Tuesday, July 31, 2012

33 koti Dev


मित्रांनो !!!!

हिंदूंचे 33 कोटी देव आहेत असे का म्हटले जाते? ते खरेच संख्येने 33 कोटी आहेत का? - या संदर्भात वाचनात आलेली ही माहिती :- 
 
मुळात हिंदू धर्म हा जगातील एकमेव विज्ञान-निष्ठ धर्म आहे. यात एकही गोष्ट "उगीचच" या सदराखाली येत नाही. तरीही जर तसे वाटले, तर निश्चितच समजावे कि आपले ज्ञान कमी पडतेय.
 
३३ कोटी या शब्दाचा जो सरळ-सरळ ३३ करोड असा अर्थ लावला जातो, तो चुकीचा आहे हे मी एक संस्कृतचा अभ्यासक म्हणून ठामपणे सांगतो. खर तर येथे कोटी या शब्दाचा अर्थ होतो Degree किंवा सोप्या भाषेत, "प्रकार". कोटी ज्यावेळी आपण पैशासंदर्भात वापरतो तेथेही हाच अर्थ मुळात अभिप्रेत असतो हे खोलवर विचार केल्यास कळते. शिवाय आपण गणितात "बैजिक पदांच्या कोटी" हि संज्ञा वापरतो तेथेही हाच अर्थ अभिप्रेत असतो. आता प्रश्न असा येईल कि हे ३३ कोटी, म्हणजे ३३ प्रकारचे देव नेमके कोण? तर त्यांची नावे देतो.

धाता, मित्र, अर्यमा, शक्र, वरुण, अंश, भग, विवस्वान, पूषा, सविता, त्वष्टा आणि विष्णू हे १२ आदित्य. (संदर्भ: महाभारत, आदि. ६५/१५-१६)

धर, ध्रुव, सोम, अह:, अनिल, अनल, प्रत्यूष आणि प्रभास हे ८ वसु. (संदर्भ: महाभारत, आदि. ६६/१८)

हर, बहुरूप, त्रयम्बक, अपराजित, वृषाकपि, शंभू, कपर्दी, रैवत, मृगव्याध, शर्व आणि कपाली हे ११ रुद्र. (संदर्भ: हरिवंश, १/३/५१-५२)

आणि याखेरीज २ अश्विनीकुमार!

असे सारे मिळून ३३ प्रकारचे देव होतात.

Monday, July 30, 2012

हरिविजय - अध्याय १३

अध्याय १३

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकुलदेवतायै नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

