Friday, October 21, 2011

RamVijay Adhyay - 10



श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥ 

संतसज्जनांची मांदी मिळाली ॥ देखोनि वाग्देवी धांविन्नली ॥ शब्दरत्नांची भरणीं भरलीं ॥ वेगें आणिली भक्तिपेठे ॥१॥
पाहोनि ग्राहकांची आवडी ॥ परीक्षक तैसेंचि रत्न काढी ॥ कीं सुगरणीं जैसी वाढी ॥ अपेक्षा पाहूनि क्षुधितांची ॥२॥
गात्रें पाहूनि भूषणें ॥ लेवविती पैं शाहाणे ॥ कीं दिनमान पाहून उष्णकिरणें ॥ दया जैसें पाविजे ॥३॥
कीं पाहूनियां समयघटिका ॥ उदय होय जेंवि शशांका ॥ कीं वर्षाकाळींचे देखा ॥ मेघ जैसे वर्षती ॥४॥
कीं ऋतुकाळीं येती फळें ॥ कीं उत्तम काळ पाहूनि भले ॥ सत्कर्में करिती सकळें ॥ निष्कामबुद्धीकरूनियां ॥५॥
कीं वेदांचें अंतर पाहूनि देख ॥ चालताति शास्त्रांचे तर्क ॥ कीं लवण पाहूनि उदक ॥ धांवे जैसें त्वरेनें ॥६॥
तैसें श्रोत्यांचें जाणोनि अंतर ॥ रामकथा आरंभिली साचार ॥ बोलिला वाल्मीक ऋषीश्र्वर ॥ तेंचि चरित्र परिसा पां ॥७॥
शब्दभवाब्धि भरला अपार ॥ कवितालक्ष तारूं थोर ॥ स्फुर्तिवायूच्या बळें सत्वर ॥ जहाज चाले त्वरेनें ॥८॥
सद्गुरुकृपा हेंचि बंदर ॥ तेथें शब्दरत्नें भरलीं अपार ॥ संतपेठेसी आणिलीं साचार ॥ ग्राहक थोर म्हणोनियां ॥९॥
तरी सादरता देऊनि धन ॥ घ्या जी शब्दरत्नें परीक्षा करून ॥ असो पूर्वोध्यायीं सुमंत प्रधान ॥ श्रीरामगृहासी पातला ॥१०॥
शोकाकुलित होऊनि ॥ दशरथ पडला कैकयीसदनीं ॥ अग्निसंगेकरूनि ॥ मुक्त जैसें आहाळलें ॥११॥
ग्रहणकाळीं सूर्यचंद्र ॥ दिसती कळाहीन साचार ॥ कीं पंकगर्तेत सुकुमार ॥ हंस जैसा रुतला ॥१२॥
तैसा जाण द्विपंचरथ ॥ पडिला असे शोकग्रस्त ॥ सुमंत पाठविला त्वरित ॥ श्रीरामासी आणावया ॥१३॥
असो सुमंत म्हणे जी श्रीरामा ॥ रायें बोलाविलें कैकयीधामा ॥ पुराणपुरुष सर्वात्मा ॥ तात्काळ उठोनि चालिला ॥१४॥
रथीं बैसला ते क्षणीं ॥ नवमेघरंग चापपाणी ॥ भक्तकैवारी कैवल्यदानी ॥ वेदपुराणीं वंद्य जो ॥१५॥
वस्त्रालंकारमंडित पूर्ण ॥ पाहती सर्व अयोध्याजन ॥ म्हणती कोट्यानकोटी मीनकेतन ॥ श्रीरामावरूनि ओंवाळिजे ॥१६॥
श्रीराममुकुटींची दिव्य कळा ॥ तेणें रविमंडप उजळला ॥ त्या तेजांत सूर्य बुचकळला ॥ प्रकाश पडला पृथ्वीवरी ॥१७॥
मकराकार शोभती कुंडलें ॥ कीं प्रळयाग्नीनें नेत्र उघडिले ॥ कीं कल्पांतविजूचे उमाळे ॥ शीतळ जाहले सर्वही ॥१८॥
अनंत बाळसूर्याच्या कळा ॥ श्रीरामरूपीं लोपल्या सकळा ॥ कीं ब्रह्मानंद रस ओतिला ॥ सगुणलीला धरूनियां ॥१९॥
सुवर्णोदकनदी निर्मळ ॥ मेरुपाठारीं वाहे सदा काळ ॥ तैसें केशरदिव्यतिलक भाल ॥ श्रीरामाचें शोभतसे ॥२०॥
अंगी दिव्य चंदन चर्चित ॥ अयोध्येमाजी सुवास बहंकत ॥ तेणें घ्राणदेवता नाचत ॥ निजानंदें करूनियां ॥२१॥
गुणीं ओविलीं भगणें सकळें ॥ तैसे मुक्ता हार शोभती चांगले ॥ अनंत ब्रह्मांडें एकेचि वेळे ॥ एकसरें डोलती ॥२२॥
अपार राहिले भक्त प्रेमळ ॥ म्हणोनि रुंदावलें वक्षःस्थळ ॥ दिव्य तेज पदक निर्मळ ॥ प्रभेनें निराळ कोंदलें ॥२३॥
अजानुबाहु रघुनंदन ॥ करीं विराजत चापबाण ॥ कटीं मेखळा पीतवसन ॥ चपळेहून झळकतसे ॥२४॥
असो ऐसा रघुनाथ ॥ रथारूढ विरिंचितात ॥ छप्पन्न देशींचे राजे समस्त ॥ देखोनियां आनंदले ॥२५॥
पुढें चालत चतुरंग दळ ॥ धडकत वाद्यांचा कल्लोळ ॥ श्रीराम पाहावया सकळ ॥ उतावीळ जन जाहले ॥२६॥
पाहतां श्रीरामाचें मुखकमळ ॥ राजे आनंदले सकळ ॥ म्हणती जन्म जाहला सुफळ ॥ तमालनीळ देखिला ॥२७॥
धन्य धन्य तो दशरथ ॥ जयाच्या उदरीं अवतरला रघुनाथ ॥ यासी राज्यपद यथार्थ ॥ देईल आतां संभ्रमें ॥२८॥
तो सोहळा पाहूनि नयनां ॥ जाऊं आपुल्या स्वस्थाना ॥ असो ऐसा मिरवत रामराणा ॥ कैकयीसदनासमीप आला ॥२९॥
