Tuesday, February 5, 2013

हरिविजय - अध्याय २६

अध्याय २६
 श्रीगणेशाय नमः ॥  श्रीकुलदेवतायै नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ 
जो देवाधिदेव पुरातन ॥ जो पूर्णब्रह्म सनातन ॥ जो मायाचक्रचाळक शुद्ध चैतन्य ॥ तो श्रीकृष्णरुपें अवतरला ॥१॥
दानव बहुत माजले ॥ तिंहीं भक्तजन गांजिले ॥ यालागीं निर्गुण सगुणत्वा आलें ॥ तेंचि अवतरलें कृष्णरुप ॥२॥
वार्ष्‍णेयगंधर्व उन्मत्त ॥ तोचि धृतराष्ट्र झाला सत्य ॥ गजायुतबल अद्‌भुत ॥ कुरुकुळीं जन्मला ॥३॥
दुष्ट कलीचें रुप सगळें ॥ तें दुर्योधनरुपें जन्मलें ॥ काम क्रोध मद मत्सर आगळे ॥ हृदयीं जयाच्या नांदती ॥४॥
दुःशासनादि बंधु शतभरी ॥ ते राक्षस प्रकटले अवनीवरी ॥ जे पौलस्त्य लंकेमाझारी ॥ तेचि हस्तिनापुरीं जन्मले ॥५॥
जयविजयांश रावणकुंभकर्ण ॥ तेचि शिशुपाळवक्रदंत दोघेजण ॥ जरासंधादि काळयवन ॥ दैत्यांश सर्व जन्मले ॥६॥
एवं मागध चैद्य कौरव सकळ ॥ भौमासुर बाणादि दुष्ट भूपाळ ॥ हे दैत्यचि सबळ ॥ द्वापारयुगीं जन्मले ॥७॥
वसुवीर्य गंगेच्या उदरीं ॥ तो भीष्ममहाराज पृथ्वीवरी ॥ जो प्रतापशूर ब्रह्मचारी ॥ महायोद्धा जन्मला ॥८॥

जो का देवगुरु बृहस्पती ॥ तोचि द्रोणाचार्य निश्चितीं ॥ क्रृपाचार्य रुद्रगण क्षितीं ॥ गौतमवीर्यें जन्मला ॥९॥

शिवहृदयींचा जो का क्रोध प्रबळ ॥ तो अश्वत्थामा बळें सबळ ॥ सूर्यांश तो कर्ण निर्मळ ॥ कुंतीउदरीं अवतरला ॥१०॥
यम समीर शचीवर ॥ अश्विनौदेव दोघे सुंदर ॥ यांचे धर्म भीम अर्जुन वीर ॥ नकुल सहदेव जन्मले ॥११॥
पंच सूर्य पृथ्वीवरी ॥ अवतरले कुंतीच्या उदरीं ॥ उजळली सकळ धरित्री ॥ प्रतापतेजें ज्यांचिया ॥१२॥
दुर्वासमुखें मंत्रसमीरें ॥ फुंकोनि कुंतीच्या कर्णद्वारें ॥ पांचही दीप एकसरें ॥ पाजळले ते धरेवरी ॥१३॥
पतंग ते कौरव निश्चितीं ॥ या पंचदीपांवरी झेंपावती ॥ परी पक्षांसहित भस्म होती ॥ राज्यलोभें झुंजतां ॥१४॥

श्रीकृष्ण द्वारावतीची भवानी ॥ पांच दिवटिया हातीं घेऊनी ॥ ब्रह्मांडमंडपीं गोंधळ घालूनी ॥ दैत्य सर्व रगडिले ॥१५॥

भूगोळदुर्गीं पांचही यंत्रें ॥ स्वसत्ताऔषधीचीं पात्रें ॥ भरोनियां स्मरारिमित्रें ॥ भडकाविलीं दुष्टांवरी ॥१६॥
कीं यादवपांडव लोहकुठार ॥ स्वभुजाबळें धरुनि यादवेंद्र ॥ दुष्टकानन समग्र ॥ छेदूनि निर्मूळ केलें पैं ॥१७॥
शची मृडानी उभयांश मिळोनी ॥ तेचि द्रौपदी याज्ञसेनी ॥ तिचा कैवारी चक्रपाणी ॥ होऊनि धरणी निर्वीर करी ॥१८॥
बाळपणीं गोकुळीं दैत्य मारिले ॥ उरले ते मथुरेसी संहारिले ॥ जरासंधादि दुष्ट पाडिले ॥ भस्म केलें काळयवना ॥१९॥
द्वारकेसी येऊनी ॥ चिच्छक्ति परिणिली रुक्मिणी ॥ त्यावरी जांबुवंताशीं युद्ध करुनी ॥ जांबुवंती वरियेली ॥२०॥
त्यावरी सत्यभामा पर्णूनी ॥ शतधन्वा मारुनि घेतला मणी ॥ पंचविसावा अध्याय संपतांक्षणीं ॥ कथा इतुकी जाहली ॥२१॥
यावरी जें कथानुसंधान ॥ ऐकोत पंडित विचक्षण ॥ एके दिवशीं गजपुराहून ॥ अर्जुन आला हरिदर्शना ॥२२॥

क्षेम देऊनि वनमाळी ॥ क्षेमवार्ता सकळ पुसिली ॥ तों मृगयेलागीं ते काळीं ॥ पार्थ कृष्ण निघाले ॥२३॥
एके रथीं दोघेजण ॥ आरुढले कृष्णार्जुन ॥ सवें चतुरंग सैन्य ॥ घेऊनि वना चालिले ॥२४॥
दारुक सारथी परम चतुर ॥ रथ चालवी समीराहूनि सत्वर ॥ क्रीडा क्रीडत श्रीकरधर ॥ यमुनातीरीं पावला ॥२५॥

मध्यान्हा आला असे मित्र ॥ तों कालिंदीतटीं वारिजनेत्र ॥ स्थिरावला हो क्षणमात्र ॥ वन विचित्र विलोकीतसे ॥२६॥
कालिंदीतटीं एक कामिनी ॥ परम सुंदर पद्मनयनी ॥ जीचिया अंगुष्ठावरुनी ॥ देवांगना ओंवाळिजे ॥२७॥
सकळ लावण्य एकवटलें ॥ कमलोद्भवें हें रुप रचिलें ॥ असो श्रीकृष्णें तीस विलोकिलें ॥ मग बोले किरीटीसी ॥२८॥

