Thursday, April 7, 2011

Geetai - Adhyay 18

Chapter - XVIII : Grace of God.

After the sermon in the fifteenth chapter, no new concepts are introduced. Sixteenth and Seventeenth chapter details the inner fight and the programme for the seeker. In this chapter, whatever we have learnt is being concluded.

First thing we learnt in Gita is that we have to act - keep on acting but surrender the fruit of our actions to God. These actions are of three types Satvic - which bring noble fruit, Rajasic - which gives mixed fruit of pleasure and pain, and Tamasic or fruitless activity / activity which bears painful fruit. Out of this, Shri Krishna advises that fruitless activity should be totally curbed and mixed fruit activity to be progressively purified by surrendering its fruit to God.

Resultant Satvic activity has also some defects, but this should not be given up. As inward purity grows, the effort in the action becomes less. From effort to gentleness, from gentleness to subtlety, from subtlety to nothingness, the activity tends to zero and action towards infinity.

After having said this, Sri Krishna tells Arjuna, You have heard with attention, all that I have been saying. Consider my words fully and do what you think right'. Thus Shri Krishna generously sets Arjuna free. In the same breath, in the next verse he says, 'Arjuna, give up everything and take refuge in Me'.
What does this mean? It means as long as there is Ego, there is danger in becoming free; let not any desire of your own arise in your heart. Be an observer of all the waves of desire. 'Not my, but HIS Will' - 'Not my but His Will'. "I" am not, "He" is. As you learn to subdue your ego thus, your 'Rajsik action ill become pure and what will be left will be infinite action without the 'doer'. Every action coming from God - making one a vehicle of His 'divine will' No 'I', No 'My' - all His. Starting with 'I' and frustration leading to no activity in the first chapter to destroying the illusion of 'I' in the second chapter, Gita progresses to the way of action, inward action to support outward action, leading to state of egoless activity in fifth chapter. Rest of the chapters mention the tools of concentration, devotion, surrender, cosmic vision etc. to support egoless activity, and last comes total surrender to obtain His Grace which is the final tool. 'His grace having been established, no effort is needed to remain pure. Purity becomes not only our second nature, but it becomes our first nature, our nature itself. This is the aim and end of Bhagvat-Gita.

गीताई अध्याय १८

[५५]

अर्जुन म्हणाला

संन्यासाचे कसे तत्त्व त्यागाचे हि कसे असे ।
मी जाणू इच्छितो कृष्णा सांगावे वेगवेगळे ॥ १ ॥

श्री भगवान् म्हणाले

सोडणे काम्य कर्मे तो ज्ञाते संन्यास जाणती ।
फळ सर्व चि कर्माचे सोडणे त्याग बोलती ॥ २ ॥

दोष-रूप चि ही कर्मे सोडावी म्हणती कुणी ।
न सोडावी चि म्हणती यज्ञ-दान-तपे कुणी ॥ ३ ॥

तरी ह्याविषयी ऐक माझा निश्चित निर्णय ।
त्याग जो म्हणती तो हि तिहेरी भेदला असे ॥ ४ ॥

यज्ञ-दान-तपे नित्य करणीय अवश्यक ।
न सोडावी चि ती होती ज्ञानवंतास पावक ॥ ५ ॥

परी ही पुण्य-कर्मे हि ममत्व फळ सोडुनी ।
करणे योग्य हा माझा जाण उत्तम निर्णय ॥ ६ ॥

नेमिले कार्य जे त्याचा संन्यास न जुळे चि तो ।
केला तसा जरी मोहे त्याग तामस बोलिला ॥ ७ ॥

कष्टामुळे चि जे कर्म सोडणे आंग राखुनी ।
त्याग राजस तो वांझ न देखे आपुले फळ ॥ ८ ॥

करणे नेमिले कर्म कर्तव्य चि म्हणूनिया ।
ममत्व फळ सोडूनि त्याग तो मान्य सात्त्विक ॥ ९ ॥

कर्मी शुभाशुभी जेंव्हा राग-द्वेष न राखतो ।
सत्त्वांत मुरला त्यागी ज्ञने छेदूनि संशय ॥ १० ॥