जवळी आला ऐकोनि रघुनाथ ॥ स्फुंदस्फुंदोनि रडे दशरथ ॥ लोकां बाहेर टाकोनि जात ॥ श्रीराम दशरथाजवळी पैं ॥३०॥
लक्ष्मण आणि सुमंत ॥ यांसहित प्रवेशे रघुनाथ ॥ तों मुर्च्छित पडला दशरथ ॥ नयनीं वाहत अश्रुधारा ॥३१॥
रामें दशरथासी केलें नमन ॥ वंदिलें कैकयीचे चरण ॥ येरी म्हणे विजयी पूर्ण ॥ सर्वदाही होसी तूं ॥३२॥
श्रीराम पुसे कैकयीसी ॥ काय व्यथा रायाचे मानसी ॥ कां शयन केलें भूमीसी ॥ मजप्रति सांगिजे ॥३३॥
कैकयी सांगे समाचार ॥ रायें मज दिधले दोन वर ॥ ते मी मागतां साचार ॥ दुःख थोर वाटलें ॥३४॥
मग बोले रघुनंदन ॥ ते मी भाक पुरवीन ॥ येरी म्हणे तूं वनासी करीं गमन ॥ चतुर्दश वर्षें पर्यंत ॥३५॥
सांगातें नेईं सुमित्रासुत ॥ राज्य करील माझा भरत ॥ तूं वनीं होसील यशवंत ॥ सीताकांत अवश्य म्हणे ॥३६॥
मातेची आज्ञा सर्वथा ॥ न मोडावी प्रमाण शास्त्रार्था ॥ संन्यास जरी घेतला तरी माता ॥ वंदावी हें साचार ॥३७॥
प्राणाहून पलीकडे ॥ माझा भरत मज आवडे ॥ त्यास राज्य देतां मत सांकडें ॥ सर्वथाही वाटेना ॥३८॥
भूधर अवतरला लक्ष्मण ॥ परम क्रोधावला जाण ॥ भ्रकुटीये आंठी घालोन ॥ नेत्रयुगुल वटारिलें ॥३९॥
जैसा विवेकबळेंकरून ॥ क्रोध आवरिती साधकजन ॥ तैसाचि उगा राहिला लक्ष्मण ॥ भीड धरून रामाची ॥४०॥
असो कैकयीस नमून रामराणा ॥ आला कौसल्येच्या सदना ॥ परमानंद पावला मना ॥ तपोवना जावया ॥४१॥
कीं दैत्य वधावया जातां स्वानंद ॥ गजवदन आणि वीर स्कंद ॥ नमिलें अन्नपूर्णेचें चरणारविंद ॥ ब्रह्मानंदें करूनियां ॥४२॥
कीं करूं जातां अमृतहरण ॥ सुपर्णे वंदिले जननीचरण । त्याजपरी रघुनंदन ॥ कौसल्येसी नमीतसे ॥४३॥
सांगीतलें सकळ वर्तमान ॥ धगधगिलें कौसल्येचें मन ॥ भूमीसी पडली मूर्च्छा येऊन ॥ वाटे प्राण चालिला ॥४४॥
किंवा हृदयीं शस्त्र खोंचलें ॥ कीं लोभियाचें धन हरविलें ॥ तैसे कौसल्येसी वाटलें ॥ आज्ञा मागतां श्रीरामें ॥४५॥
मग म्हणे घनश्यामगात्रा ॥ रामा माझ्या राजीवनेत्रा ॥ मज सांडोनि पवित्रा ॥ कैसा वना जाशील ॥४६॥
माझे पुष्पवाटिकेआंत ॥ राहें चतुर्दश वर्षेपर्यंत ॥ कोणासी तूं न भेटें यथार्थ ॥ राहें गुप्त राघवा ॥४७॥
श्रीराम म्हणे माते ॥ तैसें नव्हे जाणें वनातें ॥ सत्य करावया पितृवचनातें ॥ दंडकारण्या जाईन मी ॥४८॥
पश्र्चिमेस उगवेल चंडकिरण ॥ परी मी न मोडीं पितृवचन ॥ होईन भाकेसी उत्तीर्ण ॥ नसे अनमान सर्वथा ॥४९॥
जन्मोनियां जनकपोटीं ॥ साच न करवे त्याची गोष्टी ॥ तरी अपकीर्तीनें सृष्टी ॥। भरोनियां उचंबळे ॥५०॥


साच न करवे पितृवचन ॥ व्यर्थ काय जन्मास येऊन ॥ विगतधवेचें सुंदरपण ॥ किंवा ज्ञान दांभिकाचें ॥५१॥
कीं वोडंबरीचें शूरत्व जाण ॥ कीं अजाकंठींचें जैसे स्तन ॥ कीं नटामाजील कामिन ॥ कीं कंटकवन सधन पैं ॥५२॥
कीं जन्मांधाचे विशाळ नेत्र ॥ कीं मद्यपियाचें अपवित्र पात्र ॥ कीं अदात्याचें उंच मंदिर ॥ व्यर्थ काय जाळावें ॥५३॥
यालागीं पुत्र तोचि धन्य ॥ जो साच करी पितृवचन ॥ तरी मज वना जावयालागून ॥ आज्ञा देईं अंबे तूं ॥५४॥
म्हणोनि श्रीरामें धरिले चरण ॥ उभा राहिला कर जोडून ॥ धबधबां वक्षःस्थळ बडवून ॥ कौसल्येनें घेतलें ॥५५॥
नगरीं जेव्हां फुटली मात ॥ कीं वना जातो श्रीरघुनाथ ॥ वर्तला एकचि आकांत ॥ पडिले मूर्छित लोक तेव्हां ॥५६॥
कौसल्या म्हणे रघुनंदना ॥ सुकुमारा जगन्मोहना ॥ माझी मोडोनियां आज्ञा ॥ कैसा वना जातोसी ॥५७॥
श्रीरामासी म्हणे लक्ष्मण ॥ मज आज्ञा देईं अणुप्रमाण ॥ कैकयीचें शिर छेदून ॥ संतोषवीन सकळांसी ॥५८॥
रघुपति तूं वना जातां व्यर्थ ॥ प्राण त्याजील दशरथ ॥ राज्य बुडेल समस्त ॥ अयोध्या ओस होईल ॥५९॥
