पडला ॥
गुजर संधी पाहून परत मुरडला । चुराडा मोगलाचा केला ॥
बेवीस उमराव पाडले रणभूमीला । नाहीं गणती शिपायांला ॥
लहान मोठे कैदी बाकी सर्व जखम्यांला । पाठवी रायगडाला ॥
मोगल वेढा झोडून मार देत पिटीला । खिदाडी औरंगाबादेला ॥

रायगडीं नित्य शिवाजी घेई खबरेला । गोडबोल्या गोवी ममतेला ॥
एकसारखें औषधपाणी देई सर्वांला । निवडलें नाहीं शत्रुला ॥
जखमा बर्‍या होतां खुलासा सर्वांचा केला । राहिले ठेवी चाकरीला शिवाजीची कीर्ती चौमुलखीं डंका वाजला ।
शिवाजी धनी आवडला ॥ मोगल यवनी शिपायी सोडी चाकरीला ।
हाजरी देती शिवाजीला ॥ पोर्च्युग्यास धमकी देई मागे खंडणीला ।
बंदरी किल्ला वेढीला ॥ मधींच इंग्रज भ्याला जपे मुंबै किल्ल्याला ।
बनया धर्मा आड झाला ॥ दिल्लीस परत नेलें सुलतान माजूमाला ।
दुजें मोहबतखानाला ॥ उभयतांचा बदली खानजाहान आला ।
मुख्य दक्षणेचा केला ॥ मोगलाला धूर देऊन लुटलें मुलखाला ।
गोवळकुंडीं उगवला ॥ मोठी खंडणी घेई धाकीं धरी निजामाला ।
सुखें मग रायगडीं गेला ॥ मोगलाचे मुलखीं धाडी स्वार लुटायाला ।
लुटलें हुबळी शहराला ॥ समुद्रकांठीं गावें लुटी घेई जाहाजांला ।
केलें खुलें देसाईला ॥ परळी सातारा किल्ले घेई पांडवगडाला ।
आणिक चार किल्ल्यांला ॥
चाल
हुकूम विजापुरी झाला । सोडिलें बहुत फौजेला ॥
द्यावा त्रास शिवाजीला । घ्यावें त्याचे मुलखाला ॥
शिवाजी सोदी गुजराला । कोंडी आबदुल करीमाला ॥
केला माहग दाण्याला । शत्रु अती जेर केला ॥
आर्जव करणें शिकला । भोंदिलें सैनापतीला ॥
निघून विजापुरीं गेला । क्रोध शिवाजीस आला ॥
रागाऊन लिहिलें पत्राला । निषेधी प्रतापरावाला ॥
गुजर मनांत लाजला । निघून वराडांत गेला ॥
चाल
आबदुल्यानें । बेशर्म्यानें ॥
फौज घेऊन । आला निघून ॥
रावा प्रताप । झाला संताप ॥
आला घाईनें । गांठी बेतानें ॥
घुसे स्वतानें । लढे त्वेषानें ॥
घेई घालून । गेला मरुन ॥
चाल
प्रतापराव पडतां मोड फौजेचा झाला । पाठलाग मराठयाचा केला ॥
तोफ गोळया पोटीं दडती भिडती पन्हाळयाला । गेले नाहीं शरण शत्रूला ॥
अकस्मात हंसाजी मोहिता प्रसंगीं आला । हल्ला शत्रूवर केला ॥
गुजर दल मागें फिरुन मारी यवनाला । पळीवलें विजापुराला ॥
शिवाजीनें हंसाजीला सरनौबत केला । मोठा अधिकार दिला ॥
हंबिरराव पद जोडलें त्याच्या नांवाला । शिवाजी मनीं सुखी झाला ॥
सेनापतीचे गुण मागें नाहीं विसरला । पोशी सर्व कुटुंबाला ॥
प्रतापराव-कन्या सून केली आपल्याला । व्याही केलें गुजराला ॥
काशीकर गंगाभट घाली डौल धर्माचा । केला खेळ गारुडयाचा ॥
लुटारु शिवाजी सुटला धाक गृह फौजेचा । खर्च नको दारुगोळीचा ॥
बहुरुपी सोंग तूलदान सोनें घेण्याचा । पवाडा गातो शिवाजीचा ॥
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥७॥
चौक ८
विश्वासू चाकर नेमी मुलखीं लुटायाला । शिवाजी कोकणांत गेला ॥
छोटे मोठे गड घेई बांधी नव्या किल्ल्याला । जमाव फौजेचा केला ।
गोवळकुंडीं जाई मागुन घेई तोफांला । फितीवलें कसें निजामाला ॥
करनाटकीं गेला भेटे सावत्र भावाला । वाटणी मागे व्यंकोजीला ॥
लोभीं व्यंकोजी हिस्सा देईना बळासी आला । आशेनें फिरवी पगडीला ॥
बंधू आज्ञा मोडून गर्वानें हट्टीं पेटला । बिर्‍हाडीं रागाऊन गेला ॥
शिवाजीला राग आला कोट छातीचा केला । कैदी नाहीं केलें भावाला ॥
तंजोर बाकी ठेवी घेई सर्व मुलखाला । खडा कानाला लावला ॥
दासीपुत्र संताजी बंधु होता शिवाजीला । करनाटकीं मुख्य केला ॥
हंबीरराव सेनापती हाताखालीं दिला । निघाला परत मुलखाला ॥
वाटेमधी लढून घेई बिलरी किल्ल्याला । तेथें ठेवी सुमंताला ॥
शिवाजीचे मागें व्यंकोजीने छापा घातला । घेतलें स्वतां अपेशाला ॥
जेर झाला व्यंकोजी देई उरल्या हिश्याला । शिवाजी रायगडीं गेला ॥
विजापूरचा साह्य नेई राजे शिवाजीला । मोगल मुलखीं सोडला ॥
मुलखीं धिंगाणा धुळीस देश मिळीवला । सोडिलें नाहीं पिराला ॥
वाटेमधीं मोगल गांठी राजे शिवाजीला । घाबरा अतिशय केला ॥
भिडला शिवाजी मोगल मागें हाटीवला । वाट पुढें चालूं लागला ॥
दुसरी फौज आडवी माहाराज राजाला । थोडेसें तोंड दिलें तिजला ॥
काळ्या रात्रीं हळुच सुधरी आडमार्गाला । धूळ नाहीं दिसली शत्रूला ॥
फौजसुद्धां पोंहचला पटा किल्ल्याला । फसिवलें आयदि मोगलाला ॥
विजापूरचा आर्जव करी धाडी थैलीला । आश्रय मागे शिवाजीला ॥
हांबीरराव मदत पाठवी विजापुराला । बरोबर देई फौजेला ॥
नऊ हजार मोंगलांचा पराभव केला । त्यांनीं मार्ग अडीवला ॥
विजापुरीं जाऊन जेर केलें मोंगलाला । केला महाग दाण्याला ॥
शत्रूला पिडा होतां त्रासून वेढा काढला । मोगल भिऊन पळाला ॥
दिल्लीचा परत बोलवी दिलीरखानाला । पाठवी शाहाजाहानाला ॥
जलदी करुन शिवाजी वळवी पुत्राला । लाविला नीट मार्गाला ॥
तह करुन शिवाजी नेती विजापुरला । यवन घेती मसलतीला ॥
शिवाजीचें सोंवळें रुचले नाहीं भावाला । व्यंकोजी मनीं दचकला ॥
निरास मनीं होऊन त्यागी सर्व कामाला । निरा संन्यासी बनला ॥
शिवाजीने पत्र लिहिलें बधुं व्यंकोजीला । लिहितों पत्र अर्थाला ॥
वीरपुत्र म्हणवितां गोसावीअ कसे बनलां । हिरा कां भ्याला कसाला ॥
आपल्या पित्याचा ठसा कसा जलदी वीटला । मळावांचून काटला ॥
कनिष्ठ बंधू माझ्या लाडक्या पाठी साह्याला । तुम्ही कां मजवर रुसला ॥
बोध घ्या तुम्ही माझा लागा प्रजापालनाला । त्यागा ढोंगधतोर्‍याला ॥
मन उत्तम कामीं जपा आपल्या फौजेला । संभाळा मुळ आब्रूला ॥
कीर्ति तुझी ऐकूं यावी ध्यास माझ्या मनाला । नित्य जपतों या जपाला ।
कमी पडता तुम्ही कळवा माझ्या लोकांला । सोडा मनच्या आढीला ॥
सुभोधाचें पत्र ऐकता शुद्धीवर आला । व्यंकोजी लागे कामाला ॥
शिवाजीला रायगडीं गुडघी रोग झाला । रोगानें अती जेर केला ॥
त्याचे योगें नष्ट ज्वर फारच खवळला । शिवाजी सोसी दुःखाला ॥
यवनीं बिरास भिडतां नाहीं कुचमला । शिवाजी रोगाला भ्याला ॥
सतत सहा दिवस सोसी ताप दाहाला । नाहीं जरा बरळला ॥
सातव्या दिवशीं शिवाजी करी तयारीला । एकटा पुढें आपण झाला ॥
काळाला हूल देऊन स्वतां गेला स्वर्गाला । पडले सुख यवनाला ॥
कुळवाडी मनीं खचले करती शोकाला । रडून गाती गुणांला ॥
चाल
महाराज आम्हासीं बोला । धरला कां तुम्ही अबोला ॥
मावळे गडी सोबतीला । शिपाई केले उघडयाला ॥
सोसिलें उन्हातान्हाला । भ्याला नाहीं पाउसाला ॥
डोंगर कंगर फिरलां । यवन जेरीस आणला ॥
लुटलें बहुत देशांला । वाढवी आपुल्या जातीला ॥
लढवी अचाट बुद्धीला । आचंबा भुमीवर केला ॥
बाळगी जरी संपत्तीला । तरी बेताने खर्च केला ॥
वांटणी देई शिपायांला । लोभ द्रव्याचा नाहीं केला ॥
चतुर सावधपणाला । सोडिलें आधीं आळसाला ॥
लहान मोठया पागेला । नाहीं कधीं विसरला ॥
राजा क्षेत्र्यांमध्यें पहिला । नाहीं दुसरा उपमेला ॥
कमी नाहीं कारस्तानीला । हळूच वळवी लोकांला ॥
युक्‍तीनें बचवी जीवाला । कधीं भिईना संकटाला ॥
चोरघस्ती घेईअ किल्ल्याला । तसेंच बाकी मुलखांला ॥
पहिला झटे फितुराला । आखेर करी लढाईला ॥
युद्धीं नाहीं विसरला । लावी जीव रयतेला ॥
टळेना रयत सुखाला । बनवी नव्या कायद्याला ॥
दाद घेईअ लहानसानाची । हयगय नव्हती कोणाची ।
आकृती वामनमुर्तीची । बळापेक्षां चपळाईची ॥
सुरेख ठेवण चेहर्‍याची । कोंदली मुद्रा गुणरत्‍नाची ॥
चाल
भिडस्त भारी । साबडा घरीं ॥
प्रिय मधुरी । भाषण करी ॥
मोठा विचारी । वर्चड करी ॥
झटून भारी । कल्याण करी ॥
आपासोयरीं। ठेवी पदरीं ॥
लाडावरी । रागावे भारी ॥
चाल
इंग्लीश ज्ञान होतां म्हणे मी पुत्र क्षेत्र्याचा । उडवी फट्टा ब्रह्मयाचा ॥
जोतीराव फुल्यानें गाईला पुत क्षुद्राचा । मुख्य धनी पेशव्याचा ॥
जिजीबाईचा बाळ काळ झाला यवनाचा । पवाडा गातो शिवाजीचा ॥
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥८॥


शाहीर - महात्मा ज्योतिबा फुले




Shahir - Mahatma Jyotiba Phule

Wednesday, February 15, 2012

Original Powada on Tanaji Malusare


Herewith is the Original Powada on Shur Narveer Tanaji Malusare by Shahir Tulashidas.