अशक्य देहवंतास सर्वथा कर्म सोडणे ।
म्हणूनि जो फल-त्यागी तो त्यागी बोलिला असे ॥ ११ ॥

तिहेरी फळ कर्माचे बरे वाईट मिश्रित ।
त्याग-हीनास ते लाभे संन्यासी मुक्त त्यांतुनी ॥ १२ ॥

[५६]

ऐक तू मजपासूनि ज्ञात्यांचा कर्म-निर्णय ।
परभारे चि हे कर्म करिती पांच कारणे ॥ १३ ॥

अधिष्ठान अहंकार तशी विविध साधने ।
वेगळाल्या क्रिया नाना दैव ते येथ पांचवे ॥ १४ ॥

काया-वाचा-मने जे जे मनुष्य करितो जगी ।
धर्माचे वा अधर्माचे त्याची ही पांच कारणे ॥ १५ ॥

तेथ जो शुद्ध आत्म्यास कर्ता मानूनि बैसला ।
संस्कार-हीन तो मूढ तत्त्व नेणे चि दुर्मति ॥ १६ ॥

नसे ज्यास अहंभाव नसे बुद्धीत लिप्तता ।
मारी विश्व जरी सारे न मारी चि न बांधिला ॥ १७ ॥

[५७]

ज्ञाता ज्ञेय तसे ज्ञान तिहेरी कर्म-बीज हे ।
क्रिया करण कर्तृत्व कर्मांगे तीन त्यांतुनी ॥ १८ ॥

ज्ञाना-कर्मांत कर्त्यांत त्रिगुणी तीन भेद जे ।
रचिले ते कसे ऐक गुण-तत्त्वज्ञ वर्णिती ॥ १९ ॥

भूत-मात्रांत जे पाहे भाव एक सनातन ।
अभिन्न भेदलेल्यांत जाण ते ज्ञान सात्त्विक ॥ २० ॥

भेद-बुद्धीस पोषूनि सर्व भूतांत पाहते ।
वेगळे वेगळे भाव जाण ते ज्ञान राजस ॥ २१ ॥

एका देहांत सर्वस्व मानुनी गुंतले वृथा ।
भावार्थ-हीन जे क्षुद्र जाण ते ज्ञान तामस ॥ २२ ॥

नेमिले जे न गुंतूनि राग-द्वेष न राखतां ।
केले निष्काम-वृत्तीने कर्म ते होय सात्त्विक ॥ २३ ॥

धरूनि कामना चित्ती जे अहंकार-पूर्वक ।
केले महा खटाटोपे कर्म ते होय राजस ॥ २४ ॥

विनाश वेंच निष्पत्ति सामर्थ्य हि न पाहता ।
आरंभिले चि जे मोहे कर्म ते होय तामस ॥ २५ ॥

निःसंग निरहंकार उत्साही धैर्य-मंडित ।
फळो जळो चळे ना तो कर्ता सात्त्विक बोलिला ॥ २६ ॥

फल-कामुक आसक्त लोभी अस्वच्छ हिंसक ।
मारिता हर्ष-शोके तो कर्ता राजस बोलिला ॥ २७ ॥

स्वच्छंदी क्षुद्र गर्विष्ठ घातकी शठ आळशी ।
दीर्घ-सूत्री सदा खिन्न कर्ता तामस बोलिला ॥ २८ ॥

बुद्धीचे भेद जे तीन धृतीचे हि तसे चि जे ।
गुणानुसार ते सारे सांगतो वेगवेगळे ॥ २९ ॥

अकर्तव्ये बंध-भय कर्तव्ये मोक्ष निर्भय ।
जाणे सोडू धरू त्यांस बुद्धि सात्त्विक ओळख ॥ ३० ॥

कार्याकार्य कसे काय काय धर्म अधर्म तो ।
जी जाणू न शके चोख बुद्धि राजस ओळख ॥ ३१ ॥

धर्म मानी अधर्मास अंधारे भरली असे ।
अर्थ जी उलटा देखे बुद्धि तामस ओळख ॥ ३२ ॥

जी इंद्रिये मन प्राण ह्यांचे व्यापर चालवी ।
समत्वे स्थिर राहूनि धृति सात्त्विक जाण ती ॥ ३३ ॥