म्हणे पैल ते कोण ललना ॥ कां तप करिते आणीं मना ॥ कुळ वर्ण पुसोनि अर्जुना ॥ झडकरी येईं मागुता ॥२९॥
शिरीं वंदूनि वचन ॥ तिजजवळी आला अर्जुन ॥ म्हणे कल्याणवती तूं कोण ॥ तप किमर्थ करितेसी ॥३०॥
तंव ते बोले पद्मनयना ॥ मी असें जाण सूर्यकन्या ॥ तप करितें मनकामना ॥ पूर्ण व्हावयाकारणें ॥३१॥
तूं म्हणसी कामना कोण ॥ तरी जो श्रीकृष्ण कालियामर्दन ॥ तो पति व्हावयालागीं पूर्ण ॥ तप करितें मी येथें ॥३२॥
संतोषला पार्थवीर ॥ म्हणे तोचि येथें आला श्रीधर ॥ द्वारकाधीश समरधीर ॥ रथीं बैसोनि पातला ॥३३॥
धन्य तूं चंडकिरणकुमारी ॥ तुझें तप फळा आलें ये अवसरीं ॥ तरीच वैकुंठनाथ वनांतरीं ॥ मृगयेलागीं पातला ॥३४॥
ऐसें ऐकतां लावण्यखाणी ॥ ब्रह्मानंद पूर्ण जाहला मनीं ॥ म्हणे धन्य धन्य तुझी वाणी ॥ अमृताहूनि गोड वाटे ॥३५॥
तरी त्या क्षीरसागरविहारा ॥ भेटी करीं मजलागीं सत्वरा ॥ ऐसें ऐकतां अर्जुन माघारा ॥ क्षणें आला हरीपासीं ॥३६॥

सांगितलें सर्व वर्तमान ॥ ऐकतां हांसला जगज्जीवन ॥ तैसाचि रथ लोटून ॥ कालिंदीजवळी पातला ॥३७॥
कालिंदी विलोकी ते वेळां ॥ तों किरीटकुंडलें वनमाळा ॥ पीतांबरधर मेघसांवळा ॥ चतुर्भुज देखिला श्रीरंग ॥३८॥
जैसा हृदयीं होती ध्यात ॥ तैसाचि देखिला वैकुंठनाथ ॥ दिव्य माळा घेऊनि त्वरित ॥ हरीच्या गळां घातली ॥३९॥
चरणीं माथा ठेविला ॥ कृष्णें आलिंगिली ते वेळां ॥ रथीं बैसवूनि ते अबला ॥ श्रीहरि आला द्वारकेसी ॥४०॥
लागला वाद्यांचा गजर ॥ हरि प्रवेशला द्वारकापुर ॥ मग मुहूर्त पाहूनि सुंदर ॥ लग्न केलें यथाविधि ॥४१॥

चारी दिवस एकचि गजर ॥ याचकजन सुखी केले समग्र ॥ यापरी सूर्यकन्या सुकुमार ॥ श्रीकरधरें वरियेली ॥४२॥
यावरि अवंतीचा नृपती ॥ मित्रविंद नामें पुण्यकीर्ती ॥ त्यासी वसुदेवभगिनी सात्वती ॥ दिधली होती पूर्वींच ॥४३॥
त्याची कन्या मित्रविंदा ॥ जिच्या स्वरुपासी नाहीं मर्यादा ॥ तिनें हरिकीर्ति ऐकतां सदा ॥ हृदयीं गोविंदा धरियेलें ॥४४॥
कोणी याचक येती घरा ॥ त्यांसी म्हणे कृष्णकीर्तन करा ॥ उपवर झाली ते सुंदरा ॥ हृदयीं यदुवीरा न विसरे ॥४५॥
राजा कन्येसी वर पाहात ॥ तो तीस कळला वृत्तांत ॥ मग पितयासी विनवीत ॥ वर कृष्णनाथ आणीं कां ॥४६॥
वर वरीन एक जगज्जीवन ॥ इतर पुरुष तुजसमान ॥ ऐसें ऐकोनि कन्येचें वचन ॥ राजा मनीं आनंदला ॥४७॥
तंव तिचे चौघे बंधु सकळ ॥ कृष्णद्वेषी महाखळ ॥ तिंहीं वृत्तांत ऐकतां तत्काळ ॥ क्रोधायमान जाहले ॥४८॥
म्हणती आम्ही कृष्णासी न देऊं भगिनी ॥ म्हणोनि सकळ राजे बोलावूनी ॥ सभे बैसविले ते क्षणीं ॥ नाना उपचारें पूजोनियां ॥४९॥
कन्येचे हातीं दिधली माळ ॥ म्हणती तुज जो आवडे भूपाळ ॥ त्यासी घालीं तत्काळ माळ ॥ म्हणोनियां उभी केली ॥५०॥
तों मित्रविंदा ते अवसरीं ॥ म्हणे श्यामसुंदरा मुरारी ॥ जरी न पावसी झडकरी ॥ तरी हा देह ठेवीं ना ॥५१॥
सर्वांतरात्मा श्रीकृष्ण ॥ जाणे सर्वांची अंतरखूण ॥ तत्काळ रथारुढ होऊन ॥ निजभारेंसीं पातला ॥५२॥
अवंतीनगरासमीप आला वैकुंठनगरींचा भूप ॥ सभेसी बैसले जे नृप ॥ भयभीत जाहले ते ॥५३॥
आला ऐकतां मृगेंद्र ॥ भयभीत होती वनचर ॥ तैसे सभानायक समग्र ॥ चिंतातुर जाहले ॥५४॥
सभेमाजी आला तमालनीळ ॥ तों मित्रविंदा घेऊनि उभी माळ ॥ हरि देखतांचि तत्काळ ॥ गळां घातली निमिषार्धें ॥५५॥
तैसीच उचलूनि नोवरी ॥ वेगें घातली स्यंदनावरी ॥ निजभारेंसहित कंसारी ॥ द्वारकेकडे परतला ॥५६॥
जाहला एकचि हाहाकार ॥ धांविन्नले युद्धासी नृपवर ॥ युद्ध जाहलें घोरांदर ॥ सकळ राजे पराभविले ॥५७॥
नोवरीचे चौघे बंधु ते अवसरीं ॥ युद्ध करुं धांवती झडकरी ॥ त्यांसही कृष्णें बाणांवरी ॥ त्रासूनियां पळविलें ॥५८॥