जो परमात्मा शेषशायी ॥ जो क्षीरसिंधूचा जांवई ॥ तो राखितो गोकुळीं गाई ॥ गौळियांच्या सर्वदा ॥१॥
ज्यासी नाम रुप गुण नाहीं ॥ निर्विकार व्यापक सर्वांठायी ॥ तो नंदाराणीस म्हणे आई ॥ मज घेईं कडेवरी ॥२॥
जो नाना साधनीं न साधे ॥ त्यासी यशोदा दाव्यानें बांधे ॥ ज्याच्या कृपेनें ब्रह्मांड बोधे ॥ तो गौळियांचे छंदें नाचतसे ॥३॥
व्यासवाल्मीकादि कवी ॥ वर्णिती ज्यासी सदा पदवी ॥ तो गौळियांसांगातें जेवी ॥ थोरपण टाकूनियां ॥४॥
तोचि हा पंढरींत भीमातीरीं ॥ ब्रह्मानंद लीलावतारी ॥ समपद जोडोनियां विटेवरी ॥ वाट पाहात भक्तांची ॥५॥
बारावा अध्याय संपतां ॥ काय वर्तली तेथें कथा ॥ अकरा सहस्त्र कंसदूतां ॥ त्रासवूनि गेले गंधर्व ॥६॥
याउपरी एके दिनीं ॥ यमानुजांतीरीं कैवल्यदानी ॥ अनंत गोपाळ मिळोनी ॥ खेळ मांडिला तेधवां ॥७॥
ठायीं ठायीं वृंद गोपाळांचे ॥ खेळ खेळती नाना परींचे ॥ नाना कष्ट साधनांचे ॥ तपें तीव्र आचरती ॥८॥
हरीसी सांडूनि एकीकडे ॥ ठायीं ठायीं मांडिलीं बंडें ॥ नाना मतें साधनकाबाडें ॥ नेणोनि हरीसी शोधिती ॥९॥
एकीं वादप्रतिपाद केला ॥ हमामा घालितां जन्म गेला ॥ एकीं हुतुतू खेळ मांडिला ॥ अहंकृति जाणोनियां ॥१०॥
एकांनीं भेदाची हमली ॥ घालितां तीं बहु श्रमलीं ॥ अहंममतेची चेंडूफळी ॥ एक भ्रमणचक्रें खेळती ॥११॥
काळविवंचना करिती पाहीं ॥ हेचि एक खेळती लपंडाई ॥ एकीं वायुधारणाबळें पाहीं ॥ केली वावडी शरीराची ॥१२॥
तीर्थभ्रमणाचा भोंवरा ॥ घेवोनि खेळती एकसरां ॥ एक जन्ममृत्युयेरझारा ॥ विटीदांडू खेळती ॥१३॥
सिद्धींचे साधनें सुरवाडती ॥ कडेकपाटें एक शोधिती ॥ परी हरिरुपीं न मिळती ॥ अहंममते भूलोनियां ॥१४॥
ऐसे बहुत गुंतले खेळीं ॥ दुरुनि पाहे वनामाळी ॥ तों त्यांच्या गाई सकळी ॥ रानोमाळ चौताळंती ॥१५॥
दश इंद्रियें मनोवृत्ती ॥ खडाणा गाई न वळती ॥ गोपांसी म्हणे जगत्पती ॥ गाई आधीं सांभाळा रे ॥१६॥
गाई वळूनि स्थिर करा ॥ मग खेळ तुमचा अवघा बरा ॥ ऐसें बोलतां जगदुद्धारा ॥ गोप धांवती वळावया ॥१७॥
करणांचिया नाना वृत्ती ॥ दुरील गाई नाटोपती ॥ विषयतृण देखती ॥ तों तों धांवती पुढें पुढें ॥१८॥
आडमार्गें गाई धांवती ॥ नाना कडेकपाटीं रिघती ॥ तृष्णेच्या खळग्यामाजी पडती ॥ कदा न सरती माघारां ॥१९॥
वासनेच्या जाळ्या थोर ॥ त्यांत तोंडें घालिती वारंवार ॥ तेथें कामक्रोधादि किरडें अपार ॥ कडकडोनि डंखिती ॥२०॥
द्वेष गर्व मद मत्सर ॥ हेचि सावजें भयंकर ॥ विकल्पगुल्में अतिघोर ॥ निर्गम नोहेचि तेथोनि ॥२१॥
निंदेचे ओरबडती कांटे ॥ नाना कुतर्क आडफांटे ॥ त्रिविध तापाचे चपेटे ॥ भयंकर वणवाहा ॥२२॥
ऐशा गाई विषयतृण चरती ॥ परी सर्वथा नव्हे तृप्ती ॥ मग स्वर्गसुखाच्या पर्वतीं ॥ ऊर्ध्वगती चढियेल्या ॥२३॥
सुकृताचे तृण सरे ॥ मग फिरतां न ये माघारें ॥ लोटूनि देती एकसरें ॥ दुःखभारें आरडती ॥२४॥
जैसें भाडियाचें घोडें देख ॥ कीं वेश्येची मैत्री क्षण एक ॥ कीं उशीं घेतला दंदशूक ॥ बहु शीतल म्हणोनियां ॥२५॥
विषाचें शीतळपण ॥ कीं ओडंबरीचें भूषण ॥ कीं गंधर्वनगरींचें सैन्य ॥ तैसें जाण स्वर्गंसुख ॥२६॥
असो गाई गेल्या सकळ ॥ बहिर्मुख अवघे गोपाळ ॥ मग धांवती रानोमाळ ॥ गोगवेषणाकारणें ॥२७॥
गाई नाटोपती सर्वथा ॥ शिणले गोपाळ धांवतां ॥ इंद्रियें निग्रह करुं जातां ॥ तों तीं अधिक खवळती ॥२८॥
नेत्र भलतेंचि विलोकिती ॥ म्हणोनि झांकिले अहोरात्रीं ॥ तों कर्ण नसतेंचि ऐकती ॥ कैसीं आकळती इंद्रियें ॥२९॥
जिव्हां आठवी रस ॥ घ्राण मागे सुवास ॥ त्वचा मागे स्पर्श ॥ थोर उत्कर्ष इंद्रियांचा ॥३०॥
मन इंद्रियांचा धनी ॥ एकादश स्वर्ग त्यापासूनी ॥ त्या मानसी ठायीं वळोनी ॥ हरीविण कोणा नाणवे ॥३१॥
मन हें व्याघ्र भयंकर ॥ दश इंद्रियें त्याची पिलीं साचार ॥ जिकडे उडी घेई मनोव्याघ्र ॥ पिलीं समग्र तिकडेचि ॥३२॥
या मनोव्याघ्रें थोर थोर ॥ गिळिले पुन्हां दुजे गिळणार ॥ भगांकित केला पुरंदर ॥ कलंकी चंद्र जाहला ॥३३॥
असो बहुतांचीं नांवें घेतां ॥ निंदा घडो पाहे तत्त्वतां ॥ गोपाळ शिणले बहु धांवतां ॥ गाई सर्वथा नाटोपती ॥३४॥
ऐसे गोपाळ बहु श्रमले ॥ म्हणती काय करावें ये वेळे ॥ धरा जगंद्वद्याची पाउलें ॥ तरी आकळे गोवृंद ॥३५॥
मग सकळ गोपाळ त्या अवसरा ॥ शरण आले इंदिरावरा ॥ म्हणती तुजवांचून मुरहरा ॥ गाई कदा नाकळती ॥३६॥
तुजवेगळीं बंडें ॥ केलीं आम्हीं उदंडें ॥ बहुत साधनें प्रचंडें ॥ करोनियां शीणलों ॥३७॥
हरि तुझी कृपा न होतां ॥ अवघीं साधनें गेलीं वृथा ॥ आतां उठें तूं अच्युता ॥ वळीं गाई आमुच्या ॥३८॥
ऐसें गडी सहज बोलती ॥ कृपारस दाटला हरीच्या चित्तीं ॥ वंशवाद्य घेऊनि हातीं ॥ कमलापति उठला ॥३९॥
मुरलीधरें ते अवसरीं ॥ मुरली लाविली अधरीं ॥ मुरलीनादें मुरारी ॥ मन मोहवी गाईंचें ॥४०॥
ऐकतां मुरलीचा स्वर ॥ गाई टंवकारल्या समग्र ॥ धांवत आल्या सत्वर ॥ सर्व विषय टाकूनियां ॥४१॥
हरीभोंवती हंबरती ॥ एकी प्रीतीनें चरण चाटिती ॥ पुच्छें वर करुनि नाचती ॥ गोप पाहती विस्मित ॥४२॥
गोप म्हणती घननीळा ॥ धन्य तुझी अगाध लीला ॥ क्षणमात्रें गाई सकळा ॥ तुवां वळविल्या मुरलीस्वरें ॥४३॥
कृष्णपायीं घालिती मिठी ॥ प्रेमें सद्गद होती पोटीं ॥ म्हणती धन्य भाग्य आमुचें सृष्टीं ॥ गडी जगजेठी जोडला ॥४४॥
कळंबातळीं घननीळ ॥ पांवा वाजती रसाळ ॥ सभोंवते मिळोनि गोपाळ ॥ गदारोळ करिताती ॥४५॥
पेंधा म्हणे ऐका गोष्टी ॥ पूर्वीं खेळे बहुत जाहले सृष्टीं ॥ आम्ही जाहलों तेचि पुढती ॥ खेळ देखा सर्वही ॥४६॥
गडी म्हणती पेंधिया ॥ ते कोण सांगें लवलाह्या ॥ पेंधा म्हणे चित्त देऊनियाम ॥ सावध ऐका सकळही ॥४७॥
पूर्वीं नीलग्रीवसुत षडानन ॥ संसार मिथ्यारुप जाणोन ॥ कपाटीं बैसला जाऊन ॥ स्वस्वरुप चिंतित ॥४८॥
विधिपुत्र नारद जाणा ॥ तो कळी लावावया बहु शाहणा ॥ परस्परें लावूनि भांडणा ॥ आपण कौतुक पाहतसे ॥४९॥
व्यासपुत्र शुक आगळा ॥ तेणें काम सगळाचि गिळिला ॥ रंभेचा गर्व हरिला ॥ निजप्रतापेंकरुनियां ॥५०॥
अंबरीप ध्रुव रुक्मांगद ॥ शिबी हरिश्चंद्र प्रसिद्ध ॥ खेळ्यांमाजी मुकुटमणी प्रल्हाद ॥ ज्याची लीला अगाध पैं ॥५१॥
खेळ्यांमाजी बळिया बळी ॥ द्वारपाळ ज्याचा वनमाळी ॥ बिभीषण तो राक्षसमेळीं ॥ कुलोद्धारक निवडला ॥५२॥
हनुमंत वायुनंदन ॥ खेळ्यांमाजी पंचानन ॥ तो श्रीरामासी आवडे जैसा प्राण ॥ गिरि द्रोण जेणें आणिला ॥५३॥
ऐसे खेळे बहुत आहेत ॥ परी म्यां सांगितले किंचित ॥ ऐसें गोप जों संवादत ॥ तों सायंकाळ ओसरला ॥५४॥
अस्तासी गेला वासरमणी ॥ गोकुळा परतला चक्रपाणी ॥ आपल्या गाईंलागोनी ॥ गोप बाहती तेधवां ॥५५॥
ये गे चक्रधरे मीनरुपें ॥ शंखासुर मारिला प्रतापें ॥ पान्हाइलीस ऐक्यरुप ॥ विधीलागीं डोळसे ॥५६॥
एक गाई निबरपृष्ठी ॥ भक्त पाळी कृपादृष्टीं ॥ एक म्हणे माझे गाईनें सकळ सृष्टी ॥ दंतांवरी धरियेली ॥५७॥
एक म्हणे माझी गाई सिंहवदन ॥ परी भक्तांसी सदा सुप्रसन्न ॥ एक म्हणे माझी खुजी वामन ॥ थोर तरी गगनीं न समाये ॥५८॥
एक म्हणे गोपाळ ॥ माझ्या गाईनें रक्षिलें द्विजकुळ ॥ क्षत्रियतृण एकवीस वेळ ॥ खाऊनि खुरटी पैं केली ॥५९॥
चौदा वर्षें गेली वना ॥ खोंचोनि मारिलें रावणा ॥ राज्यीं स्थापूनि बिभीषणा ॥ अयोध्येसि परतली ॥६०॥
ऐशा गाई पाचारुनि त्वरा ॥ अवघे आले निजमंदिरा ॥ नित्य काळ यमुनातीरा ॥ हरि ये गाई रक्षणार्थ ॥६१॥
गोकुळीं असतां जगज्जीवन ॥ दावी अद्‌भुत लीला करुन ॥ द्वादश गांवें गिळिला अग्न ॥ गोवर्धन उचलिला ॥६२॥
विश्वरुप मुखीं दाविलें ॥ पूर्णब्रह्म हें अवतरलें ॥ हें गोकुळींच्या जनां नाकळे ॥ दृढ व्यापिलें मायेनें ॥६३॥
एकदां आली शक्तिचतुर्दशी ॥ जन घरोघरीं पूजिती देवीसी ॥ विसरले हरिस्मरणासी ॥ सर्व शक्तींची जो ॥६४॥
जन कैसे जाहले मूढ ॥ शेंदुरें भरला देखती दगड ॥ तेथेंचि भजती दृढ ॥ नेणोनियां हरीतें ॥६५॥
जो त्रैलोक्यप्रकाशक वासरमणी ॥ त्यासी नमस्कार करी कोणी ॥ क्षुद्र दैवतें देखोनी ॥ नमस्कारिती साष्टांगें ॥६६॥
जाखाई जोखाई मायाराणी ॥ मारको मेसको यक्षिणी ॥ आग्या झोटिंग जखिणी ॥ त्यांसी भजोनी जन बुडाले ॥६७॥
कर्णपिशाच भगलिनी ॥ उच्छिष्टचांडाळी रानसटवी जखणी ॥ वेताळ मुंज्या काळरजनी ॥ भजिजे जनीं अतिप्रीतीं ॥६८॥
असो गोकुळींचे जन ॥ सांडूनियां विष्णुभजन ॥ घरोघरीं क्षुद्र देवांचें पूजन ॥ देखोनि हरि क्षोभला ॥६९॥
कोपतांचि कृष्णनाथ ॥ गोकुळींचे जन जाहले भ्रांत ॥ नरनारी प्राणी समस्त ॥ नग्न फिरती चोहटां ॥७०॥
यशोदा आणिक नंद ॥ दोघें असती सावध ॥ वरकड लोक विषयांध ॥ नग्न होवोनि धांवती ॥७१॥
सासू जांवई विहिणी ॥ कोण्ही न लाजती कोणा लागूनी ॥ तें नंदें दृष्टी देखोनी ॥ आश्वर्य करी तेधवां ॥७२॥
नंद म्हणे कृष्णनाथा ॥ यासी काय करावें आतां ॥ हरि म्हणे विष्णूस न भजतां ॥ गति तत्त्वतां ही जाहली ॥७३॥
करिताम विष्णूचें स्मरण ॥ अवघे होती सावधान ॥ नंद करि विष्णुचिंतन ॥ नारायणा पाव आतां ॥७४॥
सर्व लोकीं घेतां हरिनाम ॥ तत्काळ दूरी जाहला भ्रम ॥ नामापुढें क्रोधकाम ॥ वितळोनि जाती क्षणमात्रें ॥७५॥
असो नामाची अगाध करणी ॥ वेदव्यास बोलिला बहु पुराणीं ॥ हरिस्मरण करितां गोकुळजनीं ॥ स्वस्थ होइजे तेधवां ॥७६॥
यावरी मथुरेंत वृत्तांत ॥ वर्तला तो ऐका समस्त ॥ कंस बहुत चिंताक्रांत ॥ म्हणे काय करुं आतां ॥७७॥
ऐसा कोणी नाहीं बळी ॥ वैरी जाऊनि मारी गोकुळीं ॥ तों देवांतक आणि पितृदोही ते वेळी ॥ पैज बोलती कंसासी ॥७८॥
म्हणती आम्ही व्याघ्र होऊनि वनांत ॥ अहोरात्र बैसों जपत ॥ वना येतां राम कृष्णनाथ ॥ अकस्मात भक्षूं दोघांसी ॥७९॥
ऐकतांचि ऐसें वचन ॥ कंसें गौरविलें दोघेजण ॥ वस्त्रें भूषणें देऊन ॥ तत्काळचि बोळविले ॥८०॥
आयुष्य दोघांचें सरलें ॥ काळें बोलावूं पाठविलें ॥ व्याघ्र होवोनि बैसले ॥ जपत वृंदावनीं पैं ॥८१॥
तों ते दिवशीं राम आणि कृष्ण ॥ वना आले नाहींच दोघे जण ॥ वरकड गोप दुरुन ॥ व्याघ्र दोघे पाहती ॥८२॥
व्याघ्र विचारिती मानसी ॥ आतां आम्हीं जरी भक्षावें गोपांसी ॥ तरी उदयीक रामकृष्णांसी ॥ जन वनासी येऊं न देती ॥८३॥
यालागीं उगेचि राहिले ॥ गोपांनीं व्याघ्र दुरुनि देखिले ॥ गाई पिटिल्या ते वेळे ॥ पळत आले गोकुळा ॥८४॥
सांगती नंदादि गौळियांसी ॥ महाव्याघ्र आले वनासी ॥ गौळी भ्याले अति मानसीं ॥ म्हणती मुलांसी न धाडावें ॥८५॥
नंद सांगे यशोदे रोहिणी ॥ वना धाडूं नका चक्रपाणी ॥ दोघे व्याघ्र जपतीं वनीं ॥ गोप पळोनि आले आतां ॥८६॥
या वाडयाबाहेर देखा ॥ दोघांसी जाउं देऊं नका ॥ अवघा धंदा तुम्ही टाका ॥ परी जतन करा हरीसी ॥८७॥
आसनीं भोजनीं शयनीं ॥ विसंबूं नका चक्रपाणी ॥ जागृतीं सुषुप्तीं स्वप्नीं ॥ हरीलागूनि विसरुं नका ॥८८॥
गौळिणी रोहिणी यशोदा ॥ सदा रक्षिती रामगोविंदा ॥ कृष्ण मातेस म्हणे एकदां ॥ बाहेर जाऊं दे खेळावया ॥८९॥
मायेच्या गळां घातली मिठी ॥ धरी यशोदेची हनुवटी ॥ मायालाघवी जगजेठी ॥ कौतुकें बोले तेधवां ॥९०॥
माते राजबिदीस क्षणभरी ॥ दोघे खेळोनि येतों झडकरी ॥ माया म्हणे बहुत दूरी ॥ जाऊं नका सर्वथा ॥ ९१॥
दोन प्रहर जाहला दिन ॥ बिदीस आले दोघे जण ॥ साक्षात्‌ शेष नारायण ॥ गीर्वाणभाषा बोलती ॥९२॥
म्हणती आतांचि जाऊं वना ॥ वधावें त्या दोघां जणां ॥ चुकवोनि जनांच्या नयनां ॥ वृंदावना पातले ॥९३॥
शेष आणि अनंत ॥ एकामागें एक धांवत ॥ व्याघ्रांनीं दुरुनि देखिले येत ॥ महाधीट चपळ पैं ॥९४॥
दिधली भयानक आरोळी ॥ व्याघ्रवेषें दैत्य महाबळी ॥ वेगीं आले रामकृष्णांजवळी ॥ विक्राळ मुख पसरोनियां ॥९५॥
अष्टवर्षी बळिराम ॥ सप्तवर्षी मेघश्याम ॥ दाविला अद्‌भुत पराक्रम ॥ भक्तकामकल्पद्रुमें ॥९६॥
दोनी गदा मुखांतून काढूनी ॥ दोघीं घेतल्या तेचि क्षणीं ॥ निजांगें बळें भवंडूनी ॥ मस्तकीं ओपिल्या व्याघ्रांच्या ॥९७॥
तेणें मस्तकें जाहलीं चूर्ण ॥ दोघांचें गेले तेणें प्राण ॥ कृष्णें बळिरामें चर्में काढून ॥ चालिले घेऊन गोकुळा ॥९८॥
इकडे गोकुळीं यशोदा माता ॥ बिदोबिदीं पाहे कृष्णनाथा ॥ एक म्हणती वनासी देखिले जातां ॥ एकामागें एक पैं ॥९९॥
घाबरली तेव्हां माया ॥ नंद गौळी आले धांवोनियां ॥ चालिले वनासी पहावया ॥ रामकृष्णांसी तेधवां ॥१००॥
एकीं करीं घेतल्या डांगा ॥ एकीं भिंदिमाळा घेतल्या वेगां ॥ माया म्हणे बळिराम श्रीरंगा ॥ कोण्या वनीं पाहूं तुम्हां ॥१॥
धांवती गौळियांचे भार ॥ दोघे देखिले येतां समोर ॥ नंद पुढें धांवे सत्वर ॥ पुसे दोघांसी तेधवां ॥२॥
कोठें गेलां होतां दोघे जण ॥ व्याघ्रचर्में आणिलीं कोठून ॥ ते म्हणती दोघे व्याघ्र मरुन ॥ पडिले होते आपणचि ॥३॥
मग चर्में आम्हीं काढिलीं वेगीं ॥ ताता तुम्हांस आसनालागीं ॥ नंद म्हणे याचि दोघीं ॥ व्याघ्र मारिले असतील ॥४॥
घरास आणिले दोघे जण ॥ नंद म्हणे यशोदेलागून ॥ या दोघांसी रक्षण ॥ शक्राचेनि न करवे ॥५॥
हे दोघे जाहले अनिवार ॥ यांसी दुजा कोण रक्षिणार ॥ असो एके दिवशीं मुरहर ॥ कालिंदीतीरीं क्रीडत ॥६॥
तों कंसाचे रंगकार ॥ वस्त्रें रंगविती चित्रविचित्र ॥ गडियांसमवेत राजीवनेत्र ॥ तयांपासीं पातला ॥७॥
तों बळिभद्र पुसे तयांतें ॥ कोणाचीं वस्त्रें रंगवितां येथें ॥ ते म्हणती तुम्हाम गौळियांतें ॥ काय कारण पुसावया ॥८॥
तुम्ही गुराखे इतुके जण ॥ तुम्हां एकला मी करीन ताडण ॥ कंसासी कळतां वर्तमान ॥ गोकुळ तुमचें नुरेचि ॥९॥
ऐकोनि कोपला बळिभद्र ॥ ताडिले अवघे रंगकार ॥ मग ते पळती समग्र ॥ मथुरापुरीं पावले ॥११०॥
सांगती कंसासी वर्तमान ॥ वस्त्रें तुमचीं नेलीं हिरोन ॥ दचकलें कंसाचें मन ॥ न बोलवे वचन तयासी ॥११॥
इकडे यमुनातीरीं वनमाली ॥ वस्त्रे सकळांसी वांटिलीं ॥ गोवळे श्रृंगारिले सकळी ॥ सायंकाळीं परतले ॥१२॥
कृष्णें आणि बळिभद्रें ॥ घेतलीं नाहीं कदा वस्त्रें ॥ गोवळे हरीचीं चरित्रें ॥ गर्जत जाती आनंदें ॥१३॥
भ्याले गोकुळींचे लोक ॥ आलें म्हणती कंसाचें कटक ॥ भय वाहती सकळिक ॥ गौळी निघाले बाहेरी ॥१४॥
नंदें ओळखिले गोवळे ॥ वस्त्रें चित्रविचित्र पांघुरले ॥ तों रामकृष्ण पुढें आले ॥ नंदें पुसिलें तयांसी ॥१५॥
राजीवनेत्रा वनमाळी ॥ कोणाचीं वस्त्रें हिरोनि आणिलीं ॥ आणाल येथें एकादी कळी ॥ नांदणें गोकुळीं नव्हे मग ॥१६॥
कृष्ण म्हणे यमुनेथडीं ॥ खेळत होते आमुचे गडी ॥ आम्हांस देखोनि तांतडी ॥ भयें पळाले रंगकार ॥१७॥
वस्त्रें टाकूनि पळाले समस्त ॥ मग तीं आम्हीं आणिलीं त्वरित ॥ टाकूनि यावें अरण्यांत ॥ तरी तेंही तुम्हांस अन मानेचि ॥१८॥
असो आणिक एके दिवशीं ॥ शेषवतार आणि हृषीकेषी ॥ कंसाचिया पुष्पवाटिकेसी ॥ लवलाहेंसीं पातले ॥१९॥
तों तेथें कंसदूत ॥ पुष्पहारे भरुनि बहुत ॥ लवलाहें घेऊनि जात ॥ कंसरायाकारणें ॥१२०॥
तों बळिराम आणि नारायण ॥ आडवे धांवले दोघे जण ॥ दूतांसी केलें ताडण ॥ सुमने नेतां कोणासी ॥२१॥
ते म्हणती आम्ही कंसदूत ॥ प्रत्यही फुलें नेतों समस्त ॥ तुम्ही कोण वर्जावया येथ ॥ मग बोलत शेष पैं ॥२२॥
जाऊनि सांगा कंसातें ॥ बळिरामें पुष्पें नेलीं समस्तें ॥ ऐसें बोलोनि गोकुळपंथें ॥ पुष्पभार परतविले ॥२३॥
वेगें आले मंदिरा ॥ माता म्हणे भुवनसुंदरा ॥ कोणाचीं पुष्पें सुकुमारा ॥ हिरोनियां आणिलीं ॥२४॥
कृष्ण म्हणे ऐक जननी ॥ नाग पूजावे आजिचे दिनीं ॥ यालागीं तुज आणोनी ॥ पुष्पें दिधलीं जाण पां ॥२५॥
आजि उरग पूजावे पंचमीसी ॥ तेणें भोगींद्र संतोषे मानसीं ॥ हांसत मग हृषीकेशी ॥ संकर्षणा विलोकी ॥२६॥
असो कंसा जाणविती दूत ॥ पुष्पें हिरोनि नेलीं समस्त ॥ कंस भयभीत मनांत ॥ म्हणे वैरी बहुत वाढले ॥२७॥
वायुसंगें अग्नि वाढे ॥ कीं पळोपळीं सूर्य चढे ॥ तैसे वैरियांचे पवाडे ॥ अधिकाधिक चढताती ॥२८॥
तों उठिला जळासुर ॥ उभा राहिला कंसासमोर ॥ म्हणे तुझ्या शत्रूंचा संहार ॥ मी करीन निश्चयेंसीं ॥२९॥
यमुनार्‍हदामाजी जाऊनी ॥ मी सावध बैसेन लपोनी ॥ जळक्रीडेसी अनुदिनीं ॥ नित्य येतो शत्रु तुझा ॥१३०॥
तयासी तेथें धरुन ॥ सगळाचि मी गिळीन कृष्ण ॥ कंसास वाटलें समाधान ॥ म्हणे यशवंत होईं तूं ॥३१॥
वस्त्रें भूषणें गौरविला ॥ जळासुर उभा ठाकला ॥ मृत्यूनें बोलावूं पाठविला ॥ ओहटला आयुष्यपूर ॥३२॥
मित्रकन्यातीरीं सत्वर ॥ येऊनि लपला जळासुर ॥ केव्हां येईल नंदकिशोर ॥ म्हणोनियां जपतसे ॥३३॥
कीं पूर्वीं काळनेमी बैसला जपत ॥ केव्हां येईल म्हणे समीरसुत ॥ तैसा जळासुर वाट पाहात ॥ श्रीकृष्णाची सर्वदा ॥३४॥
आणिक वाटे नव जाय कोणाचे ॥ आगमन इच्छी श्रीकृष्णाचें ॥ धन्य भाग्य तयाचें ॥ ध्यान हरीचें लागलें ॥३५॥
द्वेषवैरें भजनस्थिती ॥ जे जगद्वंद्यास मनीं ध्याती ॥ त्यांसी नुपेक्षी जगत्पती ॥ वेध चित्तीं जयांच्या ॥३६॥
एकें केलें परिसाचें पूजन ॥ लोह लावितांचि करी सुवर्ण ॥ एकें परिस दगडावरी कुटून ॥ मग लोहासी लावियला ॥३७॥
तत्काळचि केलें सुवर्ण ॥ दोघां परी समसमान ॥ तैसाचि हा कालियामर्दन ॥ द्वेषियां भक्तां सारिखाचि ॥३८॥
असो एके दिवशीं घेऊनि गोपाळ ॥ जळक्रीडेसी आला घननीळ ॥ मग ते वेळीं गोप सकळ ॥ कालिंदीडोहीं प्रवेशती ॥३९॥
उडी टाकी रमानाथ ॥ खेळतां जळीं झाला गुप्त ॥ जळासुरासी शोधीत ॥ कोठें बैसला म्हणोनियां ॥१४०॥
पूर्वीं सागरीं शंखासुर ॥ वधोनि केला वेदोद्धार ॥ तैसाचि शोधी यादवेंद्र ॥ यमुनाडोहीं अरीतें ॥४१॥
देखोनियां श्यामसुंदर ॥ वेगें मिठी घाली जळासुर ॥ मल्लयुद्ध मांडिलें अनिवार ॥ न कळे बाहेर कोणातें ॥४२॥
श्रीहरीच्या बळापुढें ॥ मशक काय तें बापुडें ॥ ग्रीवेसी धरुनि निवाडें ॥ पिळिला तेव्हां असुर तो ॥४३॥
धुवोनि पिळिजे जेवीं वस्त्र ॥ तैसा रागें मुरडिला असुर ॥ भडभडां वाहे रक्तपूर ॥ यमुनानीर ताम्र झालें ॥४४॥
जळासुराचे प्राण ॥ गेले तेव्हां नलगतां क्षण ॥ इकडे गोपाळ जळक्रीडा करुन ॥ अवघे बाहेर निघाले ॥४५॥
गोपाळ चहूंकडे पाहती ॥ कोठें न दिसे सांवळी मूर्ती ॥ घाबरले परम चित्तीं ॥ परी यदुपति दिसेना ॥४६॥
हांक फोडिती तेधवां ॥ वैकुंठपति कमलाधवा ॥ काय झालासी केशवा ॥ जीवाच्या जीवा श्रीहरी ॥४७॥
हरि यमुनाडोहीं बुडाला ॥ एकचि हाहाकार झाला ॥ पुढती गोपाळ ते वेळां ॥ डोहामाजी प्रवेशले ॥४८॥
घेती डोहामाजी धांडोळा ॥ एक बडविती वक्षःस्थळा ॥ नेत्रीं वाहे अश्रुधारा सकळा ॥ दुःखकल्लोळ लोटती ॥४९॥
इकडे काय केलें हृषीकेशें ॥ जळासुराचें प्रेत नागपाशें ॥ बांधोनियां परमपुरुषें ॥ ओढोनि बाहेरी काढिलें ॥१५०॥
गोपांनीं देखिला गोविंद ॥ जो जगद्वंद्य मूळकंद ॥ जाहला गोपाळांसी ब्रह्मानंद ॥ मग धांवती भेटावया ॥५१॥
जैं जळासुराचें प्रेत ॥ बाहेर काढिलें अद्‌भुत ॥ अवघ्यांसी श्रीकृष्ण म्हणत ॥ ओढा समस्त निजबळें ॥५२॥
गोपांसी म्हणती रामयदुवीर ॥ आम्हीं वधिला जळासुर ॥ गोकुळीं हा समाचार ॥ सर्वथाही न सांगावा ॥५३॥
हें प्रेत आणा गोकुळीं ओढोन ॥ आम्हीं पुढें जातों दोघे जण ॥ कांखेसी घोंगडया घेऊन ॥ रामकृष्ण चालिले ॥५४॥
भोगींद्र आणि क्षीराब्धिजापती ॥ धांवत आले मंदिराप्रती ॥ यशोदेपुढें दोघे दडती ॥ जाहले चित्तीं भयभीत ॥५५॥
यशोदा म्हणे गाई टाकून ॥ पुढें कां आलेती दोघे जण ॥ यावरी राम मनमोहन ॥ काय वचन बोलती ॥५६॥
माते आज आमुच्या गडयांनीं ॥ बागुड काढिला यमुनेंतूनी ॥ आम्ही दोघांहीं देखिला नयनीं ॥ मग भिवोनी पळालों ॥५७॥
महाभ्यासुर देखिलें प्रेत ॥ आम्हांसी धीर न धरवेचि तेथ ॥ मग गाई टाकूनि त्वरित ॥ आलों धांवत तुजपासीं ॥५८॥
उरगेंद्र आणि यादवेंद्र ॥ दासांसी दाविती लीलाचरित्र ॥ मातेसी म्हणती सत्वर ॥ लपवीं आम्हां कोठेंतरी ॥५९॥
मातेनें ते वेळीं दोघे जण ॥ हृदयीं धरिले शेषनारायण ॥ म्हणती लेंकरें आलीं भिऊन ॥ सांडीं ओंवाळून सांडणें ॥१६०॥
ज्याची इंद्र आज्ञा वंदी मुकुटीं ॥ ज्यासी हृदयीं ध्याती पद्मजधूर्जटी ॥ त्यावरोनि यशोदा उतरी दृष्टी ॥ निंबलोण प्रीतीनें ॥६१॥
इकडे जळासुराचें प्रेत ॥ गोवळे ओढून आणीत ॥ एक त्याच्या मुखांत धूळ टाकीत ॥ एक मारिती पाषाण ॥६२॥
एक डांगा उचलोनि घालिती ॥ एक त्याचें शिरीं मुतती ॥ एक तोंडास काळें माखिती ॥ कोल्हाळ करिती भोंवते ॥६३॥
नंदादि गोकुळींचे जन ॥ आले नगराबाहेर धांवोन ॥ तों विशाळ प्रेत देखोन ॥ भयभीत सर्वही ॥६४॥
गोप सांगती ते वेळां ॥ आम्ही समस्तीं हा मारिला ॥ तुम्हांसी दावावया आणिला ॥ हरि पळाला भिवोनि ॥६५॥
आम्ही गोपाळ मोठे धीट ॥ म्हणोनि ओढीत आणिला नेटें ॥ नंदास आश्चर्य वाटे ॥ म्हणे अद्‌भुत वर्तलें कीं ॥६६॥
कंसासी समाचार कळला ॥ जळासुर प्राणासी मुकला ॥ हृदयीं परम दचकला ॥ म्हणे मृत्यु आला जवळी पैं ॥६७॥
दूत गोकुला पाठविले ॥ गोपांनीं जळमनुष्य मारिलें॥ तें घेवोनि या वहिलें ॥ शकटावरी घालोनियां ॥६८॥
दूत धांवोनि आले गोकुळा ॥ नंदास म्हणती उठा चला ॥ जळमनुष्य ये वेळां ॥ आणूं पाठविलें कंसानें ॥६९॥
गाडयावरी प्रेत नेलें घालोनी ॥ कंसें देखिलें तें नयनीं ॥ परम तळमळी मनीं ॥ म्हणे ईश्वरकरणी अद्‌भुत ॥१७०॥
ज्याच्या भयें पळती सुर ॥ महापराक्रमी जळासुर ॥ गुराख्यांनीं तो महावीर ॥ क्षणमात्रें मारिला ॥७१॥
पावकासी पतंगें धरिलें ॥ अळीनें गरुडासी उचलिलें ॥ जंबुकांनीं फोडिलें ॥ केसरीचें उदर जैसें ॥७२॥
अजांनीं मारिला व्याघ्र ॥ दर्दुरें रगडिअल उरगेंद्र ॥ विपरीत काळाची मोहर ॥ महाअसुर गेला हा ॥७३॥
जळासुराचें प्रेत पुरिलें ॥ नंद गौळी गोकुळा आले ॥ आनंदें उत्साह करुं लागले ॥ पूर्ण अवतरलें परब्रह्म ॥७४॥
उतरावया पृथ्वीचा भार॥ असुरपृतना अनिवार ॥ त्यांचा करावया संहार ॥ यादवेंद्र अवतरला ॥७५॥
असो मथुरेमाजी कंस ॥ चिंतानळ जाळी तयास ॥ अरिप्रताप विशेष ॥ अनिवार वाढला ॥७६॥
तों पुढें असुरासुर ॥ विक्राळवदन भयंकर ॥ महादुरात्मा जोडोनि कर ॥ कंसापुढें बोलतसे ॥७७॥
म्हणे क्षण न लागतां ये अवसरीं ॥ वधूनि येईन तुझा वैरी ॥ राया तूं सर्वथा चिंता न करीं ॥ जितचि वैरी आणीन ॥७८॥
अथवा तेथेंचि मारीन ॥ कीं सगळेचि दोघां गिळीन ॥ मग मथुरेसी तुझें कल्याण ॥ नांदें अढळ सर्वदा॥७९॥
कंस म्हणे तुझे बोल ॥ लागती अमृताहूनि रसाळ ॥ परी वैरी अनिवार सबळ ॥ नाटोपती कवणातें ॥१८०॥
जे जे जाती प्रतिज्ञा करुनी ॥ ते नाहीं देखिले पुन्हां नयनीं ॥ यालागीं तुझ्या वचनीं ॥ विश्वास माजा न बैसे ॥८१॥
मग तो म्हणे कंसातें ॥ माझा मृत्यु वायुसुताहातें ॥ त्यावांचोनि आणिकांतें ॥ नाटोपेंचि जाण पां ॥८२॥
रामअवतार संपला ॥ तेव्हांचि हनुमंत गुप्त जाहला ॥ कोणे कपाटीं जाऊनि बैसला ॥ नाहीं देखिला पुढती पैं ॥८३॥
तो असे स्वर्गीं कीं पाताळीं ॥ तो कासया येईल ये स्थळीं ॥ आज्ञा द्यावी ये वेळीं ॥ मज गोकुळीं जावया ॥८४॥
कंस संतोषला देखा ॥ म्हणे तूं माझा प्राणसखा ॥ भयकाळींचा पाठिराखा ॥ तुजपरता न देखों ॥८५॥
दिधलीं वस्त्रें अलंकार ॥ विजयी होऊनि ये सत्वर ॥ तैसाचि वायुवेगें असुर ॥ मित्रजातीरीं पातला ॥८६॥
तों तेथें मिळाले गोपाळ ॥ मध्यें बैसला वैकुंठ पाळ ॥ ज्याचें स्वरुप अगाध अचळ ॥ वेदशास्त्रांसी न वर्णवे ॥८७॥
तो असुरासुर दुरुनी॥ गोप येतां देखती नयनीं ॥ छत्तीस गांवें भूमीपासूनी ॥ शरीर गगनीं उंच दिसे ॥८८॥
भाळीं चर्चिला शेंदूर ॥ विक्राळ वदन भयंकर ॥ जिव्हा लळलळीत भ्यासुर ॥ दाढा बाहेर दिसताती ॥८९॥
गोपाळ जाहले भयभीत ॥ नन्दात्मजासि म्हणती समस्त ॥ हरि पहा हा दैत्य अद्‌भुत ॥ मुख पसरोनि येतसे ॥१९०॥
एक रिघती हरीचे षाठीं ॥ कैवारिया जगजेठी ॥ भयत्राता तुजविण सृष्टीं ॥ कोणी नाहीं दुसरा ॥९१॥
हरि म्हणे सकळांसी ॥ कांहीं भिऊं नका मानसीं ॥ मग तो वैकुंठपुरविलासी ॥ काय करिता जाहला ॥९२॥
मनीं विचारी जगन्नाथ ॥ यासी तों हनुमंताहातें मृत्य ॥ तो जरी सखा पावे येथ ॥ तरीचि दैत्य आवरे ॥९३॥
मग नेत्र झांकोनि भगवान ॥ करी वायुसुताचें चिंतन ॥ म्हणे प्राणसखया वेगेंकरुन धांवे आतां ये वेळे ॥९४॥
तूं भक्तांमाजी चूडामणी ॥ सद्‌गुणरत्‍नांची खाणी ॥ रात्रीमाजी द्रोणाचल आणूनी ॥ सवेंचि नेऊनि ठेविला ॥९५॥
अशोकवनारि सीताशोकहरणा ॥ राक्षसांतका संकटनाशना ॥ शक्रारिजनकदर्पहरणा ॥ अंजनीहृदयरत्‍ना हनुमंता ॥९६॥
सेतुबंधनीं हनुमंत ॥ बैसलासे समाधिस्थ ॥ तों कानीं शब्द अकस्मात ॥ आपुले स्वामीचा ऐकिला ॥९७॥
हृदय सद्गदित जाहलें ॥ म्हणे श्रीरामें मज कां आठविलें ॥ म्हणोनि तैसेंचि उड्डाण केलें ॥ क्षणमात्र न लागतां ॥९८॥
इकडे गाई गोपाळ लपवून ॥ श्रीकृष्ण जाहला रघुनंदन ॥ बळिराम जाहला लक्ष्मण ॥ करीं चाप बाण शोभती ॥९९॥
तों गगनपंथें हनुमंत आला ॥ सप्रेम नमस्कार घातला ॥ श्रीरामचरणीं मस्तक ठेविला ॥ तो आनंद वर्णिला नव जाय ॥२००॥
उचलोनियां रघुनाथें ॥ हृदयीं धरिलें हनुमंतातें ॥ म्हणे सखया तुजपरतें ॥ प्रिय मज असेना ॥१॥
हनुमंत म्हणे रघुपती ॥ कांहीं आज्ञा करा मजप्रती ॥ म्हणोनि बध्दांजली मारुती ॥ सीता पतीपुढें उभा असे ॥२॥
श्रीराम म्हणे ते अवसरीं ॥ पैल असुर येतो आम्हांवरी ॥ त्याचा मृत्यु असे तुझे करी ॥ तरीं संहारीं तूं तयातें ॥३॥
ऐकतांचि ऐसें वचन ॥ बलार्णव परम वायुनंदन ॥ वारण देखोनि धांवे पंचानन ॥ तैसा उडोनि चालिला ॥४॥
कीं द्विजेंद्र धांवे उरगावरी ॥ कीं सपक्ष नग देखोनि वृत्रारी ॥ तैसा हनुमंत ते अवसरीं ॥ असुरासुरें देखिला ॥५॥
म्हणे हा माझा काळमृत्यु ॥ कोठोनि आला अकस्मातु ॥ आतां पुरला माझा अंतु ॥ न वांचें मी यापुढें ॥६॥
कृतांतकिंकाळीसम थोर ॥ ऐसी हांक फोडी असुरासुर ॥ ऐसें देखोनि वायुकुमर ॥ परमावेशें धांविन्न्नला ॥७॥
काळ उभाचि कांपे चळचळी ॥ हनुमंतें ऐसी दिधली आरोळी ॥ हस्तींचा शूळ ते वेळीं ॥ भिरकाविला असुरें हो ॥८॥
हनुमंतें शूळ देखिला ॥ वरचेवरी मग झेलिला ॥ वायुसुतें भोवंडूनि ते वेळां ॥ सवेंचि घातला त्यावरी ॥९॥
हृदयावरी आदळला ॥ मूर्च्छागत असुर जाहला ॥ सवेंचि सरसावून धांविन्नला ॥ उचलिला पर्वत ॥२१०॥
बळें भोवंडूनि ते वेळां ॥ सीताशोकहरणावरी टाकिला ॥ येतां राघवप्रियें देखिला ॥ मग फोडिला मुष्टिघातें ॥११॥
सवेंचि वायुसुतें धांवोनी ॥ असुरासुर धरिला चरणीं ॥ गरगरां भोवंडोनि गगनीं ॥ मग धरणीवरी आपटिला ॥१२॥
जैसें भंगे मृत्तिकापात्र ॥ तैसें चूर्ण झालें शरीर ॥ परतोनि आला वायुकुमर ॥ मित्रकुळभूषणाजवळी पैं ॥१३॥
घातला साष्टांग नमस्कार ॥ उभा ठाकला जोडोनि कर ॥ प्रेमें सद्गद जाहलें अंतर ॥ नेत्रीं नीर वाहतसे ॥१४॥
आदिपुरुषा आत्मारामा ॥ मृडानीवरहृदयमंगलधामा ॥ अहल्योद्धारका मेघश्यामा ॥ पूर्णब्रह्मा अव्यक्ता ॥१५॥
ताटिकांतका क्रतुरक्षका ॥ कमलिनीमित्रकुलदीपक ॥ भार्गवचापभंजना सुखदायका ॥ भार्गवजिता रघुपते ॥१६॥
पुढती स्वामीचें आगमन ॥ व्हावया येथें काय कारण ॥ मंदस्मित रघुनंदन ॥ काय वचन बोलिला ॥१७॥
बा रे हा कृष्णावतार ॥ तुजलागीं झालों रघुवीर ॥ लक्ष्मण हा शेष साचार ॥ तोचि बळिभद्र जाहलासे ॥१८॥
रामलक्ष्मणांचे चरण ॥ वंदूनि भेटला वायुनंदन ॥ म्हणे धन्य मी पुन्हां दर्शन ॥ जाहलें मज स्वामीचें ॥१९॥
हनुमंत पुढती करी नमन ॥ म्हणे एक इच्छी माझें मन ॥ गोपाळरुप संपूर्ण ॥ मी पाहीन कैसें तें ॥२२०॥
ऐकोनि हांसे अयोध्याधीश ॥ म्हणे आतां पाहें गोपाळवेष ॥ ऐसें बोलोनि परमपुरुष ॥ श्रीकृष्णरुप दाविलें ॥२१॥
काखेसी घोंगडी हातीं काठी ॥ पांवा वाजवी जगजेठी ॥ गुंजमाळा रुळती कंठीं ॥ भोंवतीं दाटी गोपाळांची ॥२२॥
लक्ष्मण जाहला बळिभद्र ॥ भोंवते चरती गोभार ॥ हमामा हुमली नाना प्रकार ॥ खेळ खेळती गोवळे ॥२३॥
कृष्णापुढें नाचती गोवळे ॥ झोंबिया घेती एक बळें ॥ ऐसें हनुमंतें देखोनि ते वेळे ॥ गदगदोनि हांसिन्नला ॥२४॥
म्हणे वैकुंठपालका सर्वेशा ॥ अगाध लीला तुझी परमपुरुषा ॥ नाना अवतारलीला परेशा ॥ भक्तांलागीं दाविसी ॥२५॥
नमस्कारोनि जगज्जीवना ॥ समीरात्मज गेला निजस्थाना ॥ गोपाळ म्हणती नंदनंदना ॥ अकळ कळेना लीला तुझी ॥२६॥
एकाएकीं हनुमंत ॥ गगनपंथे आला अकस्मात ॥ करुनि असुराचा घात ॥ प्रताप अद्‌भुत दाविला ॥२७॥
दिनमणि पावला अस्त ॥ गोकुळांत परतला रमानाथ ॥ गोप नंदासी सांगती मात ॥ वनीं हनुमंत आला होता ॥२८॥
संहारुनि असुरासुरा ॥ परतोनि गेला दक्षिणसागरा ॥ ऐसें ऐकतां त्या अवसरा ॥ आश्वर्य वाटलें गौळियां ॥२९॥
हरिविजयग्रंथ सतेज ॥ हाचि केवळ दिव्य रसराज ॥ भवरोगिया सेवितां आरोग्य सहज ॥ तेजःपुंज स्वयें होये ॥२३०॥
शुकवैद्यें आत्महस्तेंकरुन ॥ उतरिलें हें दिव्य रसायन ॥ परीक्षितीनें सेविलें सप्तदिन ॥ आरोग्य जाण तो झाला ॥३१॥
हे सेविता रसायन ॥ ब्रह्मांडभरी होइजे पावन ॥ परद्रव्यपरनिंदाग्रहण ॥ हें वावडें न सेविजे ॥३२॥
ऐसा रसराज हरिविजय ॥ सेवितां सर्वकाळ पावे जय ॥ भवरोगिया आणिक उपाय ॥ नाहीं नाहीं दूसरा ॥३३॥
जन्ममरणमोचक वैद्यराज ॥ तो ब्रह्मानंदस्वामी सहज ॥ श्रीधर तयाचे चरणरज ॥ सेवितां आरोग्य सर्वदा ॥३४॥

