Thursday, November 10, 2011

RamVijay Adhyay - 18


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
 
अखिलरघुनाथगुणसमुद्र ॥ रामउपासक तेथें जळचर ॥ ब्रह्मानंदें क्रीडती साचार ॥ प्रेमबळें मातोनियां ॥१॥
स्वानंदाचे उमाळे देती ॥ सारासारविचारें तळपती ॥ जीवनावांचोनि गति ॥ दुजी नसे तयांतें ॥२॥
अविद्याविपिन शुष्क बहुत ॥ कांहींच वासना न करी तेथ ॥ नंदनवनींचा मिलिंद सत्य ॥ अर्कींपुष्पीं बैसेना ॥३॥
जो करी सुधारसपान ॥ तो कंटाळे देखोनि वमन ॥ जेणें आत्मशयनीं केलें शयन ॥ तो भवकानन कां सेवी ॥४॥
कल्पद्रुम ज्याचे अंगणीं ॥ नित्य सुरभी दुभे सदनीं ॥ तो तृणबीज काढोनी ॥ कदाकाळीं भक्षीना ॥५॥
प्रारब्धयोगें वावरे शरीर ॥ ते विषयीं न धरिती आदर ॥ तैसे रघुवीर भजनीं सादर ॥ हेंही नेणती कदा ते ॥६॥
सतरावे अध्यायी गतकथार्थ ॥ श्रीरामें मारिला शक्रसुत ॥ सुग्रीव उसां मांडी देत ॥ देहांतसमयीं वाळीच्या ॥७॥
तों अंगदसमवेत तारा सती ॥ सत्वर पातली जेथें पति ॥ मग म्हणे अयोध्यापति ॥ काय ऐसें केलें तुवां ॥८॥
आतां टाकोनि एक बाण ॥ राघवा घेई माझा प्राण ॥ मी पतिसमागमें जाईन ॥ काय वांचोनि व्यर्थ आतां ॥९॥
कवळोनि वाळीचें प्रेत ॥ तारा अत्यंत शोक करीत ॥ ऐसें जाणोनि जनकजामात ॥ काय बोले तें ऐका ॥१०॥
कोण्या अर्थालागीं देख ॥ तारे तूं करिशी शोक ॥ येरी म्हणे पतिवियोगपावक ॥ तेणें दग्ध जाहल्यें मी ॥११॥
ताटिकांतक म्हणे ते काळीं ॥ कलेवराचें नाम वाळी ॥ तरी तें पडलें तुजजंवळी ॥ जैसें तैसें संचलें ॥१२॥
ज्यालागीं शोक करिसी बहुत ॥ तरी तें पडलें वाळीचें प्रेत ॥ येरी म्हणे हृदयस्थ ॥ आत्मा गेला निघोनियां ॥१३॥
मग बोले अयोध्याविहारी ॥ तूं काय आत्म्याची अंतुरी ॥ कीं शरीराची निर्धारीं ॥ सांगें मज विचारोनि ॥१४॥
शरीर तंव नाशिवंत ॥ आत्मा अविनाश शाश्र्वत ॥ तरी शोक करावा किमर्थ ॥ पाहें बरवें विचारोनि ॥१५॥
जैसा घटीं आणि रांजणीं ॥ एक बिंबला वासरमणी ॥ तैसा स्त्रीपुरुष अभिधानीं ॥ आत्मा एक अव्यंग ॥१६॥
घट मठ मोडितां निःशेष ॥ जेवीं न मोडेचि आकाश ॥ कीं तरंग मोडतां सागरास ॥ नाश नसे सहसाही ॥१७॥
मायामय लटिका खेळ ॥ जैसें नसतां दिसे मृगजळ ॥ कीं गंधर्वनगर केवळ ॥ मिथ्या भास आभासे ॥१८॥
सुधापानी स्वर्गी असती ॥ तेही नाश पावती कल्पांतीं ॥ जें जें दिसे आकाररीतीं ॥ नाश निश्र्चितीं असे तेथें ॥१९॥