परम प्रेमळ बंधु भरत ॥ तो राज्य न करील यथार्थ ॥ इचा वध करितां सत्य ॥ तोही सुख पावेल ॥६०॥
सकळ अनर्थांचें कारण ॥ कैकयी असत्याचें भाजन ॥ इजला टाकितां वधून ॥ सकळ जन आनंदती ॥६१॥
जैसी समूळ टाकितां दुर्वासना ॥ साधक पावती आत्मसदना ॥ कीं रजनी सरतां सकळ जनां ॥ सूर्योदयीं आनंद ॥६२॥
मग बोले श्रीराम ॥ प्राणांत जाहलिया विपरीत कर्म ॥ सहसा न करावें हें वर्म ॥ हृदयीं धरीं लक्ष्मणा ॥६३॥
कौसल्या सुमित्रा जैशा माता ॥ तैशीच कैकयी जाण तत्वतां ॥ तियेचा वध करितां ॥ मग यश कैचें आम्हांतें ॥६४॥
लक्ष्मण म्हणे श्रीरामातें ॥ तरी मज न्यावें सांगातें ॥ नाहीं तरी प्राण त्यागीन येथें ॥ मग तूं वना सुखें जाय ॥६५॥
तों सुमित्रा म्हणे रघुनंदना ॥ माझा लक्ष्मण नेईं वना ॥ सेवील तुझिया निजचरणां ॥ प्रेमभावेंकरूनियां ॥६६॥
रामा तुजवेगळा एक क्षण ॥ सर्वथा न राहे लक्ष्मण ॥ वनीं फळें जीवन आणून ॥ शय्येसी तृण निजावया ॥६७॥
तुझी सेवा करील परिकर ॥ तेणें आनंद मज थोर ॥ ऐसें बोलतां सुमित्रेचें नेत्र । प्रेमोदकें भरून आले ॥६८॥
मग उर्मिलेचें समाधान ॥ करूनियां लक्ष्मण ॥ सिद्ध जाहला प्रयाण ॥ वनाप्रति करावया ॥६९॥
कौसल्या म्हणे रघुनंदना ॥ बारे मज टाकूनि जासी वना ॥ कांटे पाषाण तुझिया चरणां ॥ चालतां रज खुपतील ॥७०॥
जडितांबरें सर्व सांडोनि ॥ कैसा राहशील वल्कलें वेष्टुनि ॥ भ्रमरपर्यंक त्यजोनि ॥ भूमिशयनें केंवि करिशी ॥७१॥
त्यजूनि रत्नजडित कोटीर ॥ कैसा राखसी जटाभार ॥ रामा तुझी तनु सुकुमार ॥ वातउष्णें श्रमेल कीं ॥७२॥
सुगंध परिमळ त्यजूनि परम ॥ कैसें चर्चिसी भस्म ॥ वनीं राक्षस दुर्धर परम ॥ छळावया तुज येतील ॥७३॥
वनीं सांडपसी तूं जगजेठी ॥ म्ग तुझी कोण राखील पाठी ॥ शोकें कौसल्या हृदय पिटी ॥ म्हणे काय करूं आतां ॥७४॥
मग औषधी मोहरे अनेक आणुनी ॥ रामाचे दंडीं बांधीं जननी ॥ रामासी पाणी लागेल वनीं ॥ औषधीमणी कबरीं बांधी ॥७५॥
वनीं दृष्टावेल रघुनाथ ॥ म्हणोनि मोहरे करीं बांधित ॥ कांही एक पीडा न होय यथार्थ ॥ ऐशा वस्तु देत माता ॥७६॥
ते आदिपुरुषाची जननी ॥ वनसी निघतां चापपाणी ॥ पंचभूतांसी कर जोडोनी ॥ प्रार्थना करी भावार्थें ॥७७॥
धरणीस कौसल्या विनवीत ॥ माते तुझा श्रीराम जामात ॥ यासी रक्षीं यथार्थ ॥ निजस्नेहेंकरूनियां ॥७८॥
ज्या पंथें जाईल कमलपत्राक्ष ॥ रक्षो यासी सर्वदा ॥७९॥
रातोत्पलें कमलें पूर्ण ॥ त्यांहून सुकुमार रामचरण ॥ त्याचिया चरणीं खडे पाषाण ॥ रुतों नेदीं अवनीये ॥८०॥
उदकासी कौसल्या म्हणत ॥ रघुवीर होईल तृषाक्रांत ॥ नदी सरोवरें समस्त ॥ पूर्णोदकें ठेवीं कां ॥८१॥
म्हणे विश्र्वप्रकाश चंडकिरणा ॥ तूं रक्षीं आपले कुलभूषणा ॥ तुझीं किरणें मनमोहना ॥ स्पर्शो नेदीं सर्वथा ॥८२॥
लोकप्राणेशा प्रभंजना ॥ लघु माझिया रघुनंदना ॥ तुझिया गुणें धुळी नयनां ॥ माजी न जावी सर्वथा ॥८३॥
उष्णें शिणतां रघुनाथ ॥ तूं मंद मंद येई मारुत ॥ जेणें सुखावे अवनिजाकांत ॥ करीं ऐसें प्राणेशा ॥८४॥
अंबरा तूं निर्विकार पाहीं ॥ शब्दविषय तुझे ठायीं ॥ मंजुळ शब्द तुझे हृदयीं ॥ अंडज करोत सर्वदा ॥८५॥
ब्रह्मा शिव इंदिरावर ॥ अष्ट दिक्पाल एकादश रुद्र ॥ नव ग्रह वसु द्वादश मित्र ॥ माझा रघुवीर रक्षोत ॥८६॥
देव उपदेव कर्मज देव ॥ पाताळभोगी सर्प मानव ॥ जलचर जलार्णव ॥ माझा रघुवीर रक्षावा ॥८७॥
चराचर प्राणी जे वहिले ॥ चहूं खाणींमाजीं जन्मले ॥ वेदशास्त्रें पुराणें सकळें ॥ ब्रह्म सांवळे रक्षोत ॥८८॥
कर जोडोनि कौसल्या सती ॥ चराचर जीवांसी प्रार्थिती ॥ परी हा आदिपुरुष रघुपति ॥ नेणवेचि तियेतें ॥८९॥