चौक १
राजगड राजाचा । प्रतापगड जिजाबाईचा ॥
सिंहगड पन्हाळा ॥ पहा त्या मोंगलाचा ॥
सरजा शिवाजी शिवभजन । काबिज केलें तळकोंकण ॥
गड माहुली घेतली । कल्याण भिंवडी काबिज केली ॥
खबर त्या विजापुराला गेली । ठाणें राजाचें बसलें ॥
शिवाजी महाराज राजगड किल्ल्यावर बसले ॥
जिजाबाई माता । आहे प्रतापगडावरी ॥
सोमवाराच्या दिवशीं । हातीं हस्तनाची फणी ॥
उगवते बाजुला नजर गेली । नजर सिंहगडावर गेली ॥१॥


चौक २
बारा मावळ पुण्याखालीं । बारा मावळ जुनराखालीं ॥
पुण्याच्या तोंडाला जेजुरीच्या बारीला । किल्ला सिंहगड पाहिला ॥
नवें कोंबडीचें अंडे । ऐसा किल्ला सिंहगड झळकला ॥
ऐसा पंतोजी तो काका । त्यानें हुजर्‍या बोलाविला ॥
"जावें राजगड किल्ल्याला । अंचवावें प्रतापगडाला" ॥२॥

चौक ३
शिवाजी महाराज पांच पोषाख नटला । पाई तुमानी सुरवारी चढविल्या ॥
अंगी किनखाप घातले । शिरीं जिरीटोप घातला ॥
हातीं वाघनखें घालून । कृष्ण घोडीला जिन केला ॥
ढाल पाठिवरी टाकिता झाला । सोनसाळीं पट्टा हातांत घेतला ॥
कृष्णघोडीला चाबुक केला । आला मढयाच्या घाटाला ॥
घाट मढयाचा उतरला । आला बिरवाडी गांवाला ॥
गांव बिरवाडी सोडिला । आला पोलातपुराला ॥
पोलातपुर पाराचा वेंघला ॥ आले प्रतापगड किल्ल्याला ।
सलाम जिजाबाईला केला ॥३॥


चौक ४
"धाडला तुम्हीं हुजराचा जासूद । काम सांगावें आम्हाला " ।
"शिवाजी महाराज । डाव फांशाचा खेळावा" ॥
"डाव खेळावा उमाजी यानें । तूं माता मी तुझा पुत्र ॥
डाव खेळावा मातेसंगें । हें आमचें महत्त्व नव्हे" ॥
"मायलेकरांचा डाव । ह्यामधिं काही गुंता नाहीं"॥
येवढया जाबावरुन । ज्यानें तिवड मांडिली ॥
हातीं फांसा ह्यानें घ्यावा । "डाव पहिला येऊं दे तुला ॥
मी बायकोची जात । पहिला डाव येऊं दे तुझा" ॥४॥

चौक ५
हातीं फांसा जो घेतला । बारा बारा तो बोलला ॥
फांसा जमिनीवर फेकला । त्याचा तिरपगडा पडला ॥
तिरपगड पडला । त्याची बेती हो पडली ॥
बेती हो बोलला । त्याचे बारा जे पडले ॥
तिन डाव गेले ज्याचे । त्या शिवाजी महाराजाचे ॥
"जिजामाई ग माते । आता डाव येऊं दे तुझा" ॥
येवढया जाबावरुन । बाईनें हाती फांसा घेतला ॥
"प्रतापगडची भवानी देवी । तूं पाव माझ्या नवसाला" ॥
बारा रे बोलली बाई । बाईचे बारा रे पडले ॥
बाई बेतीन बोलली । बाईचे बेतीन पडले ॥
तिरपगडें बोलली । बाईचे तिरपगडें पडलें ॥
जिजाबाईचे डाव पुरे रे झाले ॥५॥


चौक ६
"ऐक जिजाबाई । सत्तावीस किल्ल्यांचा मी राजा ॥
माग माग जिजाबाई । जें मागाल तें देतों तुज ॥
नाशकाची बारी सांवताची वाडी । ह्यांतून किल्ला मागून घ्यावा ॥
तुंक तिकोना लघुगड किल्ला विसापुर । हयांतून कन्‌चा मागून घ्यावा " ॥
’ह्यांतून नको मला बाळा । पुण्याचे तोंडाला ॥
आहे जेजुरीच्या बारीला । पुरंदर किल्ल्याला ॥
बारे पुरंदर किल्ला (ल्लयाला) । आहे सिंहगड किल्ला ॥
घेऊन द्यावा मला । आयुष्य मागेन तुझ्या राज्याला" ॥
नांव घेतां सिंहगडाचें । राजा थरथरां कांपला ॥
"हा किल्ला उदेभान मोगलाचा । बाई उदेभान मोगलाचा ॥
जे उमराव गेले सिंहगडाला । त्यांच्या पाठी ग पाहिल्या ॥
नाहीं पुढे पाहिले । किल्ला आहे वाघाचा जबडा ॥
सत्ताविस किल्ल्यांची बारी । ह्यांतून मागावा बाईनें" ॥
"नाहीं सिंहगड किल्ला दिल्या । मी शाप देईन ॥
राज्य जाळून टाकीन उभे" । "नको बाई चल माझ्या राजगड किल्ल्याला" ॥६॥

चौक ७
बारा भोयांची पालखी । आंत बाईला बसविली ॥
राजगड किल्ल्याला । शिवाजी महाराज जाऊन तक्तावर बसले ॥
ज्यानें वात लावूनी । जात शोधाया लागले ॥
’सिंहगड किल्ला घेणें । मला कोणी उमराव दिसेना’ ॥
प्रहर रात्रीपासुनि । बारांचा अंमल झाला ॥
प्रतापगडाखालीं । उमराठया गांवाला ॥
ज्यानें उमराव शोधिला । माझा तान्या मालुसरा ॥
तानाजी सुभेदार । पन्नास माणसांचा सरदार ॥
शिवाजीराजाचे राज्यास । ऐसा उमराव होणें नाहीं ॥
किल्ला घेईल सुभेदार । तानाजी सुभेदार ॥
खरखर लखोटा लिहीला । ज्यानें हुजर्‍या बोलविला ॥
"जावें उमराठया गांवाला । तानाजी सुभेदाराला ॥
तीन दिसांचा वायदा जो केला ॥ बारा हजार फौज ती घेऊन भेटावें तिसर्‍या दिवसाला ॥७॥
 
चौक ८
पंतोजी तो काका । ज्यानें लखोटा घेतला ॥
ज्यानें राजगड तो सोडिला । आला येल्याचे पेठेला ॥
पेठ येल्याची सोडिली । आला डोणीचे पाण्याला ॥
घाट मढयाचा उतरला । आला बिरवाडी गांवाला ॥
हुजरा तेथून निघाला । आला कोलातपुराला ॥
तेथून निघाला । गेला उमराठया गांवाला ॥
सवा प्रहर दिवस आला । तानाजी सुभेदार सदरेला बैसला ॥८॥

चौक ९
जासूद महाराजांचा पाहिला । तानाजी सुभेदार सुखी झाला ॥
पोटीं रायाबा तो बेटा । सयंवर बाळाचें मांडिलें ॥
काढल्या पंचमीच्या हळदी । काढलें षष्ठीचें लगिन ॥
लगिन बाळाचें मांडिलें । आली सिंहगडची कामगिरी ॥
लगिन रायाबाचें राहिलें । ज्यानें उमराव बोलाविले ॥
ज्याचा शलोर तो मामा । ज्याचा सूर्याबा तो बंधु ॥
येसा कणकर रुमाजी दादा । ज्यानें सरदार बोलाविला ॥
"माझ्या शेलार तूं मामा । आली सिंहगडची कामगिरी" ॥
दादा परपर बाबाजी । ज्यानें हुजर्‍या बोलाविला ॥
मिषा तोड मकाजी । ज्यानें हुजर्‍या बोलाविला ॥९॥
 
चौक १०
मामा बोलाया तो लागला । ऐंशीं वर्षांचा म्हातारा ॥
"लगिन राहिलें रायबाचें तो मजला सांगावी । माझ्या तानाजी सुभेदारा ।
जे गेले सिंहगडाला ॥ त्याचे पाठिरे पाहिले ।
नाहीं पुढारे पाहिले । ज्यानें आंबारे खाईला ।
बाठा बुरजा लाविला ॥ त्याचे झाड होउनि आंबे बांधले ।
किल्ला हातीं नाहीं आला ॥ सिंहगड किल्ल्याची वार्ता ।
काढूं नको तानाजी सुभेदारा ॥ जे गेले सिंहगडाला ।
ते मरुनशानी गेले ॥ तुमचा सपाटा होईल" ।
"असें बोलूं नको रे मामा ॥ आम्ही सूरमर्द क्षत्री ।
नाहीं भिणार मरणाला" ॥१०॥

चौक ११
मग रायाबा तो बेटा । बाबाच्या जवळ आला ॥
"ऐक ऐक माझ्या बाळा । जातों आम्ही सिंहगडाला" ॥
"माझें लगिन करील कोण ?" ॥ रायाबा पुसे बाबाला ॥
"साता नवसांचा माझा रायाबा । त्याचें लगीन मागीन ॥
भिऊं नको माझे बाळा । जातों राजगड किल्ल्याला ।
जाउन सांगतो महाराजाला ॥ सात दिवसांचा वायदा ।
घेऊन येतों तुझ्या लग्नाला ॥ आहे मी महाराजांचा चाकर " ।
लखोटा हातांत घेतला ॥ ज्यानें एका लखोटयाचे ।
बारा लखोटे केले ॥ धाडले कागद खोर्‍याला ॥
मोठया मोठया सरदारांला ॥ पंधरा गांवचे पारुंचे ।
ज्यानें आपणांजवळ बोलाविले ॥ दसपटिचे मोकाशी ।
त्यानें आपणाजवळ बोलाविले ॥ उमराठयाचे शिरके ।
त्यानें आपणांजवळ बिलाविले ॥ नांदविचे सावंत ।
त्यानें आपणांजवळ बोलाविले ॥ वडघरचे नाईक ।
त्यानें आपणांजवळ बोलाविले ॥ सिलमाचे ठाकूर ।
त्यानें आपणांजवळ बोलाविले ॥ बारा हजार फौजेला ।
ज्याचा लखोटा पोंचला ॥११॥
 

चौक १२
’अरे फलाणाचे फलाणा । घाव घाला निशाणा’ ॥
बारा हजार लोक, बिनहत्यारी । होते. सैन्य बोलाया लागलें ॥
बिनहत्यारी लोक । कसे जाऊं महाराजांचे भेटिला ।
ज्यानें सैन्य पाहिलें । बारा हजार लोक बिनहत्यारी आले ॥
आंकडया कोयत्या त्या कमरेला । टापसीच्या खोळा डोईवर घेतल्या ॥
हातीं सोडा घेऊन । सलाम त्यांनीं केला सुभेदाराला ॥
माझे तानाजीची हिम्मत । म्हणून मिळाली जमात ॥
त्यानें पेटारा उघडिला । बारा हजार रुपया बाहेर काढिला ॥
बारा हजार मनुष्यें । त्यांचे हातांमधिं दिला ॥
’दाढि होई रे करावी । चिरी मिरी रे घ्यावी ॥
चला महाराजांचे भेटिला । राजगड किल्ल्याला" ॥१२॥
 

चौक १३
बारा हजार फौज बोलूं लागली । मनीं विचार त्यानें केला ॥
"जातों राजगड किल्ल्याला । धनगर अडविल बायकोला ॥
अब्रु घेईल आमुची । बारा हजार रुपया त्यांनें मागें लावून दिला ॥
सुभेदार बोले त्या सेनेला । "बारा हजार रुपया काय केला ॥

घेतलें धनगराचें घोंगडें । त्याला मागें लावून दिला" ॥

बारा भोयांची पालखी सवारिली । तोरण पालखीला बांधिलें ।
पाय दिला पालखीमध्यें । हात पालखीला दिला ॥
रायाबा तो बेटा । बाबाच्या आडवा येणार झाला ॥
"माझें लगीन करिल कोण । तुम्ही जातां सिंहगडाला" ॥
"भिऊं नको बेटा । तुझे मी येतों लग्नाला ।
आधीं लगीन सिंहगडचें । मग करीन रायाबाचें" ॥१३॥
 
चौक १४
हुकूम ज्यानें भोयांला केला । आले नगरीचे वेशीला ॥
तोरण पालखीचें तुटून उजव्या बाजूवर पडलें ॥
माझ्या शेलार तूं मामा । आम्ही जातों सिंहगडाला ॥
अपशकुन झाला । माझ्या तानाजी सुभेदाराला ॥
तानाजी सुभेदारानें । ह्याचा गुमान नाहीं केला ॥
गेला गांवाच्या शिवेवर । ज्याला आडवा तास गेला ॥
मग तो शेलार मामा बोलला । तानाजी सुभेदाराला ॥
"तानाजी सुभेदारा । मोहोरें बरें नाहीं होणार" ॥
"राजा शिवाजीचें देणें । अढळपदीं सोनें !" ॥१४॥