भग्नपात्रीचें गेलें नीर ॥ माजी बिंबला राहिणीवर ॥ तो न दिसे म्हणोनि अपार ॥ शोक करी अज्ञानी ॥२०॥
मळे पिकवीन अपार ॥ यालागीं इच्छी रोहिणीनीर ॥ तें अदृश्य होतां साचार ॥ शोक करिती मूर्खत्वें ॥२१॥
सकळ पिंडांसमवेत ॥ ब्रह्मांड अवघें मिथ्याभूत ॥ आत्मा अक्षय शाश्र्वत ॥ शोक किमर्थ करिसी तूं ॥२२॥
ऐशीं रावणारीचीं वचनें ॥ अमृताहून गोड गहनें ॥ कीं बोधसमुद्रींचीं चिद्रत्नें ॥ तारेलागीं दीधलीं ॥।२३॥
कीं तीं विश्रांतीची मंदिरें ॥ कीं अनुभवभींचीं नक्षत्रें ॥ कीं स्वानंदाचीं पात्रें ॥ मुखावरी उचंबळती ॥२४॥
कीं रामवचन अगस्ति थोर ॥ शोषिला तिचा शोकसागर ॥ कीं वचनरूपें दिनकर ॥ अज्ञानतिमिरनाशक ॥२५॥
मदनारीमित्राचे चरण ॥ तारेनें धरिले प्रीतीकरून ॥ श्र्वासोच्छ्वास टाकून ॥ तटस्थरूपें राहिली ॥२६॥
श्रीराम म्हणे तारेलागून ॥ माझें वचन मानीं प्रमाण ॥ सुग्रीवासी माळ घालून ॥ सुखेंकरून वर्तावें ॥२७॥
तारा म्हणे चापपाणी ॥ हे वेदविरुध्द दिसे करणी ॥ मग म्हणे कैवल्यदानी ॥ वचन मानीं माझें हें ॥२८॥
तूं पतिव्रतांमाजीं विख्यात ॥ तारे होशी यथार्थ ॥ अघटित घडवी रघुनाथ ॥ महिमा अद्भुत जयाचा ॥२९॥
देवाचें अघटित आचरण ॥ तें मानव करूं म्हणती आपण ॥ तरी तें नरकासी कारण ॥ होईल निश्र्चयें जाण पां ॥३०॥
अघटित घडवी रघुनंदन ॥ स्तंभाविण राहिलें गगन ॥ उदकावरी पृथ्वी संपूर्ण ॥ न बुडे सहसाही ॥३१॥
त्याचें कर्तृत्व करिती इतर ॥ तरी अनर्थासी नाहीं पार ॥ स्वेच्छा वर्ते सर्वेश्र्वर ॥ नव्हे म्हणे कोण त्यातें ॥३२॥
यावरी उत्तरक्रिया समस्त ॥ वाळीची करी सूर्यसुत ॥ अंगदावरी रघुनाथ ॥ प्रीति अत्यंत करीत पैं ॥३३॥
असो ते तारा सुंदरी ॥ रामें बोधिली ऐशियापरी ॥ सुग्रीवासी दिधली निर्धारीं ॥ शेसपाट भरोनियां ॥३४॥
यावरी तारेनें माळ ॥ सुग्रीवासी घातली तात्काळ ॥ जेणें प्रसन्न होय तमालनीळ ॥ आचरण तेंचि उत्तम ॥३५॥
सकल कपि जयजयकारें ॥ गर्जना करिती लहान थोरें ॥ नभ नादावलें भुभुःकारें ॥ महागजरें दुमदुमत ॥३६॥
राघव म्हणे सुग्रीवास ॥ आम्ही येथें राहिलों चार मास ॥ तुम्ही भोगोनि राज्यविलास ॥ सत्वर परतोनि येइंजे ॥३७॥
अर्कज म्हणे रघुनाथा ॥ आपण किष्किंधेसी चलावे आतां ॥ श्रीराम म्हणे माझिया भरता ॥ कारणें मी व्रतस्थ ॥३८॥
माझिया जिवालागाविण ॥ न करी मी मंगळस्नान ॥ आठवोनि भरताचे गुण ॥ रघुनंदन गहिंवरला ॥३९॥