जो दानवकुळवैश्र्वानर ॥ साधुहृत्प्रमच्छेदक दिवाकर ॥ नेणें साचार कौसल्या ॥९०॥
जो अरिचक्रावारणपंचानन ॥ कीं दुःख पर्वतभंजन सहस्रकिरण ॥ कीं विघ्नफणिपाळ विदारून ॥ त्यावरून ॥ त्यावरी सुपर्ण रघुवीर ॥९१॥
तो सज्जनचकोरामृतकर ॥ भक्तचातकसजलजलधर ॥ कीं साधुनयनाब्जमित्र ॥ तो हा साचार अवतरला ॥९२॥
असो याउपरी कौसल्या म्हणत ॥ चतुर्दश वर्षेंपर्यंत ॥ व्यर्थ देह हा प्रेतवत ॥ कैसा पाळूं मी आतां ॥९३॥
कैसें पूर्वकर्म गहन ॥ फळा आलें मुळींहून ॥ अमलदलराजीवनयन ॥ वनास जातो ये वेळे ॥९४॥
तूं वना जातोसी रघुनंदना ॥ स्तनीं दाटला प्रेमपान्हा ॥ माझ्या विसाविया मनमोहना ॥ गुणनिधाना जाऊं नको ॥९५॥
श्रीरामा भुवनसुंदरा ॥ डोळसा सुकुमारा राजीवनेत्रा ॥ मुनिजनरंजना गुणसमुद्रा ॥ जाऊं नको वनातें ॥९६॥
हृदयीं नसतां रघुनंदन ॥ संपत्ती त्या विपत्ती जाण ॥ कळा त्या विकळा संपूर्ण ॥ विद्या होत अविद्या ॥९७॥
श्रीरामाविण करिती कर्म ॥ तोच तयांस पडला भ्रम ॥ सच्चिदानंद मेघश्याम ॥ मज टाकूनि जातो कीं ॥९८॥
तंव देववाणी गर्जिन्नली पाहीं ॥ सर्वांठायीं राम विजयी ॥ कल्पांतीं तयासी भय नाहीं ॥ हा शेषशायी अवतरला ॥९९॥
जैसा जीव जातां वैद्य येऊन ॥ म्हणे मी तुज वांचवीन ॥ तैसे मायेस वाटलें पूर्ण ॥ आकाशवाणी ऐकतां ॥१००॥


आदिपुरुष निर्विकार ॥ कौसल्येस घाली नमस्कार ॥ प्रदक्षिणा करूनि वारंवार ॥ मुख विलोकीं जननीचें ॥१॥
जो मायातीत अगोचर ॥ तेणें आसुवें भरले नेत्र ॥ विमलांबुधारा पवित्र ॥ मुखावरून उतरल्या ॥२॥
मायेनें धांवून तयेवेळीं ॥ रामाचे गळां मिठी घातली ॥ तो शोक ऐकतां उर्वीमंडळीं ॥ कवींसी बोली न वर्णवे ॥३॥
म्हणे कमलपत्राक्षा रघुनंदना ॥ तुवां कैकयीची पाळिली आज्ञा ॥ मान दीधला पितृवचना ॥ माझी अवज्ञा कां करिसी ॥४॥
मग तो जगद्वंद्य रघुनायक ॥ मातेसी म्हणे न करीं शोक ॥ मी सत्वर परतोनि देख ॥ जननी येतों तुजपाशीं ॥५॥
असो सीतेचिया मंदिरांत ॥ प्रवेशला जनकजामात ॥ सीता जाहल आनंदभरित ॥ मूद ओंवाळी वरूनिय ॥६॥
मनीं जगन्माता विचारति ॥ कां एकलेचि आले श्रीरघुनाथ ॥ संगें राजचिन्हें नाहींत ॥ चिंताक्रांत जानकी ॥७॥
वृत्तांत सांगें रघुनंदन ॥ आम्ही वनाप्रति करितों गमन ॥ तुवां कौसल्येची सेवा करून ॥ सुखें राहावें येथेंचि ॥८॥
सुमित्रा आणि कैकयी ॥ समान भजें सर्वांठायीं ॥ जनकगृहा न जाय कदाही ॥ कुरंगनेत्रे जानकी ॥९॥
वनासी येसी तरी बहुत ॥ दंडकारण्य कठिण पंथ ॥ वात ऊष्ण शीत यथार्थ ॥ न सोसवे तुझेनि ॥११०॥
तंव ते सुंदर श़ृंगारमराळी ॥ गुणसरिता जनकबाळी ॥ सुकुमार राजस चंपककळी ॥ काय बोले तेधवां ॥११॥
अहा जगद्वंद्या श्रीरामा ॥ निजभक्तकामकल्पद्रुमा ॥ गजास्यजनकविश्रामा ॥ टाकुनि मला नव जावें ॥१२॥
जगज्जनका रघुवीरा ॥ जनकजामाता जगदुद्धारा जगरक्षका जलनेत्रा ॥ जलदगात्रा रघुराजा ॥१३॥
जलचरें जल सांडून ॥ वेगळीं होतां त्यजिती प्राण ॥ द्विजकुळांसी आकाशावांचून ॥ नव्हे भ्रमण कोठेंही ॥१४॥
दीप सांडूनि निश्र्चितीं ॥ प्रभा न राहे कल्पांतीं ॥ कनकासी टाकूनि कांति ॥ कदा परती नव्हेचि ॥१५॥
शिवावेगळी नाहे अंबिका ॥ किरणें न सोडिती कदा अर्का ॥ साधुहृदय सांडोनि सद्विवेका ॥ कोठें जाणें घडेना ॥१६॥
रत्नावेगळी कळा ॥ गोडी न सोडी गुळा ॥ कस्तूरी न सोडी परिमळा ॥ तेवीं मी वेगळी नव्हेचि ॥१७॥
म्हणोनि रघुपति कोमलांगा ॥ दयाळा मम हृदयाब्जभृंगा ॥ ताटिकांतका नवमेघरंगा ॥ मज टाकूनि न जावें ॥१८॥
सिंह सखा असतां पाहीं ॥ मग कांतारीं हिंडतां भय नाहीं ॥ सीतेचे शब्द ऐकतां हृदयीं ॥ जगदात्मा संतोषला ॥१९॥
जानकीवचन सुधाकर ॥ तेणें तोषले रामकर्णचकोर ॥ कीं वचनमेघ गर्जतां गंभीर ॥ मनमयूर नृत्य करी ॥१२०॥