इति श्रीहरिविजयग्रंथ ॥ संमत हरिवंशभागवत ॥ संतजन पंडित परिसोत ॥ त्रयोदशाध्याय गोड हा ॥२३५॥
श्रीकृष्णार्पणमस्तु॥

Tuesday, July 17, 2012

गीताई विषयी आणखी थोडे

नित्यनूतन गीताई   
हा अग्रलेख लोकसत्तेत छापून आला होता. गीताई आणि प्रामुख्याने तिच्या रचियेत्यावर प्रकाश टाकणारा हा लेख तुम्हा सर्वांना आवडेल अशी आशा आहे.

साभार : लोकसत्ता, शनिवार, १४ जुलै २०१२
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मराठीत दोन महान ग्रंथ निर्माण झाले. १९१४मध्ये लोकमान्य टिळकांचे ‘गीतारहस्य’ प्रसिद्ध झाले. स्वातंत्र्यलढय़ाला अनुकूल असा गीतेचा आविष्कार लोकांसमोर आला. तरुण वयापासून असलेले गीतेचे अखंड अनुसंधान आणि सामाजिक कार्यातून आलेले अफाट अनुभव यातून लोकमान्यांचे हे चिंतन उभे राहिले.
सह्य़ाद्रीच्या कडय़ासारखे लोकमान्यांचे व्यक्तिमत्त्व आहे असे ब्रिटिश खासदार हेन्री नेव्हिन्सन याने म्हटले होते. गीतारहस्य हेही सह्य़कडय़ाप्रमाणेच आहे. तत्त्वज्ञानाचा भव्य, बळकट तरीही सुंदर असा आविष्कार आपण पाहात आहोत अशी भावना गीतारहस्य वाचताना होते. अर्थात यासाठी तत्त्वज्ञानाची किमान आवड असावी लागते. आयुष्यातील समस्यांना तोंड देण्यासाठी गीतारहस्यात तात्त्विक आधार सापडतो.
तथापि, तात्त्विक आधाराने माणसाचे समाधान होत नाही. त्याला आत्मीय आधार हवा असतो. समाजाची ती चिरंतर गरज असते. तत्त्वज्ञान शुष्क असण्याची गरज नाही हे ज्ञानदेवांनी दाखवून दिले. नाद-रूपाबरोबर स्वाद व स्पर्श यांच्याही संवेदना देणाऱ्या सर्वेद्रियस्पर्शी शब्दकळेच्या साह्याने गीतेच्या तत्त्वज्ञानाची ‘सुखेसीं सुखाडिजे, सुखाचिमाजी’ अशी अलौकिक अनुभूती ज्ञानदेवांनी करून दिली. त्याचाच विसाव्या शतकातील उन्मेष म्हणजे विनोबांची ‘गीताई’. गीतेच्या तत्त्वज्ञानाच्या गूढ अंतरंगात ती वात्सल्याने घेऊन जाते. आपल्या लहानग्याशी आईचा संवाद जितका सहज, तीच सहजता गीताईची. गीतारहस्यानंतर २० वर्षांनी गीताई वाचकांच्या हाती आली आणि बुद्धीला वात्सल्याचे रूपडे चढले. त्या घटनेला आज ८० वर्षे पूर्ण होत आहेत.
असे घडले कारण आईचे नि:स्वार्थ प्रेम ही गीताईची मुख्य प्रेरणा होती. विनोबांवर आईचा खोल प्रभाव होता. त्यांची आई फार शिकलेली नसली तरी बुद्धिमान व सहृदय होती. भारतीय तत्त्वचिंतनाचा खोल अर्थ जाणत होती. विनोबांशी झालेल्या तिच्या लहान लहान संवादातून याची प्रचीती येते. गीतेचे अनुवाद तिने वाचले होते, पण सरळसोपे मराठी तिला हवे होते. ‘विन्या तूच का नाही माझ्यासाठी सोपा अनुवाद करीत, तू हे करू शकतोस’ या आईच्या उद्गाराचा विनोबांवर खोल परिणाम झाला. पुढे हीच अपेक्षा स्वातंत्र्यलढय़ातील अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. कारण टिळकांपाठोपाठ महात्मा गांधींनीही सामाजिक कार्यासाठी गीतेचा आधार घेतला होता. त्याचा प्रभावी आविष्कार आजूबाजूला दिसत असल्याने असंख्य कार्यकर्ते गीतेकडे आकृष्ट होत होते. विनोबा गांधींना भेटले १९१६ साली. या तरुणाचे आध्यात्मिक चिंतन खूप खोल आहे हे माणसे जोखण्यात वाकबगार असलेल्या गांधींना पहिल्याच भेटीत जाणवले. त्यानंतर दोघांमध्ये अनेक वर्षे संवाद होत राहिला. गीतेतील सिद्धान्तांच्या गहनगूढ अरण्यात दोघेही शिरत. मात्र ती केवळ बौद्धिक सफर नसे. जाणलेले आचरणात आणण्याचे विविध प्रयोग लगेच होत. शास्त्र व कला यांचा मनोहारी संगम असलेले गीता हे आचरणशास्त्र आहे असे स्पष्ट दर्शन या दोघांना झाले होते. गांधींनी सत्याग्रहींसाठी तयार केलेले एकादशव्रत ही या दर्शनाची निर्मिती होती.
कार्यकर्त्यांचा आग्रह, आईची प्रेरणा आणि बापूंचे सान्निध्य यांच्या संगमातून गीताईची निर्मिती झाली. कर्म आणि अकर्म यांचा परस्परसंबंध हे गीतेतील एक गूढ कोडे आहे. गीतेचा सखोल अभ्यास असला तरी हे कोडे सुटेपर्यंत गीतेवर काही बोलण्यास विनोबांची तयारी नव्हती. पूर्ण कर्मयोग हा संन्यास तर पूर्ण संन्यास हा पूर्ण कर्मयोग या कर्माच्या दुहेरी स्वरूपाबाबत नि:संदिग्धता आल्यावर पाचव्या अध्यायापासून गीतेच्या भाषांतरास सुरुवात झाली. गीतेचे नित्यनूतन तत्त्वज्ञान मधुर मराठीत पुन्हा सामान्य लोकांच्या अंगणात आले. तत्त्वज्ञानात रस नसेल तरी मराठीच्या माधुर्याचा अनुभव घेण्यासाठी गीताई चाळावी. साधेसोपे शब्द किती खोलवर घेऊन जातात ते पाहावे. गीतेचे तत्त्वज्ञान अजिबात क्लिष्ट नाही, उलट अगदी आजच्या परिस्थितीतही ते कसे मार्ग दाखविते याचे स्पष्ट दर्शन आपल्याला गीताईमध्ये मिळते. ‘अपार धरिती चिंता जी मेल्या हि सरे चि ना, गढले काम-भोगांत जणूं सर्वस्व मानुनी! ’ किंवा ‘आशेचे लेइले फांस काम-क्रोधात तत्पर, भोगासाठी अधर्माने इच्छिती धन-संचय! ’ हे आजच्या जीवनाचे किती सहज वर्णन? या परिस्थितीचे कारणही गीतेने मार्मिकपणे सांगितले आहे. ते सोप्या मराठीत विनोबा असे सांगतात.. ‘हे आज लाभलें आता तो जोडीन मनोरथ, हें आहे तें हि होईल माझे चि सगळें धन! ’ संपत्ती, सत्तेच्या चाकांवर धावणाऱ्या मनोरथाने आसुरी वृत्ती पोसली जाऊन ऐहिक जीवन नरकप्राय होऊन जाते असे विनोबांनी म्हटले आहे.
गीताई हे भाषांतर असले तरी त्यामध्ये विनोबांच्या व गांधींच्या विचारांचे सार आले आहे. गीताईची भारतीय संस्कृतीवर अपार श्रद्धा आहे, पण ती बुद्धीच्या ठाशीव पायावर उभी आहे. म्हणूनच आजच्या काळाला अनुकूल असे स्थितप्रज्ञ दर्शन विनोबांनी गीताईतून पुढे आणले. हा काळ बुद्धीचा आहे. बुद्धीची अचाट कार्ये आजूबाजूला चालू आहेत. पण भारतीय तत्त्वज्ञानानुसार बुद्धी हे जडतत्त्व असल्यामुळे ती सात्त्विक, राजस व तामस अशी असू शकते. सध्या सर्वत्र तामस व राजसी बुद्धीचे प्रदर्शन होते. अगदी आध्यात्मिक क्षेत्रातही पैसा, पारितोषिके व संख्येचे होणारे प्रदर्शन हे राजस बुद्धीचे प्रताप आहेत. समाजातील बुद्धी सात्त्विक व्हावी ही संतांची धडपड होती. गीताई, त्यापाठोपाठ आलेली गीता प्रवचने आणि त्यानंतर आलेले स्थितप्रज्ञ दर्शन या तिन्हीमध्ये विनोबांनी बुद्धीच्या सात्त्विकतेवर भर दिलेला आहे. बुद्धीला सात्त्विकता व्रतामधून येते. ही व्रते पूर्वी व्यक्तिगत असत. जशी चातुर्मासात घेतली जाणारी व्रते. पण गांधींनी व्रतांना सामाजिक केले. कारण गांधींना फक्त भारताचे स्वातंत्र्य अपेक्षित नव्हते तर त्यांना चारित्र्यवान राष्ट्र निर्माण करायचे होते. त्यासाठी आदर्श पुरुषविशेषाची गरज होती. गांधींना ती स्थितप्रज्ञाच्या वर्णनात सापडली. ‘स्थितप्रज्ञ’ हा गीतेचा खास शब्द आहे. तो अन्य कोणत्याच ग्रंथात सापडत नाही. ती गीतेची आदर्शमूर्ती आहे. दुसऱ्या अध्यायात त्याचे वर्णन येते. गांधींनी रोजच्या प्रार्थनेत त्याचा समावेश केला. ‘घेई ओढून संपूर्ण विषयातून इंद्रिये..’ ही स्थितप्रज्ञाच्या व्रतसाधनेची सुरुवात असून ‘स्वामित्वे विषयी वर्ते, त्यास लाभे प्रसन्नता’ हे मुक्कामाचे ठिकाण आहे.
ही प्रसन्नता साधण्यासाठी बुद्धीला कर्मयोगाची जोड अनिवार्य होती. विनोबांनी ती दिली. म्हणूनच पहिला सत्याग्रही म्हणून गांधींनी विनोबांची निवड केली. विनोबांचे चिंतन व्यक्तिगत असले तरी व्रतसाधना सामाजिक राहिली. मनुष्याचे रोजचे सर्व व्यवहार हे सामाजिकच असतात असा त्यांचा विश्वास होता. म्हणून गीताई परंपरानिष्ठ, धर्माध झाली नाही. ते मानवतेचे तत्त्वज्ञान झाले कारण गीतेची मूळ निर्मिती ही मानवासाठी होती. ही स्पष्टता आल्यामुळेच गीताई लिहूनही विनोबा कर्मकांडी झाले नाहीत. उलट सुरगावचे भंगीकाम, कांचनमुक्ती, ग्रामसेवा मंडळ असे अनेक क्रांतिकारी प्रयोग करू लागले. फैजपूरच्या काँग्रेस अधिवेशनाचे त्यांनी नियोजन केले. स्वातंत्र्यानंतर भूदान यज्ञाचा महान प्रयोग एकटय़ाच्या जिवावर केला. आत्मज्ञानही पूर्ण नसल्याने विज्ञानाप्रमाणे त्यातही कायम प्रयोग झाले पाहिजेत असे विनोबा म्हणत. विज्ञानयुगात व्यापक व कठीण समस्या वारंवार निर्माण होतील आणि त्यावर त्वरित निर्णय घेण्याची गरज असेल. यासाठी सात्त्विक निर्णयशक्ती विकसित व्हायला हवी. तेथे विज्ञानाला अध्यात्माची मदत होईल, असे त्यांचे प्रतिपादन होते. व्यवहारात गीता कशी उपयोगी पडते याचे रोकडे दर्शन टिळक, गांधी व विनोबा यांच्या जीवनात होते. अगदी व्यवहारी विचार केला तरी कत्तल व कायदा न वापरता भूदान यात्रेत गरिबांसाठी विनोबांनी रोज तीनशे एकर जमीन सरकारकडे जमा केली. याची किंमत टीकाकारांनी काढावी. ‘गीताई’च्या २६१ आवृत्त्या निघाल्या असून एकूण ४० लाख प्रतींची विक्री झाली आहे. विनोबांची अन्य पुस्तकेही जाहिरातीविना लाखोंनी खपतात. केवळ गीताईच्या स्वामित्वधनावर विनोबा कोटय़धीश झाले असते. पण हा आचार्य ‘कांचनमुक्त’ होता. कारण तो गीता आचरणात आणत होता.