ऐसा करुनियां पुरुषार्थ ॥ द्वारकेसी आला कृष्णनाथ ॥ चारी दिवसपर्यंत ॥ यथाविधि लग्न केलें ॥५९॥
यावरी राजा यज्ञजित ॥ त्याची कन्या उपवर होत ॥ याज्ञजिती नाम सत्य ॥ रुप विशेष सर्वांहूनि ॥६०॥
देखोनियां कन्या सुंदर ॥ जे ते मागों येती नृपवर ॥ राजा म्हणे पृथ्वीवरी जो बलाढय वीर ॥ त्यासीच कन्या देईन ही ॥६१॥
अद्‌भुत पण करी नृपवर ॥ सप्त वृषभ भयंकर ॥ सातही आकळूनि जो वीर ॥ वेसण घाली एकदां ॥६२॥
सात वृषभांचीं नासिकें ॥ एक हस्तें आकळूनि देखें ॥ एकदांचि टोंचील कौतुकें ॥ त्यासींच कन्येचें पाणिग्रहण ॥६३॥
देशोदेशींचे नृपती ॥ कर्णदुर्योधनादिक येती ॥ परी पण भेदवेना निश्चितीं ॥ मग बैसती मूकवत ॥६४॥
कोणी एक वृषभ बळें धरी ॥ शिंगें झाडिती झडकरी ॥ तों तेथें द्वारकापुरविहारी ॥ निजभारेंसीं पातला ॥६५॥
पणाचा वृत्तांत कळला समस्त ॥ मग दृढ कांस घाली रमानाथ ॥ व्रजाचे वृषभ भासत ॥ आकळी सर्वांदेखतां ॥६६॥
त्रिभुवनींच्या वीरां नाटोपे पण ॥ तो सिद्धीसी नेला नलगतां क्षण ॥ सातां वृषभांचीं नाकें टोंचून ॥ वेसण घाली एकदांचि ॥६७॥
झाला एकचि जयजयकार ॥ याज्ञजिती माळ घाली सत्वर ॥ तों खवळले दुष्ट नृपवर ॥ युद्धालागीं मिसळले ॥६८॥
सकळ राजे पराभवून ॥ यथाविधि केलें पाणिग्रहण ॥ रायें अपार दिधलें आंदण ॥ मग नारायण बोळविला ॥६९॥
सवें घेऊनि याज्ञजिती ॥ द्वारकेसी आला यदुपती ॥ यावरी मद्ररायाची कन्या मद्रावती ॥ तीस श्रीपति वरिता जाहला ॥७०॥
माता पिता बंधुजन ॥ म्हणती पुरुषार्थी नवरा नारायण ॥ त्यासी मद्रावती देऊन ॥ षोडशोपचारें पूजावा ॥७१॥
मग बोलावूनि श्रीपती ॥ यथाविधि दिधली मद्रावती ॥ चारी दिवस सोहळा निश्चितीं ॥ यथासांग जाहला ॥७२॥
देऊनि अपार आंदण ॥ बोळविला यादवकुळभूषण ॥ मद्रावती सवें घेऊन ॥ गजरें पातला निजनगरा ॥७३॥
यावरी राजा लक्ष्मणसेन ॥ त्याची कन्या लक्ष्मणा सुरत्‍न ॥ तेणें केला दुर्धर पण ॥ मत्स्ययंत्र तेधवां ॥७४॥
अखंड मत्स्ययंत्र फिरत ॥ खालतें पाहोनि उदकांत ॥ नळिकायंत्रें बाण त्वरित ॥ अधोवदनें सोडावा ॥७५॥

भेदावया मत्स्याचा वाम नयन ॥ मर्यादा केली तीन बाण ॥ जो हें लक्ष्य भेदील सुजाण ॥ त्यासी कन्या देईन हे ॥७६॥
मिळाले देशोदेशींचे नृपवर ॥ दुर्योधनकर्णादि शाल्ववीर ॥ निजभारें पार्थवीर सत्वर ॥ तोही आला तेधवां ॥७७॥
तों धनुष्य देखिलें प्रचंड ॥ शिवधनुष्याऐसें वितंड ॥ नुचले आधीं कोणासी कोदंड ॥ मग यंत्र भेदील कोण पैं ॥७८॥
कोणी धनुष्य उचलूनि पाहती ॥ तों तें कोणा न ढळे निश्चितीं ॥ उगेचि बैसती तटस्थ नृपती ॥ कौतुक म्हणती पाहूं आतां ॥७९॥
मग उठिला वीर कर्ण ॥ आपुलें संपूर्ण बळ वेंचून ॥ धनुष्यासी चढविला गुण ॥ नानाप्रकारें करुनियां ॥८०॥
खालीं भोंवे उदकाचा आवर्त ॥ वरी चक्राकार मीन फिरत ॥ नलिकाद्वारें न भेदवे निश्चित ॥ म्हणोनि धनुष्य ठेविलें ॥८१॥
स्वस्थानीं बैसला कर्ण ॥ मग उठिला पार्थ आपण ॥ धनुष्या लावूनियां बाण ॥ अधोवदनें सोडिला ॥८२॥
परी चुकलें तेंही संधान ॥ मग धनुष्य खालीं ठेवी अर्जुन ॥ बैसला स्वस्थानीं जाऊन ॥ कोणा पण न भेदवे ॥८३॥
सभा राहिली तटस्थ पूर्ण ॥ कन्या उभी माळ घेऊन ॥ विलोकी श्रीरंगाचें वदन ॥ प्रेमेंकरुनि सद्गदित ॥८४॥
जाणोनि तियेचें अंतर ॥ सत्वर उठिला यादवेंद्र ॥ धनुष्यबाण घेऊनि सत्वर ॥ ठाण मांडिलें तेधवां ॥८५॥
पूर्वीं रामें केलें त्र्यंबकचापभंजन ॥ त्याहूनि कठिण दिसे हा पण ॥ लीलावतारी जगन्मोहन ॥ न लागतां क्षण भेदिलें ॥८६॥
नलिकाद्वारें बाण गेला ॥ मत्स्यनयन तेव्हां भेदिला ॥ एकचि जयजयकार झाला ॥ निर्जर पुष्पें वर्षती ॥८७॥
ते वेळीं त्या कालियामर्दना ॥ माळ घाली लक्ष्मणा ॥ मग प्रार्थूनि राहविलें जगज्जीवना ॥ लग्न केलें विधिपूर्वक ॥८८॥