रघुपती म्हणे इंदुवदने ॥ श्रीवसिष्ठाचे चरण धरणें ॥ मज वनाप्रति पाठवणें ॥ हेंचि विनवीं तयांप्रति ॥२१॥
तुज नेतां वनाप्रति ॥ नानाशद्बें लोक निंदिती ॥ यालागी पुसोनि वनाप्रति ॥ समागमें निघावें ॥२२॥
मग वसिष्ठाचिये चरणीं ॥ नमन करी जगज्जननी ॥ म्हणे मी राघवाची सांगातिणी ॥ वनवासीं होईन ॥२३॥
मग वसिष्ठ म्हणे रघुनाथा ॥ संगे नेईं जनकदुहिता ॥ सवें असो द्यावें सुमित्रासुता ॥ रक्षणार्थ तुम्हांतें ॥२४॥
असो सौमित्रास म्हणे राघवेश ॥ वसिष्ठगृहीं आहे मम धनुष्य ॥ अक्षय भाते निःशेष ॥ वरद शस्त्रें आणावीं ॥२५॥
आपुलें संग्रहधन रघुवीर ॥ याचका वाटी उदार ॥ गुरुगृहास द्रव्य अपार ॥ वस्त्रें भूषणें धाडिलीं ॥२६॥
आणि नाना वस्तु संपत्ति ॥ पाठविल्या गुरुगृहाप्रति ॥ सद्रुरूसी जे न भजती ॥ अभागी निश्र्चिती तेचि पैं ॥२७॥
तनुमनधनेंसी शरण ॥ श्रीगुरुसी जो न जाय आपण ॥ तो जाहला जरी शास्त्रप्रवीण ॥ न करितां गुरुभजन तरेना ॥२८॥
व्यर्थ गेलें तयाचें तप ॥ जळो जळो तयाचा जप ॥ व्थर्थ काय कोरडा प्रताप ॥ गुरुवचन नावडे जया ॥२९॥
सद्रुरूचे घरीं आपदा ॥ आपण भोगी सर्व संपदा ॥ त्या अपवित्राचें मुख कदा ॥ दृष्टीं न पहावें कल्पांतीं ॥१३०॥
तरी तैसा नव्हे रघुवीर ॥ गुरुगृहाप्रति अपार ॥ द्रव्य वस्त्रें अलंकार ॥ पाठविलीं तेधवां ॥३१॥
गुरुपुत्र परम सूज्ञ ॥ आदरें आणिला बोलावून ॥ आपलीं वस्त्रें भूषणें काढून ॥ तया संपूर्ण लेवविलीं ॥३२॥
सीतेनें वस्त्रें भूषणें अपार ॥ सुयज्ञासी दिधलीं सत्वर ॥ रथ देऊनियां गुरुपुत्र ॥ निजगृहास पाठविला ॥३३॥
सकळ ऋषींच्या गृहाप्रति ॥ द्रव्य पाठवी रघुपति ॥ चौदा वर्षें निश्र्चितीं ॥ पुरोन उरे अपार ॥३४॥
विश्र्वामित्र असित कण्व ॥ दुर्वास भृगु वामदेव ॥ अंगिराआदि द्विज सर्व ॥ द्रव्य राघव पाठवी त्यांतें ॥३५॥
कौसल्या सुमित्रा माता जाणा ॥ द्रव्य पाठवी तयांच्या सदना ॥ रामें आपुले सेवकजनां ॥ द्रव्य अपार दिधलें ॥३६॥
दरिद्री दीन कुटुंबवत्सल ॥ अशक्त पंगु केवळ ॥ तयांसी द्रव्य तमानीळ ॥ आणूनि देता जाहला ॥३७॥
इष्ट अत्यंत गौरवून ॥ सर्वांस म्हणे रघुनंदन ॥ स्नेह न सांडावा मजवरून ॥ सुखें करून नांदा हो ॥३८॥
मग कैकयीच्या गृहास ॥ येता जाहला जगन्निवास ॥ ते वेळे अयोध्येच्या लोकांस ॥ कल्पांतचि वाटला ॥३९॥
अयोध्येच्या नरनारी ॥ अश्रु वाहती तयांच्या नेत्रीं ॥ गोब्रह्मणांचा कैवारी ॥ वना जातो म्हणोनियां ॥१४०॥
इकडे कैकयीच्या सदनांत ॥ रामें नमिला दशरथ ॥ प्रदक्षिणा करोनि विलोकित ॥ वदनारविंद पितयाचें ॥४१॥
दशरथ म्हणे रघुनंदना ॥ राजीवनयना जातोसी वना ॥ मी न ठेवीं आपुल्या प्राणा ॥ कुलभूषणा रघुवीरा ॥४२॥
राजा म्हणे श्रीरामातें ॥ दळभार नेईं सांगातें ॥ वनामाजी सुखें वर्तें ॥ चौदा वर्षेपर्यंत ॥४३॥
तों रामचंद्र बोले वचन ॥ मी तपालागीं सेवितां कानन ॥ तेथें दळभाराचें कारण ॥ सर्वथाही नसेचि ॥४४॥
वल्कलें वेष्टूनि वनांत ॥ तप करीन मी यथार्थ ॥ ऐसी कैकयीनें ऐकोनी मात ॥ वल्कलें पुढें ठेविलीं ॥४५॥
तीं वेष्टूनि श्रीराम ॥ श्यामलांगीं लाविलें भस्म ॥ केशभार सुवास परम ॥ आकर्षोनि बांधिले ॥४६॥
सौमित्रें वल्कलें वेष्टून ॥ वंदिले दशरथाचे चरण ॥ तों कैकयी म्हणे सीते झडकरून ॥ वस्त्रें भूषणें फडीं कां ॥४७॥
ऐसें ऐकतां जनकबाळी ॥ तडिदंबर भूषणें त्यागिलीं ॥ तीं सर्व कैकयीनें आवरिलीं ॥ वल्कलें दीधलीं नेसावया ॥४८॥
तंव वल्कलें कडकडीत कठिण ॥ नेसतां न येती सीतेलागून ॥ मग आपुले करें रघुनंदन नेसवीत जानकीतें ॥४९॥
जानकी सुकुमार अत्यंत ॥ वल्कलें नेसतां अंगास रुपत ॥ ते देखोनि ब्रह्मसुत ॥ निर्भस्ति कैकयीतें ॥१५०॥ 