मी चित्रकूटींहूनि निघतां ॥ भरतासि जाहली जे अवस्था ॥ ते सुग्रीवा नये सांगतां ॥ धीर चित्ता न धरवे ॥४०॥
जैसें बाळक परदेशीं ॥ माता टाकोनि जाय तयासी ॥ मजविणें माझ्या भरतासी ॥ तैसें जाहलें असेल ॥४१॥
सांगतां भरताचे गुण ॥ सद्रद जाहला रघुनंदन ॥ सुग्रीव धांवोनि धरी चरण ॥ लक्ष्मणही गहिंवरला ॥४२॥
असो याउपरी राजीवनेत्र ॥ बोलतां जाहला नीरदगात्र ॥ म्हणे सुग्रीवावरी धरीं छत्र । सौमित्रा सत्वर जाऊनियां ॥४३॥
रघुपतीचे चरणांबुज ॥ वंदी तेव्हां सुमित्रातनुज ॥ आशीर्वाद देत भरताग्रज ॥ विजयी होई सर्वदा ॥४४॥
मग सौमित्रें जावोनि सत्वर ॥ सुग्रीवावरी धरिलें छत्र ॥ अमात्यपद पवित्र ॥ वाळीपुत्रासी दीधलें ॥४५॥
सवेंच परतोन लक्ष्मण ॥ आला जेथें जानकीजीवन ॥ जवळी उभा वायुनंदन ॥ कर जोडोनि सर्वदा ॥४६॥
किष्किंधेसी नित्य जाऊन ॥ राघवापाशीं येईं परतोन ॥ तों चातुर्मास लोटले पूर्ण ॥ सुग्रीवासी स्मरण नव्हेचि ॥४७॥
देखोनियां शरत्काळ ॥ बोलता झाला तमालनीळ ॥ म्हणे सुग्रीव जाहला सबळ ॥ राज्यमदेंकरूनियां ॥४८॥
विषयसंगें रमलें मन ॥ धनविद्यामदें गेला भुलोन ॥ परी सज्जनीं त्यास दंडोन ॥ सन्मार्गातें लावावें ॥४९॥
तरी किष्किंधेसी जाईं लक्ष्मणा ॥ आठव देईं सूर्यनंदना ॥ तो जरी न मानी माझिया वचना ॥ तरी वधोनि त्यासी येईंजे ॥५०॥

तारा रुमा दोघी घेऊन ॥ नित्य करी मद्यपान ॥ जो न करी माझे स्मरण ॥ त्यास अवश्य दंडावें ॥५१॥
जो ब्राह्मण देखोनि उपहास करी ॥ संत भक्तांचा द्वेष धरी ॥ सद्रुवचन अव्हेरी ॥ त्यासी अवश्य दंडावें ॥५२॥
निंदी हरिहरांची चरित्रें ॥ अपमानी जो सत्पात्रें ॥ अपूज्य पूजी आदरें ॥ त्यासी अवश्य दंडावें ॥५३॥
कायावाचामनें ॥ ज्यासी परपीडा अगत्य करणें ॥ आणि वेदविरूध्द ज्यासी वर्तणें ॥ त्यासी अवश्य दंडावें ॥५४॥
ऐश्र्वर्यमदें जे मातले ॥ हिंसा करितां न कंटाळले ॥ धर्मपंथ ज्यांनीं मोडिले ॥ त्यांसी अवश्य दंडावें ॥५५॥
कमळा आणि चक्रपाणी ॥ भेटों इच्छिती धर्मसदनीं ॥ कार्पण्यलोभें विघडी दोनी ॥ त्यास अवश्य दंडावें ॥५६॥
यावरी वीरचूडामणी ॥ किष्किंधेसी जाईं ये क्षणीं ॥ तो जरी माझें वचन अवगणी ॥ तरी तेचि क्षणीं वधावा ॥५७॥
वाळी निर्दाळिला ज्या बाणें ॥ त्याच शरें त्याचा प्राण घेणें ॥ ऐसें ऐकतां लक्ष्मणें ॥ राघवचरण वंदिले ॥५८॥
धनुष्यासी चढवूनि गुण ॥ वेगें चालिला उर्मिलाजीवन ॥ किष्किंधेसमीप येऊन ॥ लाविला बाण चापासी ॥५९॥