धर्मार्थकाम सारे चि चालवी सोय पाहुनी ।
बुडवी जी फलाशेत धृति राजस जाण ती ॥ ३४ ॥

निद्रा भय न जी सोडी शोक खेद तसा मद ।
घाली झांपड बुद्धीस धृति तामस जाण ती ॥ ३५ ॥

तिन्ही प्रकारचे आता सांगतो सुख ऐक ते ॥ ३६ ॥

अभ्यासे गोड जे होय दुःखाचा अंत दाखवी ।
जे कडू विख आरंभी अंती अमृत-तुल्य चि ।
आत्म्यांत शुद्ध बुद्धीस लाभले सुख सात्त्विक ॥ ३७ ॥

आरंभी गोडसे वाटे अंती मारक जे विख ।
भासे विषय-संयोगे इंद्रिया सुख राजस ॥ ३८ ॥

निद्रा आळस दुर्लक्ष ह्यांनी आत्म्यास घेरुनी ।
आरंभी परिणामी हि गुंगवी सुख तामस ॥ ३९ ॥

इथे पृथ्वीवरी किंवा स्वर्गी देवादिकांत हि ।
काही कुठे नसे मुक्त प्रकृतीच्या गुणांतुनी ॥ ४० ॥

[५८]

ब्राह्मणादिक वर्णांची कर्मे ती ती विभागिली ।
स्वभाव-सिद्ध जे ज्याचे गुण त्यास धरूनिया ॥ ४१ ॥

शांति क्षमा तप श्रद्धा ज्ञान विज्ञान निग्रह ।
ऋजुता आणि पावित्र्य ब्रह्म-कर्म स्वभावता ॥ ४२ ॥

शौर्य धैर्य प्रजा-रक्षा युद्धी हि अ-पलायन ।
दातृत्व दक्षता तेज क्षात्र-कर्म स्वभावता ॥ ४३॥

शेती व्यापार गो-रक्षा वैश्य-कर्म स्वभावता ।
करणे पडिली सेवा शूद्र-कर्म स्वभावता ॥ ४४ ॥

आपुल्या आपुल्या कर्मी दक्ष तो मोक्ष मेळवी ।
ऐक लाभे कसा मोक्ष स्व-कर्मी लक्ष लावुनी ॥ ४५ ॥

जो प्रेरी भूत-मात्रास ज्याचा विस्तार विश्व हे ।
स्व-कर्म-कुसुमी त्यास पूजिता मोक्ष लाभतो ॥ ४६ ॥

उणा हि अपुला धर्म पर-धर्माहुनी बरा ।
स्वभावे नेमिले कर्म करी तो दोष जाळितो ॥ ४७ ॥

सहज-प्राप्त ते कर्म न सोडावे सदोष हि ।
दोष सर्व चि कर्मांत राहे अग्नींत धूर तो ॥ ४८ ॥

राखे कुठे न आसक्ति जिंकूनि मन निःस्पृह ।
तो नैष्कर्म्य महा-सिद्धि पावे संन्यास साधुनी ॥ ४९ ॥

सिद्धीस लाभला ब्रह्म गांठी कोण्यापरी मग ।
ज्ञानाची थोर ती निष्ठा ऐक थोडयांत सांगतो ॥ ५० ॥

बुद्धि सात्त्विक जोडूनि धृतीचा दोर खेचुनी ।
शब्दादि-स्पर्श टाळूनि राग-द्वेषांस जिंकुनी ॥ ५१ ॥

चित्त वाचा तनू नेमी एकांती अल्प सेवुनी ।
गढला ध्यान-योगात दृढ वैराग्य लेउनी ॥ ५२ ॥

बळ दर्प अहंकार काम क्रोध परिग्रह ।
ममत्वासह सोडूनि शांतीने ब्रह्म आकळी ॥ ५३ ॥

ब्रह्म झाला प्रसन्नत्वे न करी शोक कामना ।
पावे माझी परा भक्ति देखे सर्वत्र साम्य जी ॥ ५४ ॥

भक्तीने तत्त्वता जाणे कोण मी केवढा असे ।
ह्यापरी मज जाणूनि माझ्यात मिसळे मग ॥ ५५ ॥