चारी दिवस सोहळा झाला अद्‌भुत ॥ दोन लक्ष वाजी एक लक्ष रथ ॥ एक अयुत गज जैसे पर्वत ॥ आंदण दिधले तेधवां ॥८९॥
लक्ष्मणा घेऊनि सवेग ॥ द्वारकेसी आला श्रीरंग ॥ अष्टनायिका वरिल्या सांग ॥ भक्तभवभंगें यापरी ॥९०॥
अष्टनायिकांसहित ॥ नांदे द्वारकेसी वैकुंठनाथ ॥ लीलावतारी रुक्मिणीकांत ॥ प्रताप अद्‌भुत न वर्णवे ॥९१॥
रुक्मिणी जांबुवंती सत्यभामा सगुणा ॥ कालिंदी मित्रविंदा याज्ञजिती सुजाणा ॥ भद्रावती आणि आठवी लक्ष्मणा ॥ नारायणें वरियेल्या ॥९२॥
ऐसा द्वारकेसी नांदे जगज्जीवन ॥ तों अकस्मात कमलोद्भवनंदन ॥ हातीं ब्रह्मवीणा घेऊन ॥ ऊर्ध्वपंथें पातला ॥९३॥
सुधर्मासभेसी यादवेंद्र ॥ यादवांसमवेत बैसला उदार ॥ नारद देखितां रुक्मिणीवर ॥ उठोनि उभा ठाकला ॥९४॥
जो व्यासवाल्मीकांचा गुरु साचार ॥ त्यासी षोडशोपचारें पूजी श्रीधर ॥ ब्राह्मणदेव यदुवीर ॥ परम प्रियकर भक्तांसी जो ॥९५॥
तों नारदें स्वर्गींहून ॥ आणिलें पारिजातकसुमन ॥ त्याच्या सुवासेंकरुन ॥ द्वारकानगर दुमदुमलें ॥९६॥
चतुर्दश रत्‍नांमाजी सुरेख ॥ क्षीराब्धिमाजी निघाला पारिजातक ॥ ज्याचें पालन शचीनायक ॥ प्रीतीनें स्वर्गीं करीतसे ॥९७॥
जें पुष्प न सुके कदाकाळीं ॥ परम दुर्लभ भूमंडळीं ॥ तें पुष्प नारदें ते वेळीं ॥ श्रीरंगासी दीधलें ॥९८॥

आश्चर्य करिती सभानायक ॥ त्यापुढें सुवास नेणों आणिक ॥ असो सभा विसर्जिलिया सकळिक ॥ निजमंदिरीं प्रवेशती ॥९९॥

नारद गेला तेथूनी ॥ रुक्मिणीच्या मंदिरीं चक्रपाणी ॥ प्रवेशोनि तेचि क्षणीं ॥ काय करिता जाहला ॥१००॥
गजदंताचिया डोल्हारियावरी ॥ बैसोनियां मधुकैटभारी ॥ रुक्मिणी बोलावूनि ते अवसरीं ॥ पुष्प हातीं दीधलें ॥१॥
परम संतोषली जगन्माता ॥ परी दूतीच्या मुखें हे वार्ता ॥ सत्यभामेच्या कर्णीं तत्त्वतां ॥ प्रवेशली आद्यंत ॥२॥
कीं पुष्प दिधलें रुक्मिणीसी ॥ ऐकतां क्षोभली मानसीं ॥ ताम्रवर्ण जाहला वदनशशी ॥ अश्रु नेत्रांसी पैं आले ॥३॥
काढूनि टाकिले अलंकार ॥ मोकळे रुळती कबरीभार ॥ खेदें विव्हळ सुकुमार ॥ स्वेदें शरीर आर्द्र जाहलें ॥४॥
दिव्य तल्पक सांडून ॥ उर्वीवरी केलें शयन ॥ हृदय गहिंवरलें पूर्ण ॥ श्वासोच्छ्‌वास टाकीतसे ॥५॥

नयनीं सुटले पाझर ॥ तेणें भिजले पयोधर ॥ वर्जिले सकळ उपचार ॥ विकळ शरीर पडियेलें ॥६॥

सख्यांसी म्हणे त्या चित्तचोरा ॥ नका येऊं देऊं माझ्या मंदिरा ॥ माझा प्राण गेलियाही शरीरा ॥ स्पर्श त्याचा न करावा ॥७॥
हृदय त्याचें परम कठिण ॥ बाळपणीं केलें विषप्राशन ॥ द्वादश गांवें गिळिला अग्न ॥ त्याचें वदन न पाहें मी ॥८॥
तेणें भोगिल्या बहुत युवती ॥ महापतित त्यासी जपती ॥ त्यासी माझिया सदनाप्रती ॥ येऊं देऊं नका हो ॥९॥
परमनाटकी कपटी जार ॥ माझिया सवतीचा प्रियकर ॥ त्याचा स्पर्श अणुमात्र ॥ मज सर्वथा सोसेना ॥११०॥
असो हें वर्तमान त्वरा ॥ कळलें त्या भुवनसुंदरा ॥ तत्काळ तिचिया मंदिरा ॥ येता जाहला यादवेंद्र ॥११॥
तिचा परिसोनियां वृत्तांत ॥ दासींप्रति दावी हस्तसंकेत ॥ बोलूं नका कांहीं मात ॥ उग्याचि असा क्षणभरी ॥१२॥
मौनेंचि येऊनि मोक्षदानी ॥ सत्यभामेचें शिर उचलूनी ॥ उसां आपुली मांडी देऊनी ॥ चक्रपाणी बैसला ॥१३॥
मग बोले कंसारी ॥ आमुची राणी आजि भूमीवरी ॥ निजली असे निर्धारीं ॥ कोण्या क्रोधें कळेना ॥१४॥
मुखचंद्र उतरला देख ॥ भूमीवरी रुळती अलक ॥ कपाळींचा मृगमद सुरेख ॥ घर्मभरें वाहवला ॥१५॥
अंजनओधें पयोधर ॥ कृष्णमुख झाहले समग्र ॥ द्विजसमुदाय सकळ वर ॥ विद्रुमाधर सूकले ॥१६॥

परमविशाळ नेत्र अंबुधर ॥ आरक्त झाले झिरपे नीर ॥ निचेष्टित पडले इंद्रियकर ॥ कारभार टाकूनियां ॥१७॥

नयनकपाटें उघडूनी ॥ आम्हांकडे न पाहेचि राणी ॥ खेद तरी धरिला मनीं ॥ कोणे गोष्टीचा न कळेचि ॥१८॥