चौक १५
"अपशकून मानूं नये । ज्यानें हर हर वाहिला" ॥
गांव उमराठें सोडिलें । पांचकर्णांचा बाजा केला ।
आले त्या पोलातपुराला । पांचकर्णांचा बाजा केला ।
गेले बिरवाडी गांवाला । पांचकर्णांचा बाजा केला ।
घाट मढयाचा वेधला । गेले डोणीचे पाण्याला ॥
गलीम तेथुनि निघाला । गेला येल्याच्या पेठेला ॥
गलीम तेथुनि निघाला । गेला रायगडच्या पोटाला ॥
बारांच्या अंमलांत । गेले किल्ल्याच्या पोटाला ॥
बारा हजार फौज चाले । धुरळा गगनास गेला ॥१५॥

चौक १६
हिरव्या बुरुजावरुन । जिजाबाईनें पाहिला ॥
"माझ्या शिवाजीमहाराजा । गलीम वैरियाचा आला ॥
तोफांला आग घाला । गलीम मारावा किल्ल्याखाला" ॥
शिवाजी महाराजानें । गलीम नजरेनें पाहिला ॥
तो शिवाजी महाराजाचा । भगवा झेंडा ओळखिला ॥
"माझे जिजाबाई माते । आमचा तानाजी सुभेदार आला" ॥
नांव घेतलें सुभेदाराचें । बाई गदगदां हांसलि ॥
सेना तानाजीची पाहिली । मनांत संतोषित झाली ॥१६॥

चौक १७
बारा हजार फौज घेऊन । सुभेदार दरवाजाला आला ॥
पहिल्या सदरे जमाडिला । सूर्या गगनीं लखाकला ॥
दुसर्‍या सदरेमधीं । कमरकमर कापुस टाकला ॥
तिसर्‍या सदरेमधीं । ज्यानें चांदवे बांधिले ॥
चवथ्या सदरेमधीं । हंडया झुंबर बांधिले ॥
पाचव्या सदरेमधीं । महाराज शिवाजी बैसले ॥
सुभेदार सलामाला गेला । महाराजावर घुसा केला ॥
"मागचे दिवस मागल्यापरी । मोहरिल दिवस मोहरल्यापरी ॥
माझ्या बेटयाचें लगीन, तुम्हीं जासूद धाडिला । तुमचा काय वाद केला ?" ॥
"ऐक तानाजी सुभेदारा । आमची कामगिरी नव्हे तुम्हांला ॥
जिजामातेनें बोलाविलें" । दोघांचा जबाब जिजाबाईनें ऐकिला ॥
जिजाबाई बोलाया लागली । "मी जातीनें बाईल ॥
आतां सुभेदार येईल । माझी अबरु घेईल" ॥१७॥

चौक १८
सर्व शृंगार नटली । धांवा अंबाबाईचा मांडिला ॥
"भले भले अंबाबाई । तानाजी सुभेदार आला ॥
इच्छेप्रमाणें होऊं दे ।" सिंहगड किल्ल्याची पंचारती केली ॥
गेली सुभेदाराला ओंवाळायला । "तुझे जाऊं अलाबला ॥
तानाजी सुभेदारा । चढत्या दवलतीचें राज्य येऊं दे तुला" ॥
सुभेदाराला ओंवाळितां । त्याचा राग निघून गेला ॥
ज्याला वर्तली चिंता । ही आहे महाराजांची माता ॥
इच्या आरतीला । मी घालूं काय आता ॥
ज्यानें मंदिल काढिला । बाईचे पायांवर ठेविला ॥
जिजाबाई बोलली । तानाजी सुभेदाराला ॥
"माझा सुभेदार शाहाणा ।" हात मस्तकी ठेविला ॥
"माग माग जिजाबाई । जें मागशील (तें) देतों तुला" ॥
"काय मागूं सुभेदाराला ? । ह्या म्हातारपणीं सिंहगड किल्ला ॥
घेऊन द्यावा मला । आयुष्य मागेन तुझ्या राजाला ॥
माझा शिवाजी थोरला माझा तानाजी धाकटा । लेकाचें वाण दिलें त्याला" ॥१८॥

चौक १९
सुभेदार तेथुन निघाला । आपल्या सेनेमधिं आला ॥
शेलार त्याचा मामा । त्याला पुसाया लागला ॥
"गेला बाईच्या भेटीला । तुम्हीं काय मजकूर केला" ॥
"काय सांगू शेलारमामा । जाणें आहे सिंहगडाला" ॥
जावें जावें बाईच्या भेटीला । बारा हजार फौज आली तुझ्या ग कामाला ॥
नाहीं गाढव वळायाला । जेवण कर बारा हजारांला मग आम्ही जाऊ सिंहगडाला" ॥
"माझ्या सुभेदार बाळा । तुजवर घातलें गडाचें ओझें" ॥
"भला भला सुभेदारा । यावें जेवायाला ॥
आहे गडाची रे वस्ती । येथें अन्न रे मिळेल ॥
नाहीं मिळायाचें पाणी । जावें गुंजवर्‍या नदीला ॥
आंघोळ करायाला । मग यावें जेवायाला" ॥१९॥

चौक २०
बारा हजार फौजेनिशीं । सुभेदार गडाखालीं उतरला ॥
गडाखालीं उतरुन ज्यानें विचार काढिला । मग त्या शेलार मामानें ॥
विचार काढिला । "भला भला रे सुभेदारा ॥
तीन कोस जावयाला वेळ फार झाला । धोपर संध्या रे करा ॥
चला जाऊं रे जेवणाला" । बारा हजार फौजेतून ॥
एकटा सुभेदार गेला । गुंजवर्‍या नदीला ।
आंघोळ करायाला ॥ ज्याने आंघोळ संध्या केली ।
आला आपल्या फौजेमधीं ॥ बारा हजार घेऊन ।
आला दरवाजाचे तोंडीं ॥ ज्यानें सैंपाक पाहिला ।
बारा हजार पाट मांडला ॥ बारा हजार दुरुन ।
बारा हजार पंचपात्री ॥ बारा हजार लाविला ठाव ।
सैंपाक वाढून त्वरीत झाली (ला) ॥२०॥

चौक २१
ज्यानें सैंपाक पाहून । हुर्द ज्याचें भरुन आलें ॥
"आग लागो जेवणाला । माझा बाळ अंतरला" ॥
ज्याचा शेलार तो मामा । बोलाया लागला ॥
"भला भला सुभेदार । ऐंशीं वर्षांची उमर ॥
ह्या रे जिजाबाईची । एकटी वाढील रे कुणाला" ॥
मामा बोले सुभेदाराला । "अठरा शाखा अठरा भाज्या ॥
एक ठिकाणीं करा । जेवण वाढिलें फौजेला" ॥
अर्धे उठून उभे राहिले । बारा हजार फौजेनें एकच गर्दी केली ॥
कोणी करतो पोळी पोळी । कोणी करतो खीर खीर ॥
कोणी करतो भाजी भाजी । कोणी करतो डाळ डाळ ।
ज्यानें एकच गर्दी केली । जिजाबाई माता बहुत श्रमी झाली ॥
धांवा अवघा मांडिला । "प्रतापगडची भवानी धांव संकटाला" ॥
पांचजणी देवी । धांवुनिया आल्या ॥
सैंपाक वाढाया लागल्या । ऐकेनात कुणाला ॥
ज्याचा मापटयाचा आहार । त्याचा अधोलीचा झाला ॥
ज्याच्या मोहरें पांच पोळ्या ॥ याच्या पंधरा पोळ्या झाल्या ॥
खाववतील त्यानें खाव्या । उरतील त्यांनीं गडाखालीं टाकाव्या ॥२१॥

चौक २२
बारा हजार फौज । जेऊन तृप्त झाली ॥
तानाजी सुभेदार गेला । शिवाजीच्या मुजर्‍याला ॥
"आम्ही जातों सिंहगडाला । आमचा रायाबा संभाळा ॥
जर आलों सिंहगडाहून । लगीन करीन रायाबाचें ॥
जर गेलों तिकडे मेलो । लगीन करा रायाबाचें ॥
मज बापाची सरदारी । द्यावी रायाबा बेटयाला ।
दिवटी बुदलीची जहागीर । द्यावी रायाबा बेटयाला ।
डोजगांव द्यावा पानसुपारिला । मालसर्‍याला दंड द्यावा इनाम खायाला" ॥
सुभेदार तेथून निघाला । आला बाईचे भेटिला ॥
डोईचा मंदिल काढला । बाईच्या चरणावर ठेविला ॥
"आम्ही जातों सिंहगडाला । माझ्या बेटयाला सांभाळा" ॥
बाईनें पेटारा उघडिला । पांच पोषाख काढिले ॥
त्या ग सुभेदाराला दिले । ’यांतून जरि जगून (जिंकून?) तू आला ॥
नव पोषाख करिन तुला’ । ज्यानें पोषाख तो केला फौजेमधीं गेला ॥२२॥

चौक २३
शेलार मामानें पाहिला । "माझ्या ऐक सुभेदारा ।
बारा हजार फौज आली रे तुझ्या कामाला ॥ हा पोषाक तो घ्यावा नेऊनशानी द्यावा ।
देशील तर द्यावा बारा हजाराला" । येवढया जाबावरुन ।
बाई मनीं चरकली ॥ काय सांगू सुभेदाराला ।
देईन बारा हजाराला ॥ चढविन सिंहगडची पायरी ।
बाईनें कोठार उघडिले ॥ ’मोहरे येर’ बारा हजार तलवार ।
बारा हजार काढिल्या ढाला ॥ बारा हजार गूर्दा ।
बारा हजार सिंगडा ॥ बारा हजार चौकडा ।
बारा हजारांना तोडा ॥ बारा हजार पोषाक ।
बारा हजारांना केसरी झगा ॥ घेरदार, बारा हजार ।
कोणी उमराव समजेना ॥ एकापेक्षां एक अधिक ।
दादा फौज निघाली ॥२३॥

चौक २४
’माझे जिजाबाई माते । माझ्या बाळाला सांभाळा" ॥
तानाजी सुभेदार । बारा भोयाचे पालखीमधिं बसला ॥
सर्व सेनेला मग तो मुजरा केला ॥ बसा बसा दादांनो ॥
आम्हीं जातों सिहगडाला । आमचा रामराम तो घ्यावा ॥
ज्यानें राजगड तो सोडीला । पांच कर्णांचा बाजा केला ॥
गलीम तेथून निघाला । साखरेच्या मुक्कामी गेला ॥
पांच कर्णांचा बाजा केला ॥ गलीम तेथून निघाला ।
गेला खामगांवाला । पाच कर्णांचा बाजा केला ॥
गलीम तेथून निघाला । गेला डेर्‍याच्या मुक्कामी ॥
पांच कर्णांचा बाजा केला । गलीम तेथून निघाला ॥
गेला सिंहगडच्या पोटाला । तेथुनि कर्णा बंद केला ॥२४॥

चौक २५
गलीम आनंदी, बारीला । दबा दिला भला ॥
माझ्या शेलार मामानें काळी घोंगडी हांतरिली । विडे पैजेचे मांडले ॥
"ज्यानें विडा उचलावा । त्यानें जावे सिंहगडाच्या माहितीला ॥
माहिती काढून येईल त्याला । छत्री घोडा इनाम त्याला, बारा गांव इनाम देईन त्याला" ॥
ज्या वीरांच्या वरती माना । त्यांनीं खालती घातल्या ॥
हात कोणी लाविना विडयाला । तानाजी सुभेदार भला ॥
त्यानें हात विडयाला घातला ॥ विडा मंदिलीं खोंविला ॥२५॥