Monday, July 2, 2012

हरिविजय - अध्याय १२


अध्याय १२


 श्रीगणेशाय नमः ॥  श्रीकुलदेवतायै नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
जय जय यादवकुळदीपका ॥ त्रिभुवनजनहृदयप्रकाशका ॥ अंतःकरणचतुष्टयचाळका ॥ दारुकायंत्रन्यायेंसीं ॥१॥
आम्ही जग आणि तूं जगदीश्वर ॥ नाहीं द्वैतभेदविकार ॥ तूंचि नटलासी चराचर ॥ कनककटकन्यायेंसीं ॥२॥
मित्र आणि रश्मी देख ॥ स्फुलिंग आणि दाहक ॥ तैसा तूं सर्वांत श्रेष्ठ एक ॥ लोहखड्‌गन्यायेंसीं ॥३॥
धातु आणि पात्र ॥ तंतु आणि वस्त्र ॥ कीं तरंग आणि नीर ॥ तैसा श्रीधर व्यापक तूं ॥४॥
मधुसंहारका यादवेंद्रा ॥ मुरहरा श्रीकुचदुर्गविहारा ॥ कालियामर्दना गुणसमुद्रा ॥ ब्रह्मानंदा यतिराया ॥५॥
तुझें चरित्र तूंचि बोले ॥ यावरी गोकुळीं काय वर्तलें ॥ तें कृष्ण परब्रह्म सांवळे ॥ अवतरलें प्रत्यक्ष भक्तकाजा ॥६॥
एकादश अध्यायाचें कथन ॥ केलें दुर्धर कलियामर्दन ॥ द्वादश गांवें महा अग्न ॥ हरि प्राशून अक्षयी ॥७॥
प्रातःकाळीं एके दिनीं ॥ हरिसमीप येऊनि नंदराणी ॥ कोमल हस्तेंकरुनी ॥ थापटोनि उठवीत ॥८॥
उठीं उठीं माझे आई ॥ सांवळे राजसे कृष्णाबाई ॥ राजीवनेत्रा वदन धुईं ॥ वना जाईं राजसा ॥९॥
उदया आला चंडकिरण ॥ ताटीं वाढिलें दध्योदन ॥ वना जाईं जेवून ॥ गाई घेऊन कान्हया ॥१०॥
मायालाघवी ते समयीं ॥ उठूनियां देई जांभई ॥ मातेनें धरिला हृदयीं ॥ वदन चुंबी प्रीतीनें ॥११॥
इंद्रादिकां दृष्टी न पडती चरण ॥ त्याचें यशोदा धूतसे वदन ॥ कपाळीं रेखिला चंदन ॥ उटी दिधली सर्वांगीं ॥१२॥
ऐसा पूजिला यादवेंद्र ॥ तैसाचि रोहिणीनें अर्चिला बळिभद्र ॥ पदकें माळा परिकर ॥ दोघां कंठीं शोभती ॥१३॥
प्रत्यक्ष ते शेषनारायण ॥ बाहेर आले जेवून ॥ मुरली वाजवितां चहूंकडोन ॥ गाई गोप मिळाले ॥१४॥
तंव गौळी मिळाले असंख्यात ॥ नंद त्यांसीं विचार करीत ॥ म्हणती पूजावा शचीनाथ ॥ मेघ समस्त त्याहातीं ॥१५॥
करावा जी महायज्ञ ॥ तें ऐकूनि जगन्मोहन ॥ नंदास पुसे नारायण ॥ हास्यवदन करुनियां ॥१६॥
कासयाचा करितां विचार ॥ पूजासामग्री मेळविली अपार ॥ नंद म्हणे सहस्त्रनेत्र ॥ प्रतिवर्षीं पूजितसों ॥१७॥
तो मेघवृष्टि करी धरणीं ॥ तेणें वांचती सर्व प्राणी ॥ तृण जीवन गाईंलागुनी ॥ यथेष्ट अवनीं होतसे ॥१८॥
अष्टादश धान्यें षड्रस ॥ तेणेंचि होती बहुवस ॥ इंद्राहूनि विशेष ॥ श्रेष्ठ नसे दूसरा ॥१९॥
पुराणपुरुष गोकुळीं अवतरला ॥ तंव पाकशासनें गर्व केला ॥ अहंपणेंचि व्यापिला ॥ दंभअहंकारेंकरुनियां ॥२०॥
पांचवें वर्षीं वत्सहरण ॥ करी कमलोद्भव येऊन ॥ केलें त्याचें गर्वच्छेदन ॥ रुपें अपार दावूनियां ॥२१॥
सहावें वर्षीं कालियामर्दन ॥ सातव्यांत गोवर्धनोध्दारण ॥ सहस्त्राक्षाचें गर्वहरण ॥ याच मिषें मांडिलें ॥२२॥
असो नंदास म्हणे व्रजभूषण ॥ काय आहे इंद्राधीन ॥ आपुलाल्या कर्मेंकरुन ॥ प्राणी वर्तती संसारीं ॥२३॥
ज्यांचें पूर्वकर्म उत्तम नाहीं ॥ त्यांस आखंडल करील कायी ॥ विपरीत नव्हे कदाही ॥ ब्रह्मादिकां कर्म तें ॥२४॥
उत्तम कर्में उत्तम फळ प्राप्त ॥ तें शक्रासी नव्हे विपरीत ॥ आपुले सत्कर्म पूर्वकृत ॥ देव सत्य तोची पैं ॥२५॥
आपुलें जें दुष्कर्म ॥ त्याचेंचि नांव काळ यम ॥ सुखदुःखफळें परम ॥ कर्माकर्म भोगवी ॥२६॥
आपण जें केलें बीजारोपण ॥ तोचि अंकुर येत तरतरोन ॥ तैसें आपुलाल्या कर्मेकरुन ॥ जन्ममरण प्राणियां ॥२७॥
आपुल्याचि पूर्वकर्मेंकरुनी ॥ इंद्र आरुढला राज्यासनीं ॥ कर्म ब्रह्मादिकांलागोनी ॥ न सुटेचि निर्धारें ॥२८॥
तरी एक ऐका सत्य वचन ॥ पूजा गाई आणि ब्राह्मण ॥ हेचि सामग्री नेऊन ॥ अर्चा गोवर्धन प्रीतीनें ॥२९॥
आमुच्या गाई तेथें चरती ॥ तरी तो पर्वत पूजावा निश्चितीं ॥ बुध्दीचा चालक श्रीपती ॥ मानलें चित्तीं सर्वांच्या ॥३०॥
कुटुंबासहित गौळी निघाले ॥ लक्षानुलक्ष गाडे भरिले ॥ नंदराणी तये वेळे ॥ निघे सकळ स्त्रियांसह ॥३१॥
वत्सांसमवेत गोभार ॥ त्याचि पंथें जाती समग्र ॥ नंद निघाला सत्वर ॥ करीत गजर वाद्यांचा ॥३२॥
पुढें जाती गोभार ॥ मागें गोपाळांसमवेत श्रीधर ॥ त्यामागें शकट समग्र ॥ वरी बैसल्या गौळिणी ॥३३॥
कीं त्या उतरल्या देवांगना ॥ किंवा आल्या नागकन्या ॥ तैशा त्या खंजरीटनयना ॥ मिरवत जाती उल्हासें ॥३४॥
दधि घृत नवनीत ॥ अन्नांचे गाडे भरले समस्त ॥ तों मूर्तिमंत गोवर्धन दिसत ॥ कृष्ण दावीत सर्वांसी ॥३५॥
सकळांनीं गोवर्धन पूजिला ॥ अन्नांचा पर्वत पुढें केला ॥ आपुल्या हातें ते वेळां ॥ गोवर्धन जेवीतसे ॥३६॥
विशाळ पुरुष बैसला ॥ गौळियां विस्मय वाटला ॥ कोणास न कळे हरिलीला ॥ आपणचि नटला स्वरुप तें ॥३७॥
सर्वांसी म्हणे मनमोहन ॥ पहा कैसा जेवी गोवर्धन ॥ तुम्ही उगेंचि अन्नें जाळून ॥ व्यर्थ यज्ञ करीतसां ॥३८॥
याउपरी गाईंची पूजा करिती ॥ सकळ जन भोजनें सारिती ॥ सुगंध चंदन चर्चिती ॥ गौळी एकमेकांतें ॥३९॥
किंचित उरला दिनमणी ॥ मग बोले चक्रपाणी ॥ आतां गोवर्धनासी प्रदक्षिणा करुनी ॥ मग गोकुळा चलावे ॥४०॥
सिद्ध झाले सकळ जन ॥ शकटावरी आरोहण करुन ॥ गोपाळ गाई आदिकरुन ॥ करिती प्रदक्षिणा समग्र ॥४१॥
कृष्णास मध्यें वेष्टून ॥ गोप करिताती कीर्तन ॥ तो उत्साह देखोन ॥ मनीं क्षोभला सहस्त्राक्ष ॥४२॥
प्रळयमेघांच्या तोडिल्या श्रृंखळा ॥ तयांसी आज्ञा देत ते वेळां ॥ म्हणे वर्षोनियां चंडशिळा ॥ सर्वही मारा व्रजवासी ॥४३॥
गौळी माजले समस्त ॥ मज न लेखिती उन्मत्त ॥ करावा समस्तांचा घात ॥ कृष्णासमवेत आतांचि ॥४४॥
तामसगुणें इंद्र वेष्टिला ॥ हरीचा प्रताप नेणवेचि त्याला ॥ असंभाव्य मेघ वोळला ॥ एकाएकीं चहूंकडे ॥४५॥
हस्तिशुंडेऐशा धारा ॥ नभींहूनि सुटल्या सैरावैरा ॥ त्यांत वर्षों लागल्या चंडधारा ॥ पडती अनिवारा सौदामिनी ॥४६॥
चहूंकडोनि पूर चालिले तुंबळ ॥ बुडालें न दिसे कोठें गोकुळ ॥ जैसे समुद्रांत पडले ढेकूळ ॥ मग ते कोठें पहावें ॥४७॥
थरथरां कांपती सर्व जन ॥ गारा मस्तकावरी पडती येऊन ॥ गौळिणी बाळांसी पोटीं धरुन ॥ आक्रंदती तेधवां ॥४८॥
कडकडोनि वर्षती चपला ॥ महाप्रळय गौळियां ओढवला ॥ मग दीन वदनें ते वेळां ॥ धांवा मांडिला सकळांनीं ॥४९॥
आक्रोशें एक फोडिती हांका ॥ हे दीनबंधो वैकुंठपालका ॥ हे अनाथनाथा जगदुद्धारका ॥ ब्रीदें आपुलीं सांभाळीं ॥५०॥
इंद्रें मांडिला प्रळय फार ॥ तूं जरी न धांवसी श्रीकरधर ॥ तुझे कृपेचें निकेतन थोर ॥ करुनि आम्हां रक्षीं कां ॥५१॥
कोठें ठाव नाहीं लपावया ॥ धांव धांव भक्तकैवारिया ॥ गाईंच्या कांसे रिघोनियां ॥ वत्सें लपती पोटांतळीं ॥५२॥
नंद यशोदा गौळिणी सवेग ॥ वरी टाकूनि आपुलें अंग ॥ तळीं आच्छादिती श्रीरंग ॥ रक्षिती भवभंग जगद्‌गुरु ॥५३॥
अनंत ब्रह्मांडांचें पांघरुण ॥ जो मायाचक्रचाळक निरंजन ॥ त्यास निजांगाखालीं घालून ॥ गौळीजन झांकिती ॥५४॥
यशोदा करी रुदना ॥ कैसे वांचवूं जगज्जीवना ॥ मग तो वैकुंठीचा राणा ॥ काय करिता जाहला ॥५५॥
जो इंद्राचा इंद्र तत्त्वतां ॥ जो हरविधींसी निर्माणकर्ता ॥ जो प्रळयकाळीं शास्ता ॥ तो गौळियां नौंभीं म्हणतसे ॥५६॥
निजभक्तकैवारें ते वेळां ॥ धांवोनि गोवर्धन उचलिला ॥ गौळियांसी म्हणे सांवळा ॥ तळीं या रे सर्वही ॥५७॥
गोवर्धनाखालीं समग्र ॥ आले नरनारी गोभार ॥ पर्वत रुंदावला थोर ॥ जीव समग्र झांकिले ॥५८॥
अद्‌भुत हरीची करणी ॥ जीवनावरी धरिली धरणी ॥ शेषकूर्मादिकांलागोनि ॥ चक्रपाणी आधार ॥५९॥
उभाविला ब्रह्मांडाचा डेरा ॥ स्तंभ न तेचि अंबरा ॥ उडुगण मित्र रोहिणीवरा ॥ वायुचक्री चालवी ॥६०॥
भू आप अनल अनिल निराळ ॥ यांसी परस्पर वैर केवळ ॥ ते मित्रत्वें वर्तत्वें वर्तती सकळ ॥ श्रीघननीळप्रतापें ॥६१॥
सप्तावरण हें ब्रह्मांड ॥ माजीं सांठवले सकळ पिंड ॥ ऐशा ब्रह्मांडभरी उदंड ॥ रची प्रचंड माया याची ॥६२॥
द्वादश गांवें अग्नि गिळिला ॥ महाविखार कालिया मर्दिला ॥ पूतना शोषिली अवलीला ॥ तेणें उचलिला गोवर्धन ॥६३॥
गोवर्धनाखालीं सकळ लोक ॥ निवांत राहिले पावले सुख ॥ मग तो निजजनप्राणरक्षक ॥ वचन काय बोलिला ॥६४॥


म्हणे भार बहुत मज झाला ॥ अवघे मिळोनि पर्वत ॥ तंव धांविन्नला गौळियांचा मेळा ॥ स्थळीं स्थळीं उचलिती ॥६५॥
एक मस्तकें उचलोनि देती ॥ एक डांगा मुसळे उभारिती ॥ मध्यें सप्त वर्षांची मूर्ति ॥ अगाध कीर्ति जयाची ॥६६॥
गौळी बळें बहु उचलिती ॥ स्वेदपूर सर्वांगें जाती ॥ कष्टें श्वासोच्छ्‌वास टाकिती ॥ हरीस बोलती तेधवां ॥६७॥
आम्ही उचलिलें चंड पर्वता ॥ तुवां करांगुळी लाविली वृथा ॥ आम्ही कासावीस समस्त होतां ॥ तूं हांसतोसी गदगदां ॥६८॥
तुझी घाई जाणूं आम्ही वनमाळी ॥ लटकीचि लाविली त्वां करांगुळी ॥ चोरी करुनि आळी ॥ अम्हांवरी घालिसी ॥६९॥
शिदोर्‍या आमुच्या चोरुनि खासी ॥ पर्वत उचलावया कां भितोसी ॥ नवनीताचे गोळे तूंचि गिळिसी ॥ आतां कां होसी माघारा ॥७०॥
वत्सें वळावया धाडिसी आम्हां ॥ मागें शिदोर्‍या भक्षिसी पुरुषोत्तमा ॥ व्यर्थ करांगुळी मेघश्यामा ॥ कासया त्वां लाविली ॥७१॥
मग बोले वनमाळी ॥ मी काढूं काय अंगुळी ॥ महिमा नेणोनि गौळी ॥ काढीं काढीं म्हणती आतां ॥७२॥
दाखवावया चमत्कार ॥ अंगुळी ढिलाविली अणुमात्र ॥ तंव तो पर्वत समग्र ॥ एकाएकीं करकरिला ॥७३॥
दडपतांचि गोवर्धन ॥ हांक फोडिती गौळीजन ॥ हरि उचलीं वेगेंकरुन ॥ आम्ही दीन तुझे पैं ॥७४॥
पर्वत उचलीं रे दयाळा ॥ भक्तवरदायका तमालनीळा ॥ ब्रह्मानंदा अतिनिर्मळा ॥ उचलीं ये वेळा पर्वत ॥७५॥
अद्‌भुत न कळे तुझी करणी ॥ लिहितां न पुरे मेदिनी ॥ वेदशास्त्री पुराणीं ॥ नव जाय कीर्ति वर्णितां ॥७६॥
आम्ही म्हणों नंदाचा किशोर ॥ परी करणी ब्रह्मांडाहूनि थोर ॥ तूं जगदात्मा निर्विकार ॥ प्रत्यया आलासी आम्हांतें ॥७७॥
द्वादश गांवें गिळिला अग्न ॥ मूर्ख आम्ही नेणों महिमान ॥ इंद्रादि देव समस्त गण ॥ आज्ञाधारक तुझे पैं ॥७८॥
ऐसें वदती गौळीजन ॥ ऐकोनि संतोषे पद्माक्षीरमण ॥ सव्य करांगुलीकरुन ॥ गोवर्धन उचलिला ॥७९॥
उचलोनि दिधली अंगुळी ॥ कृष्ण म्हणे तुम्ही रहावें सकळीं ॥ अवघेचि बैसोनि भूतळीं ॥ ऊर्ध्ववदनें विलोकावें ॥८०॥
सहस्त्रशीर्षाचिये शक्ती ॥ सर्षपप्राय वाटे क्षिती ॥ क्षितिधरशयनें तेचि रीतीं ॥ क्षितिधर धरियेला ॥८१॥
कीं पूर्वीं निरालोद्भवनंदन ॥ करतळीं धरुनि आणी द्रोण ॥ व्रजभूषणें तेंचि रीतीं जाण ॥ नगोत्तम धरिलासे ॥८२॥
कीं अंडजप्रभु सुधारसघट नेतां ॥ क्लेश न मानीच तत्त्वतां ॥ कीं लीलाकमळ हातीं धरितां ॥ खेद चित्ता न वाटे ॥८३॥
जो सप्त धातूंविरहित ॥ जो सप्तवर्षी जगन्नाथ ॥ तो सप्तस दिन सप्त रात्रपर्यंत ॥ उभा तिष्ठत भक्तकाजा ॥८४॥
मूर्ति पाहतां दिसे लहान ॥ पुरुषार्थें भरलें त्रिभुवन ॥ चिमणाच दिसे चंडकिरण ॥ परी प्रभा पूर्ण चराचरीं ॥८५॥
घटीं जन्मला अगस्ती ॥ पाहतां धाकुटी दिसे आकृती ॥ आचमन करुनि अपांपती ॥ हृदयामाजी सांठविला ॥८६॥
वामनरुप चिमणें भासलें ॥ परी दोन पाद ब्रह्मांड केलें ॥ तेवीं नंदात्मजें आजी केलें ॥ गोवर्धन उचलोनि ॥८७॥