तों इकडे सूचना मारुति ॥ जाणवीत सुग्रीवाप्रति ॥ म्हणे एकला वनीं रघुपति ॥ चला वेगीं दर्शना ॥६०॥
सीताशुद्धीस त्वरीत ॥ वानर धाडावे निश्र्चित ॥ तूं जाहलासि उन्मत्त विसरलासि स्वामिकायार्थ ॥ सूर्यसुत मग बोले ॥६१॥
जाहले धूर्णित लोचन ॥ बोले उदासीन वचन ॥ म्हणे वानरसेना मेळवून ॥ सिद्ध करा हळू हळू ॥६५॥
ऐसें बोलोनि सूर्यसुत ॥ राणीवसामाजीं प्रवेशत ॥ तों नगरद्वारीं उर्मिलानाथ ॥ येवोनि उभा ठाकला ॥६६॥
धनुष्यासि लाऊनि बाण ॥ क्षोभे जैसा प्रळयाग्न ॥ पळों लागले वानरगण ॥ येती शरण सुग्रीवा ॥६७॥
तेव्हां सुग्रीव गजबजिला ॥ म्हणे हनुमंता रक्षी मला ॥ येरु म्हणे सौमित्र कोपला ॥ तो नाटोपें कवणातें ॥६८॥
उभयदारांसमवेत ॥ शरण येत सूर्यसुत ॥ आणिक वानरभार समस्त ॥ सांगे हनुमंत समस्तां ॥६९॥
म्हणे हो नम्रता धरून ॥ अवघे घाल लोटांगण ॥ तैसेंच करिती वानरगण ॥ सुग्रीवासहित तेधवां ॥७०॥
तारा रुमा पुढें होऊन सौमित्रास मागती चुडेदान ॥ सुग्रीव धरी दृढ चरण ॥ ऊर्मिलापतीचे तेधवां ॥७१॥
सौमित्र म्हणे क्रोधायमान ॥ ऐसे तुम्ही निर्दय पूर्ण ॥ श्रीरामसच्चिदानंदघन ॥ वनीं सोडोनि राज्य करितां ॥७२॥
तो अनंत ब्रह्मांडनायक ॥ अयोध्यानाथ पुण्यश्र्लोक ॥ त्यास वनीं सांडोनि राज्यसुख ॥ गोड कैसें वाटलें ॥७३॥
हनुमंत बोले वचन ॥ सर्व अपराध क्षमा करून ॥ उठवावा सूर्यनंदन ॥ प्रीती करोन येसमयीं ॥७४॥
मग उठवोनि सूर्यसुत ॥ राघवानुज आलिंगित ॥ तंव वानरभार अद्भुत ॥ चहूंकडोन धांविन्नले ॥७५॥
वानरचमूसमवेत ॥ चालिला तेव्हां तमारिसुत ॥ जैसी नदी उचंबळोन बहुत ॥ मिळूं जाय जलार्णवा ॥७६॥
आवेशें वानरगण धांवत ॥ जैसें गोकुळ तृषाक्रांत ॥ सरितापंथें जलपानार्थ ॥ चपळत्वेंकरून लोटती ॥७७॥
कीं दात्याचें गृह लक्षून ॥ धांवती वेगें याचकजन ॥ कीं पाहावया सद्रुरुचरण ॥ सच्छिष्य येती त्वरेनें ॥७८॥
कीं लग्नघडी उरली थोडी ॥ देखोनि धांवती वऱ्हाडी ॥ कीं मिलिंदचक्रें धांवती तांतडी ॥ पद्मकरंद सेवावया ॥७९॥
तैसे आले रघुपतीजवळी ॥ लोटांगणें घालिती सकळी ॥ रामें आलिंगिला हृदयकमळीं ॥ मित्रतनुज आदरें ॥८०॥
आणीकही सकळ वानरां ॥ भेटला परत्रींचा सोयरा ॥ कर जोडोनि पुढारां ॥ किष्किंधेश स्तवीतसे ॥८१॥
जय निगमागमवंद्या रघुवीरा ॥ भक्तकैवारिया आनंदसमुद्रा ॥ पंचकद्वययरथपुत्रा ॥ विश्र्वनेत्रा विश्र्वपाळा ॥८२॥