चौक २६
"सूर्याबा रे बंधु आरता येरे माझ्या दादा । आम्ही जातों सिंहगडाला ॥
जगुनशानि आलों । लगीन करुं रायाबाचें ॥
गेलों तिकडे मेलों । लगीन करा रायाबाचें" ॥
तानाजी सुभेदार त्यानें पोषाक काढिला । पाटलाचा थाट केला ॥
जंगल लागलें दारुण । वेळु करकरां वाजती ॥
लागलें चिंवारीचें रान । लागलें आळविचें रान ॥
आरीबोरीचें दारुण । वाट नाहीं रे जावयाला ॥
काळोखी रात्र । वाट नाहीं रे जावयाला ॥
वन धुंडाया लागला । वाट मिळेना जावयाला ॥
सुमार पाहाया लागला । बारे धोंडीवर चढला ॥
गेला कोळ्याचे ग्याटाला (म्याटाला) । बारा जण कोळी होते पहिल्या ग्याटाला (म्याटाला) ॥
त्यानें सुभेदार पाहिला । "मारा मारा ह्या चोराला" ॥
सुभेदार बोलाया लागला । "भ्यालों ह्या चोराला ॥
हे ठार मारतील मला" । "चोर असलों ठार मारा ॥
राव असलों तर काय मरतां । बायकोच्या याराला ? ॥
जरा बत्ती तुम्ही लावा । यावें मला पाहावयाला" ॥२६॥

चौक २७
पहिल्यानें सरदार पाहिला । "धन्य याची नारायणा ॥
कोण तुमचें नांव गांव । येवढे सांगावें आम्हांला " ॥
"मी साखरेचा पाटील । गेलों होतों पुण्याला ॥
मंडईच्या वाडयांत । गेलों होतों पट्टी लावायाला ।
जात होतों घराला । तेथें वाघानें आडविला ॥
तुमच्या आलों आश्रमाला ॥ भले भले रे दादांनों ॥
घाईनें निघालों । पान खायला विसरलों " ।
पान द्यावें खायाला ॥ ऐक ऐक दादा ।
ह्या बारा वर्षामधीं पान खाल्लें नाहीं " ॥ बटवा खाकेचा सोडिला ।
यानें विडे जे काढिले ॥ बारा त्या कोळयाला ।
यानें बारा विडे दिले आफुमाजुमाचे विडे कोळ्यांला दिले ।
कोळी झिंगूनशानी गेले ॥२७॥

चौक २८
बारा बाराजण कोळी । पहिल्या दरबाराचे गेटकरी (मेटकरी) ॥
"बारा असामींचा कोण सरदार सांगावा" । आहे मी खंडोजी नाईक बारांचा सरदार" ॥
"ऐक खंडोजी नाईक । तुमची तैनात सांगावी" ॥
"तीन रुपयांची तैनात । मला सरदाराला मिळती" ॥
ह्यानें कठी जी काढिली । दिली खंडोजी नाईकाला ॥
ज्यानें तोडा जो काढिला । दिला विठोजी कोळ्याला ॥
चौकडा काढिला । दिला मालोजी कोळ्याला ॥
बारा कोळ्यांला बारा । ऐशा वस्ता त्यानें दिल्या ॥
कोळी फितूर ते केले । "ऐक ऐक पाटीलबोवा ॥
मोठया वस्तू आम्हांला जिरतील कशा । काम सांगा आम्हांला" ॥
"काम तुम्हांला सांगेन । भाक द्यावी रे मजला" ॥
इमान ज्यानें दिलें । कोळ्यांनीं इमान दिलें ॥
"मी आहें कोणाचा कोण । नांव सांगतों रे तुम्हांला ॥
राजा शिवाजीचा उंबराव । आहे मी तानाजी सुभेदार ।
पन्नास माणसांचा सरदार ॥ आहें मी, एकला ।
आलों सिंहगडच्या माहितीला । लांबी रुंदी सांगा मला" ॥२८॥

चौक २९
नांव घेतां शिवाजीचें । कोळी खालती बसले ॥
"ऐक ऐक तानाजी सुभेदारा । शिवाजीचें कुत्रे नाहीं येत सिंहगडाला" ॥
ज्यानें वस्ता घेतल्या । त्यानें सुभेदाराच्या पुढें ठेविल्या ॥
"घे रे सुभेदारा । आल्या वाटेनें जावें राजगडकिल्ल्याला " ॥
"ऐक खंडोजी नाईका । इमान तूं रे मला दिलें ॥
द्यावी सेजेची बाइल । पण इमान देऊं नये" ॥
येवढया जाबावरुन । कोळी सांगायला लागला ॥
"ऐका सिंहगडची माहिती । तिनकोसांचा आहे बा घेरा ॥
दिडकोचासी आहे बा रुंदी । आहे अठराशें पठाण सिंहगडाला ॥
आहे उदेभान मोंगल । दीड गाई दीड शेळी सवामण तांदूळ वेळेला ॥
अठराजणी बिब्या । आहेत त्याच्या पलंगाला ॥
घेतो तेल्याची पहार । मणगटावर घालतो ॥
सरी करुन घालतो । बिबिच्या गळ्यांत ॥
चांदवडी रुपया । दोहों बोटांनी तोडितो" ॥२९॥

चौक ३०
"आहे बाच्छायाचा हत्ती । त्याचें नांव चंद्रावळी ॥
एक बाच्छायाचा हत्ती । करिल सब दुनियेची माती ॥
उदेभानाचा प्रधान । आहे सिद्दी हिलाल ॥
एक शेळी अर्धी गाई । आदमण तांदुळ त्याचे एका वेळेला ॥
नउजणी बिब्या । सिद्दी हिलालाच्या पलंगाला ॥
बाराजण होते लेक । उदेभानाच्या पेक्षां भारी ॥
उगवत्या बाजुला । कड़ा आहे डोणागिरी ॥
तेथें आहे सोलाची जागा । डोणागिरीच्या कडयाला ॥३०॥

चौक ३१
"बसावें सरदारांनो । जातों आपल्या गोटाला" ॥
बाराजण कोळी चरण धरुन । तुम्ही काय सांगतां आम्हांला ॥
त्या मर्दाला पाहुन । कोळी रडाया लागले ॥
"शिवाजीच्या राज्यांत कोणीं । तुजसारखा सरदार नाहीं पाहिला" ।
"भिऊं नको रे दादांनो । हा किल्ला हातीं आला तर ह्या किल्याची सरदारी देईन तुम्हांला ॥
हजाराची तैनात देईन बारा असामीला" ॥ तानाजी सुभेदारानें दिला हातचा लखोटा ।
त्या खंडोजी कोळ्याला ॥३१॥
 
चौक ३२
सुभेदार तेथुनि निघाला । आला आपल्या फौजेला ॥
ज्याचा शेलार तो मामा । त्याच्या पुढें धावत आला ।
"तुम्ही गेला सिंहगडाला । नवस केला बहिरोबाला ॥
माझा सुभेदार येऊं दे । बारा बकरे देईन तुला ॥
तुम्ही चला हो किल्ल्याला । जातों नवस फेडायाला" ।
ऐक ऐक शेलारमामा बारा द्यावयाचे ते चोवीस देऊं । पण किल्ला येऊं दे हाताला" ॥
"बहिरोबा आहे ओंगळ । त्याचा नवस पाहिजे फेडला" ॥
"ऐक ऐक शेलार मामा माझ्या महाराजाचें देणें । अढळ पदीं सोनें ॥
नाही आम्ही बहिरोबा जाणित । साडेतिनशें देव पाणी रांजणांत भरतात ॥
ऐसा शिवाजीमहाराजा । आहे तळकोंकणचा राजा" ॥३२॥


चौक ३३
चला माझे दादांनो । हुकूम सैन्याला केला ॥
बारा हजार फौज गेली । कल्याण दरवाज्याला ॥
ज्यानें पेटारा उघडिला । काढिली यशवंत घोरपड ॥
सात शेर शेंदुर । तिच्या मस्तकीं थापिला ॥
भांग मोत्यांचा भरला । चरणीं मस्तक ठेविलें ॥
सांखळी कमरेला बांधिली ॥ यशवंत घोरपड ज्यानें किल्ल्याला लाविली ॥
अर्ध्या किल्ल्याला गेली । घोरपड माघारीं परतली ॥
आउक्ष तानाजीचें समजली । घोरपड फिरली ती सुभेदारानें पाहिली ॥
"सत्ताविस किल्ले मी घेतले । घोरपड कधीं मागें नाही फिरली" ॥
राग आला त्या मर्दाला । "मी आहे मराठयाचा पोर नाही भिणार मरणाला ॥
एक हात टाकीन । अठरा खांडोळीं पाडीन, शिळ्या भाकरीसंगें खाईन" ॥
त्या मरणाचे धास्तीनें । सात वेढे जी फिरली नखें रोऊन बसली ॥३३॥

चौक ३४
"जावें जावें शेलारमामा सोल बघायाला" । ज्यानें टिचकीनें मारिली ॥
सोलाला जोरानें लागली ॥ काळी घोंगडी जी सोडली ॥
ज्यानें बटवा जो सोडिला । बारा विडे काढिले ॥
"कोण शूर मर्द आहे क्षत्री । त्यानें विडा उचलावा, हात सोलाला घालावा" ॥
ज्या वीरांच्या वरती माना । त्यांनीं खालीं घातल्या माना ॥
सुभेदार बोलतो । "भरा बायकांच्या बांगडया" ॥
एवढया जाबावरुन । राग आला त्या सैन्याला ॥
मोहिता म्हणतो धार माझी । घाग म्हणतो धार माझी ॥
चवाण म्हणतो धार माझी । जाधव म्हणतो धार माझी ॥
गायकवाड म्हणतो धार माझी । शिरके म्हणतो धार माझी ॥
महाडिक म्हणतो धार माझी । बारा हजार फोजेनें एकच गर्दी केली ॥३४॥

चौक ३५
अरे फलाणाचा फलाणा । घाव घाला निशाणा ॥
घस्त आली मोगलांची । त्यानं कानोसा घेतला ॥
हांक मारली गेटाला (मेटाला) । खंडोजी नायकाला ॥
"किस्का गलबला मेरे भाई । एवढा सांगावा आम्हांला" ॥
खालून कोळ्याने जबाब दिला । जंगलमें धनगराचा वाडा ॥
त्यामध्यें बडा वाघ शिर्‍या । गाईकी बचडी खाते ॥
रांड पोर किचाड करते । वरती सुखी राज्य करा" ॥३५॥

चौक ३६
सुभेदार बोलतो सेनेला । "पहिली सोल शिवाजीमहाराजांची ॥
दुसरी सोल अंबाबाईची । तिसरी सोल तानाजी सुभेदाराची" ॥
पट्टे घेतले तोंडामधीं । सोल धरली हातामधीं ॥
आपल्या बेताचे माणुस पन्नास मोजीले । सुभेदार गडावर चढले ॥
पन्नास कमी बारा हजार फौज । खालीं होती, त्याने एकच गर्दी केली ॥
सूर्याबा तो बंधु । त्यानें एकच गर्दी केली । दादा वरती गेला (म्हणून) ।
बारा हजार फौजेनें हात सोलाला घातला ॥ तीन पुरुष वरती गेले ।
सोल मधीच तुटली ॥ पन्नास कमी बारा हजार ।
फौज धरणीवर पडली ॥३६॥

चौक ३७
सुभेदार तो वरती जाऊन । त्याला दोन घटका झाल्या ॥
माझ्या "शेलार तूं मामा । कां वेळ लागला फौजेला तूं जावे बघायाला" ॥
सोल पाहुन मामा । धोतरात....ला ॥
"काय सांगूं सुभेदारा । सोल ते तुटली आली मरणाची वेळा" सुभेदार बोलाया लागला ।
"नाहीं सोल रे तुटली माझें आयुष्य तुटलें ॥ ऐक ऐक शेलार मामा ।
माझ्या रायाबा बेटयाला रामराम सांगा " ॥३७॥

चौक ३८
शेलार मामा बोलतो । "ऐक ऐक मी तुला एक तोड सांगतो ॥
आहे अठराशें फौज । किल्ल्याला अठराशे पठाण ॥
आहे उदेभान मोंगल । आहे सिद्धी तो हिलाल, आहे चंद्रावळी हत्ती ।
उडी टाका किल्ल्याखालीं । म्हणजे पहायाला नको" ॥
"भला भला शेलार मामा । उडी टाकीली तरी प्राण जायाचा ॥
पन्नास माणसाचा सरदार । सत्तावीस किंल्ल्यांचा मी सरदार, नाहीं भिणार मरणाला" ॥
शूर मर्दाची कीर्ति । धावा केला अंबाबाईचा ॥
प्रतापगडची भवानी । पाव माझ्या नवसाला ॥
सातारची मंगळाई । मग पुण्याची पर्वती ॥
तुळापुरची (तुळजापूरची) भवानी । माता पाराची वरदानी ॥३८॥