असो अद्‌भुत प्रताप देखोनी ॥ अश्रु वाहती गौळियांचे नयनीं ॥ उर्ध्व वदनें करुनी ॥ कृष्णवदन विलोकिती ॥८८॥
अद्‌भुत प्रताप देखोन ॥ यशोदा आली धांवोन ॥ कंठीं मिठी घालोन ॥ कृष्णवदन पाहतसे ॥८९॥
बा रे तुजवरुन ओंवाळूनियां ॥ सांडीन आतां माझी काया ॥ मी तुझी म्हणवितें माया ॥ लाज वाटे सर्वेशा ॥९०॥
तूं माझी जनकजननी ॥ मी उद्धरलें तुझे गुणीं ॥ अश्रु वाहती नंदाचे नयनीं ॥ म्हणे त्रिभुवनीं धन्य मी ॥९१॥
यशोदा आणि रोहिणी ॥ निंबलोण उतरिती हरीवरुनी ॥ सकळ गोपिका लागती चरणीं ॥ धन्य करणी दाविली ॥९२॥
आपुल्या कुरळ केशेंकरुन ॥ झाडिती श्रीहरीचे चरण ॥ एकीं चरणीं भाळ ठेवून ॥ आंसुवें पाय धुतले ॥९३॥
असो सात दिवस अखंडगती ॥ जलद शिलावृष्टि करिती ॥ मनीं भावित निर्जरपती ॥ गौळी निश्चितीं सर्व मेले ॥९४॥
अमरेंद्र म्हणे मेघांतें ॥ पुरे करा रे आतां वृष्टीतें ॥ तत्काळ उघडलें तेथें ॥ शुद्ध जाहलें नभोमंडल ॥९५॥
कीं गुरुकृपें प्रकटतां ज्ञान ॥ तेव्हांचि अज्ञान जाय निरसोन ॥ तैसाचि उगवला सहस्त्रकिरण ॥ गौळीजन सुखावती ॥९६॥
सकळांसी म्हणे कैटभारी ॥ निघा आतां वेगें बाहेरी ॥ क्षण न लागतां ते अवसरीं ॥ व्रजजन सर्व निघाले ॥९७॥
खालीं ठेवूनि गोवर्धन ॥ सकळांसी भेटे जगज्जीवन ॥ गौळी सद्गद प्रेमेकरुन ॥ म्हणती ब्रह्म हेंचि खरें ॥९८॥
श्रीकृष्णाची स्तुति करीत ॥ गोकुळा आले जन समस्त ॥ तंव गोकुळ तैसेंचि संचलेम स्वस्थ ॥ नाहीं विपरीत कोठेंही ॥९९॥
विमानीं पाहे पुरंदर ॥ तों गोकुळ गजबजिलें समग्र ॥ गाई गोपाळ सर्वत्र ॥ अतिआनंदें क्रीडती ॥१००॥
आपण जे अपाय केले ॥ ते सर्वही व्यर्थ गेले ॥ जैसे उदकातें घुसळिले ॥ तक्र ना नवनीत कांहींच ॥१॥
मनीं विचारी वज्रधर ॥ म्हणे श्रीकृष्ण पूर्णब्रह्मावतार ॥ पडलें मजपासून अंतर ॥ जगद्‌गुरु क्षोभविला ॥२॥
असंख्य ब्रह्मांडें असंख्य शक्र ॥ क्षणें निर्मील मायाचक्र ॥ तो क्षोभला जगदुद्धार ॥ कैसा विचार करुं आतां ॥३॥
ज्या श्रीहरीचें म्यां करावें पूजन ॥ त्यावरी उचलोनि घातले पाषाण ॥ बुडालों अभिमान धरोन ॥ आतां शरण जाईन त्यातें ॥४॥
दिव्य सुमनें पूजिजे गोपाळा ॥ त्यावरी धाडिल्या प्रलयचपळा ॥ तनुमनधनेंसीं या वेळा ॥ शरण घननीळा जाईन ॥५॥
अहंकारें बहु माजलों ॥ चित्स्वरुपासी अंतरलों ॥ विपरीतज्ञानें उन्मत्त झालों ॥ विसरलों जगदात्भया ॥६॥
दिसती नाना विकार भेद ॥ तेणें अंतरला ब्रह्मानंद ॥ हृदयीं ठसावेना बोध ॥ न लागे वेध हरिपायीं ॥७॥
वित्तआशा न सोडी चित्त ॥ योषितांसंगें सदा उन्मत्त ॥ हा खेद कांहीं न वाटे मनांत ॥ तरी अनंत अंतरला ॥८॥
जैसें कां पिशाच श्वान ॥ तैसें चित्त गेलें भ्रमोन ॥ न धरी क्षमा दया मौन ॥ द्वेषेंकरुन वेष्टिलें ॥९॥
धरितां योग्यता अभिमान ॥ सत्संग नावडे मनांतून ॥ चित्त उठे कुतर्क घेऊन ॥ तरी हरिचरण अंतरले ॥११०॥
चित्त न बैसे सदा भक्तीं ॥ कैंची तितिक्षा उपरति विरक्ती ॥ ऐसा अनुतापें अमरपती ॥ सद्गद चित्तीं जाहला ॥११॥
ब्रह्मा ऋषि भृगु देवगण ॥ तुंबर मरुद्गण ॥ संगें घेऊनि शचीरमण ॥ चालिला शरण श्रीकृष्णा ॥१२॥
अष्टवसु अष्टविनायका ॥ किन्नर गंधर्व गाती देखा ॥ वाजत वाद्यांचा धडाका ॥ चतुर्विध प्रकारें ॥१३॥
जाहली विमानांची दाटी ॥ व्रजासमीप उतरे भूतळवटीं ॥ तों गाई चारीत जगजेठी ॥ गोपांसमवेत आनंदें ॥१४॥
देखोनियां पुराणपुरुषा ॥ कनकदंड पडे जैसा ॥ साष्टांग पृथ्वीवरी तैसा ॥ इंद्रें घातला नमस्कार ॥१५॥
इंद्र आला कृष्णासी शरण ॥ पाहावया धांवती गोकुळीं जन ॥ म्हणती हें पूर्णब्रह्म सनातन ॥ नेणों आम्ही कांहींच ॥१६॥
रत्‍नजडित मुकुट इंद्राचा पाहीं ॥ रुळत श्रीकृष्णाचे पायीं ॥ मग हरि बोले ते समयीं ॥ उठीं त्रिदशेश्वरा ॥१७॥
व्यर्थ पेटलासी अभिमाना ॥ कासया तूं शचीरमणा ॥ तुज हे आठवण दिधली जाणा ॥ सावध येथूनि वर्तावें ॥१८॥
स्वरुपी होऊनि सावधान ॥ करावें सृष्टिकार्य संपूर्ण ॥ क्रोध दुष्टांवरी चढवोन॥ साधुजन पाळावे ॥१९॥
संतांचा न करावा मानभंग ॥ हरि भजनीं झिजवावें अंग ॥ सांडोनि सकळ कुमार्ग ॥ सन्मार्गेंचि वर्तावें ॥१२०॥
ऋषींचे आशीर्वाद घ्यावे ॥ वर्म कोणाचें न बोलावेम ॥ विश्व हें अवघें पाहावें ॥ आत्मरुपी केवळ ॥२१॥
सत्संग धरावा आधीं ॥ न ऐकावी दुर्जनांची बुद्धी ॥ कामक्रोधादिक वादी ॥ दमवावे निजपराक्रमें ॥२२॥
मी जाहलों सज्ञान ॥ हा न धरावा अभिमान ॥ विनोदेंही परछळण ॥ न करावें कधींही ॥२३॥
शमदमादि साधनें ॥ दृढ करावीं साधकानें ॥ जन जाती जे आडवाटेनें ॥ सुमार्ग त्यांस दाविजे ॥२४॥
क्षणिक जाणोनि संसार ॥ सांडावा विषयांवरील आदर ॥ असावें गुरुवचनीं सादर ॥ चित्त सदा ठेवूनि ॥२५॥
ऐसें बोलतांचि श्रीधर ॥ उभा राहोनियां अमरेंद्र ॥ स्तवन करीत अपार ॥ सकलदेवांसमवेत ॥२६॥
हे अनंतकोटिब्रह्मांडपालका ॥ हे विश्वकारणा विश्वरक्षका ॥ हे देवाधिदेवा जगन्नायका ॥ मायातीता अगम्यां ॥२७॥
तूं क्षीरसागरविलासी ॥ अवतरलासी यादववंशीं ॥ ब्रह्मानंद अविनाशी ॥ कर्माकर्मासी वेगळां तूं ॥२८॥
अवतरलासी ज्याचें सदनीं ॥ धन्य तो नंद आणि यशोदा जननी ॥ आम्हांलागीं चक्रपाणी ॥ अवतार तुवां धरियेला ॥२९॥
चहूं मुखीं स्तवी ब्रह्मदेव ॥ पंचमुखीं वर्णी सदाशिव ॥ बृहस्पति नारदादि ऋषी सर्व ॥ अपार स्तोत्रें करिताती ॥१३०॥
शक्रें कामधेनु आणविली ते वेळे ॥ कांसेखालीं कृष्णासी बैसविलें ॥ पूर्णब्रह्म घनसांवळें ॥ सप्तवर्षी मूर्ति पैं ॥३१॥
कामधेनूच्या दुग्धधारा ॥ श्रीहरिवरी सुटल्या सैरा ॥ गोविंदनामाचा घोष अंबरा ॥ गाजविला सुरवरीं ॥३२॥
गोविंद गोविंद हें नाम ॥ सकळ नामांमाजी उत्तम ॥ देव बहुत संभ्रम ॥ या नामाचा करिताती ॥३३॥
कल्पपर्यंत प्रयागवासी ॥ मख अयुत मेरुसम सुवर्णराशी ॥ पुण्य आचरतां गोविंदनामासीं ॥ तरी तुलना नाहीं सर्वथा ॥३४॥
ऋषी वेदघोषें गर्जती ॥ किन्नर गंधर्व आनंदें गाती ॥ अष्टविनायका नृत्य करिती ॥ प्रेमें डुल्लती भक्तजन ॥३५॥
दुग्धाभिषिकें ते वेळे ॥ पाहतां सकळांचे नेत्र निवाले ॥ धन्य धन्य तेचि जाहले ॥ हरिमुख पाहिलें जयांनीं ॥३६॥
उदार सुहास्य मुख चांगलें ॥ वरी दुग्धाभिषेकें कैसें शोभलें ॥ जैसें इंद्रनीळावरी घातलें ॥ काश्मीराचें कवच पैं ॥३७॥
किंवा मित्रतनयेवरी ॥ लोटे जैसी जन्हुकुमारी ॥ दुग्धाभिषेकें ते अवसरीं ॥ पूतनारी तैसा दिसे ॥३८॥
मंदाकिनीचें उदक त्वरित ॥ घेऊनि आला ऐरावत ॥ शुध्दोदकें स्नान निश्चित ॥ इंद्र घालीत निजकरें ॥३९॥
जें पूर्ण परब्रह्म निर्मळ ॥ त्याचें अंगीं कैंचा मळ ॥ परी भक्तीनें भुलला गोपाळ ॥ साकारला म्हणोनियां ॥१४०॥
दिव्य अलंकार दिव्य वस्त्रें ॥ हरीस वाहिलीं तेव्हां शक्रें ॥ अर्चूनियां षोडशोपचारें ॥ रमावर तोषविला ॥४१॥
ऐसा करोनियां सोहळा ॥ प्रदक्षिणा करीत घननीळा ॥ इंद्र आज्ञा मागोनि ते वेळां ॥ जाता जाहला निजपदा ॥४२॥
हें गोवर्धनोद्धारण ऐकतां ॥ हरे सकळ संकट दुःखवार्ता ॥ ब्रह्मानंदपद ये हाता ॥ श्रवण करितां भावार्थें ॥४३॥
असो गोकुळीं झाला आनंद ॥ उत्साह करिती परमानंद ॥ विलोकितां गोविंदवदनारविंद ॥ तृप्ति नव्हे कोणातें ॥४४॥
असो एके दिवशीं मुरारी ॥ गाई चारीत यमुनातीरीं ॥ तों वर्तली एक नवलपरी ॥ ते चतुरीं परिसिजे ॥४५॥
मयासुराचा एक पुत्र ॥ त्याचेम नांव व्योमासुर ॥ तो दुरात्मा निर्दय क्रूर ॥ कंसासुर धाडी तया ॥४६॥
व्योमासुरासी म्हणे ते अवसरीं ॥ थोर जाहला आमुचा वैरी ॥ गाई चारावया यमुनातीरीं ॥ नित्याकाळ येतसे ॥४७॥
तरी तुवां सत्वर जाऊनी ॥ वधावा तो प्रयत्‍न करोनी ॥ तेणें वचन शिरीं वंदोनी ॥ वृंदावना पातला ॥४८॥
तेणें गोपाळरुप धरोनी मिळाला कृष्णदासांत येऊनी जैसा दांभिक आचार दावूनी ॥ मैंद माना मोडीत ॥४९॥
कीं कडुवृंदावन जैसें ॥ वरीवरी शोभिवंत दिसे ॥ कीं बिडालक शांत बैसे ॥ मूषकालागीं जपतचि ॥१५०॥
असुर हरीस म्हणे ते समयीं ॥ गोप वांटूनि दों ठायीं ॥ वाघमेंढी लवळाहीं ॥ खेळूं म्हणे कृष्णातें ॥५१॥
आपण वाघ जाहला ते वेळे ॥ गोपाळांसी घेऊनि पळे ॥ पर्वतीं घोर विवर कोरिलें ॥ त्यांत गोपाळ कोंडी पैं ॥५२॥
परम कपटी दुराचार ॥ गोप एक एक नेले समग्र ॥ गाईवत्सांचेही भार ॥ कोंडी विपरीं दुरात्मा ॥५३॥
गाई गोवळे नेले समस्त ॥ एकलाचि राहिला रमानाथ ॥ तटस्थ चहूंकडे विलोकित ॥ म्हणे विपरीत केलें येणें पैं ॥५४॥
भक्तांकारणें चक्रपाणी ॥ चहूंकडे हिंडे रानोरानीं ॥ महापर्वतदरीं ते क्षणीं ॥ मोक्षदानी पाहतसे ॥५५॥
मग मुरलीस्वरें वनमाळी ॥ गाई पाचारीत तये वेळीं ॥ गंगे जान्हवी भीमरथी सकळी ॥ या गे वेगीं धांवोनियां ॥५६॥
धांव गे तुंगभद्रे वैतरणी ॥ वेणी पिनाकी पयोष्णी ॥ नर्मदे सरस्वती यमुने कृष्णे वेणी ॥ गोदे मंदाकिनी या वेगें ॥५७॥
रेवा तापी भोगावती ॥ प्रवरे चंद्रभागे पूर्णावती ॥ कावेरी प्रतीची सावित्री सती ॥ या गे वेगें सत्वर ॥५८॥
सुवर्णमुखी ताम्रपर्णी ॥ क्रतुमाले शिशुमाले पयोष्णी ॥ तुंगभद्रे सुवर्णोदके यक्षिणी ॥ धांव आतां सत्वर ॥५९॥
तंव त्या पर्वताचे अंतरीं ॥ गाई आक्रंदतीं एकसरीं ॥ धांवें धांवें कां मुरारी ॥ सोडवीं झडकरी येथूनियां ॥१६०॥
मुरलीस्वरें गोपाळां ॥ आळवीतसे सांवळा ॥ या रे या रे म्हणे सकळां ॥ मांडूं काला आतांचि ॥६१॥
वडज्या सुदाम्या वांकुडया ॥ दोंदिल्या सुंदर रोकडया ॥ वाल्या कोल्या बोबडया ॥ वेडया बागडया संवगडे तुम्ही ॥६२॥
खुज्या मोठया रोडक्या कान्ह्या ॥ चपळचपळा वेधकारण्या ॥ प्रेमळ चतुरा सगुण ज्ञान्या ॥ प्राणसखे हो या वेगीं ॥६३॥
तंव पर्वताअंतरीं गोपाळ ॥ आक्रंदती करिती कोल्हाळ ॥ श्रीकृष्णनाम तें वेल्हाळ ॥ घेवोनि बाहती एकदांचि ॥६४॥
धांव आनंदकंदा गोविंदा ॥ हे कमळपत्राक्षा उदारा मुकुंदा ॥ सगुणनिर्गुणब्रह्मानंदा ॥ स्वानंदबोधा अद्वया ॥६५॥
कोंडिलों संसारपर्वतीं ॥ पडिलों जन्ममरणविषयावर्ती ॥ सांपडलों अहंकारदैत्याचे हातीं ॥ म्हणवूनि बाहतों कृष्णा तूतें ॥६६॥
मग तो भक्तकैवारी श्रीधर ॥ मुखावाटे काढूनि चक्र ॥ पर्वत फोडिला सत्वर ॥ गोगोपवत्सें सोडविलीं ॥६७॥
तंव प्रळयहांक देऊनी ॥ व्योमासुर धांवे तत्‍क्षणीं ॥ अतिविशाळ मुख पसरोनी ॥ ग्रासीन म्हणे हरीतें ॥६८॥
परमपुरुषें भक्तवत्सलें ॥ चक्रें कंठनाळ छेदिलें ॥ व्योमपंथें उडविलें ॥ व्योमासुराचें शिर पैं ॥६९॥