परम निर्दय तूं पापिणी ॥ घेसी सीतेचीं वस्त्रें हिरोनी ॥ तूं जाहलीस राज्यबुडवणी ॥ रामासी वनीं धाडिसी ॥५१॥
दशरथ म्हणे ते अवसरीं ॥ गृहांतूनि नीघ जा बाहेरी ॥ तीं विकावया मांडोनि बाजारीं ॥ धगडी बैस आतांचि ॥५२॥
माझीं बाळें सुकुमार ॥ निर्दये घालिसी बाहेर ॥ मी भाकें बांधिलों साचार ॥ नाहीं तरी शिर छेदितों ॥५३॥
आडांत पडला मृगेंद्र ॥ कीं सांपळ्यांत गोंविला व्याघ्र ॥ कीं वणव्यांत सांपडला फणिवर ॥ तैसा साचार गुंतलों मी ॥५४॥
कीं गळीं सांपडला मीन ॥ कीं पराधियें कोंडिलें हरिण ॥ कीं तस्करें वाटेसीं सज्जन ॥ गोंवोनि हरिले सर्वस्वें ॥५५॥
ऐसें बोलतां नृपवर ॥ हृदयीं दाटला गहिंवर ॥ पोटासी धरून सीता सुंदर ॥ म्हणे बाळे शिणलीस ॥५६॥
सुकुमार तूं चंपककळी ॥ वातउष्णें शिणवील वेल्हाळी ॥ गुणसरिते जनकबाळी ॥ सांगसी शीण कोणातें ॥५७॥
सुमंता सांगे राजेंद्र ॥ आणा दिव्य अलंकार ॥ सीतेसी देऊनि सत्वर ॥ जगन्माता गौरवीं ॥५८॥
त्यावरी ते मंगलभगिनी ॥ मस्तक ठेवी श्र्वशुरचरणीं ॥ वसिष्ठ नमिला स्नेहेंकरूनी ॥ म्हणे कृपा बहुत असों द्या ॥५९॥
जैसा द्वितीयेचा चंद्र ॥ दिवसेंदिवस होय थोर ॥ तैसा स्वामी स्नेहादर ॥ अपार वर्धमान होऊं दे ॥१६०॥
वसिष्ठ देत आर्शीर्वचन ॥ जोंवरी मृगांक चंडकिरण ॥ तोंवरी चिंरंजीव दोघेजण ॥ अक्षयी राज्य करावें ॥६१॥
असो वसिष्ठ आणि दशरथ ॥ रामलक्ष्मण निघतां त्वरित ॥ सव्य घालूनि हात जोडित ॥ काननामाजी जावया ॥६२॥
मुनी म्हणे तूं पूर्ण सती ॥ त्रिभुवनीं वाढेल तुझी कीर्ति ॥ विजयी होईल रघुपति ॥ वनांतरीं जाऊनियां ॥६३॥
सप्तशत राजयुवती ॥ तया साष्टांग नमी रघुपती ॥ माते वाढवावी प्रीति ॥ श्रीकौसल्येसमान सर्वदा ॥६४॥
तों एकचि हाक जाहली ते वेळे ॥ सर्व माता पिटती वक्षःस्थळें ॥ एक मृत्तिका घेऊनि बळें ॥ मुखामाजी घालिती ॥६५॥
एक भूमीसीं आपटिती शिरें ॥ एक केश तोडिती निजरकरें ॥ एक हाक फोडिती एकसरें ॥ रामा राहें रे म्हणोनियां ॥६६॥
दशरथ म्हणे चापपाणी ॥ ग्रामांतून न जावें चरणीं ॥ जान्वीपर्यंत षड्गुणी ॥ माझा रथ नेईं कां ॥६७॥
अवश्य म्हणे रघुनाथ ॥ तत्काळ आणविला रथ ॥ कर जोडूनि सुमंत ॥ पुढें उभा ठाकला ॥६८॥
दशरथाचे चरणीं भाळ ॥ ठेवूनियां तमालनीळ ॥ निघाला तेव्हां तत्काळ ॥ जाहला कोल्हाळ एकचि ॥६९॥
सीता रथावरी घेऊन ॥ निघती वेगें रामलक्ष्मण ॥ तेव्हां वक्षःस्थळ बडवून ॥ दशरथरायें घेतलें ॥१७०॥
उठोनि राव दशरथ ॥ द्वाराबाहेरी धांवत ॥ लोकांस म्हणे रघुनाथ ॥ राहवा आतां लवकरी ॥७१॥
कोठें गेलें माझें पाडस ॥ कोणीकडे गेला माझा राजहंस ॥ भेटावया आणा डोळस ॥ मी वनास जाऊं नेदीं ॥७२॥
मी आपुली घालीन आण ॥ रथापुढें आडवा येऊन ॥ राघवापुढें पदर पसरून ॥ वनवासी गमन करूं नेदीं ॥७३॥
गोपुरावरी चढे दशरथ ॥ चाचरी जाय खालें पडत ॥ मागुतीं बिदोबिदीं धांवत ॥ दीन वदनें करूनियां ॥७४॥
लोकांसी पुसे दशरथ ॥ राम कोठें दावा त्वरित ॥ वाटेसी अडखळून पडत ॥ मस्तक पिटीत अवनीये ॥७५॥
लोकांसी म्हणे म्लानवदन ॥ अयोध्येसी लावारे अग्न ॥ माझा जाईल आतां प्राण ॥ दावा वदन रामाचें ॥७६॥
प्राणाविण जैसें प्रेत ॥ तैसें अयोध्यापूर दिसत ॥ तरी अग्नि लावूनि त्वरित ॥ मजसहित भस्म करा ॥७७॥
दाही दिशा दिसती उदास ॥ अयोध्या नगर जाहलें ओस ॥ राघव गेला वनवासास ॥ मुख लोकांस काय दावूं ॥७८॥
जाहलें माझें काळें वदन ॥ आतां माझा जड देह त्यागिन ॥ वायुवेगीं जाईन ॥ काननीं राम शोधावया ॥७९॥
लोकांसी म्हणे ते वेळां ॥ मज राघव दाखवा सांवळा ॥ स्त्रिया म्हणती वना गेला ॥ आज्ञा घेऊनि तुमची पैं ॥१८०॥
एक वदे वेशींत आहे रथ ॥ ऐकतां धांवे दशरथ ॥ तों दूर गेला जनकजामात ॥ ध्वजही परतून दिसेना ॥८१॥