चौक ३९
पांच देवी पुढे धांवत आल्या । गळ्यांत कवडयांच्या माळा ॥
हात मारिला पाठीवर । "भिऊं नका सुभेदारा ॥
यश तुझ्या तलवारीला" । बळ देवीचें सापडलें ॥
जोर हातींचा चढविला । मागची पुढची आशा सोडली ॥
खुन डोळ्यावर चढला । "ऐक माझ्या शेलारमामा ॥
जेथें सुभेदाराचा पटा । तेथें पन्नासांचा पटा ॥
जेथें सुभेदाराचा मान । तेथें पन्नासांची मान चलचल माझ्या मामा" ॥३९॥

चौक ४०
गेले पहिले दरवाजाला । ज्यानें दिंडीनें पाहिला ॥
होती आरबाची जात । होती मोगलाची जात ॥
होती मुसलमानाची जात । अफु माजुम खाल्ली ॥
मदनमस्त झाली । ज्यानें डाव जे मांडिले ॥
कोण बारा बारा बोलती । कोण ग्यारा रे बोलती ॥
ह्याने एकच गर्दी केली । खणाखण वाजिती ॥
व्हाळ आसुदाचे वाहती । रक्त अंगाला लागलें खुन डोळ्याला चढला ॥
कोण करितो खुदा खुदा । बुधा धरणीला पडला ॥
कोण करितो अल्ला अल्ला । खाली काला जो पडला ॥४०॥

चौक ४१
पहिला दरवाजा मारिला । गेला दुसर्‍या दरवाजाला ॥
काळोखी रात्र, पार--
दुसर्‍या दरवाजाला होता । तिनशें पठाण, ज्यानें दिन दिन वाहिला ॥
मुसलमानी लोक दादा । बिनफिकिर होते, नाहीं गलीमाची माहित ॥
तानाजी सुभेदार, जैसा ठाणांत । वाघ लोटला, सेनांत ॥
पांच पट्टयांचा मारा केला । सवाघटकेमधिं तिनशें पठाण कापिला ॥
गेला तिसर्‍या दरवाजाला । होता चारशें पठाण ॥
दिन दिन ज्यानें वाहिला । चारशें पठाण कापिला ॥
एकदंर हिशेब नऊशें मनुष्यांचा झाला ॥४१॥

चौक ४२
"ऐक शेलार मामा । गलीमाचा हिशेब घ्यावा ॥
एक ह्यानें कमी । नऊशें पठाण झाला" ॥
त्यांत बोंब्या निघून गेला । उदेभान मोंगलापाशीं गेला ॥
अठरा तो पेले अफूचे । उदेभान एकटा प्याला ॥
भंगीच्या जुडया । आणि अफुच्या वडया खाल्ल्या ॥
उदेभान मोंगल मगरमस्त झाला । आठरा पलंग ज्यानें बिब्यांचे सवारिले ॥
ज्यानें लुंगिज सोडिली । ज्यानें खुंटीवर ठेविली ॥
चोन कराया चालला । तो म्होरें बोंब्या अवचित गेला ॥
"मेरे उदेभान मोंगला । आग लागो तुझ्या चोन्याला ।
सिंहगड किल्ला डुब होया । भाई नऊशें पठाण कापिला ॥
काळोखी रात्र, नाहीं गलीमाची माहित । नऊशें पठाण काटया" ॥
"x x हमारे पर बैठया । आम्ही नाहीं चोन्याला सोडताया ॥
जा बालेकिल्ल्याला । जाऊन सांगा हत्तीच्या महाताला ॥
आठरा घागरी कुसुंबा पाजा हत्तीला । अठरा अफूचे ते पेले ॥
अठरा माजुमाच्या वडया, पांच पते त्या (द्या) सोंडेला । चंद्रावळीचा हत्ती जाऊं दे कल्याणदरवाज्याला ॥४२॥
 
चौक ४३
सुभेदारानें काय केलें । सुभेदार बोलतो मामाला ॥
"नऊशें पठाण कापिला । माझा जीव श्रमी झाला बटवा सोडा पान खायाला" ॥
शेलार तो मामा शिणल्यावर "दादा पोट रे फुगलें" । "भला भला माझ्या मामा ॥
बाराच्या ठोक्याला । किल्ला सई करुन देतों तुला ॥
पान खाऊं दे मला" । पान जो खातांना मोहरें हत्ती धांवत आला ॥
"किस्का उमराव । मेरा भाई सांगावा मजला" ॥
"उंबराव शिवाजीमहाराजांचा । मी आहें तानाजी सुभेदार" ॥
"नऊशें पठाण कोणी काटया, सांगावें मजला" । "नऊशें पठाण आम्ही काटया" ॥
महाता बोले सुभेदार । "कुणब्याच्या पोरा काय तुझा एवढा तोरा ॥
जंगलामधीं तूं रें जावें । लकडी तोडावी त्याची मोळी ।
बांधावी जाऊन बनियाला ओपावी ॥ ज्यानी धानोर्‍या आणाव्या ।
रांडा पोरा रे घालाव्या ॥ एवढया बडया बडया सरदारी एवढया बडया तलवारी ।
कोठें होत्या तुझ्या बाला ?" ॥ सुभेदार बोले महताला ।
"ऐक भुसार्‍याच्या पोरा जाऊन ताग तूं पेरावा ॥ गोणी ताटुक वळावा ।
यावें कुणब्याच्या वाडयाला ॥ भात रुपयाचे द्यावें ।
तुझ्या रंडीनें भरडावें ॥ कणी कोंडा आपण खावा ।
तांदूळ बनियाला ओपावा ॥ एवढया बडया बडया अंबार्‍या एवढया बडया तलवारा ।
कोठें होत्या रे मुसंडया तुला ?" ॥४३॥

चौक ४४
सलाम सलाम मेरे भाई । पहिला हात येऊं दे रे तुझा" ॥
पैलवान हत्तीवर बसला । शिवी दिली हत्तीला ॥
"तेरी रंडीका नर । ह्याला पाहुन घ्यावा" ॥
हत्ती सात पावलें मागे गेला । पांच पटयाचा मारा केला ॥
"संभाळ संभाळ मेरे भाई । आतां संभाळ सुभेदारा ॥
हा हात्ती बाच्छाईचा" । "मी रे आहे महाराजांचा" ॥
पहिला हत्तीनें डोईवर मारा केला । सुभेदार भला,
हत्तीच्या पोटाखालून निघून गेला ॥ हत्तीनें मारा केला ।
बंदुकीचा गजभर चिरा जो तुटला ॥ वरुन पहिलवान बोलला ।
"सहाही पाताळ गाडिला !" राग आला सुभेदाराला ।
सात हात जमीन उडाला लाथ मारिली महाताला ॥
अल्ला म्हणून बोलला । शब्द हत्तीनें ओळखिला ॥
हत्तीने उलटा पाठीवर मारा केला । ह्या वैर्‍याला मारायाला ॥
सुभेदार सराईत भला । कावा नदरेचा राखिला ॥
सळ पटयाचा सोडिला । नऊ तुकडे सोंडेचे नऊ सांखळीचे ॥
अठरा खांडोळीं पाडिलीं । सुभेदार खालीं उतरला ॥
पन्नास माणूस लागलें हत्तीला भोकाया । शेलार मामा धांवत आला ह्याचा "भोचु दे रे बोx" ॥४४॥

चौक ४५
तिथुन बोंब्या निघून गेला ॥ "मेरे उदेभानभाई आग लागो तुझे चोन्याला ॥
"सिंहगड किल्ला डुब होया" । "हम चोन नहीं सोडताई ॥
जा पिराच्या दरग्याला । सांगा सिद्दी हिलालाला ॥
पांच हत्यारें घेऊन जावें । कल्याण दरवाजाला" ॥
सिद्दी हिलाल भला । ज्याच्या नऊ जनी बिब्या पलंगा निजायाला ॥
चोन कराया लागला । लाखोटा मोगलाचा दिला ॥
सिद्दी हिलालानें । त्यानें वाचून पाहिला ॥
सिंहगड किल्ल्याला गलीम बहुत आला । तुम्हीं जावें लढायाला ॥
सिद्दी तो हिलाल पांच पोषाग नटला । दोहीं हातांत दोन पट्टे नऊजण बिब्या हारोहारीनें उभ्या केल्या ॥
ज्यानें पहिला हात टाकिला । अठरा खांडोळीं पाडिलीं ॥
आसुदाचा टिळा ल्याला । उमराव तेथून निघाला सुभेदारापाशीं आला ॥४५॥

चौक ४६
"सलाम सलाम मेरे भाई । किस्का तूं उमराव ऐसा सांगावा मजला" ॥
"उमराव आहे शिवाजीचा । मी तानाजी सुभेदार" ॥
"ऐक कुळंब्याच्या पोरा । पागोटयाच वेढे घाल गळ्यामधीं शरण यावें सरदाराला" ॥
सुभेदार त्याला बोलता झाला । "घ्यावे तोंडात तृण, घ्यावी डोईवर वहाण, शरण यावें सुभेदाराला ॥
पहिला हात येऊ दे तुझा सिद्दी तूं हिलाला" ।
पहिला हात जो टाकिला सात हात जमीन उडाला रे हातांमधीं हात त्यानें अठरा टाकीला ।
सुभेदार गुंजभर नाहीं ढळला ॥ "अरे सिद्दी तू हिलाल ।
दुसरा हात येऊं दे तुझा" ॥ सुभेदार बोलला ॥
"संभाळ संभाळ मेरे भाई । आतां हाच येतो सुभेदाराचा ॥
नऊ हात जमीन उडाला । मारा सुभेदारानं केला ॥
बत्तीस वेढे पागोटयाचे । बत्तीस वेढे मंदिलाचे ॥
बेंबीपावेतों चिरित नेला । खुदा रे खुदा बोलला बुध्या धरणीवर पाडिला ॥४६॥

चौक ४७
बोंब्या तेथुनि निघाला । उदेभानापाशीं गेला ॥
"मेरे उदेभान भाई आग लागो तुझ्या चोन्याला । सिंहगड किल्ला डुब होया ।
नऊशें पठाण कापिला । बाच्छाईचा हत्ती कापिला ॥
सीद्दी हिलाल कापिला । हमकु किल्ला डुब होया" ॥
"हम चोन नहीं सोडताई । जावें जळमंदिराला ॥
आहेत बारा जण छोकरे । जावा कल्याणदरवाजाला लढायाला" ।
तुम्हीं जावें लढाईला" ॥ बारा जण भाऊ, केला मरणाचा पोषाग, पांच हत्यारें घेतलीं ।
तेथुन निघाले आले सुभेदाराजवळी ॥ "सलाम सलाम मेरे भाई ।
किस्का तू उमराव सांगावें आम्हांला" ॥ "उमराव शिवाजी महाराजाचा ।
आहे मी तानाजी मालूसरा" ॥ "सुभेदार भाई ।
पहिला हात येऊं दे तुझा" । "तुम्ही आम्हां मोगलांचे बाळक ।
पहिला हात येऊं दे तुमचा " ॥ बारा जण लडक्यांनीं ।
चोवीस हात जे टाकिले ॥ सुभेदार भला ।
त्यानें धांवा अंबेचा मांडला ॥ अंबाबाई तू पाव गे माझ्या नवसाला ।
नऊ हात जमीन उडाला ॥ बारा जण लडक्यांचीं ।
चोवीस खांडोळीं पाडिलीं ॥४७॥

चौक ४८
तेथून बोंब्या निघून गेला । उदेभानाचा जवळ आला ॥
"मेरे उदेभान भाई आग लागो ह्या चोन्याला । सिंहगड किल्ला डुब होया ॥
नऊशें पठाण काटया । बाच्छाईचा हत्ती काटया ॥
सिद्धी हिलाल काटया । तुम्हारे बारा लडके काटया !"
लडक्याचा तो जाब ह्याच्या कानावरतीं गेला ।
उदेभान मोंगल ज्या बिबी xxx बसला होता तेथून उठेनासा झाला ॥
लेंकांचा तो दुःखाचा शब्द । ज्याच्या ऊरामधीं बसला ॥
खरखर लखोटा लिहिला त्या बोंब्यापाशीं दिला ॥
"जाऊन सांगा उमरावाला । उदेभान तो मोंगल पळून पुण्याला गेला ॥
झेंडा लावा सिंहगडाला । यश तुमच्या तलवारीला" ॥४८॥