>

ऐसा करोनि पुरुषार्थ ॥ गाईगोपाळांसमवेत ॥ पूर्वस्थळा आले समस्त ॥ काला करिती ते क्षणीं ॥१७०॥
कळला कंसासी समाचार॥ व्योमासुर पावला परत्र ॥ धगधगलें कंसाचें अंतर ॥ म्हणे विचार कैसा करुं ॥७१॥
तंव अकरा सहस्त्र दैत्य ॥ उभे होते अविचारी उन्मत्त ॥ त्यांस कंस तेव्हां सांगत ॥ जा रे धांवत वृंदावना ॥७२॥
एक गोरा एक सांवळा ॥ दोघां धरुनि आणा ये वेळां ॥ ऐसें ऐकतां दैत्यमेळा ॥ वेगें चालिला वनातें ॥७३॥
पिशाचवत धांवती ते वेळां ॥ गोपाळांभोवता वेढा घातला ॥ पुसती बळिराम सांवळा ॥ कोठें आहेत सांगा रे ॥७४॥
ऐसें देखोनि ते अवसरीं ॥ भयभीत गोप अंतरीं ॥ म्हणती कृष्णा लपें त्वरीं ॥ घोंगडी तुजवरी घालितों ॥७५॥
तुजला हे धरोनि नेती ॥ आम्हीं कैसें जावें गोकुळाप्रती ॥ हरि म्हणे रे कांहीं चित्तीं ॥ भिऊं नका सर्वथा ॥७६॥
मग श्रीकृष्ण म्हणे तयांतें ॥ कोण्या पुरुषें धाडिलें तुम्हांतें ॥ ते म्हणती कंसें उभयांतें ॥ धरुं तुम्हांसी पाठविले ॥७७॥
ऐसें ऐकोनि ते वेळे ॥ गदगदां हांसिजे गोपाळें ॥ म्हणे कंसें मूर्खत्व केलें ॥ इतुके पाठविले कासया ॥७८॥
आम्हां दोघांसी दोघे जण ॥ नेतील कडेवर घेऊन ॥ व्यर्थ आलेती इतुके धांवोन ॥ जा परतोन सर्वही ॥७९॥
दोघे जणें येथें रहावें ॥ आम्ही जेवूनि येतों तयांसवें ॥ ऐसें बोलतां केशवें ॥ तें मानलें तयांसी ॥१८०॥
म्हणती कंस मूर्ख साचार ॥ कां व्यर्थ पाठविले अकरा सहस्त्र ॥ मग दोघांसी ठेवूनि समग्र ॥ मथुरापंथें परतले ॥८१॥
ऐसा क्षण एक जाहलियावरी ॥ विचार करिती बळिराम मुरारी ॥ म्हणती या दोघांसी ये अवसरीं ॥ पूजा बरवी समर्पावी ॥८२॥
जन्मपर्यंत न विसरती ॥ ऐसी पूजा करावी निगुती॥ तंव ते दोघे हरीस म्हणती ॥ त्वरितगती चला आतां ॥८३॥
जरी तुम्ही न याल ये क्षणीं ॥ तरी नेऊं दोघांस उचलोनी ॥ ऐसें ऐकतांचि कर्णीं ॥ शेषावतार क्षोभला ॥८४॥
बळिभद्रें आपुल्या हातेंकरुन ॥ दोघांस केलें बहुत ताडण ॥ भोंवते गोवळे मिळोन ॥ डांगांखालीं मारिती ॥८५॥
दोघे काकुळती करिती बहुवस ॥ आम्ही न येऊं म्हणती सोडा आम्हांस ॥ बहुत झालों कासावीस ॥ सोडा हृषीकेश म्हणे तयां
॥८६॥
श्रीकृष्ण म्हणे दोघांसी ॥ जाऊनि सांगा कंसापाशीं ॥ जीवदान दिल्हें आम्हांसी ॥ बळिराम आणि श्रीकृष्णें ॥८७॥
दोघे मथुरापंथे पळती ॥ असंख्य गोपाळ पाठीं लागती ॥ वाटे अडखळोनि पडती ॥ मग राम वारीत गोपाळां ॥८८॥
दोघांचें अंग झालें चूर ॥ जवळी केलें मथुरापुर ॥ पुढें जात होते अकरा सहस्त्र ॥ मागें परतोनि पाहाती ॥८९॥
तंव कुंथतचि दोघे येती ॥ समस्त पुसती तयांप्रती ॥ कां रे आलेत रिक्तहस्तीं ॥ राम श्रीपती कोठें दोघे ॥१९०॥
तंव ते बोलती दोघेजण ॥ आम्हांसी तिहीं घातलें भोजन ॥ जन्मवरी हें अन्न ॥ नाहीं जाणा जेविलों ॥९१॥
तडस भरोनि येती तिडका ॥ मोदक बहु चारिले देखा ॥ जेविताम आमुचा आवांका ॥ गलित झाला तेधवां ॥९२॥
आम्ही बहुत आलों काकुळती ॥ पुरे म्हणूं तरी न सोडिती ॥ अवघेचि आग्रह करिती ॥ घ्या घ्या म्हणोनि एकदां ॥९३॥
बळिभद्रेंचि स्वहस्तें ॥ बहुत वाढिलें आम्हांतें ॥ पुरे पुरे म्हणतां नंदसुतें ॥ तरी कदा सोडीच ना ॥९४॥
सांवळा उगाचि पाहत होता ॥ तो जरी वाढावया उठता ॥ मग आमुचा अंत न उरता ॥ तेणें पुरे म्हणतां राहविलें ॥९५॥
त्यांहीं आम्हांस ऐसें जेवूं घालावें ॥ मग त्यांस कैसें धरावें ॥ ऐसें ऐकतांचि आघवे ॥ अकर सहस्त्र बोलती ॥९६॥
परम नीच दैत्यजाती ॥ अन्नाकारणें लाळ घोंटिती ॥ म्हणती सांगा रे त्वरितगती ॥ भोजन देती आम्हां काय ॥९७॥
अन्न त्यांजवळी आहे कीं नाहीं ॥ सांगा आम्ही जातों लवलाहीं ॥ तंव ते दोघे तये समयीं ॥ बोलती काय ऐका तें ॥९८॥
म्हणती अन्न कदा न सरे ॥ तुम्हांसी पुरोनि तुमच्या पितरांस उरे ॥ तुमच्या देवांचें पोट भरे ॥ जा माघारे आतांचि ॥९९॥
आतां यावें तुमचे सांगातीं ॥ तरी आणीक आग्रह करिती ॥ जुनी ओळख काढिती ॥ मग न सोडिती आम्हांतें ॥२००॥
एक भोजनें झालें अजीर्ण ॥ दुसरें त्यावरी होय प्राणोत्क्रमण ॥ ऐसें ऐकतां अवघेजण ॥ आले सत्वर हरीजवळी ॥१॥
देखिला दैत्यभार सकळ ॥ भयभीत जाहले गोपाळ ॥ म्हणती कृष्णें अनर्थ प्रबळ ॥ येथें आतां मांडिला ॥२॥
हरि म्हणे सखे हो ऐका ॥ काळत्रयीं भिऊं नका ॥ पाठीसी मी असतां शंका ॥ धरुं नका मनांत ॥३॥
ऐसें बोलोनि जगन्नाथें ॥ मग विलोकिलें ऊर्ध्वपंथें ॥ तंव अकस्मात गंधर्व तेथे ॥ एकादश सहस्त्र उतरले ॥४॥
त्यांत मुख्य गंधर्व चित्रसेन ॥ तेणें वंदिला जगद्‌भूषण ॥ पुढें ठाकला कर जोडून ॥ म्हणे आज्ञा द्यावी मज ॥५॥
श्रीकृष्ण म्हणे सकळां ॥ या दैत्यांसी भोजन घाला ॥ तंव गंधर्व धांवले ते वेळां ॥ प्रळय मांडिला दैत्यांसी ॥६॥
गंधर्व तोडिती नाककान ॥ हस्तपाय टाकिती मोडून ॥ कितीकांच्या ग्रीवा पिळून ॥ गतप्राण ते केले ॥७॥
ज्यांचे कां उरले प्राण ॥ तिंहीं समर्पून नासिका कर्ण ॥ मथुरेमाजी आले पळून ॥ शंख करिती एकदां ॥८॥
वाहती रक्ताचे पूर ॥ हडबडिलें मथुरानगर ॥ लोक घाबरले समग्र ॥ चाळवती तेव्हां भलतेंचि ॥९॥
म्हणती आणा रे वेगें घोडे ॥ त्यांवरी सत्वर जुंपा गाडे ॥ मांजरें आणि माकडें ॥ रथीं जुंपा सत्वर ॥२१०॥
उचला उखळें झडकरी ॥ चुली बांधा घोडयावरी ॥ कोथळ्या आणि आड विहिरी ॥ घेऊनि शिरीं चला रे ॥११॥
नेसा वेगीं दृढ मुसळें ॥ डोईस गुंडाळा रे पाळें ॥ चाटू आणिक चौपाळें ॥ पांघरुनियां पळा वेगीं ॥१२॥
म्हैशी बांधा वांसरांवरी ॥ गाई बांधा कुतर्‍याशिरीं ॥ नेसतीं वसनें झडकरी ॥ सांडोनिया पळा रे ॥१३॥
स्त्रियांस म्हणती तेच क्षणीं ॥ वोंटीस घ्या हो केरसुणी ॥ पळा सत्वर येथूनी ॥ नासिक कर्ण सांभाळा ॥१४॥
असो लोक जाहले भयभीत ॥ गंधर्व परतले समस्त ॥ श्रीकृष्णासी वंदोनि त्वरित ॥ आज्ञा मागती जावया ॥१५॥
म्हणती जय जय पुराणपुरुषोत्तमा ॥ अज अजित मेघश्यामा सच्चिदानंदा पूर्णब्रह्मा ॥ न कळे सीमा वेदांसी ॥१६॥
तूंचि सूत्रधारी सत्य होसी ॥ आम्हां बाहुलियां नाचविसी ॥ इंद्र विधि सकळ हृषीकेशी ॥ शरण चरणांसीं पैं आले ॥१७॥
ऐसें स्तवोनि पूतनाप्राणहरणा ॥ गंधर्व गेले निजस्थाना ॥ असो इकडे घायाळ कंससदना ॥ बरळतचि पळताती ॥१८॥
म्हणती कंसराज्य बुडालें ॥ तुमचें मरण जवळ आलें ॥ चित्त कंसाचें घाबरलें ॥ धगधगलें हृदयांत ॥१९॥
कंसास सांगाती घायाल ॥ ते दोघे प्रतापसूर्य केवळ ॥ नखाग्रीं हा ब्रह्मांडगोळ ॥ चालविती क्षणमात्रें ॥२२०॥
एक सांवळा एक गौर ॥ दोन्ही परब्रह्म निर्विकार ॥ ते मनुष्यवेषें निर्धार ॥ शेषविष्णु अवतरले ॥२१॥
कंस टाकी श्वासोच्छ्‌वास ॥ आतां काय करणें तयांस ॥ असो गोकुळीं नंदास ॥ श्रुत जाहलें तेधवां ॥२२॥
कीं अकरा सहस्त्र वीर येऊनी ॥ गेले रामकृष्णांस घेऊनी ॥ नंद गौळी यशोदा रोहिणी ॥ धांवती वनीं आक्रंदत ॥२३॥
यशोदा पिटी वक्षःस्थळ ॥ नंद वाटेसी पडे विकळ ॥ तंव अकस्मात तमालनीळ ॥ गाई घेऊनि परतला ॥२४॥
पुढें गाईंचे येती भार ॥ मागें हलधर आणि श्रीधर ॥ भोंवते गोप करती गजर ॥ नाना वाद्यांचे तेधवां ॥२५॥
तें देखोनियां यशोदा नंद ॥ हृदयीं उचंबळला आनंद ॥ ते समयीं जो जाहला ब्रह्मानंद ॥ तो कवण वर्णूं शके पैं ॥२६॥
मंदिरा आला इंदिरावर ॥ नंदें समारंभ केला थोर ॥ मेळवूनियां धरामर ॥ दानें अपार दिधलीं ॥२७॥
उत्तम हरिविजयग्रंथ ॥ हाचि जाणिजे शेषाद्रिपर्वत ॥ श्रीव्यंकटेश श्रीभूसहित ॥ परब्रह्म वसे तेथें ॥२८॥
श्रवणीं आवडी विशेष ॥ भावार्थ हाचि आश्विनमास ॥ सुप्रेम हे विजयादशमीस ॥ भक्त येती धांवोनियां ॥२९॥
विजयादशामी विजयदिवस ॥ हरिविजय पाहतां सावकाश ॥ शेषाद्रिवासी तो रमाविलास ॥ निजदासांतें रक्षीतसे ॥२३०॥
ब्रह्मानंदकृपा पूर्ण ॥ तेंचि निर्मळ निकेतन ॥ जेथें नलगे द्वैत वात उष्ण ॥ श्रीधर अभंग सेवीतसे ॥३१॥
इति श्रीहरिविजयग्रंथ ॥ संमत हरिवंशभागवत ॥ संत श्रोते परिसोत ॥ द्वादशाध्याय गोड हा ॥२३२॥
श्रीकृष्णार्पणमस्तु॥