ऐसे लौकिकविलास ॥ दावी तेव्हां पुराणपुरुष ॥ आपुल्या पीतांबरें हृषीकेश ॥ नेत्राअश्रु पुसी तेव्हां ॥१९॥
मग ते सद्गदित होऊन ॥ स्फुंदस्फुंदोनि बोले वचन ॥ जीस तुम्हीं दिधलें सुमन ॥ तिचें समाधान करावें ॥१२०॥
मजवरी असतें तुमचें मन ॥ तरी कां तीस देतां सुमन ॥ ऐकतांचि ऐसें वचन ॥ हांसें आलें रमारंगा ॥२१॥
हरि म्हणे नारदें आणिलें सुमन ॥ तें देऊनि केलें तिचें समाधान ॥ परी तुझे द्वारीं आणून ॥ वृक्षचि लावीन अवघा ॥२२॥
ऐसें बोलोनि उठविली ॥ आलिंगन देऊनि अंकीं बैसविली ॥ नूतन अलंकार ते वेळीं ॥ स्वहस्तें वनमाळी लेववीत ॥२३॥
शीसफूल चंद्र जडोनी ॥ आपुल्या हातें घातली वेणी ॥ वेणीचे नग चक्रपाणी ॥ ठायीं ठायीं गुंफीत ॥२४॥
मुख धुवोनि स्वहस्तें ॥ कुंकुम रेखिलें रमानाथें ॥ अंगप्रत्यंगीं भूषणें समस्तें ॥ दिव्य नूतनें लेवविलीं ॥२५॥
ऐसें करीत समाधान ॥ तों तेचि वेळीं पाकशासन ॥ आला गार्‍हाणें घेऊन ॥ हरिलागीं सांगावया ॥२६॥

करुनि साष्टांग नमस्कार ॥ उभा राहिला वज्रधर ॥ भ्रूसंकेतें क्षीराब्धिजावर ॥ वर्तमान पुसे इंद्रातें ॥२७॥
तंव तो म्हणे यादवराया ॥ नरकासुर येऊनियां ॥ आमचा मुख्य मुकुट हिरोनियां ॥ घेऊनि गेला निजबळें ॥२८॥

आमुची जे कां अदिति माता ॥ तिचीं कुंडलें नेलीं जगन्नाथा ॥ ज्या कुंडलांची प्रभा पाहतां ॥ शशिसूर्य झांकुळती ॥२९॥

भूमिपुत्र नरकासुर ॥ असंख्य त्याजवळी दैत्यभार ॥ देवांचीं पदें समग्र ॥ हिरोनि घ्यावया इच्छीतसे ॥१३०॥
आम्हीं कोणासी जावें शरण ॥ तूं देवाधिदेव सनातन ॥ बाळकें खेद पावतां धांवोन ॥ पितयाच्या गळां पडती पैं ॥३१॥
माता जरी परतें लोटी ॥ परी तिच्या पायीं घालिती मिठी ॥ आम्ही शरण जगजेठी ॥ याचि रीतीं तुज आलों ॥३२॥
कैवारिया यादवेंद्रा ॥ धांवणें करीं प्रतापरुद्रा ॥ दीनबंधु करुणासमुद्रा ॥ ब्रीदें सांभाळीं आपुलीं ॥३३॥
ऐसें ऐकोनि सत्यभामापती ॥ सैन्य सिद्ध करवी शीघ्रगती ॥ यादवभार सिद्ध होती ॥ चतुरंगदळासहित पैं ॥३४॥

त्राहाटिल्या संग्रामसंकेतभेरी ॥ तेणें मंगळजननी थरारी ॥ तों सत्यभामा म्हणे जी कंसारी ॥ मीही येईन समागमें ॥३५॥
ऐकतें तुमच्या संग्रामगोष्टी ॥ परी मीही पाहीन आजि दृष्टीं ॥ गरुडावरी तुमच्या पुष्टीं ॥ मागें लपोनि राहीन मी ॥३६॥

हरि म्हणे ऐक मृगनयनी ॥ संग्रामाच्या गोष्टी ऐकिजे कानीं ॥ महावीर रण देखोनी ॥ मूर्च्छा येऊनि पडती धरे ॥३७॥
तुज सोसेना अनिल शीतळ ॥ तेथें येती बाणांचे कल्लोळ ॥ तें नव्हे गायन मंजुळ ॥ आरडती सकळ वीर तेथें ॥३८॥
तो नव्हे मृदंग मधुर ॥ होती उल्हाटयंत्राचे भडिमार ॥ तुज उष्ण न सोसे अणुमात्र ॥ शस्त्रसंभार वर्षती तेथें ॥३९॥
सत्यभामा म्हणे प्रतापशूरा ॥ तुम्ही जवळी असतां यादवेंद्रा ॥ मज न लागे भयवारा ॥ तुमच्या कृपेंकरुनियां ॥१४०॥
मनीं विचारिंलें जगन्नाथें ॥ जरी समागमें न न्यावें ईतें ॥ तरी ही पुन्हां रुसेल मग मातें ॥ सांकडें हाईल दुसरें ॥४१॥
स्त्रियेशीं युद्ध केल्याविण ॥ भौमासुरा नाहीं मरण ॥ पुढील भविष्यार्थ जाणोन ॥ सत्यभामा सवें घेतली ॥४२॥
गरुडारुढ जाहला जगजेठी ॥ सत्यभामा बैसविली पाठीं ॥ दळभारेंसीं उठाउठी ॥ दैत्यपुरीसमीप आला ॥४३॥
तों सात दुर्गें तया नगरा ॥ भेदीत गेलीं हो अंबरा ॥ सात परिघ अवधारा ॥ जेथींच्या नीरा अंत न लागे ॥४४॥
महाप्रतापी नरकासुर ॥ भूमंडळींच्या कन्या नागर ॥ एकशत सोळा सहस्त्र ॥ सांचवूनि ठेविल्या ॥४५॥
तितुक्यांशीं लग्न लावूनियां ॥ करुं इच्छी आपुल्या स्त्रिया ॥ ज्यांच्या स्वरुपावरुनियां ॥ रंभा मेनका ओंवाळिजे ॥४६॥
ऐशा त्या सुंदरा कोंडूनी ॥ नरकासुरें ठेविल्या निजसदनीं ॥ सैन्यासहित चक्रपाणी ॥ वेढा घाली नगरातें ॥४७॥

कळला नरकासुरासी समाचार ॥ कीं इंद्राचा कैवारी यादवेंद्र ॥ युद्धालागीं आला बाहेर ॥ दैत्य थोर कोपला ॥४८॥
आज्ञा देतां ते अवसरीं ॥ सेनासिंधु लोटला बाहेरी ॥ रणवाद्यें महागजरीं ॥ वाजों लागलीं तेधवां ॥४९॥