करूनि हि सदा कर्मे सगळी मज सेवुनी ।
पावे माझ्या कृपेने तो अवीट पद शाश्वत ॥ ५६ ॥

मज मत्पर-वृत्तीने सर्व कर्मे समर्पुनी ।
समत्व न ढळू देता चित्त माझ्यात ठेव तू ॥ ५७ ॥

मग सर्व भये माझ्या कृपेने तरशील तू ।
मीपणे हे न मानूनि पावशील विनाश चि ॥ ५८ ॥

म्हणसी मी न झुंजे चि हे जे मीपण घेउनी ।
तो निश्चय तुझा व्यर्थ स्वभाव करवील चि ॥ ५९ ॥

स्वभाव-सिद्ध कर्माने आपुल्या बांधिलास तू ।
जे टाळू पाहसी मोहे अवश्य करिशील ते ॥ ६० ॥

राहिला सर्व भूतांच्या हृदयी परमेश्वर ।
मायेने चाळवी त्यांस जणू यंत्रांत घालुनी ॥ ६१ ॥

त्याते चि सर्व-भावे तू जाई शरण पावसी ।
त्याच्या कृपा-बळे थोर शांतीचे स्थान शाश्वत ॥ ६२ ॥

असे गूढाहुनी गूढ बोलिलो ज्ञान मी तुज ।
ध्यानी घेऊनि ते सारे स्वेच्छेने योग्य ते करी ॥ ६३ ॥

सर्व गूढांतले गूढ पुन्हा उतम वाक्य हे ।
हितार्थ सांगतो ऐक फार आवडसी मज ॥ ६४ ॥

प्रेमाने ध्यास घेऊनि यजी मज नमी मज ।
प्रिय तू मिळसी माते प्रतिज्ञा जाण सत्य ही ॥ ६५ ॥

सगळे धर्म सोडूनि एका शरण ये मज ।
जाळीन सर्व मी पापे तुझी शोक करू नको ॥ ६६ ॥

[६०]

न कथी हे कधी त्यास तपो-हीन अभक्त जो ।
श्रवणेच्छा नसे ज्यास माझा मत्सर जो करी ॥ ६७ ॥

सांगेल गूज हे थोर माझ्या भक्त-गणांत जो ।
तो त्या परम भक्तीने मिळेल मज निश्चित ॥ ६८ ॥

कोणी अधिक त्याहूनि माझे प्रिय करी चि ना ।
जगी आवडता कोणी न होय मज त्याहुनी ॥ ६९ ॥

हा धर्म-रूप संवाद जो अभ्यासील आमुचा ।
मी मानी मज तो पूजी ज्ञान-यज्ञ करूनिया ॥ ७० ॥

हे ऐकेल हि जो कोणी श्रद्धेने द्वेष सोडुनी ।
पावेल कर्म-पूतांची तो हि निर्वेध सद्-गति ॥ ७१ ॥

तू हे एकाग्र चित्ताने अर्जुना ऐकिलेस की ।
अज्ञान-रूप तो मोह गेला संपूर्ण की तुझा ॥ ७२ ॥

अर्जुन म्हणाला

मोह मेला चि तो देवा कृपेने स्मृति लाभली ।
झालो निःशंक मी आता करीन म्हणसी तसे ॥ ७३ ॥

संजय म्हणाला

असा कृष्णार्जुनांचा हा झाला संवाद अद्भुत ।
थोरांचा ऐकिला तो मी नाचवी रोम रोम जो ॥ ७४ ॥

व्यास-देवे कृपा केली थोर योग-रहस्य हे ।
मी योगेश्वर कृष्णाच्या मुखे प्रत्यक्ष ऐकिले ॥ ७५ ॥

हा कृष्णार्जुन-संवाद राया अद्भुत पावन ।
आठवूनि मनी फार हर्षतो हर्षतो चि मी ॥ ७६ ॥

स्मरूनि बहु ते रूप हरीचे अति अद्भुत ।
राया विस्मित होऊनि नाचतो नाचतो चि मी ॥ ७७ ॥

योगेश्वर जिथे कृष्ण जिथे पार्थ धनुर्धर ।
तिथे मी पाहतो नित्य धर्म श्री जय वैभव ॥ ७८ ॥

अध्याय अठरावा संपूर्ण

No comments:

Post a Comment