Sunday, July 1, 2012

हरिविजय - अध्याय ११


अध्याय ११


श्रीगणेशाय नमः ॥  श्रीकुलदेवतायै नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
जय जय इंदिरावरा श्रीरंगा ॥ निजजनहृत्पद्मनीलभृंगा ॥ अज अजिता अव्यंगा ॥ सकलरंगातीत तूं ॥१॥
नीलग्रीवभूषणारिरोहणा ॥ पयोब्धिहृदयरत्‍नमनमोहना ॥ सरसिजोद्भवजनका नीलवर्णा ॥ सप्तावरणांवेगळा तूं ॥२॥
अनंतकोटिकामसुंदरा ॥ सकलरंगचालका परम उदारा ॥ अमला पराभारतीअगोचरा ॥ निर्विकारा निर्द्वंद्वा ॥३॥
भवनागविदारकपंचानना ॥ विद्वज्जनमनमांदुसरत्‍ना ॥ नाकळसी पंचास्याच्या ध्याना ॥ सकलकल्याणनिकेतना तूं ॥४॥
दुर्जनदानवकुलनिकृंतना ॥ अरिवर्गप्रतापभंजना ॥ गहनमायाविपिनदहना ॥ तमनाशना ज्ञानसूर्या ॥५॥
अगम्य तूं दशशतनयना ॥ न वर्णवसी दशशतवदना ॥ दशशतहस्ताचियां किरणां ॥ नाढळसी तूं शोधितां ॥६॥
निकटभीमातटविहारा ॥ आदिपुरुषा श्रीदिगंबरा ॥ ब्रह्मानंदा श्रीधरवरा ॥ पुढें चरित्र चालवीं ॥७॥
दशमाध्यायाच्या अंतीं कथा ॥ हरीसी स्तवोनि नारदपिता ॥ गोपवत्सें देऊनि मागुता ॥ निजस्थानासी पावला ॥८॥
यावरी प्रातःकाळीं एके दिवशीं ॥ गोगोप घेऊनि वैकुंठविलासी ॥ आला तमारिकन्यातीरासी ॥ लावण्यराशि जगदात्मा ॥९॥
उष्णकाल वसंतमास ॥ मध्यान्हासी आला चंडांश ॥ त्याच्या करप्रतापें सकलांस ॥ तृषा विशेष वाढली ॥१०॥
धांवती गाईंचे कळप ॥ कृतांत भगिनीतीरासमीप ॥ पया र्‍हदीं कालिया दुष्ट सर्प ॥ महादुर्मति वसे तेथें ॥११॥
जगद्वंद्यास टाकूनि मागें ॥ गोगोप पुढें धांवती वेगें ॥ हरि समीप नसतां कर्मभोगें ॥ प्राप्त झालें दुःख पैं ॥१२॥
सेवितांचि यमुनाजीवन ॥ गोगोप झाले गतप्राण ॥ यमानुजातीरीं मृत्युशयन ॥ सकळीं केलें एकदां ॥१३॥
दुरावतां धराधरतनुशयन ॥ अकल्पित विघ्नें पडती दारुण ॥ यालागीं कमलपत्राक्षाचे चरण ॥ न विसंबावे सर्वदा ॥१४॥
हातीं वंशवाद्य घेऊन ॥ तेथें पावला पद्माक्षीरमण ॥ तंव ते अनाथ प्रेतें होवोन ॥ गोगोपाल पडियेले ॥१५॥
ऐसें देखोनि कृपार्णवें ॥ निजवल्लभें कमलाधवें ॥ करुणाकरें विलोकितां आघवे ॥ निद्रिस्तापरी उठती ॥१६॥
अनंतब्रह्मांडींचे प्राणी ॥ जीववी जो कृपावलोकनीं ॥ तेणें गोप धेनु तेच क्षणीं ॥ कृपाकटाक्षें उठविलीं हो ॥१७॥
मग उठोनि ते वेळां ॥ तटस्थ विलोकिती तमालनीला ॥ म्हणती याचे हातीं जीवनकला ॥ सकल जीवांच्या असती हो ॥१८॥
आम्ही प्राशितां विषजीवन ॥ समस्त पडिलों कुणपें होऊन ॥ येणें कृपेचें करुनि निकेतन ॥ आमुचे प्राण रक्षिले ॥१९॥
असो मनीं विचारी जगदात्मा ॥ कालिंदीर्‍हदीं हा दुष्टात्मा ॥ यास दवडावें न करावी क्षमा ॥ तरीच सर्वां सुख होय ॥२०॥
परमदुष्ट हा अहि साचार ॥ सळसळां पुढें यमुनेचें नीर ॥ जिकडे उदकावरुनि जाय समीर ॥ तिकडे संहार चराचरजीवा ॥२१॥
अंतरिक्षें द्विज जातां उडोन ॥ मृत्यु पावती चडफडोन ॥ कालियानयनींचा पेटतां अग्न ॥ वनें जळोनि भस्म होतीं ॥२२॥
तेथींचा जिकडे जाय प्रभंजन ॥ तिकडे वृक्ष जाती जळोन ॥ मग तें कोण प्राशील जीवन ॥ स्पर्शही जाण न करवे ॥२३॥
त्याच डोहीं येऊन ॥ कालिया वसावया काय कारन ॥ पूर्वीं सर्व उरग मिळोन ॥ माधववहना शरण गेले ॥२४॥
म्हणती तूं आमुचा संहार करिसी ॥ तरी अभय देईं एक आम्हांसी ॥ तवं सुपर्ण म्हणे प्रतिवर्षीं ॥ पूजा नेमेंसीं पैं देणें ॥२५॥
सर्वीं मान्य केलें वचनासी ॥ भाद्रपदशुद्ध पंचमीचे दिवसीं ॥ आदरें पूजावें विनायकासी ॥ तरीच सर्पासी निर्भय ॥२६॥
एक रथभरी अन्न ॥ त्यावरी एक उरग ठेवून ॥ देती खगपतीस नेऊन ॥ नेमेंकरुन प्रतिवर्षीं ॥२७॥
तों हा कालिया मदें करुन ॥ न पूजी अरुणानुजालागून ॥ तें विहंगोत्तमें एकोन ॥ म्हणे जिवें मारीन कालिया ॥२८॥
अंडजप्रभुभेणें लपावया ॥ ठाव कोठें न मिळे कालिया ॥ तों यमुनाडोहीं त्या पक्षिवर्या ॥ शाप होता पूर्वींचा ॥२९॥
यमुनाजीवनींचे मत्स्य काढोनी ॥ उरगरिपु भक्षीं अनुदिनीं ॥ तों तेथें सौभरी नामें महामुनी ॥ भानुजातीरी तप करी ॥३०॥
मत्स्य अवघे मिळोन ॥ सौभारीस गेले शरण ॥ म्हणती तूं साधु येथें असोन ॥ आम्हांलागून गरुड मारी ॥३१॥
मग मत्स्यकैवारें वदे सौभर ॥ येथींच्या जीवना स्पर्शतां खगेंद्र ॥ तत्काळ मृत्यु पावेला साचार ॥ ऐकोनि मत्स्य सर्व तोषले
॥३२॥
तें विष्णुवहनें जाणोन ॥ पुनः त्यजिलें तें स्थान ॥ त्या र्‍हदीं कालिया म्हणून ॥ राहिला येऊन द्विजेंद्रभयें ॥३३॥
असो ऐसा दुष्ट अही ॥ नेत्र उघडोनि जिकडे पाही ॥ वृक्षवनें जळती सर्वही ॥ पाषाणही उलती हो ॥३४॥
एक कदंबवृक्ष राहिला ॥ वरकड वृक्षांचा संहार जाहला ॥ तरी त्यावरी पूर्वीं खगपति बैसला ॥ सुधारघट नेतां हो ॥३५॥
घट ठेविला होता पलमात्र ॥ तेणें अमर झाला तरुवर ॥ यालागीं कालियाविष दुर्धर ॥ न जाळी त्या कदंबा ॥३६॥
सिंहावलोकनें तत्त्वताम ॥ श्रोते हो परिसा मागील कथा ॥ यमुनातीरीं जगत्पित्याचा पिता ॥ उठवीं प्रेतें सकलही ॥३७॥
मनांत इच्छी स्कंदतातमित्र ॥ हा काढावा येथूनि अमित्र ॥ म्हणोनि कदंबावरी श्रीधर ॥ चढे साचार तेधवां ॥३८॥
उदयाचलावरी सहस्त्रकार ॥ तैसा दिसे क्षीराब्धिजावर ॥ कीं ऐरावतारुढ सहस्त्रनेत्र ॥ त्रिभुवनेश्वर तैसा दिसे ॥३९॥
तो वैकुंठींचा सुकुमार ॥ श्यामसुंदर नन्दकुमर ॥ कदंबावरी श्रीधर ॥ दीनोद्धार शोभतसे ॥४०॥
कालियामर्दन आरंभिलें जेव्हां ॥ सहा वर्षांची मूर्ति तेव्हां ॥ ऊर्ध्ववदनें कमलाधवा ॥ गोप सर्व विलोकिती ॥४१॥
परम सुवास पीतवसन ॥ दृढ कशिलें स्वकरेंकरुन ॥ सुरंग पदर खोवून ॥ मुक्तमाळा सांवरिल्या ॥४२॥
कटिसूत्र सरसाविलें ॥ कर्णीं रुळती दिव्य कुंडलें ॥ आकर्णपर्यंत नेत्रोत्पलें ॥ मुख विकासिलें सुहास्य ॥४३॥
सुनीळ रसें ओतिले अखंड ॥ तैसे आजानुबाहु दंड ॥ ते बळें वाजवूनि प्रचंड ॥ हांक फोडिली तेधवां ॥४४॥
तों वैकुंठींचा वेल्हाळ ॥ सुकुमारतनु तमालनीळ ॥ उडी घातली तत्काळ ॥ गोप सकळ पाहती ॥४५॥
उडीसरसें जीवन त्या वेळे ॥ शतधनुष्य उंच गेलें ॥ कल्लोळ तीरास आदळले ॥ विषनीराचे तेधवां ॥४६॥
परम अद्‌भुत केलें गोपाळें ॥ अदितिसुत सकळ धांवले ॥ विमानारुढ पाहों लागले ॥ अद्‌भुत कर्तव्य हरीचें ॥४७॥
मृडानीसहित मदनदहन ॥ शचीसहित सहस्त्रनयन ॥ सावित्रीसहित कमलासन ॥ कौतुक पाहों धांविन्नले ॥४८॥
मित्रकन्याजीवनीं जगज्जीवन ॥ भुजदंड आफळी क्रोधायमान ॥ परम दारुण घोष ऐकोन ॥ धांवे दुर्जन अही तो ॥४९॥
महाकपटी सर्प काळा ॥ शत फणा ताठरा विशाळा ॥ धुधुःकारासरशा ज्वाळा ॥ महाकराळा उठती पैं ॥५०॥
नेत्रीं देखिला जगन्मोहन ॥ मायाचक्रचालक शुद्धचैतन्य ॥ जें मीनकेतनारीचें देवतार्चन ॥ सनकादिक ध्याती जया ॥५१॥
सनकादिकांच्या हृदयसंपुटीं ॥ जे का पहुडे मूर्ति गोमटी ॥ पद्मोद्भव आणि धूर्जटी ॥ वाहती मुकुटीं आज्ञा ज्याची ॥५२॥
असो ऐसिया मुरमर्दना ॥ राजीवनेत्रा सुपर्णवहना ॥ कालिया देखोनि व्रजभूषणा ॥ धांवोनि डंखी वर्मस्थळीं ॥५३॥
दंश करुनि स्थळीं स्थळीं ॥ वेढे घालूनि आंवळिलें ॥ सच्चिदानंदतनू सांवळी ॥ आच्छा दिली काळसर्पें ॥५४॥
जो विद्वज्जनमानसमराळ ॥ अनंतकल्याणदायक घननीळ ॥ जो पुराणपुरुष भक्तवत्सला ॥ सर्पें सकळ आंवळिला ॥५५॥
राहूनें ग्रासिला वासरमणी ॥ केतु रमाबंधूस झांकी गगनीं ॥ कीं ईश्वरास माया वेष्टूनी ॥ आपुली करणी दावीत ॥५६॥
कीं पूर्वी दंशराथात्मजांसी ॥ पाकशासनशत्रु बांधी नागपाशीं ॥ तैसें कालियानें जदद्वंद्यासी ॥ वेढे घालूनि आंवळिलें ॥५७॥
भुजंगें वेष्टिला परमपुरुष ॥ न हाले न बोले हृषीकेश ॥ लीलावतारी जगन्निवास ॥ लीला भक्तांस दावीतसे ॥५८॥
ऐसा देखताम श्रीपती ॥ गोप गाई तीरीं पाहती ॥ महाआक्रोशें हांक देती ॥ हृदय पिटिती धबधबां ॥५९॥
गगनीं पाहती निर्जर ॥ देवललना देखती समग्र ॥ त्यांच्या नेत्रीं वाहे नीर ॥ शोक अपार जाची तयां ॥६०॥
तटस्थ पाहती नयनीं ॥ भुजंगें वेष्टिला चक्रपाणी ॥ त्या दुःखेंकरुनि धरणी ॥ उलों पाहे तेधवां ॥६१॥
हा यमुनेसी जाहला वृत्तांत ॥ गोकुळीं काय वर्तली मात ॥ दुश्चिन्हें परम अद्‌भुत ॥ जाणवती लोकांतें ॥६२॥
चपला पडती कडकडोन ॥ अद्‌भुत सुटला प्रभंजन ॥ उडुगण पावती पतन ॥ लोक शोकें विव्हळ ॥६३॥
कांपों लागली धरित्री॥ उगेच अश्रु येती जननेत्रीं ॥ कलाहीन नरनारी ॥ भय अंतरीं वाटतसे ॥६४॥
कमलापतीची जननी ॥ परम विव्हळ शोकेंकरुनी ॥ तिडकूं लागले स्तन दोन्ही ॥ अश्रु नयनी वाहती ॥६५॥
मिळाले गौळी गोपी समस्त ॥ नंदही धांवे भयभीत ॥ यशोदा बाहेर आली धांवत ॥ रोहिणी येत लवलाहें ॥६६॥
घरीच होता संकर्षण ॥ बाहेर आली धांवोन ॥ यशोदा म्हणे जगज्जीवन ॥ कोण्या वनांत गेला रे ॥६७॥
सांडूनियां घरदार ॥ वनांत जाती लोक समग्र ॥ बाळें संगती जाती सत्वर ॥ श्यामसुंदर पहावया ॥६८॥
वृद्धें सांडूनि देहगेह आशा ॥ पाहों इच्छिती परमपुरुषा ॥ म्हणती काय जाहलें हृषीकेशा ॥ कोण्या वनीं पाहावें ॥६९॥
तों ध्वजवज्ररेखाचिन्ह ॥ हरिपदमुद्रा देखती जन ॥ भोंवतीं गोपदें सधन ॥ पुढें गोचरण उमटले ॥७०॥
जिकडे उमटले गाईंचे खूर ॥ त्याच पंथें गेला मुरहर ॥ जैसे वेदश्रुतींचे भार ॥ स्वरुप निर्धार दाविती ॥७१॥
असो नंद यशोदा सकळ जन ॥ आले यमुनातीरा धांवोन ॥ तंव तेथें गोप शोकेंकरुन ॥ मूर्च्छा येऊन पडताती ॥७२॥
तों भुजंगें वेष्टिला वनमाळी ॥ सर्वीं देखिला तेचि वेळीं ॥ एकचि हांक तेव्हां जाहली ॥ तो शोक वर्णिला नव जाय ॥७३॥
यशोदा म्हणे गा कान्हया ॥ आतां तुज कोठें पाहें तान्हया ॥ बा रे धांव कां लवलाह्या ॥ विसांविया गोपाळा ॥७४॥
स्तनीं दाटलासे पान्हा ॥ कोणास पाजूं राजीवनयना ॥ माझिया पाडसा मनमोहना ॥ निजवदना दावीं रें ॥७५॥
धांव धांव गे माझे कान्हाई ॥ सांवळे सुकुमारे सखेबाई ॥ उदार डोळसे कृष्णबाई ॥ कोणे ठायीं पाहूं तूं तेम ॥७६॥
दधि दुग्ध तूं सर्व खासी साई ॥ राजसा मी तुज न बोलें कांहीं ॥ पाडसा एकदां भेट देईं ॥ धांवोनियां मज आतां ॥७७॥
तुझ म्यां बांधिलें उखळासी ॥ म्हणवून सखया रुसलासी ॥ आग लागो माझिया हातांसी ॥ श्रीकृष्णासी बांधिलें म्यां ॥७८॥
काय काय आठवूं बा रे तव गुण ॥ उर्वी न पुरे करितां लेखन ॥ सकळ गोपी शोकेंकरुन ॥ मस्तकें अवनीं आपटिती ॥७९॥
एक वक्षःस्थळें पिटिती ॥ एक दीर्घस्वरें हांक देती ॥ नंदाचे नेत्रीं अश्रु वाहती ॥ पडे क्षिती मूर्च्छित ॥८०॥
हंबरडा फोडोनि बोभति गाई ॥ अश्रु वाहती नेत्रीं पाहीं ॥ यशोदा म्हणे आतां सर्वही ॥ प्राण देऊं तेथेंचि ॥८१॥
सकळ स्त्रियांसमवेत कृष्णमाया ॥ चालिली डोहामाजी प्रवेशावया ॥ तंव बळिराम आडवा येऊनियां ॥ म्हणे ऐका गोष्टी एक ॥८२॥
त्रिभुवननायक हा वनमाळी ॥ त्यास भय नाहीं कदाकाळीं ॥ कृतांतही कांपे चळवळीं ॥ कृष्णप्रताप देखतां ॥८३॥
बळिभद्राचें वचन ऐकोनी ॥ सकळांसौख्य वाटे मनीं ॥ त्याच्या वचनीं विश्वास धरुनी ॥ तटस्थ नयनी पाहती ॥८४॥
असो इकडे कालिंदीजीवनीं ॥ कालियें हरि बांधिला आंवळोनी ॥ यावरी श्रीकृष्ण प्रतापतरणी ॥ काय करिता जाहला ॥८५॥
दृढ वेढें घातलें भुजंगें ॥ शरीर फुगविलें रमारंगें ॥ कालियादेह तडतडी वेगें ॥ वेढें काढिले तेधवां ॥८६॥
जरी क्षणभरी न काढिता वेढे ॥ तरी ठायीं ठायीं होते तुकडे ॥ महाविखारें त्या प्रचंडें ॥ भयें वेढे काढिले ॥८७॥
हरीस सांडूनि ते वेळां ॥ भुजंग जाहला हो वेगळा ॥ भडभडां गरळज्वाळा ॥ मुखावाटे सोडीतसे ॥८८॥
मडकें भाजलें जैसे तप्त ॥ जैसे नेत्र दुष्टाचे आरक्त ॥ नासिकाद्वारें उष्ण श्वास सोडीत ॥ प्रळयाग्नीच्या शिखा जैशा ॥८९॥