एकाहूनि एक उंच दुर्गें ॥ उल्हाटयंत्रें भडकती वेगें ॥ इंद्रादिक निराळमार्गें ॥ विमानीं बैसोनि पाहती ॥१५०॥
पायदळावरी पायदळ ॥ एकवटलें परमतुंबळ ॥ एकचि झाला रणकल्लोळ ॥ देखतां काळ भय पावे ॥५१॥
तुरंगांवरी तुरंग लोटती ॥ वीरांशीं वीर झगटती ॥ असिलता करीं लखलखती ॥ क्षणप्रभेसारिख्या ॥५२॥
रथांशीं रथ मिळाले ॥ अश्व दोंपायीं उभे ठाकले ॥ दोन्ही मकरतोंडांशीं घर्षण झालें ॥ कल्पांत मांडला ते वेळे ॥५३॥
सारथ्यांशी सारथी हाणिती ॥ रथियांसी रथी ओढिती ॥ देहआशा टाकोनि भीडती ॥ स्वामिकार्याकारणें ॥५४॥
परमकुशल सारथी ॥ रथ ओढूनि माघारे करिती ॥ पवनवेगें रथ फिरविती ॥ कावे देती सव्य अपसव्य ॥५५॥

कीं त्या रणसागरावरी सहजें रथ तेचि थोर जहाजें ॥ वरी ध्वज सतेज विराजे ॥ पवनवेगें धांवती ॥५६॥

रणसागरीं मीन चंचळ ॥ तेंचि पायदळ हिंडे चपळ ॥ गज धांवती सबळ ॥ तेचि नाडेसावजें पैं ॥५७॥

रक्तगंगेमाजी शुंडा तुटोन ॥ वाहती ते चपळ विरोले जाण ॥ छत्रें नीळवर्ण पडती तुटोन ॥ तेचि कूर्म वर्तुळाकार ॥५८॥
असो यादववीरांचा मार थोर ॥ क्षणें काचावले दैत्यभार ॥ हें देखोनि नरकासुर ॥ चंडबळेंसीं धांविन्नला ॥५९॥

जैसी पर्जन्यवृष्टि निरंतर ॥ तैसे बाण वर्षे उर्वीपुत्र ॥ यादव त्रासिले थोर ॥ मार अनिवार तयाचा ॥१६०॥

ऐसें देखोनियां श्रीरंगें ॥ शारंग चढविलें अति वेगें ॥ सुपर्णवहनें भक्तभवभंगें ॥ बाण हातीं घेतला ॥६१॥
तों सत्यभामा म्हणे ते अवसरीं ॥ मजपाशीं धनुष्य द्या पूतनारी ॥ मी युद्ध करीन क्षणभरी ॥ नरकासुराशीं आजि पैं ॥६२॥
आकर्ण ओढी ओढून ॥ सोडी बाणांपाठीं बाण ॥ वरि आश्चर्य करिती पूर्ण ॥ म्हणती नवल वर्तलें ॥६४॥

कोण्या वीराची पत्‍नी ॥ युद्ध करी समरांगणीं ॥ परवीरांसी खोंची बाणीं ॥ वर्में लक्षूनि सवेग ॥६५॥
नेणे कधीं बाहेरील समीर ॥ उभी रणांगणीं धरुनि धीर ॥ जिचें बोलणें अतिसुकुमार ॥ हांकें अंबर गाजवीतसे ॥६६॥
सोडी शरांपाठीं शर ॥ आश्चर्य करी भूमिपुत्र ॥ म्हणे स्त्रियेवरी मी शस्त्र ॥ महावीर कैसा धरुं ॥६७॥
मग रथ पदें लोटिला सत्वर ॥ हरीसी म्हणे मोठा तूं रणधीर ॥ युद्धासी स्त्री केली समोर ॥ लाज अणुमात्र नाहीं तुज ॥६८॥
स्त्रीसमवेत तुज गोवळा ॥ भस्म करीन ये वेळां ॥ म्हणोनि अग्निअस्त्रमंत्र जपला ॥ बाण सोडिला तैसाचि ॥६९॥

ऐस देखोनि हृषीकेशी ॥ सत्यभामा घाली पाठीसी ॥ धनुष्य ओढूनि वेगेंसीं ॥ पर्जन्यास्त्र सोडिलें ॥१७०॥
अग्नीसी ग्रासूनि पर्जन्यें ॥ शीतल केलीं सकळ सैन्यें ॥ जैसें सत्संगतीकरुन ॥ मोहभ्रम वितळती ॥७१॥
चंडधारा मेघ वर्षत ॥ तेणें नरकासुराची चमू वाहत ॥ मग नरकासुरें वातास्त्र त्वरित ॥ प्रेरितां मेघ वितळला ॥७२॥
वात वाढला प्रबळ ॥ तेणें उडों पाहे यादवदळ ॥ हें देखोनि तमालनीळ ॥ पर्वतास्त्र योजिलें ॥७३॥
तेणें कोंडिला सकळ वात ॥ पर्वत भौमसैन्यावरी पडत ॥ सवेंचि वज्रास्त्र नरक जपत ॥ तेणें पर्वत पिष्ट केले ॥७४॥
ऐसें देखोनि वैकुंठपाळ ॥ म्हणे अकं आतां लावावा वेळ ॥ सकळशास्त्रांचा नृप तात्काळ ॥ सुदर्शन हातीं घेतलें ॥७५॥
जैसे उगवले सहस्त्र मार्तंड ॥ तेजें लखलखिलें ब्रह्मांड ॥ निमिष न लागतां प्रचंड ॥ यादवरायें सोडिलें ॥७६॥

नरकासुराचें शिर ॥ छेदिलें न लागतां क्षणमात्र ॥ मागुती परतोनि सत्वर ॥ हरिहस्तकीं वसिन्नलें ॥७७॥

आश्विनमास वद्य चतुर्दशी ॥ तीन प्रहर जाहलिया निशी ॥ चंद्रोदयीं नरकसुरासी ॥ मुक्ति दिधली श्रीरंगें ॥७८॥