चौक ४९
उदेभान तेथुन निघाला । आला पिराच्या दरग्याला ॥
फोडल्या कापसाच्या उदी । ओतले तेलाचे बुधले ॥
ज्यानें आग जी लाविली । ज्यानें उजेड तो केला ॥
गलीम किती मोजून पाहिला । पन्नास माणूस पाहून ह्याच्या आलें हिशोबाला ॥
उदेभान माणूस पाहून । त्याच्या भुज्या ज्या थरारल्या ॥
पन्नास माणूस माझी आंबाडाची भाजी मोगल मागें परतला ।
गेला आखाडखान्यामधीं ॥ पायीं तुमानी सुरवारा घातल्या ।
अठरा खंडीचे किनखाप त्यानें आंगांत घातलें ॥ बारा आतबडीचा जोडा ।
त्यानें पायांमधीं घातला ॥ ज्यानें वाघनखें चढविलीं ॥
जिरेटोप डोईस घातला ॥ अठरा जागीं बिब्या ।
हारोहारीनें उभ्या केल्या ॥ सळ पट्टयाचा सोडिला ।
अठरा बिभ्यांची खांडें केलीं ॥ आसुदाचा टिळा ल्याला ।
गाभणीगाई जी काटली ॥ गेला पिराच्या दरग्याला ।
सवामण ऊद जाळिला ॥ एका हातीं गुरदा एका हातीं घेतला पट्टा ।
दोपट्टयाचा मारा केला । आला कल्याणदरवाजाला ।
ज्यानें सलाम वाहिला ॥ दादा नऊशें पठाण ।
ज्यानें दिमतीला घेतला ॥४९॥

चौक ५०
"सलाम मेरे भाई । उंबराव किस्का सांगावा मजला" ॥
"उंबराव शिवाजी महाराजांचा । आहें मी तानाजी सुभेदार" ॥
उंबराव मोगलानें पाहिला । "ऐसा भला आहेस रे दादा ॥
तुज्यासारख्या भाई पाठीला असावा । खाणें घालावें वजिराला वजीर पाळावा बाजूला ॥
सोड महाराजांची चाकरी । कर माझी मोगलाची चाकरी ॥
हवाला देतों सिंहगडाचा । हजार रुपयांची तैनात देतों बसून खायाला" ॥
सुभेदार बोले मोगलाला । "सोड सिंहगडाची गादी ॥
चल माझ्या राजगड किल्ल्याला । चलावे महाराजाचे भेटीला ॥
राजगड किल्ल्याचा हवाला । उदेभाना देतों तुला " ।
एवढया जाबावरुन । घुस्सा आला मोगलाला ॥
"पहिला हात येऊं दे तुझा" । "उदेभान हात येऊं दे तुझा" ॥
तानाजी सुभेदार धांवा अंबेचा मांडिला । धांव धांव अंबाबाई ॥
अंबा त्या बाईनें घोस गाईचा पाहिला । देवी मागें जी सरली ॥
मोगलासमोर उभारिला । गर्भगाळ कोसळला ॥
नऊ हात जमीन उडाला । मोगलाला माराया गेला ॥
हातामधीं हात ज्यानें अठरा टाकिले । गुंजभर नाहीं जो सरला ॥
"ऐका उदेभान मोगला । पहिला हात माझा झाला ॥
दुसरा हात येऊं दे तुझा" । सुभेदार बोलतो "मामा ऐक निर्वाणाची वेळा ॥
लग्न करा रायाबाचें । दोहों हातांचा मुजरा सांगा शिवाजी महाराजाला" ॥
उदेभान मोगल बारा हात जमीन उडाला । वचक सुरबाईचा दाविला मारा कैफाचा केला ।
पन्नास वेढे पागोटयाचे पन्नास वेढे मंदिलाचे बेंबीपावेतों चिरित नेला ।
सुभेदार धरणीला लोटिला ॥५०॥

चौक ५१
पन्नास माणूस, ज्यानें रोजन्या----मांडिल्या, आमच्या सुभेदार धन्या ॥
आम्हाला सांभाळील कोण । आणलेंस वाघाच्या रानाला ॥
मग तो शेलार मामानें । मुर्दा मांडीवर घेतला ॥
उदेभान बोलाया लागला । दादा आपल्या सेनेला ॥
"हात मी नऊशें पठाण । पन्नास माणसें घेऊन जावें॥
कल्याण दरवाजाला ॥ आऊत द्यावी हयांची बुरजाला" ॥
लोक खळखळा रडती कैसें झालें नारायणा । दिन दिन पटयानें वाहिला मारायाला लागला ॥
सुभेदार मेलेला मुरदा इरयानें झाला । ऐशी वर्षांचा तो मामा त्याच्या आंगात संचारला ॥
यश आलें मोगलाला । मोगल मागें जात होता ॥
मग तो सुभेदाराचा पट्टा । शेलार मामानें घेतला ॥
"फीर ग मर्दाचे लंडे फीर ग मर्दाचे लंडे" । मोगल मागे पहात होता ॥
दोहों हातांनीं कचका दिला बेंबीपावता चिरीत नेला ॥ खुदा खुदा बोलला ।
बुधा धरणीला पाडिला ॥ ज्यानें भाव तो आंतला सोडिला मग तो नऊशे पठाण राहीले ॥
नऊशे पठाण । मार माराया लागले ॥
त्यामध्ये एकटा शेलार मामा लढनेवाला । पन्नास माणसांतून पंचवीस माणूस पडला ॥५१॥
 
चौक ५२
नऊशे पठाण बोलाया लागला । चला कल्याण दरवाजाला ॥
आहुत देऊं पंचवीस माणसांची । संकट पडलें अंबाबाईला ॥
प्रतापगडची भवानी । उभी राहीली सांकडयाला ॥
पिवळें पातळ नेसली । गळीं कवडयांची माळा ॥
संकट पडलें देवीला । यश जातें शिवाजीमहाराजाचें ॥
देवीनें आपल्या हातून दरवाजा उघडिला । पन्नास कमी बारा हजार फौज किल्ल्याला घेतली ॥
ज्याचा सूर्याबा तो बंधु । मामाला पुसाया लागला ॥
"शेलार रे मामा । माझा दादा रे कुठे आहे बंधू रे कुठे आहे" ॥
शेलार मामा रे बोलला । जरी मेलासे बोललों तर सारी फौज बसेल ॥
सुभेदार आहे बाले सद्रेमधीं । मी आहे कल्याणदरवाजाला ॥
नऊशे पठाण मारावा । मग जाऊं दादाच्या भेटीला" ॥
मग त्या बारा हजार फौजेने । ज्यानें हर हर वाहिला ॥
एका एकाच्या मागें तिघे तिघे लागले । नऊशे पठाण कापिला ॥
पांढरें निशाण उपटलें । भगवा झेंडा शिवाजीचा ॥
पांच तोफा जों मारिल्या । यशाच्या तोफा जों मारिल्या ॥
त्या तोफांचा आवाज । गेला राजगड किल्ल्याला ॥
शिवाजी महाराज बोलला । माझ्या सुभेदारानें सिंहगड सही केला ॥
शिवाजी महाराजानें । यशाच्या दहा तोफा सोडिल्या ॥५२॥

चौक ५३
ज्याचा सूर्याबा तो बंधू । शेलार मामाला बोलला ॥
चला जाऊ दादाच्या भेटीला । शेलार मामानें सूर्याबा बंधूचे ।
पटे घेतले आपल्या हातामधीं ॥ गेले मुर्द्याचे जवळ ।
वरुन शेला उघडिला ॥ मुर्दा दादाचा पाहिला ।
मुर्दा सुभेदाराचा पाहिला ॥ "माझ्या सुभेदार दादा लग्न रायाबाचं राहिलं ।
ह्याचें लग्न करील कोण" ॥ बारा गेटांचे (मेटांचे) कोळी निघाले ।
आले सुभेदाराजवळ ॥ "आमचा सुभेदार धनी ।
आम्हांला तैनात देईल कोण आम्हांला हवाल देईल कोण" ॥
सुभेदार बोलायाला लागला । "भिऊं नका रे दादांनो ह्या दादाचें वचन पुरें करीन ॥
जातों राजगड किल्ल्याला । सांगतों शिवाजी महाराजाला सिंहगडाचा हवाला देतों तुम्हाला" ॥
अबिर गुलाल । ज्याचे मुर्द्यांत भरला ॥ दोरा रेशमाचा घातला ।
मुर्दा पालखींत ठेविला ॥ पंचवीस कमी बारा हजार लोक सगळे घेतले ।
वाजत गाजत मुर्दा गेला राजगड किल्ल्याला ॥५३॥

चौक ५४
आले किल्ल्याचे पोटाला । पांचकर्णांचा बाजा केला ॥
आवाज महाराजानें घेतला । सुभेदार किल्ला घेऊन आला ॥
सुभेदाराची पालखी । नेली राजाचे सदरेला ॥
शिवाजी महाराजानें । मुर्दा पाहिला सुभेदाराचा ॥
शिवाजीचे राज्यांत । ऐसा उंबराव होणें नाहीं सुभेदारासारखा ।
जिजाबाई धांवत आली । पालखी पाहिली ॥
गर्व आला सुभेदाराला । नाहीं आला भेटायाला ॥
बाई पालखीपाशीं आली । बाईनें शेला उघडिला ॥
मुर्दा सुभेदाराचा पाहिला ॥ आंग धरणीला टाकिलें ॥
"सुभेदारासारखा । ऐसा क्षत्री होणार नाही ॥
बाजू गेली महाराजांची । बाजू गेली शिवाजीची" ॥
मग त्या शिवाजीनें चाकराचे साठीं । डोईला रुमाल बांधला ॥
बारा भोयांचे पालखींत । सुभेदाराचा मुर्दा जो घातला ।
वाजत गाज्त आणला उमराठया गांवाला । ह्याचे लेकाचे भेटीला ॥
पांच कर्णांचा आवाज । रायाबा बेटयानें केला (ऐकला?) ॥
रायाबा बोलतो । बाबा आले माझे लग्नाला ॥
पालखीपाशीं धांवत आला । मुर्दा बाबाचा पाहिला ॥
"साता दिवसांची मुदत ॥ केली माझे लगनाला ॥
बाबा माझें लगीन करील कोण । यजमान होईल बाबा कोण ? मंडपांत मिरवेल कोण ? ॥
आग लागो ह्या लग्नाला । कां माझा बाबा निघून गेला" ॥
शिवाजी राजानें । मुलगा पोटासंगं धरिला ॥
"भिऊं नको माझे बेटा । शिवाजी महाराज तो गेला, तान्हाजी सुभेदार ।
आहे तुला " ॥ बारा दिवसांचे सुतक धरिलें ।
शिवाजी महाराजांनीं सुभेदाराचें ॥५४॥
 
चौक ५५
मग त्या तेराव्या दिवसांत । संयबर बाळाचे मांडिलें ॥
ज्यानें मंडप घातला । मंडपाला तोरण बांधिलें ॥
पहिली नवरी रद्द केली । कडाशीचे दरकराची केली रायबा बेटयाला ॥
संयवर केलें रायाबाचें । रायाबा पुढें तो बसविला ॥
बापाची सरदारी । दिली रायाबा बेटयाला ॥
दिवटया बुदलीची जहागिर । दिली रायाबा बेटयाला ॥
डोणजं तें गांव । दिलें पानसुपारीला ॥
मालुसर्‍याचा दंड । दिला इनाम खायाला ॥
रायाबा तो बेटा । ज्यानें संगतिला घेतला ।
आले राजगड किल्ल्याला ॥ ज्यानें पंतोजी तो काका ।
ज्यानें हुजर्‍या बोलविला ॥ "पंतोजी तो काका ।
जावें पुण्याचे शहराला ॥ मंडईच्या बाजारीं ।
आहे तुळशीदास शाहीर ॥ घेऊन यावें त्याला ।
राजगड किल्ल्याला" ॥ तुळशीदास शाहिर ।
त्यानें सदरेला आणिला ॥ डफ तुणतुणें घेऊन ।
मग त्या तान्हाजी सुभेदाराला ॥ शिवाजी महाराजांचा ।
पोवाडा कटिबंध केला ॥ हजार रुपयांचा तोडा ।
हातामधीं घातला त्या रे तुळशीदास शाहीराच्या ॥ शूरमर्दाचा पोवाडा ।
शूरमर्दानें ऐकावा ॥ शिवाजीचे राज्यांत ।
ऐसा उमराव होणें नाहीं ॥ पोवाडा गात्याला उद्राण ऐकत्याला घडो पुण्य ।
सत्य युगींचा पोवाडा कलयुगीं वर्तला ॥ सत्तावीस किल्ल्यांचा सरदार निघूनशानी गेला ।
ऐसा पुनः होणें नाहीं ॥५५॥

Thursday, February 9, 2012

Original AfzalkhanVadh Powada


Herewith is the Original Afzalkhan Vadh (Assasination of Afzal Khan) Powada by Shahir Adyaandas. This is the oldest powada today available on record.
Though this has been considered as written during Shivaji's rule, as per history scholar G. H. Hare, this is was written after 1700AD.
Judging by the well-knit of composition and style of the ballad, we can safely assume that the art of 'Shahiri' had developed considerably when this was written.