जिव्हा सुळसुळीत दुधडा ॥ शतफणा कराळ प्रचंडा ॥ पर्वतश्रृंगें जेवीं दाढा ॥ दंत तीक्ष्ण तयाचे ॥९०॥
परम भ्यासुर अधरप्रांत ॥ ते जिव्हेनें क्षणक्षणां चाटीत ॥ करकरां क्रोधें दांत खात ॥ हरीस लक्षोनि सक्रोध ॥९१॥
क्रोधें थरथरां अंग कांपत ॥ नेत्र गरगरां भोवंडीत ॥ पुढें दंश करावया जपत ॥ मग रमानाथ काय करी ॥९२॥
सहा वर्षांची मूर्ति होय ॥ पुरुषार्थ ब्रह्मांडीं न समाय ॥ झेपा घालोनि लवलाहें ॥ धरिला भुजंगम पुढती तो ॥९३॥
आधीं गरगरां भोंवंडूनी ॥ बळें आफळी यमुनाजीवनीं ॥ निर्भय निःशंक चक्रपाणी ॥ वेदपुराणी वंद्य जो ॥९४॥
जो उरगांचा काळ पूर्ण ॥ त्यावरी बैसोनि करी गमन ॥ तो हा पुराण पूतनाप्राणहरण ॥ जन्ममरण त्या नाहीं ॥९५॥
क्षणक्षणां आफळूनि सर्प ॥ हरिला समूळ बलप्रताप ॥ गळाला दुर्जनाचा दर्प ॥ जाहलें भ्रमित अंग पैं ॥९६॥
जवेंचि शिरीं पाय देऊनि भगवंतें ॥ पुच्छ धरिलें वामहस्तें ॥ तांडवनृत्य श्रीजगन्नाथें ॥ आरंभिलें तेधवां ॥९७॥
निजपदघातेंकरुनी ॥ शतफणा लववी मोक्षदानी ॥ सप्त तालसांवरुनी ॥ नृत्य करी भगवंत ॥९८॥
जो क्षीराब्धिशायी वैकुंठविहारी ॥ तो चपळ नृत्य करी कालियाफणांवरी ॥ फणा लववी यमुनानीरीं ॥ श्वास उदरीं न समाय ॥९९॥
चुकवूनि पळों पाहे भुजंग ॥ परी न सोडी भक्तभवभंग ॥ जो कां फणांवरी व्यंग ॥ टांच हाणोनि तुडवीतसे ॥१००॥
जो सर्वांतरात्मा भगवान ॥ जो कां पूर्णब्रह्म सनातन ॥ तो कालियाशिरीं नृत्य करुन ॥ पाहतां भक्त सुखी होती ॥१॥
नृत्य करी भगवंत ॥ गोकुळींचे जन तटस्थ पाहात ॥ विमानीं सुरवर विस्मित ॥ न हालत नेत्रपातीं ॥२॥
आनंदें टाळ विणे वाजविती ॥ मृदंगवाद्यें झणत्कारिती ॥ एक करटाळिया पिटिती ॥ नृत्यगति पाहोनियां ॥३॥
मदनमनोहर वेधक मूर्ती ॥ कल्याणदायक अगाध कीर्ती ॥ पहावया अष्टनायिका धांवती ॥ विस्मित होती किन्नर ॥४॥
नृत्य करितां भगवंत ॥ वांकीं नेपुरें रुणझुणत ॥ सुरंग पीतांबर रुळत ॥ कटिमेखळा झळके वरी ॥५॥
हस्तसंकेत दावी वनमाळी ॥ मुद्रिका झळकती दशांगुळीं ॥ दिव्य पदक वक्षःस्थळीं ॥ मुक्तामाळा डोलती ॥६॥
मंदस्मित सुहास्यवदन ॥ आकर्ण विराजती राजीवनयन ॥ कर्णी कुंडलें देदीप्यमान ॥ निढळीं केशर झळकतसे ॥७॥
रत्‍नजडित मुकुट माथां ॥ ऐसी मूर्ति नृत्य करितां ॥ नानागती नाचतां नाचतां ॥ चक्राकार दिसतसे ॥८॥
मग दिव्य सुमनांचे संभार ॥ वर्षताती सकल निर्जर ॥ देखोनि मूर्ति मनोहर ॥ देवांगना वेधल्या ॥९॥
म्हणती तनुमनधनेंसीं अभिमान ॥ सांडावा यावरुनि ओवाळून ॥ अनंत जन्मींचें तपाचरण ॥ तरीच जगज्जीवन प्राप्त होय ॥११०॥
असो नृत्य करितां त्रिभुवनपती ॥ टाळ मृदंग देव वांजविती ॥ कालियाचे प्राण निघों पाहती ॥ सकल शक्ति आकर्षिल्या ॥११॥
मुखीं शोणित वाहत ॥ उरग पडिला मूर्च्छित ॥ विराली अहंकृति समस्त ॥ गर्वरहित झाला कालिया ॥१२॥
श्वासोच्छ्‌वास सोडावया ॥ जंव शिर जाय उचलावया ॥ हरी तें टांचें रगडूनियां ॥ पुन्हां हालवेनासें करी ॥१३॥
भुजंग आठवी श्रीजगन्निवासा ॥ धांव धांव बापा पुराणपुरुषा ॥ जगत्पालका रमाविलासा ॥ सोडवीं दासासी येथूनियां ॥१४॥
मी करितों ज्याचिया स्मरणा ॥ तो शिरीं नाचतो समजेना ॥ त्रिभुवनाचा भार सोसेना ॥ प्राण सोडूं पहातसे ॥१५॥
अनंत ब्रह्माडें ज्याचें पोटीं ॥ तो मस्तकीं नाचे जगजेठी ॥ असो कालिया होऊनि कष्टी ॥ मूर्च्छागत पडियेला ॥१६॥
मग त्या भुजंगाच्या नितंबिनी ॥ करीं रत्‍नदीप आरत्या घेऊनी ॥ शरण येती तेचि क्षणीं ॥ भक्तवल्लभा हरीतें ॥१७॥
देव करिती स्तुतीतें ॥ शिवविरिंचिआदि गाती ज्यातें ॥ हें कळलें नागकन्यातें ॥ कीं जगदात्मा हाचि पैं ॥१८॥
कालिया झाला भ्रम मूर्च्छित ॥ जवळी असतां नेणे भगवंत ॥ सुर विमानीं स्तुति करीत ॥ तेंही श्रवणीं पडेना ॥१९॥
शरण आल्या आपुल्या स्त्रिया ॥ हेंही न समजेचि कालिया ॥ केवळ मूढदशा पावोनियां ॥ जगत्पतीस नेणेचि ॥१२०॥
जैसें जवळीं दिव्यरत्‍न असोनी ॥ अंधासी कदा न दिसे नयनीं ॥ कीं पिशाचास न समजे मनीं ॥ आपण कोण आहों तें ॥२१॥
कीं जो सुषुप्तिडोहीं बुडाला ॥ त्यास सहस्त्राक्ष प्रसन्न होऊं जरी आला ॥ परी न कळे जैसें त्याला ॥ तैसें झालें कालियातें ॥२२॥
असो देखोनि शारंगपाणी ॥ शरण येती भुजंगकामिनी ॥ गेल्या देह विसरोनी ॥ पतिभयें अति विव्हळ ॥२३॥
न सांवरती कबरीभार ॥ गळोनि पडती अलंकार ॥ ढळले वक्षःस्थळींचे पदर ॥ विव्हळ शरीर जाहलें ॥२४॥
एकीचीं लेंकुरें करिती स्तनपाना ॥ ते युवती दावी जगन्मोहना ॥ कीं लेंकुरें देखोनि व्रजभूषणा ॥ कृपा येईल म्हणोनि ॥२५॥
एक पसरोनि अंचळा ॥ चुडेदान मागती तमालनीळा ॥ अश्रु वाहती एकीच्या डोळां ॥ करुणा गोपाळा दाविती ॥२६॥
एकी उभ्या ठाकती बद्धाजळी ॥ एकी दृढ लागती चरणकमळीं ॥ एकी काकुळती येती वनमाळी ॥ दे म्हणती पतिदान ॥२७॥
श्रीकृष्णपदकमळांवरी ॥ उरगंतनया झाल्या भ्रमरी ॥ तेथींचा मकरंद अंतरीं ॥ सांठविती प्रीतीनें ॥२८॥
एक करिती स्तवना ॥ ब्रह्मानंदा जगज्जीवना ॥ दीनवत्सलापीतवसना ॥ सकटमर्दना श्रीहरे ॥२९॥
हे सिंधुजापति जगन्निवासा ॥ हे योगिमानसराजहंसा ॥ हे घोर अविद्यावनहुताशा ॥ परमपुरुषा विलासिया ॥१३०॥
हे गोपीमानसचकोरचंद्रा ॥ सच्चिदानंदा आनंदभद्रा ॥ हे समरधीरा प्रतापरुद्रा ॥ मन्मथजनका जगद्गुरो ॥३१॥
बाळक करी बहुत अन्याय ॥ परी क्षमा करी निजमाय ॥ महादुर्जन हा अहि निर्दय ॥ तव पदरजंउद्धरला ॥३२॥
जे दुसर्‍याचा करुं इच्छिती घात ॥ त्यांस शासनकर्ता तूं जगन्नाथ ॥ परी येणें पूर्वीं तप बहुत ॥ किती केलें न कळे तें ॥३३॥
बहुत केलें पुरश्चरण ॥ कीं साधिलें पंचाग्निसाधन ॥ कीं केलें सद्‌गुरुभजन ॥ साधुसेवा प्रीतीनें ॥३४॥
कीं ब्रह्मचर्य आचरला ॥ कीं वानप्रस्थधर्मीं राहिला ॥ कीं चतुर्थाश्रम अवलंबिला ॥ तरी पावला पद तुझें ॥३५॥
तुझ्या आंगींची चित्कळा ॥ तेचि चरणीं राहिली कमला ॥ तिजपरीस भाग्यें आगळा ॥ कालिया आम्हां वाटतो ॥३६॥
एवढा अन्याय करुनि क्षमा ॥ वज्रचुडेदान देईं आम्हां ॥ हा तों परम मूढ दुष्टात्मा ॥ तुझा महिमा नेणेचि ॥३७॥
हे अनंत ब्रह्मांडपाळका ॥ देवशिखामणि गजरक्षका ॥ येवढा अन्याय कमलानायका ॥ घालीं पोटांत आतांचि ॥३८॥
भृगूनें तुज मारिली लात ॥ परी तूं जगदात्मा पूर्ण शांत ॥ तैसे अन्याय याचे समस्त ॥ क्षमा करीं गोविंदा ॥३९॥
ऐशा उरगकन्याविनविती ॥ अहिशिरीं नाचे जगत्पती ॥ तों कालियाचे प्राण निघों पाहती ॥ नेत्रीं तंद्री लागली हो ॥१४०॥
देखोनियां अंतसमया ॥ करुणा भाकिती भोगितनया ॥ करुणालया यादवराया ॥ प्राण जाती कीं याचे ॥४१॥
हरीपुढें पदर पसरिती ॥ करिती नाना काकुळती ॥ दीनवदनें मुख विलोकिती ॥ दीनबंधूचें तेधवां ॥४२॥
अहा श्रीकृष्णा आत्मयारामा ॥ प्रेतदशा आली भुजंगोत्तमा ॥ आमुची निराशा सर्वोत्तमा ॥ झाली आतां येथूनियां ॥४३॥
आम्ही भणंगें अनाथ दीन देख ॥ पतिप्राणाची मागतों भीक ॥ तूं उदार जगत्पालक ॥ कां कृपणता धरियेली ॥४४॥
स्वामी त्वां ध्रुवास अढळपद दिधलें ॥ शक्रारिजनकानुजा त्वांचि स्थापिलें ॥ आतां कृपण चित्त कां केलें ॥ ब्रीद आपुलें सांभाळीं ॥४५॥
ऐसी ऐकूनि करुणा ॥ कृपा उपजली व्रजभूषणा ॥ पुरें करुनि कालियामर्दना ॥ भक्तवचना पाळिले ॥४६॥
सर्प मूर्च्छागत जाहला ॥ तैसाचि पायें परत लोटिला ॥ जयजयकार करीत ते वेळां ॥ नागकन्या ओंवाळिती ॥४७॥
तव कालिया अत्यंत क्षीण ॥ हळूच उघडोनि पाहे नयन ॥ तों देव विमानीं करिती स्तवन ॥ तें श्रवणीं ऐके भुजंग ॥४८॥
वैकुंठनाथ हा परमात्मा ॥ तेव्हां कळलें भुजंगमा ॥ स्तवावया वैकुंठधामा ॥ तत्काळ जाहला नररुप ॥४९॥
जैसें व्यथाभूत बाळक जाण ॥ वदे मंजुळ मंजुळ वचन ॥ तैसे भुजंग हरिपद धरुन ॥ करी स्तवन तेधवां ॥१५०॥
जय जय यादवकुलतिलका ॥ नंदकुमारा व्रजपालका ॥ त्रैलोक्यनाथा चित्तचालका ॥ शरणागता रक्षीं तूं ॥५१॥
प्राण्याचे जे जे जैसे संस्कार ॥ चराचर जीव नाना विकार ॥ ते ते सुटती निर्धार ॥ जातिस्वभावेंकरुनियां ॥५२॥
तुवां सकळ जाती निर्मोनी ॥ आम्हांस घातलें सर्पयोनीं ॥ महातामस पापखाणी ॥ सदा मनीं द्वेष वाढे ॥५३॥
वेष्टिलें बहुत कामक्रोधें ॥ नागविलें मत्सरदंभमदें ॥ यालागीं तुझीं चरणारविंदें ॥ भ्रमेंकरुनि नोळखों जी ॥५४॥
अहा लागली प्रपंचाची गोडी ॥ पायीं ठोकिली अज्ञानबेडी ॥ फेरे फिरतां जाहलों वेडीं ॥ न भजों आवडीं कदा तूतें ॥५५॥
हरि म्हणे कालियाला ॥ बहुत न बोलें वेळ जाहला ॥ तूं परिवारेंसीं येचि वेळां ॥ जाय सत्वर सागराप्रति ॥५६॥
जरी उरगरिपुभेणें पाहीं ॥ तूं लपलासी यमुनाडोहीं ॥ तुज आतां तो न करी कांहीं ॥ सुखी राहें येथूनियां ॥५७॥
माझ्या पदमुद्रा तुझें शिरीं ॥ यालागीं खगेंद्र तुज न मारी ॥ मम वरें त्या सागरीं ॥ सुखें राहें कालिया ॥५८॥
तुज म्यां केलें शासन ॥ ही लीला गाती जे अनुदिन ॥ त्यांस तुम्हीं न डंखावें पूर्ण ॥ पळावें उठोन देखतां ॥५९॥
हे कालियामर्दनकथा सत्य ॥ त्रिकाल जो पुढे पुण्यवंत ॥ त्याचे दृष्टीनेंचि त्वरित ॥ महाविष उतरेल ॥१६०॥
कालियामर्दनपुस्तक ॥ जो गृहीं संग्रही भाविक ॥ तें गृह सोडूनि तात्कालिक ॥ सर्प जाती तेथोनियां ॥६१॥
जेणें ऐकिलें कालियामर्दन ॥ त्यास काळ करुं न शके बंधन ॥ मग कैंचें सर्पदंशाचें विघ्न ॥ त्यासी बाधक होईल ॥६२॥
जो सर्प आज्ञा न मानी प्रमाण ॥ त्याचें मस्तक होईल चूर्ण ॥ असो कालिया आज्ञा वंदून ॥ करी पूजन हरीचें ॥६३॥
अर्पूनि षोडशोपचार पूजा ॥ प्रदक्षिणा करी गरुडध्वजा ॥ म्हणे लक्ष्मीविलासा महाराजा ॥ कृपा बहुत असो दे ॥६४॥
ऐसें बोलोनि सहपरिवारें ॥ विखार सागरा गेला त्वरें ॥ यमुना अमृतमय नीरें ॥ वाहो लागली ते क्षणीं ॥६५॥
जैसा परीस झगटतां पूर्ण ॥ लोह होय तत्काळ सुवर्ण ॥ कीं मित्रकुल भूषणपदरजेंकरुन ॥ विरिंचितनया उद्धरली ॥६६॥
त्याचपरी हो श्रीदीननाथें ॥ शुद्ध केलें यमुनार्‍हदातें ॥ मुरली वाजविली स्वहस्तें ॥ ऐलतीरा आला जगद्गुरु ॥६७॥
म्हणती आला आला वनमाळी ॥ पूर्ण ब्रह्मानंद जाहला ते वेळीं॥ दुंदभी गर्जती निराळीं ॥ सुमनें भूतळीं वर्षती ॥६८॥
समीप देखोनि अनंता ॥ सद्गदित जाहली माता ॥ धांवोनि भेटली जगन्नाथा ॥ दृष्टांत आतां काय देऊं ॥६९॥
चतुर्दश वर्षें वनीं क्रमून ॥ अयोध्येसी आला रघुनंदन ॥ कौसल्या माता धांवोन ॥ तैसाचि कृष्ण आलिंगिला ॥१७०॥
पाहोनियां कृष्णवदना ॥ स्तनीं दर्दरोनि फुटला पान्हा ॥ आडवे घेवोनि जगन्मोहना ॥ प्रेमें माया न सोडी ॥७१॥
नेत्रीं सुटल्या अश्रुधारा ॥ तेणें अभिषेक जाहला श्यामसुंदरा ॥ म्हणे माझिया सांवळ्या श्रीधरा ॥ कैसा वाचोनि आलासी ॥७२॥
जैसें कृपणाचें ठेवणें चुकलें ॥ तें बहु श्रमतां सांपडलें॥ कीं जहाज बुडतां कडे लागलें ॥ तैसें जाहलें मायेसी ॥७३॥
कीं चोरीं मारितां अरण्यांत ॥ एकाएकीं धांवणें धांवत ॥ त्याच्या सुखासी नसे अंत ॥ तैसें जाहलें मायेसी ॥७४॥
कीं प्राण जातां एकाएकीं ॥ सुधारस घातला मुखीं ॥ तो प्राणी जैसा होय सुखी ॥ तैसें मायेसी जाहलें ॥७५॥
कीं वणव्यामाजी जळतां ॥ घन वर्षे कां अवचिता ॥ तैसें देखतां श्रीकृष्णनाथा ॥ जाहलीं माता सुखी ते ॥७६॥
मातेच्या चरणांवरी ॥ नमन करी मधुकैटभारी ॥ तों नंद येऊनि झडकरी ॥ हृदयीं धरीं श्रीरंगा ॥७७॥
नंद हृदयीं ऐसें भावित ॥ कीं त्रिभुवनीं मीच भाग्यवंत ॥ नंद आनंदें नाचत ॥ सुख गगनांत न समाये ॥७८॥
की शक्तीनें भेदिला सुमित्रासुत ॥ औषधि घेऊनि आला हनुमंत ॥ अनुज उठतां आनंदें रघुनाथ ॥ नंद आनंदे त्यापरी ॥७९॥
कीं साधूनि मंत्र संजीवनी ॥ गुरुसुत आला परतोनी ॥ जेवीं सहस्त्राक्ष भेटे धांवोनी ॥ नंदाचें मनीं तेवीं वाटे ॥१८०॥
असो हरीनें नमिलें नंदातें ॥ तों बळिराम धांवे भेटावयातें ॥ हांसो आलें संकर्षणातें ॥ हरिमुखातें पाहोनियां ॥८१॥
तरी कां संकर्षण हांसिन्नला ॥ काय तो अर्थ सुचविला ॥ कीं म्यां शोक नाहीं केला ॥ प्रताप अद्‌भुत जाणोनि ॥८२॥
कृतांतासही शासनकर्ता ॥ मग शोक कां करावा वृथा ॥ आदि अंत मध्य पहातां ॥ तुजपरता कोण असे ॥८३॥
देखोनियां त्रिभुवनायका ॥ प्रेमें सद्गदित झाल्या गोपिका ॥ आंगीं तटतटिल्या कंचुका ॥ हर्ष पोटीं न समाये ॥८४॥
दंडकडीं रत्‍नजडित ॥ मणगटापाशीं तीं दाटत ॥ गोपी येऊनि चरणीं लागत ॥ ब्रह्मानंदेंकरुनियां ॥८५॥
सकळ गौळियां लहानथोरां ॥ भेटला परात्परसोयरा ॥ जो दुर्लभ सकळ सुरवरां ॥ सुलभ झाला तो गोकुळीं ॥८६॥
तंव अस्तमाना गेला गभस्ती ॥ तेथेंचि लोकीं केली वस्ती ॥ सकळ निद्रार्णवीं निमग्न होती ॥ चिंता चित्तीं नसेचि पैं ॥८७॥
अस्ताचळा जाताम वासरमणी ॥ द्विज बैसती स्थळीं येऊनी ॥ मिलिंद वारिजकोशीं प्रवेशूनी ॥ आमोदातें सेविती ॥८८॥
तरुण जे जे विषयपर ॥ त्यांचें हृदयीं चंचरे पंचशर ॥ रात्र झाली दोन प्रहर ॥ श्वापदें दुधर्र बाहती ॥८९॥
परम दाटली घोर रजनी ॥ द्विजांच्या उठती नाना ध्वनी ॥ रिसें वाघुळा मिठी घालूनी ॥ वृक्षडाहाळिये लोंबती ॥१९०॥
वनदेवता गंधर्व यक्षिणी ॥ गोंधळ घालिती महावनीं ॥ आसरा जाज्वल्यरुप दाऊनी ॥ तेच क्षणीं गुप्त होती ॥९१॥
नाना वल्लींचे भंबाळ ॥ दिसतीं अवचितेंचि कल्लोळ ॥॥ प्रेतगण मिळाले सकळ ॥ भ्यासुर केवळ दिसतीं पैं ॥९२॥
विकार करिती भूतें प्रेतें ॥ छळिती अमंगळ अपवित्रातें ॥ दिवाभीतांचे घुंघाट तेथें ॥ पिंगळे थोर किलबिलती ॥९३॥
भालुवा भुंकती क्षणक्षणीं ॥ टिटवे शब्द करिती गगनीं ॥ करुणास्वरेंकरुनी ॥ चक्रवाकें बाहती ॥९४॥
चंद्रकुमुदिनी विकासती ॥ भ्रमर तेथें पाहों येती ॥ उरग बाहेर निघती ॥ सैर हिंडती चहूंकडे ॥९५॥
निधानें चरावया निघती ॥ क्षणक्षणां प्रभा दाविती ॥ सभाग्यास बोलाविती ॥ येऊं म्हणती गृहा तुझ्या ॥९६॥
तंव तो वसंत ऋतु उष्णकाल ॥ वनें वाळूनि गेलीं सकळ ॥ पूर्वींच कालियाचा मुखानळ ॥ जाळीत होता वनातें ॥९७॥
तों अद्‌भुत वात सुटला ॥ अग्नि गौळियांवरी परतला ॥ सभोंवतीं वेढा पडिला ॥ आंत झांकळिला पर्वत ॥९८॥
आकाश कवळिलें ज्वाळें ॥ तडतडां फुटती वेळूनळे ॥ पाळती पक्षियांचे पाळे ॥ आहाळोनि माजीं पडताती ॥९९॥
एकाएकीं निदसुरे गौळी ॥ आरडत उठती ते वेळीं ॥ तों आकाश झांकिलें अग्निकल्लोळीं ॥ ठाव नाहीं पळावया ॥२००॥
जाग्या झाल्या गौळिणी ॥ हडबडोनि उठे नंदराणी ॥ म्हणे कोठें लपवूं चक्रपाणी ॥ देईं मेदिनी ठाव आतां ॥१॥
गौळी गौळिणी करिती चिंता ॥ आमुचे प्राण जावोत आतां ॥ परी कैसें करावें कृष्णनाथा ॥ वांचेल कैसा नेणवे ॥२॥
गौळी करिती थोर धांवा ॥ धांवें वैकुंठपते कमलाधवा ॥ विश्वव्यापका केशवा ॥ कृष्ण आमुचा वांचवीं ॥३॥
दीनवदनें हांक फोडिती ॥ ज्वाळा आल्या आल्या म्हणती ॥ एकावरी एक पडती ॥ दुर्धरगति ही ओढवली ॥४॥
मायेनें हरि धरिला हृदयीं ॥ म्हणे कृष्णा वांचवा रे या समयीं ॥ पळावया ठाव नाहीं ॥ धांव लवलाही भगवंता ॥५॥
देखोनि तयांची करुणा ॥ कृपा उपजली कमलनयना ॥ सांगे अवघ्या व्रजजनां ॥ झांका नयनां समस्तही ॥६॥
हरिवदनीं विश्वास धरुनी ॥ नेत्र झांकिले समस्त जनीं ॥ ब्रह्मांडनायक त्याची करणी ॥ शिवविरिंचींसी कळेना ॥७॥
असंभाव्य पसरिलें वदन ॥ जो विराट्‌स्वरुपी भगवान ॥ द्वादशगांवें महाअग्न ॥ न लगतां क्षण गिळियेला ॥८॥
मागुती झाला सहा वर्षांचा ॥ साही शास्त्रां न कळे अंत ज्याचा ॥ हरि सकळांस वदे वाचा ॥ नेत्र उघडा सर्वही ॥९॥
सकळीं उघडिले नयन ॥ अणुमात्र कोठें न दिसे अग्न ॥ गौळी भेटती हरीस येऊन ॥ म्हणती महिमा न कळे तुझा ॥२१०॥
तों सवेंचि झाली प्रभात ॥ जान्हवीवरुन येत वात दानवगुरु उदय दावत ॥ अरुण प्रकाशे पाहीं पां ॥११॥
कीं पूर्वदिशेनें मुख धुतलें ॥ आरक्त कुंकुम निढळीं रेखिलें ॥ उडुगणतेज हरपलें ॥ ज्ञानें निसरलें अज्ञान जेवीं॥१२॥
पक्षी उडोनि चालिले ॥ भ्रमर कमळांतूनि मुक्त झाले ॥ तस्कर ठायीं ठायीं लपाले ॥ हिंडों लागले श्रेष्ठ पैं ॥१३॥
निजगृहास येऊनि जार ॥ मांडिला दांभिक आचार ॥ जे स्मशानीं जप करणार ॥ कुटिल नर पळतासी ॥१४॥
कुक्कुट काग बाहती ॥ चिमण्या ठायीं ठायीं गुजगुजती ॥ अग्निहोत्री स्नान करिती ॥ होम द्यावयाकारणें ॥१५॥
कापडी तीर्थपंथें जाती ॥ भक्तप्रातःस्मरणें गर्जती ॥ वैष्णव विष्णूतें चिंतिती ॥ शैव ध्याती शिवातें ॥१६॥
हातीं घेऊनि अर्ध्यजल ॥ सौर पाहती सूर्यमंडल ॥ गाणपत्य परम सुशील ॥ गणपतीतें चिंतिती ॥१७॥
शाक्त चिंतिती शक्तीतें ॥ गुरुभक्त आठविती गुरुचरणांतें ॥ विद्यार्थी नानापरींचे एकचित्तें ॥ विद्याभ्यास करिताती ॥१८॥
गृहींगृहींच्या ललना उठती ॥ अंग प्रक्षालूनि कुंकुमें रेखिती ॥ सडासंमार्जनें करुनि निश्चितीं ॥ घालिती रंगमाळा ॥१९॥
करुनियां गोदोहन ॥ वेगीं आरंभिती घुसळण ॥ असो उदय पावला सहस्त्रकिरण ॥ गौळी तेथूनि निघाले ॥२२०॥
घेऊनियां तमालनीळा ॥ समस्त चालिले मग गोकुळा ॥ वाद्यांचा गजर ते वेळां ॥ अति जाहला सधन पैं ॥२१॥
मोहरी पांवे मृदुंग ॥ डफडीं सनया उपांग ॥ मिरवत जातसे श्रीरंग ॥ नंदयशोदेस हित पैं ॥२२॥
कृष्णावरी पालवछत्रेम ॥ गौळी धरिती अत्यादरें ॥ चंद्रप्रभेऐसीं चामरें ॥ एक वरि धरिताती ॥२३॥
सहा वर्षांची मूर्ती ॥ केली अद्‌भुत त्रिभुवनीं कीर्ती ॥ कर्णीं कुंडलें ढाळ देती ॥ नयन विकासती आकर्ण ॥२४॥
कपाळीं त्रिपुंड्र रेखिला ॥ सर्वांगीं चंदन चर्चिला ॥ चिमणीच मुरली सांवळा ॥ चिमण्या स्वरें वाजवीत ॥२५॥
पुढें चिमणे गोप मिळोनी ॥ हुंबरी घालिती छंदेंकरुनी ॥ एक सामोर्‍या येती गौळणी ॥ आरत्या घेऊनी हरीतें ॥२६॥
यशोदा करी निंबलोण ॥ हरी घेतला कडे उचलोन ॥ गृहीं प्रवेशले शेषनारायण ॥ धन्य भाग्य नंदाचें ॥२७॥
हरीचे अवतार सर्व उत्तम ॥ परी ये अवतारींचें जें कर्म ॥ अत्यद्‌भुत लीला परम ॥ जे न वर्णवे शेषातें ॥२८॥
दिवसदिवसाप्रती ॥ अद्‌भुत लीला अद्‌भुत कीर्ती ॥ शिणल्या व्यासादिकांच्या मती ॥ तेथें मी पामर काय वर्णूं ॥२९॥
ऐसा थोर पवाडा दाविला ॥ केवळ काळ कालिया मर्दिला ॥ द्वादश गांवें अग्नि गिळिला ॥ वांचवूनियां सकळांसी ॥२३०॥
कलियुगीं भवनदीपूर ॥ अत्यंत दाटला दुर्धर ॥ हरिविजयग्रंथ थोर ॥ नौका तेथें तरावया ॥३१॥
भाविक हो धांवा लौकरी ॥ सत्वर बैसा या नौकेवरी ॥ प्रेमाचा ध्वज निर्धारीं ॥ अति सतेज फडकत ॥३२॥
ही नाव परतीरा न्यावया त्वरित ॥ नावडी तेथें सद्‌गुरुनाथ ॥ तो ब्रह्मानंद स्वामी समर्थ ॥ भीमातीरविहारी जो ॥३३॥
ब्रह्मानंदस्वामीचे चरण ॥ हेंचि कमळ सुवासिक पूर्ण ॥ तेथें श्रीधर भ्रमर रिघोन ॥ मकरंद पूर्ण सेवीत ॥३४॥
इति श्रीहरिविजयग्रंथ ॥ संमत हरिवंश भागवत ॥ प्रेमळ परिसोत पंडित ॥ एकादशाध्याय गोड हा ॥२३५॥
श्रीकृष्णार्पणमस्तु॥