शरणागतासी तूं वज्रपंजर ॥ कदा नुपेक्षी शाङर्‌रधर ॥ जैसें सबळ काष्ठ तारी नीर ॥ आपण वाढविलें म्हणोनि ॥८३॥
तिळभरी पाषाण न तरे जळीं ॥ वृक्षा तारी सर्व काळीं ॥ शरणागतांची माउली ॥ तैसाचि तूं श्रीरामा ॥८४॥
पद्मासी ढका न लावी भ्रमर ॥ काष्ठें तात्काळ करी चूर ॥ तेंवि भक्तपाळक अभक्तसंहार ॥ सीतावल्लभा करिसी तूं ॥८५॥
असो भूरत्नशुद्धीसी वानर ॥ जावया इच्छिती सर्वत्र ॥ मग बोले विषकंठमित्र ॥ जाऊंद्या सत्वर चहूंकडे ॥८६॥
अर्कसुतें पाठवून दूत ॥ वानर आणिले समस्त ॥ अष्टदश पद्में बल अद्भुत ॥समरीं कृतांता जिंकिती ॥८७॥
सुग्रीवें घालोन आण ॥ आणिले वेगें सप्तद्वीपींचे हरिगण ॥ समस्तांसी म्हणे सूर्यनंदन ॥ ऐका वचन सत्य माझें ॥८८॥
सीताशुद्धि करून तत्वतां ॥ जानकी भेटवूं रघुनाथा ॥ हें कार्य सिद्धीस न पावतां ॥ निजनगरासी न जावें ॥८९॥
सीता न भेटवितां रघुवीरा ॥ जो कोणी जाईल माघारा ॥ तो मात्रागमनी अवधारा ॥ ब्रह्महत्यारी पापिष्ठ ॥९०॥
त्यासी रासभावरी बैसवून ॥ तात्काळ छेदीन नासिका कर्ण ॥ पृथ्वीवरी फिरवीन ॥ स्वामिद्रोही म्हणोनियां ॥९१॥
सीताशुद्धि नोहे म्हणोन ॥ जो कोणी येईल परतोन ॥ त्यासी मी स्वहस्तें दंडीन ॥ छेदीन कर चरण तयांचे ॥९२॥
तंव द्वीपद्वीपींचे वानर ॥ गिरिकंदरीं जे राहणार ॥ मेरुपाठारवासी समग्र ॥ देत भुभुःकार पातले ॥९३॥
नाद न मायेचि गगनीं ॥ चालतां दणाणी मंगळजननी ॥ शेष कूर्म दचकले मनीं ॥ भुभुःकारध्वनि ऐकोनियां ॥९४॥
एक हरि पर्वत उचलोनि ॥ कंदुकवत् धाडी गगनीं ॥ एक वरचेवर झेलोनि ॥ भिकावित दुसरीकडे ॥९५॥
एक महावृक्ष उपडोनि बळें ॥ झोडोनियां भक्षिती फळें ॥ पृथ्वी अंबर समग्र भरलें ॥ रीसवानरीं तेधवां ॥९६॥
एक गगनपंथें उडिया घेती ॥ खालीं पाडूं पाहती गभस्ती ॥ खुंटली समीराची गति ॥ वाट न फुटे चालावया ॥९७॥
एक पश्र्चिमसमुद्रा धांवती ॥ तों अस्तासी गेला दिनपति ॥ एक समुद्रीं पुच्छें बुडविती ॥ ओढून काढिती जलचरें ॥९८॥
दशलक्ष योनि उदकांत ॥ नाना जातींचे जीव बहुत ॥ आणोनि राघवासी दावित ॥ चतुःसमुद्र धुंडोनियां ॥९९॥
नानाजातींचे वानर ॥ बहुत रंग बहुत विकार ॥ एक उभे राघवासमोर ॥ वांकुल्या दाविती विनोदें ॥१००॥

अति विशाळ धरोनि द्रुम ॥ आनंदें नाचती प्लवंगम ॥ एक गायन करिती सप्रेम ॥ डुल्लती राम ऐकोनियां ॥१॥
राग उपराग भार्येसहित ॥ मूर्च्छना शरीर कंपित ॥ सप्त ताल अति संगीत ॥ गीत प्रबंध खंडरचना ॥२॥