तों आरडत कौसल्या धांवे ॥ वरतीं करूनियां बाहे ॥ म्हणे कोमलगंगा उभा राहें ॥ वदन तुझें पाहूं दे ॥८२॥
कैकयींभाक अमावास्या थोर ॥ माजी न दिसे रामचंद्र ॥ त्यावियोगें आम्ही चकोर ॥ चिताग्नींत पडलों कीं ॥८३॥
कीं कैकयीवर केतु जाण ॥ राम झांकिला चंडकिरण ॥ चतुर्दश वर्षीं मुक्तस्नान ॥ तोंवरी उपोषण पडियेलें ॥८४॥
राम माझा मेघ पूर्ण ॥ कैकयीवर दुष्ट प्रभंजन ॥ दूर गेला झडपोन ॥ जीवनाविण सुकलों आम्ही ॥८५॥
मज अंधाची काठी हिरून ॥ कोणें वनीं टाकिली नेऊन ॥ मज दरिद्रियाची गांठ पूर्ण ॥ कोणें निर्दयें सोडिली ॥८६॥
माझें दवडिलें निधान ॥ चिंतामणि दिधला भिरकावून ॥ माझा परिस नेऊन ॥ कोण्या निर्दयें भिरकाविला ॥८७॥
मज पान्हा दाटला स्तनीं ॥ माझें तान्हें दावा हो नयनीं ॥ माझा सुकुमार घोर वनीं ॥ भोजन मागेल कोणासीं ॥८८॥
गेला वल्कलें वेष्टून ॥ कैचें तया मंगलस्नान ॥ रातोत्पलाहून कोमल चरण ॥ कंटक पाषाण खुपतील ॥८९॥
आंधळें जातां वनांतरीं ॥ सांगाती टाकूनि गेला दुरी ॥ तें तळमळून शोक करी ॥ माझी परी तेंवी जाहली ॥१९०॥
कीं तान्हें टाकूनि परदेशीं ॥ माता जाय सहगमनासी ॥ तें तळमळी जेंवी परदेशी ॥ जाहलें तैसें रामाविण ॥९१॥
वनीं निघतां रविकुळमंडण ॥ दुःखें उलथती कठिण पाषाण ॥ गज तुरंग पशु पक्षी संपूर्ण ॥ तृण जीवन न घेती ॥९२॥
वना जातां जनकजामात ॥ वनीं पक्षी रुदन करित ॥ अयोध्येच्या प्रजा समस्त ॥ पाठीं धांवती रामाचे ॥९३॥
श्रीरामाचे आवडते ब्राह्मण ॥ भक्त मित्र सेवकजन ॥ चर्मक अनामिक आदिकरून ॥ कुटुंबें घेऊनि चालिले ॥९४॥
ओस पडलें अयोध्यापुर ॥ अबालवृद्ध धांवतीं समग्र ॥ म्हणती सेवूं कांतार ॥ श्रीरामचंद्रा सांगातें ॥९५॥
कैकयी चांडाळीण खरी ॥ सीतेचीं वस्त्रें भूषणें हरी ॥ तिजखालीं दुराचारी ॥ कोण येथे नांदेल ॥९६॥
दशरथ आतां देईल प्राण ॥ ओस पडेल अयोध्यापट्टण ॥ कैकयीचें शिर वपन करून ॥ छत्र धरोत कोणीही ॥९७॥
एक म्हणती हा दशरथ ॥ दग्ध जाहला याचा पुरुषार्थ ॥ कैकयीस वधून रघुनाथ ॥ कां हो राज्यीं स्थापीना ॥९८॥
स्त्रीलोभें जाहला दीन ॥ वनासी पाठविला श्रीराम निधान ॥ एक म्हणती वनासी गमन ॥ करावें हा निर्धार ॥९९॥
दूर टाकिलें अयोध्यापुर ॥ धांवती नगरजनांचे संभार ॥ माघारा पाहे रघुवीर ॥ तों लोक सत्वर धांवती ॥२००॥


तत्काळ उभा केला रथ ॥ सकळ जनांसी हात जोडित ॥ म्हणे शिरीं आहे राजा दशरथ ॥ निजगृहीं स्वस्थ राहावें ॥१॥
आम्ही सेवितों घोर कानन ॥ तुम्हांसी तेथे न घडे आगमन ॥ आम्ही सत्वर येती परतोन ॥ चतुर्दश वर्षें होतांचि ॥२॥
ऐसें श्रीरामें विनविलें ॥ लोक भिडेनें अवघे परतले ॥ रुदन करीत अयोध्येस आले ॥ शोकें जाहले निस्तेज ॥३॥
तरी श्रीरामभक्त ब्राह्मण ॥ अग्निहोत्री पंडित सज्ञान ॥ त्यांवरी प्रलयचि वर्तला पूर्ण ॥ प्रियप्राण राघवाचे जे ॥४॥
ते सर्वथा न सोडिती रामातें ॥ म्हणती आम्ही येऊं काननातें ॥ बहुत प्रर्थिलें रघुनाथ ॥ परी कदा न राहती ॥५॥
रथाखालीं उतरून ॥ धरी ब्राह्मणांचे चरण ॥ ते म्हणती गेलिया प्राण ॥ तुज सोडूं राघवा ॥६॥
रघुनाथासी म्हणे सुमित्रासुत ॥ ब्राह्मण श्रम पावले समस्त ॥ आज यांसाठीं राहावें येथ ॥ अहल्योद्धारा राघवा ॥७॥
असो वासरमणि गेला अस्ता ॥ अयोध्येंत काय जाहली अवस्था ॥ स्त्रियांनीं धरून दशरथा ॥ कैकयीसदनाप्रति गेल्या ॥८॥
कौसल्या सुमित्रा आदिकरून ॥ बसती दशरथासी वेष्टून ॥ सदना समस्त दीपेंविण ॥ भणभणित दिसती पैं ॥९॥
बाहेर जातां रघुनाथ ॥ अवदशा प्रवेशली नगरांत ॥ जैसा विवेक जातां यथार्थ ॥ अज्ञान हृदयीं प्रवेशे ॥२१०॥