हरीनें नरकासुरासी दिधला वर ॥ ये समयीं मंगलस्नान न करी जो नर ॥ तो परमदरिद्री दुराचार ॥ जन्मवरी जाणिजे ॥७९॥
असो नरकासुराचें नगर ॥ त्या नांव प्राग्ज्योतिषपुर ॥ त्यामाजी प्रवेशला श्रीकरधर ॥ तंव अपूर्व देखिलें ॥१८०॥
तेजागळा मणिपूरपर्वत ॥ त्यावरी मंदिरें रत्‍नखचित ॥ त्यांत सोळाहस्त्र एकशत ॥ गोपी सुंदर देखिल्या ॥८१॥
परमसुंदर लावण्यखाणी ॥ तिंहीं दृष्टीं देखिला चक्रपाणी ॥ म्हणती कोटि काम यावरुनी ॥ ओंवाळूनी टाकावे ॥८२॥
ऐसा जरी आम्हांसी होईल वर ॥ तरी मग पुण्यासी नाहीं पार ॥ द्वारकनाथ हा यादवेंद्र ॥ आजि दृष्टीं देखिला ॥८३॥
समीप देखिला क्षीराब्धिजावर ॥ गोपी सद्गद जाहल्या समग्र ॥ करिती हरीसी नमस्कार ॥ आमुचा उद्धार करीं आतां ॥८४॥
आम्ही अपर्णिता कर्णकुमारी ॥ आमुचा बंध मुक्त करीं ॥ आम्ही षोडश सहस्त्र नारी ॥ कंसांतका तुजचि वरुं ॥८५॥
मग कृपाळु यदुवीर ॥ तयांसी दिधला नाभीकर ॥ म्हणे तुमचा मनोभाव समग्र ॥ पुरवीन चिंता न कीजे ॥८६॥

सोळासहस्त्र एकशत ॥ आणवी श्रीकृष्ण दिव्य रथ ॥ गोपिका बैसवूनि समस्त ॥ द्वारकेलागीं पाठविल्या ॥८७॥
सवें दिधलें समस्त सैन्य ॥ अक्रूर उद्धव रेवतीरमण ॥ जयवाद्यें वाजवून ॥ द्वारकापंथें परतले ॥८८॥
वाटे जातां गोपी भाविती ॥ आम्हांसी वर जोडला श्रीपती ॥ नरकासुरानें उपकार निश्चितीं ॥ आम्हांवरी बहु केला ॥८९॥
तो केवळ आमुचा पिता ॥ तेणें दाखविलें वैकुंठनाथा ॥ असो यावरी कमलोद्भवजनिता ॥ काय करिता जाहला ॥१९०॥
प्राग्ज्योतिषपुरीं हरि राहिला ॥ तों नरकासुराची स्त्री ते वेळां ॥ पुत्र हातीं घेऊनि तमालनीळा ॥ शरण येती जाहली ॥९१॥
मुकुटकुंडलें ते वेळीं ॥ हरीपुढें आणूनि ठेविलीं ॥ म्हणती आम्ही शरण वनमाळी ॥ कृपा करीं दीनबंधु ॥९२॥
तो नरकपुत्र भगदत्त ॥ हरीसी नमस्कार घालीत ॥ कृपेनें द्रवला रमानाथ ॥ छत्र धरवी तयावरी ॥९३॥
तयासी राज्यीं स्थापून ॥ मुकुटकुंडलें घेऊन ॥ सत्यभामेसहित जगन्मोहन ॥ द्विजेंद्रावरी आरुढला ॥९४॥

क्षण न लागतां इंद्रपदासी ॥ आला क्षीरसिंधुविलासी ॥ मुकुटकुंडलें सहस्त्रनेत्रासी ॥ देऊनियां तोषविलें ॥९५॥

मग नानारत्‍नें अलंकारीं ॥ इंद्रें पूजिला मधुकैटभारी ॥ आज्ञा घेऊनि ते अवसरीं ॥ द्वारकेसी हरि निघाला ॥९६॥

तों इंद्राचें नंदनवन ॥ परम सुरेख शोभायमान ॥ तेथें पारिजातक दिव्य रत्‍न ॥ दृष्टीं देखिलें श्रीकृष्णें ॥९७॥
कमळपत्राक्षें ते वेळां ॥ वृक्ष समूळ उपटिला ॥ गरुडावरी पुढें घेतला ॥ तों खोल्हाळ केला वनरक्षकीं ॥९८॥
वनरक्षक सांगती इंद्रातें ॥ कीं वृक्ष नेला द्वारकानाथें ॥ आखंडल ऐकतां क्रोधें बहुतें ॥ युद्धालागीं धांविन्नला ॥९९॥

परम अज्ञानें वेष्टिला इंद्र ॥ नेणवेचि हरिप्रताप अपार ॥ म्हणे उभा रे उभा तूं तस्कर ॥ वृक्ष नेसी चोरुनियां ॥२००॥

ऐकोनि मुरडला श्रीरंग ॥ शारंग चढविलें सवेग ॥ तंव वाचस्पति म्हणे श्रीपति अभंग ॥ यासीं युद्धा न पुरसी तूं ॥१॥

हा पुराणपुरुश नारायण ॥ क्षणांत ब्रह्मांड टाकील जाळून ॥ इंद्र पाहे विचारुन ॥ नमस्कार घातला ॥२॥

इंद्र गेला परतोन ॥ द्वारकेसी आला नारायण ॥ सत्यभामेच्या द्वारीं नेऊन ॥ पारिजातक लाविला ॥३॥
मणि बापाचा आंदण घरीं ॥ पारिजातक वृक्ष द्वारीं ॥ त्या गर्वें सत्राजितकुमारी ॥ कोणासी न मानीच ॥४॥
असो ऐसा करुनि पुरुषार्थ ॥ हरि रुक्मिणीच्या गृहा येत ॥ षोडशोपचारें पूजा करीत ॥ परमपुरुषाची प्रीतीनें ॥५॥

रुक्मिणी म्हणे श्रीहरी ॥ पारिजातक लाविला तिचें द्वारीं ॥ एक पुष्प आम्हां घरीं ॥ आणूनियां दीधलें ॥६॥

कृष्ण म्हणे वृक्ष कासया निश्चित ॥ तुझें द्वारीं पुष्पें अपरिमित ॥ स्वर्गींहूनि अकस्मात ॥ अंगणांत पडतील ॥७॥
ऐसा वर देऊनी ॥ मग काय करी मोक्षदानी ॥ सोळा सहस्त्र मंदिरें तेचि क्षणीं ॥ उभविलीं हेममयें ॥८॥

त्या मंदिरांची रचना पाहूनि ॥ तटस्थ होती सुधापानी ॥ विश्वकर्मा स्वकरेंकरुनी ॥ निर्मीत हरिआज्ञेनें ॥९॥