गद्यपद्यछंदगति ॥ ऐकतां तटस्थ होय गभस्ति ॥ ठायींच्या ठायीं विरती ॥ गायन ऐकतां तयांचें ॥३॥
असो यावरी मित्रपुत्र ॥ मित्रकुठमंडणातें समग्र ॥ दावीतसे सकळ भार ॥ पृथ्वी अंबर भरलें तें ॥४॥
जैसे कां जलतरंग ॥ सागरीं तळपती सवेग ॥ परि तो पाहतांचि सांग ॥ सागरचि एकला ॥५॥
तैसा ब्रह्मानंद सागर रघुवीर ॥ तेथींच्या लहरी ते वानर ॥ असो पृथ्वी दिशा अंबर ॥ वानरमय दिसतसे ॥६॥
ते रघुनाथाची मनोवृत्ति ॥ सकळ सुर अवतरले क्षितीं ॥ वानवेषें अपार शक्ति ॥ उचलूं भाविती भूगोल ॥७॥
नळ केला दळाधीश ॥ अठरा पद्में वानर विशेष ॥ बहात्तर कोटी रीस ॥ छप्पन्न कोटी गोलांगूळ ॥८॥
सीतावल्लभ म्हणे किष्किंधानाथा ॥ मज वाटते बहुत चिंता ॥ अन्न वस्त्रें या समस्तां ॥ कोठून आतां पुरवावीं ॥९॥
अर्कज म्हणे जनकजावरा ॥ यांसी फळ मूळ कंद आहारा ॥ न मिळे तरी भक्षिती समीरा ॥ तेणेंचि तृप्त होती हे ॥११०॥
अंबर तरी हे दिगंबर ॥ शस्त्रें पर्वत किंवा तरुवर ॥ ऐकतां मंगळभगिनीचा वर ॥ परम आश्र्चर्य मानित ॥११॥
सुग्रीव म्हणे राजीवनेत्रा ॥ हा खेळ तुझा कोमलगात्रा ॥ जाणोनि पुससी विचारा ॥ पदवी वानरां देऊनियां ॥१२॥
असो यावरी ताराकांत ॥ सकळ वानरां आज्ञापित ॥ त्रिभुवन धुंडोनि समस्त ॥ सीताशुद्धि करावी ॥१३॥
महीतळ अतळ वितळ ॥ सुतळ तळातळ महातळ ॥ सातवें तें रसातळ ॥ शोधावया धाडिले ॥१४॥
विलोकावे चतुर्दश लोक ॥ वैकुंठकैलासादि सकळिक ॥ धुंडोनियां आवश्यक ॥ सीताशोध करावा ॥१५॥
कैलासादि ब्रह्मलोक ॥ इंद्रचंद्रसूर्यलोक ॥ जनलोक तपोलोक ॥ सकळ शोधूं धाडिले ॥१६॥
वरुणलोक भूलोक ॥ यमलोक पितृलोक ॥ मृत्युलोकासी विशेष देख ॥ लोक चतुर्दश धुंडावे ॥१७॥
भरतखंड रमणकखंड ॥ हरित सत्य विधिविशेष प्रचंड ॥ केतु सुवर्ण द्राक्ष वितंड ॥ हरिखंड नववें पैं ॥१८॥
जंबुद्वीप शाकद्वीप ॥ शाल्मली क्रौंच द्राक्षाद्वीप ॥ अंग वंगादि दक्षद्वीप ॥ छप्पन्न देश शोधिले ॥१९॥
वनें उपवनें पर्वत ॥ ऋषिआश्रम विवरें मठ बहुत ॥ भक्तांची स्थानें बहुत ॥ शोधावया धाडिले ॥१२०॥
तीर्थें क्षेत्रें शोधिलीं नाना ॥ परी रामांगना कोठें दिसेना ॥ सीतेचें स्वरूप समजेना ॥ कष्टती हे बहुसाल ॥२१॥
सीता रामाची ज्ञानशक्ति ॥ तिची कैसी आह स्थिती ॥ न पुसतां व्यर्थचि भ्रमती ॥ अहंमती भुलोनियां ॥२२॥
सद्रुरूसी न रिघतां शरण ॥ कदापि नोहे आत्मज्ञान ॥ नवनीत मंथनावांचून ॥ हाता न चढे सर्वथा ॥२३॥