राण्या आणि दशरथ ॥ प्राण द्यावया होऊनि उदित ॥ महाविष आणिलें त्वरित ॥ जे स्पर्शतां घात करी प्राणाचा ॥११॥
तंव तो वसिष्ठ श्रीगुरुनाथ ॥ म्हणे सहसा न कीजे आत्मघात ॥ मग वाल्मीकाचा मूळकाव्यार्थ ॥ समस्तांसी सांगितला ॥१२॥
सहपरिवारें दशग्रीव ॥ वधून बंदींचे सोडवील देव ॥ चतुर्दश वर्षांनी राघव ॥ गजरें येईल स्वधामा ॥१३॥
जरी मी असत्य बोलेन ॥ तरी श्रीरघुनाथाची आण ॥ गुरुवचन मानुनि प्रमाण ॥ विषपान वर्जियेलें ॥१४॥
इकडे वनीं राहिला जगदुद्धार ॥ तो पद्मोद्भवजनक उदार ॥ स्मरारि मित्र रघुवीर ॥ सकळविप्रवेष्टित ॥१५॥
रात्र जाहली तीन प्रहर ॥ रथवेष्टित निजले द्विजवर ॥ जैसा उड्डगणवेष्टित रोहिणीवर ॥ कीं किरणचक्रीं चंडांशु ॥१६॥
निद्रार्णवीं निमग्न ब्राह्मण ॥ ऐसें जाणोनि सीतारमण ॥ सौमित्रासी म्हणे रथ वेगेंकरून ॥ येथोनियां काढीं कां ॥१७॥
काया जैसी असोन ॥ केव्हां जाय न कळे प्राण ॥ तैसा रथारूढ रघुनंदन ॥ न लागतां क्षण पैं गेला ॥१८॥
अयोध्येकडे दावूनि माग ॥ मग रथ मुरडिला सवेग ॥ जैसा अमृतहरणी स्वर्ग ॥ खगनायक आक्रमी ॥१९॥
असो आकाशमार्गीं रथ ॥ श़ृंगवेरापाशीं उतरत ॥ मानससरोवरीं अकस्मात ॥ राजहंस बैसले जैसे ॥२२०॥
तेथें गुहकाचा आश्रम निर्मळ ॥ पुढें वाहे जान्हवीजळ ॥ देखोनियां प्रातःकाळ ॥ घननीळ स्नान करी ॥२१॥
पाहूनियां भागीरथी ॥ म्हणे सूर्यवंशीं भगीरथ नृपति ॥ तेणें प्रार्थूनि नानारीतीं ॥ जगदुद्धारा आणिली ॥२२॥
कीं शिवमुकुटींची शुभ्र माळा ॥ प्रसाद दिधला शीघ्रकाळा ॥ फोडून ब्रह्मकटाह सकळा ॥ परब्रह्मजळ लोटलें ॥२३॥
ब्रह्मा पुरंदर उमावर ॥ ऋषीगण गंधर्व फणिवर ॥ देखतां जान्हवीचें नीर ॥ स्तुति अपार करिती पैं ॥२४॥
दृष्टीं पाहतां जान्हवीनीर ॥ सहस्र जन्मींचें पातक समग्र ॥ शुष्क दग्ध वन वैश्र्वानर ॥ अघ सर्व जळे तेंवी ॥२५॥
ऐसी ते सगरकुळतारिणी ॥ राम लक्ष्मण स्तावोनी ॥ स्नान करिती ते क्षणीं ॥ सीता सुमंत सर्वही ॥२६॥
नित्यकर्म सारूनि सकळीं ॥ न्यग्रोधवृक्षाचिये तळीं ॥ श्रीराम बैसें ते वेळीं ॥ तृणशेज घालूनियां ॥२७॥
वटदुग्ध घालोनि तये वेळीं ॥ रघुवीर मस्तकीं जटा वळी ॥ भस्मचर्चित चंद्रमौळी ॥ तैसा ते काळीं राम दिसे ॥२८॥
असो इकडे ब्राह्मण समस्त ॥ जागे होऊनि जंव पाहत ॥ तों रथासहित रघुनाथ ॥ गेला निश्र्चित समजलें ॥२९॥
परम खेद करिती ब्राह्मण ॥ निद्रा नव्हे हा अनर्थ पूर्ण ॥ हातींचा गेला रघुनंदन ॥ आनंदघन जगद्रुरु ॥२३०॥
अज्ञान पांघरूण पडलिया ॥ मग आत्माराम न ये प्रत्यया ॥ न दिसे जवळ असोनियां ॥ दुर्घट माया पडली हे ॥३१॥
एक म्हणती राम करुणाघन ॥ दशरथ राव सोडील प्राण ॥ म्हणोनि गेला परतोन ॥ सीताजीवन जगदात्मा ॥३२॥
तों रथचक्रांचा मार्ग ॥ अयोध्येकडे दिसे सवेग ॥ ब्राह्मण धावती काढिती माग ॥ परम आनंदले मनीं पैं ॥३३॥
हर्षयुक्त ब्राह्मण ॥ प्रवेशले अयोध्यापट्टण ॥ तों तेथें नाहीं रघुनंदन ॥ भवबंधनच्छेदक जो ॥३४॥
सकळ मंगळभोग वर्जूनि ॥ ब्राह्मण बैसलें निरंजनीं ॥ म्हणती श्रीरामदर्शनावांचोनि ॥ प्रवेश सदनीं न करूंचि ॥३५॥
आतां जान्हवीजवळ लंघून ॥ कैसा जाईल रघुनंदन ॥ ती कथा कौतुकें श्रवण ॥ सज्जन करोत आदरें ॥३६॥
अहो श्रीरामविजय ग्रंथ ॥ हें केवळ स्वानंदामृत ॥ संत हे निर्जर समस्त ॥ ब्रह्मानंदें सेविती ॥३७॥
रविकलमंडणा राघवेंद्रा ॥ ब्रह्मानंदा ज्ञानसमुद्रा ॥ श्रीधरवरदा अतिउदारा ॥ निर्विकारा अभंगा ॥३८॥
स्वति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मिकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ दशमाध्याय गोड हा ॥२३९॥
॥श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु॥ 
 


 




 



No comments:

Post a Comment