चौक १
माझें नमन आधी गणा । सकळिक ऐका चित्त देऊन ॥
नमियेली सारज्या । ल्याली जडिताचें भूषण ॥
अज्ञानदासाचें वचन । नमिला सद्‌गुरु नारायण ॥
सद् गुरुच्या प्रसादें । संपूर्ण अंबेचें वरदान ॥
गाइन वजिराचें भांडण । भोसल्या सरजा दलभंजन ॥
फौजेवर लोटतां । यशवंत खंडेश्वरी प्रसन्न ॥
अज्ञानदास बोले वचन । गाइन राजाचें भांडण ॥
देश इलाइत । काबिज केलें तळकोंकण ॥१॥


चौक २
गड मी राजाचे गाईन । कोहज माहुली भर्जन ॥
पारगड कर्नाळा । प्रबळगड आहे संगिन ॥
मस्त तळा आणि घोसाळा । रोहरी आनसवाडी दोन ॥
कारला कासागड मंडन । दर्यांत दिसताती दोन ॥
गड बिरवाडी पांचकोन । सुरगड अवचितगड भूषण ॥
कुबल गड भीरिका कुर्डुगडाचें चांगुलपण ॥
धोडप तळकोंकणचे किल्ले, घाटावरले गड गाइन ॥२॥


चौक ३
गड आहे रोहिडा । जामली प्रतापगड मंडन ॥
मकरंदगड वांसोट । सिंहगड वृंदावन ॥
पुरंधराचें चांगुलपण । उंची झुलवा देत गगन ॥
सोन्याची सुवेळा आहे राजगड संगिन ॥
कोंडाण्यापासून तोरणा वर्ता । कोर रेखिली घाटमाथा ॥
तुंग आणि तुकोना । विसापुर लोहगड झुलता ॥
गड राहेरीची अवस्था । तीन पायर्‍या सोन्याच्या तक्ता ॥
दुसरा प्रतापगड पाहतां । अवघड दिसे घाटमाथा ॥३॥


चौक ४
मस्त हुडे दुर्गाचे खण । माहाल राजाचे गाइन ॥
पुणे भिस्तका दरगा । शेकसल्ला पीर, पाटण ॥
शिरवळ सुपे देस । घेतला ज्यानें इंदापुरा पासुन ॥
महाड गोरेगांवापासून । घेतले शिणगारपूर पाटण ॥
असे तुळजेचे परिपूर्ण । सोडविलें चवदा ताल कोंकण ।
घेतली बारा बंदरें । भाग्य राजाचें संगिन ॥४॥


चौक ५
देश दुनिया काबिज केली । बारा माउळें घेतलीं ॥
चंद्रराव कैद केला । त्याची गड जाउली घेतली ॥
चेतपाउली काबिज केली । ठाणी राजाचीं बैसलीं ॥
घेतली जाउली न् माहुली । कल्याण भिवंडी काबिज केली ॥
सोडविलें तळकोंकण । चेउलीं ठाणीं बैसविलीं ॥
कुबल, बांकी घरें । शिवराजाच्या हाता आलीं ॥
मुलाना हामाद । फिर्याद बाच्छायाप गेली ॥
बाच्छायजादी क्रोधा आली । जैशी अग्न परजळली ॥
जित धरावा राजाला । कुलवजिरांला खबर दिली ॥५॥


चौक ६
बाच्छाय(ये) पाठविले प्रमाण । वजीर बोलावा तमाम ॥
अबदुलखान, रस्तुम जुमा ॥ सिद्दी हिलाल, मुशेखान ॥
मेळविलें वजिरांला । बाच्छाय बोलावी कवणाला ? ॥
बोलावी बाजी घोरपडयाला । घाटग्या जुंझाररायाला ॥
बोलावी खर्‍या कोबाजीला । त्या नाइकजी पांढर्‍याला ॥
देवकांत्या जीवाजीला । मंबाजी भोसल्याला ॥
बावीस उंबराव मिळुनी । आले बाच्छाय सभेला ॥६॥


चौक ७
बाच्छायजादा पुसे वजीरांला । धरीसा आहे कोण शिवराजाला ॥
बावीस उंबराव आले सभेला । विडा पैजेचा मांडिला ॥
सवाई अबदुल्या बोलला । ’जिता पकडूं मैं राजाला’ ।
निरोप दिला कुल्‌वजिराला । अबदुल सदरे नवाजिला ॥
विडा पैजेचा घेतला (म्हणून) । तुरा मोत्याचा लाविला ॥
गळांअ घातलीं पदकें । खान विजापुरीं बोलला ॥
फिरंग घोडा सदरे दिला । बाच्छायानें नवाजीला ॥
तीवरसांची मोहीम । घेऊन अबदुल्या चालला ॥७॥


चौक ८
खान कटकबंद केला । कोटाबाहेर डेरा दिला ॥
मोठा अपशकुन जाहला । फत्यालसकरा हत्ती मेला ॥
खबर गेली बाच्छायाला । बिनीचा हत्ती पाठविला ॥
बारा हजार घोडा । अबदुलखानालागीं दिला ॥८॥


चौक ९
संगात कुंजर मस्त हत्ती । घेतली झगडयाची मस्तुती ॥
आरोब्याच्या गाडया । कोतवालतेजी धांवा घेती ।
सातशें उंट आहे बाणांचा । करडा लष्करी खानाचा ।
वजीर अबदुलखान । त्याच्या दळाची गणती ।
बारा हजार घोडा । उंबराव ताबिन चालती ॥९॥


चौक १०
तेथुनि कुच केलें कटकाला । अबदुल फौजेनें चालिला ॥
मजलीवर मजल । अबदुल तुळजापुरा आला ॥
फोडिली तुळजा । वरती मसुदच बांधिली ॥
मसुद बांधुनी । पुढें गाय जब केली ॥
अबदुलखान फोडी देवीला । ’कांहीं एक अजमत दाव मला’ ॥
कोपली भद्रकाली । बांधुनी शिवराजाप दिला ।
अंबा गेली सपनांत (ला) । कांहीं एक बोल शिवराजाला ॥
’बत्तीस दातांचा बोकड । आला वधायाला’ ॥१०॥


चौक ११
तेथून कुच केलें कटकाला । अबदुल दरमजली चालिला ॥
मजलीवर मजल । अबदुल माणकेश्वरा आला ॥
तेव्हां त्या अबदुलखानानें । हाल मांडिले देवाला ॥
तेथुनि कुच केलें कटकाला । अबदुल फौजेनें चालिला ॥
मजलीवर मजल । अबदुल करकंभोशा आला ॥
तेथुनि कुच केलें कटकाला । अबदुल दरमजली चालिला ॥
मजलीवर मजल । वेगीं पंढरपुरा आला ॥
फोडिला विठोबा । पुंडलिक पाण्यात टाकिला ॥११॥


चौक १२
खान (नें) कुच केलें कटकाला । अबदुल फौजेनें चालिला ॥
मजलीवर मजल । वेगीं महादेवासी आला ॥
तेव्हां त्या अबदुलखानानें । दंड बांधिला शंभुला ॥
हाल हिंदुच्या देवाला । अबदुलखान (नें) धाक लाविला ॥
तेथुनि कुच केलें कटकाला । अबदुल दरमजली चालिला ।
मजलीवर मजल । अबदुल रहिमतपुरा आला ॥१२॥


चौक १३
अबदुल आलासे बोलती । धाकें गड किल्ले कांपती ॥
वजीर उंबराव बोलती । ’शिवाजीस गडे कोंडू’, म्हणती ।
अबदुल सारा आहे किती । त्याच्या दळाची गणती ॥
बारा हजार घोडा । उंबराव ताबिन चालती ॥
सौंदळीं भांडतां । मग कणकीला मीठ किती ? ॥१३॥


चौक १४
तेथुनि कुच केलें कटकाला । अबदुल वांईलागी आला ॥
आपुल्या मुलखांत राहिला । कोट बांधुन पिंजरा केला ॥
बरेपणाचा कागद (देउन) । हेजिब महाराजाप गेला ॥
राजा पुण्यात मस्त झाला । देश पाठीशीं घेतला ॥
सोडून दिले किल्ले । डेरा जाउलींत दिला ॥
राजा जाउलींत राहिला । हेजिब अबदुल्याचा आला ॥१४॥


चौक १५
हेजिब बोले महाराजाला । ’खान बर्‍यापणाशीं आला ॥
खानाला भेटतां । थोर बाच्छाये सल्ला झाला’ ॥
राजा बोले हेजिबाला । ’कशाला बोलवितां वांईला ? ॥
किल्ले गड कोट । दवलत खानाच्या हवाला ॥
जाउली खानाच्या हवाला । लिहून देतों हेजिबाला ॥
बैसूं दोघेजण । खान बुध सांगेल आम्हांला’ ।
लुगडीं दिलीं हेजिबाला । हेजीब ’बेगीं’ रवाना झाला’ ॥१५॥


चौक १६
हेजिबाची खबर ऐकुनी । अबदुल महाभुजंग झाला ॥
अबदुलखान (नें) कउल दिला । रोटीपीर पाठविला ॥
’भिउ नको शिवाजी भाई । आहे तेरा मेरा सल्ला ॥
तुझे गड तुझ्या हवाला । आणिक दवलत देतों तुला ॥
तुझी थोडीशी गोष्ट । क्रिया शहाजीची आम्हाला’ ॥
इकडे कउल पाठविला । (पण) शीलचा राउत निवडिला ॥
हत्तीचे पायीं तोरड । लाविला गजढाळा ॥
नदरे पडतां । दस्त करा शिवराजाला ॥१६॥


चौक १७
राजा हेजीबासि बोलतो । "खंड काय मला मागतो ॥
चउआगळे चाळीस गड । मी अबदुलखानालागीं देतों ।
मजवर कृपा आहे खानाची । जावलींत सदरा सवारितो ॥
तेथें यावें भेटायाला । मी खानाची वाट पाहतों "॥
हेजिब तेथुनि निघाला । अबदुलखानाजवळ आला ॥
अबदुलखानामोहरें । हेजिब (बें) टाकिला प्रमाण ॥
अबदुल पाहतो वाचुन । "खुंटले गनिमाचें मरण" ॥
हाती आले गड किल्ले । खुशी जहाला अबदुलखान ॥१७॥


चौक १८
हिगडे सल्ला कउल दिला । खासा राउत निवडिला ॥
चार हजार घोडा । हालका धराया चालला ॥
हत्तींचे पायिं तोरड ज्याला । वरी सोडिल्या गजढाला ॥
फौजामागें फौजा । भार कडक्यानें चालला ॥
रडतोंडीच्या घाटाखालीं । अबदुल सारा उतरुं दिला ॥
इसारत सरज्याच्या लोकांला । ज्यांणीं घाट बळकाविला ॥
मागल्याची खबर नाहीं पुढिल्याला । कटकाची खबर, कैची त्याला ॥
जाऊं जाणें येऊं नेणें । ही गत झाली अबदुल्याला ॥
जावलींत उतरुनि । अबदुल दिशीभुला जाहला ॥१८॥


चौक १९
राजानी सदरा सवारिल्या । गाद्या पडगाद्या घातल्या ॥
तिवाशा जमखान टाकिले । सदर पिकदाण्या ठेविल्या ॥
सुरंग चारी खांब सदरेचे । वरी घोंस मोतीयांचें ॥
माणिकाच्या भरणी । हारी मोत्यांच्या बसविल्या ॥
दुसरे सदरेची मांडणी । सूर्य लखलखितो गगनीं ।
मणिकाचे ढाळ । सदरे सुवर्णाचें पाणी ॥
काचबंदी पटांगणाचा ढाळ । कापुर कस्तुरी परिमळ ॥१९॥