नारी षोडश सहस्त्र एकशत ॥ सुलग्न पाहूनि कमलोद्भवतात ॥ एकेचि घटिकेंत तितुक्यांस वरीत ॥ कर्तव्य अद्‌भुत हरीचें ॥२१०॥

सोळा सहस्त्र एकशत नारी ॥ तितुकीं रुपें धरी कंसारी ॥ सोळा सहस्त्र मंदिरीं ॥ मंडप दिव्य उभविले ॥११॥
सोळा सहस्त्रां घरीं ॥ भिन्नभिन्न वसुदेव देवकी सुंदरी ॥ बळिभद्र उग्रसेन सुभद्रा नारी ॥ सर्वां घरीं सारिख्या ॥१२॥
सकळ यादवांचे भार ॥ ऋषींच्या मांद्या समग्र ॥ रुक्मिणीचीं रुपें अपार ॥ सर्वां घरीं सारिखीं ॥१३॥
इतुकीं रुपें आपण ॥ नटला पूतनाप्राणहरण ॥ पूर्णावतार श्रीकृष्ण ॥ अतिअद्‌भुत लीला त्याची ॥१४॥
वैकुंठींची अवघी संपत्ती ॥ आणविली द्वारकेप्रती ॥ शंखचक्रादि आयुधें हातीं ॥ श्रीवत्सलांछन ॥१५॥

वैकुंठींचे दिव्य रथ ॥ द्वारकेसी आणवी कृष्णनाथ ॥ सुपर्ण कर जोडूनि तिष्ठत ॥ कर्तव्य अद्‌भुत हरीचें ॥१६॥
सनक सनंदन सनत्कुमार ॥ नारद विरिंचि रुद्र शचीवर ॥ द्वारकेसी येती वारंवार ॥ हरिदर्शन घ्यावया ॥१७॥

वरकड हरीचे अंशावतार ॥ पृथ्वीवरी दाविलें चरित्र ॥ वैकुंठपति इंदिरावर ॥ तैसाचि असे संचला ॥१८॥

कृष्णावतारीं आपण ॥ स्वयें अवतरला आदिनारायण ॥ वैकुंठींचीं कपाटें देऊन ॥ राहिला जाण द्वारके ॥१९॥
इंद्रादिदेवांचीं गार्‍हाणीं ॥ द्वारकेसी येती क्षणक्षणीं ॥ यालागीं पूर्णावतार चक्रपाणी ॥ भक्तजनीं जाणिजे ॥२२०॥
म्हणोनि सोळा सहस्त्र घरीं ॥ तितुकीं रुपें हरीच धरी ॥ षोडश सहस्त्र नारी ॥ एक्याचि लग्नीं वरियेल्या ॥२१॥
रत्‍नजडित बोहलीं ॥ सर्वां घरीं घातलीं ॥ हळदी उटणें वनमाळी ॥ सर्वां घरीं खेळत ॥२२॥
उग्रसेन उद्धव अक्‍रुर ॥ घरोघरीं सारिखेचि समग्र ॥ भांडारें फोडूनि अपार ॥ द्रव्य याचकां वांटिती ॥२३॥
ऐसा चारी दिवस सोहळा पूर्ण ॥ वर्णितां भागे सहस्त्रवदन ॥ सकळ देव येऊन ॥ कामें करिती घरोघरीं ॥२४॥
इंद्र अग्नि यम निऋति ॥ रसनायक समीर धनपति ॥ सत्यलोकवासी अपर्णापति ॥ घरोघरीं सारिखेचि ॥२५॥
सर्व याचकांसी देकार ॥ घरोघरीं देत कुबेर ॥ सकळ वर्‍हाडियां नीर ॥ रसनायक पुरवीतसे ॥२६॥

सभेवरी मलयाद्रीचा सुवास ॥ घेऊनि येत प्राणाधीश ॥ जातवेद धरुनि हर्ष ॥ पाकनिष्पत्ति स्वयें करी ॥२७॥

असो यावरी सर्वां सदनीं ॥ राबताती सुधारसपानी ॥ अष्टनायिका येऊनी ॥ सर्वां घरीं नृत्य करिती ॥२८॥
ऐसे चारी दिवस संपादूनी ॥ अवघ्यांसी दिधली पाठवणी ॥ अलंकारवस्त्राभरणीं ॥ चारी वर्ण तोषविले ॥२९॥

अहो त्या सोळा सहस्त्र वेदश्रुति ॥ निर्गुणाची न वर्णवे कीर्ति ॥ म्हणोनि आल्या द्वारकेप्रति ॥ हरिरुपीं जडावया ॥२३०॥

किं हरिकल्पवृक्षावरी देखा ॥ सोळा सहस्त्र चढिल्या कनकलतिका ॥ सर्वही सुफळसुखदायका ॥ वैकुंठनायका भोगिती ॥३१॥

श्रीकृष्ण मेघसांवळा ॥ सोळा सहस्त्र तळपती चपळा ॥ दाहकत्व सांडूनि सकळा ॥ हरिरुपीं जडल्या हो ॥३२॥
कीं षोडश सहस्त्र राजहंसी ॥ हरिपदीं मुक्तता हे मुक्तराशी ॥ मिळाल्या सकळ भोगूं द्वारकेसी ॥ तपें बहुत आचरोनियां ॥३३॥

सर्वां घरीं समसमान ॥ एकचि असे जगज्जीवन ॥ परी मुख्य स्वरुप रुक्मिणीवांचून ॥ सहसा नसे कोठेंही ॥३४॥

एकपत्‍नीव्रती श्रीकृष्ण ॥ रुक्मिणीवेगळा नव्हे एक क्षण ॥ इच्छारुपें धरुन ॥ सोळा सहस्त्र घरीं वसे ॥३५॥
हा हरिविजयग्रंथ ॥ परमसुंदर मलयपर्वत ॥ तेथींचा समीरसुवास अद्‌भुत ॥ निजभक्त सेविती ॥३६॥

ब्रह्मानंदा पंढरीनाथा ॥ श्रीधरवरदा परमसमर्था ॥ निजभक्तांचिया मनोरथा ॥ तुजविण पुरविता कोण असे ॥३७॥

इति श्रीहरिविजयग्रंथ ॥ संमत हरिवंशभागवत ॥ सदा परिसोत प्रेमळ भक्त ॥ षड्‌विंशतितमोऽअध्या गोड हा ॥२३८॥
अध्याय॥२६॥ओंव्या॥२३८॥
॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥

No comments:

Post a Comment