चौक २०
तिसरे सदरेची मांडणी । हिरे जोडिले खणोखणीं ॥
खासियाचे पलंग । ते ठेवोनी मध्यस्थानीं ॥
वाळियाच्या झांजी । दबण्याचे कुंड घालोनी ॥
बराणपुरी चिटाचे । आडोआड पडदे बांधुनी ॥
चाहुंकोनी चारी समया । चांदवा जडिताचा बांधोनी ॥
घोंस मोतियांचे । वर ठिकडी नानापरिची ॥
अवघी जडिताची लावणी । हिरे जोडिले खणोखणीं ॥
बहुत सवारिल्या सदरा ॥ ऐशी नाहीं देखिल्या कोणी ॥२०॥


चौक २१
राजानीं सदरा सवारिल्या । हेजिब अबदुल्यास धाडिला ॥
मोरो ब्राह्मण पाठविला । अबदुलखानासी बोलाविला ॥
"चार हजार घोडा । कोण्या कामास्तव आणिला ?" (म्हणून) त्यानें बाहेर निराळा ठेविला ।
दहा पांचांनिशीं चालिला ॥ "एकांतीच्या गोष्टी ।
तेथें दहा पांच कशाला ॥ पालखी दुर करा भोईयाला ।"
खासा अबदुल चालला ॥ "हात चालावा व्हा । दुर करा" म्हणे खानाला ॥
वस्त्रें केली हेजीबाला । शामराज नवाजीला ॥२१॥


चौक २२
भवानीशंकर प्रसन्न ज्याला । तुळजा मदत शिवराजाला ॥
भोग पुरला खानाचा । अबदुल जावळींत आला ॥
बिनहत्याराविण मोकळा । अबदुल सदरेलागीं आला ।
अबदुल पहिले सदरे गेला । सदर देखुनी सुखी झाला ॥
’ऐशी सदर नव्हती । आमच्या आली इदलशाला ॥"
खान दुसरे सदरे गेला । सदर देखुनि सुखी झाला ॥
’ऐशी सदर नव्हती । नवरंगशा बाच्छायाला" ॥
अबदुल तिसरे सदरे गेला । सदर देखुनि सुखी झाला ॥
"ऐसी सदर नाहीं अवरंगशा बाच्छायाला" ॥ अबदुलखान बोलिला ।
"शिवाजीस आणा भेटायाला" ॥२२॥


चौक २३
राजा नवगजींत बैसला । मोरो, शाम बोलविला ॥
रघुनाथ पेशवे । नारो शंकर पाचारिला ॥
दहातोंडया माणकोजीला । त्या इंगळ्या सुभानजीला ॥
देवकांत्या जीवाजीला । राजानें बोलाविले तुम्हांला ॥
करनखर्‍या सुभानजीला । बेलदारा पिलाजीला ॥
त्या बोबडया बहिरजीला । सरदार आले भेटायाला ॥२३॥


चौक २४
राजा विचारी भल्या लोकांला । "कैसें जावें भेटायाला" ॥
बंककर कृष्णाजी बोलला । "शिवबा सील करा अंगाला" ॥
भगवंताची सील ज्याला----। आंतून, (तो) बारिक झगा ल्याला ॥
मुसेजरीच्या सुरवारा । सरजा (जें) बंद सोडुन दिला ॥
डावे हातीं बिचवा त्याला (ल्याला) । वाघनख सरज्याच्या पंजाला ।
पटा जिव म्हाल्याप दिला । सरजा बंद सोडुन चालिला ॥२४॥


चौक २५
"माझा रामराम दादानु" ॥ गडच्या गडकर्‍या बोलिला ॥
जतन भाईनु करा । आमच्या संभाजीराजाला ॥
सराईत उमाजी राज्य (राजा) होईल तुम्हांला ॥
गड निरवितो गडकर्‍याला राज्य निरवितो नेतोजीला ॥
निरवानिरव दादानु । विनंती केली सकलीकाला ॥
"येथुनि सलाम सांगा । माझा शहाजी महाराजाला" ॥
खबर गेली जिजाऊला । शिवबा जातो भेटायला ॥
पालखींत बैसुनी । माता आली भेटायाला ॥२५॥


चौक २६
शिवबा बोले जिजाऊ सवें । "बये वचन ऐकावें ॥
माझी आसोशी खानाला । "बये जातों भेटायाला" ॥
जिजाऊ बोले महाराजाला । "शिवबा न जावें भेटायाला ॥
मुसलमान बेइमान । खान राखिना तुम्हांला" ॥
राजा बोले जिजाऊला । "येवढी उंबर झाली भेट दिली नाहीं कोणाला ॥
येवढी गोष्ट माते । आज द्यावी मला ॥
आई अबदुलखान आला ॥ यानें धाक लाविला देवाला" ॥
जिजाऊ बोले महाराजाला । "शिवबा बुद्धिनें काम करावें ।
उसनें संभाजीचें घ्यावे" ॥२६॥


चौक २७
जिजाऊ घेती अलाबला । "शिवबा चढती दवलत तुला ॥
घे यशाचा विडा" । शिवबा स्मरे महादेवाला ।
गळां घातली मिठी । मातेच्या चरणासी लागला ॥
ध्यानीं आठवुनी भगवंताला । शिवाजी राजा सदरे गेला ॥२७॥


चौक २८
"पहिला सलाम । माझा भवानीशंकराला ॥
दुसरा सलाम । माझा शहाजी महाराजाला ।
तिसरा सलाम । अमचे अबदुलखानाला " ।
शिवाजी सरजे सलाम केला । अबदुलखान (नानें) गुमान केला ॥
मनीं धरलें कपट । पुरतें कळलें महाराजाला ॥
मग तो शिवाजी सरज्याला । खान दापुनी बोलला ॥
"तूं तो कुणाबीका छोकरा । सवरत बाच्छाई सदरा" ॥२८॥


चौक २९
इतक्या उपरी राजा बोले । त्या अबदुलखानाला ॥
"खाना ज्याची करणी त्याला । कांहीएक भ्यावें रघुनाथाला ॥
तुम्ही जातीचे कोण । आम्ही जाणतों तुम्हाला ॥
तूं तरी भटारनीका छोरा । शिवाजी सरज्यापर लाया तोरा" ॥
यावर अबदुल बोलला ॥ "शिवा तुम चलो विजापुराला" ॥
"शिवाजी सरजे नेतां । बहुत दिन लागतील खानाला ॥
कळला पुरुषार्थ । तुमचा बसल्या जाग्याला" ॥२९॥

चौक ३०
"अबदुल जातका भटारी । तुमने करना दुकानदारी" ॥
इतकिया उपरी । अबदुल मनीं खवळिला पुरा ॥
कव मारिलि अबदुल्यानें । सरजा गवसून धरला सारा ॥
चालविली कटयार । सीलवर मारा न चाले जरा ॥
सराईत शिवाजी । त्यानें बिचव्याचा मारा केला ।
उजवे हातीं बिचवा त्याला । वाघनख सरजाच्या पंजाला ॥
उदरच फाडुनी । खानाची चरबी आणिली द्वारा ॥३०॥


चौक ३१
खान "लव्हा लव्हा" बोलिला । खानाचा लव्हा बेगिन आला ॥
राजानें पट्टा पडताळिला । अबदुलखानानें हात मारिला ।
शिरींचा जिरेटोप तोडला । सरजा(ला) जरासा लागला ।
भला सराईत शिवाजी । पटयाचा गुंडाळा मारिला ॥
मान खांदा गवसुनी । जानव्याचा दोरा केला ॥
अबदुलखान शिवाजी दोनी । भांडती दोनी धुरा ॥
बारा हजार घोडा । सरदार नाहीं कोणी तिसरा ॥३१॥


चौक ३२
अबदुलखान झाला पुरा । कृष्णाजी ब्राह्मण उठावला ॥
शिवाजी राजा बोलला । "ब्राह्मणा मारुं नये तुला ।
तुजशीं मारतां शंकर हांसेल आम्हांला" ॥ नाइकतां ब्राह्मणें ।
हात दुसरा मारिला । "ब्राह्मणा मारुं नये तुला ।
क्रिया शहाजीची आम्हांला" ॥ कृष्णाजी ब्राह्मण(णें) ।
हात तिसरा टाकिला ॥ (तरी) होईल ब्रह्महत्या भोंसल्यासी ।
( म्हणून ) शिवांजीनें राखिला ॥ कृष्णाजी ब्राह्मण मागें सरला ।
सैद बंडु मोहरे आला ॥ जवळ होता जिउ म्हाल्या ।
त्यानें सैद पुरा केला ॥३२॥


चौक ३३
संशय खानाचा फिटला । खान (नें) पळतां पाय काढिला ॥
मेळविला भोयांनीं । पालखींत घालून चालविला ॥
कावजीचा संभाजी भोंसला । मोठे उडीनें आला ॥
जखमा केल्या भोग्यांच्या पाया(ला) । खटारां धरणीवर पाडिला ।
शिवाजीराजा बेगिन आला । शिर कापुनी गडावर गेला ॥
जराचाच मंदिल । शिरीं त्या संभाजीचे घातला ॥
फाजिलखाना क्रोध आला । बाण आणि बंदुखा थोर वर्षाव एकच केला ॥
शिवाजीराजाचा चपाटा । फाजिलखान बारा वाटा ॥
हाल महाराजाचे झाले । अबदूलच्या लोकांला ॥३३॥


चौक ३४
प्रतापगडाहुनि केला हल्ला । मारिती खुण सरज्याच्या लोकांला ॥
धरल्या चारी वाटा । ज्यांनीं घाट बळकाविला ॥
दळ त्या समई । पायदळाचा कडका आला ॥
सिलीमकर, खोपडया, । काकडया, सुरव्या, लोटला ॥
अंगद हनुमंत रघुनाथाला । पायचे पायदळ शिवाजीराजाला ॥
"फिरंग ठेवी जाउद्या, त्याला । राखु नका तुम्ही उगारल्या पाइकाला" ॥
फत्ते महाराजाची झाली । वाट दिली कुलवजीराला ॥३४॥


चौक ३५
पळतां फाजिलखान । त्याचा दुमाळा घेतला ॥
माघारा फिरोनि । जान(नें) हातीचा आरोबा दिला ॥
शिवाजीचे हाल । फाजिलखान घाय (यें) पुरा केलाअ ।
घोडा आणि राऊत । ज्यांणीं पाडाव केला ॥
वळल्या हातीवरल्या ढाला । चार हजार घोडा अबदुल्या जावळींत बुडविला ॥
भवानी शंकर प्रसन्न ज्याला । यश राज्याला खंडयाला ।
सरज्या तोरड महीमोर्तब शिवाजीला । फत्ते झाली महाराजाची ते वेळ पन्हाळा घेतला ॥३५॥


चौक ३६
अज्ञानदास विनवी श्रोत्याला । राजा अवतारी जन्मला ॥
नळनीळ सुग्रीव जांबूवंत । अंगद हनुमंत रघुनाथाला ॥
एकांती भांडन । जैसें राम रावणाला ॥
तैसा शिवाजी सरजा । एकांती नाटोपे कवणाला ॥
दृष्टी पर्यस शिवाजीला । कलीमधीं अवतार जन्मला ॥
विश्वाची जननी । अंबा बोले शिवाजीला ॥
मोठें भक्तीचें फळ । महादेव भाकेला गोंविला ॥
जिकडे जाती, तिकडे यश राज्याच्या खंडाला ॥३६॥


चौक ३७
माता जिजाऊ बोलली । पोटीं अवतार जन्मला ॥
शंकपाळ शिवाजी महाराजानें केला । आतां मी गाईन ।
भोंसले शिवरायाच्या ख्याति ॥ दावा हेवा जाण ।
अखेर संग्रामाच्या गति ॥ राजगड राजाला ।
प्रतापगड जिजाऊला ॥ धन्य जिजाऊचे कुशी ।
राजा अवतार जन्मला ॥ आपल्या मतें अज्ञानदासानें ।
बीरमाल राज्याचा गाइला ॥ शिवाजी सरज्यानें ।
इनाम घोडा बक्षीस दिला ॥ शेरभर सोन्याचा ।
तोडा हातांत घातला ॥ यश जगदंबेचें ।
तुळजा प्रसन्न शिवराजाला ॥३७॥