व्यर्थ हिंडतां भागले वानर ॥ दृष्टी न पडे सीता सुंदर ॥ परतोनि येती समग्र ॥ अधोवदन लज्जित ॥२४॥
मग तयांचें समाधान ॥ स्वयें करीत रघुनंदन ॥ दक्षिणादिशेसी कोण कोण ॥ गेले तेंचि ऐका हो ॥२५॥
मुख्य अंगद वाळिसुत ॥ नळ नीळ ऋषभ जांबुवंत ॥ पांचवा तो हनुमंत ॥ जो उमाकांत अवतरला ॥२६॥
आणिक एक शत वानरगण ॥ रघुपतीची आज्ञा घेऊन ॥ आक्रमिलें सकळीं गगन ॥ वायुवेगें करोनियां ॥२७॥
तंव तो कृतांतासी शिक्षा करणार ॥ महाराज जो रुद्रावतार ॥ अंगदासी म्हणे क्षण एक स्थिर ॥ तुम्हीं रहावें समस्तीं ॥२८॥
कांहीं आठवलें मानसीं ॥ पुसोन येतों रघुपतीसी ॥ ऐसें बोलोनि तयांसी ॥ वायुसुत परतला ॥२९॥
एकाएकीं येऊन ॥ दृढ धरिले रामचरण ॥ उभा ठाकला कर जोडून ॥ जैसा सुपर्ण विष्णुजवळी ॥१३०॥
तो बोले मंजुळ उत्तरीं ॥ म्हणे भार्गवजिता अवधारीं ॥ सीताशुद्धि वानरीं ॥ कैशी करावी तें सांगा ॥३१॥
सीतेचें स्वरूप कैसें स्वामी ॥ केवीं ओळखिजे प्लवंगमीं ॥ रूपरेखा कैशी आम्हीं ॥ जाणावी ती राघवा ॥३२॥
ऐसे हनुमंत बोलतां ॥ संतोषला कमलोद्भवपिता ॥ म्हणे तुझिया बुद्धीस तुळितां ॥ वाचस्पति हळुवट ॥३३॥
पुसिलें सीतास्वरूप ॥ तरी तें जाण माझेंचि रूप ॥ जैसी प्रभा आणि दीप ॥ एकरूप दोहींचें ॥३४॥
जैसी कनक आणि कांति ॥ कीं रजत आणि त्याची दीप्ति ॥ तैसी जाण सीता सती ॥ स्वरूप माझें अभेद ॥३५॥
सीतेच्या अंगींचा सुवास ॥ मृगमदाहूनि विशेष ॥ अर्धयोजन आसपास ॥ घ्राणदेवीसी संघटे ॥३६॥
खूण ऐकावी मारुति ॥ मुखीं कर्पूराची वसे दीप्ति ॥ माझें स्मरण अहोरातीं ॥ सीता सती करीतसे ॥३७॥
द्वादश हस्तप्रमाण साचार ॥ सीतेसमीप पाषाण तरुवर ॥ त्यांसी माझें स्मरण निरंतर ॥ खुण साचार ओळखें ॥३८॥
अंतरखूण सांग सीतेतें ॥ कैकयीगृहीं म्यां स्वहस्तें ॥ वल्कलें नेसविलीं तियेतें ॥ वनवासासी निघतां पैं ॥३९॥
मग विनवी समीरात्मज ॥ ऐसी खूण द्यावी मज ॥ जेणें अवनिजा मानी सहज ॥ दास मी तुमचा सत्य कीं ॥१४०॥
ऐकोनि मारुतीचें वचन ॥ तोषलें रघुनाथाचें मन ॥ धन्य धन्य म्हणवून ॥ शब्दरत्नें गौरविला ॥४१॥
धन्य तो अंजनी सज्ञान ॥ ऐसें प्रसवली निधान ॥ ज्याच्या प्रतापाखालीं संपूर्ण ॥ ब्रह्मांड ठेंगणें होय कीं ॥४२॥
प्रेम नावरे रघुनाथा ॥ हृदयीं आलिंगिलें हनुमंता ॥ वरदहस्त ठेवोन माथां ॥ करीं मुद्रिका घातली ॥४३॥
खूण दिघल अवतारमुद्रिका ॥ जेणें मानी जनककन्यका ॥ मग साष्टांगें रघुनायका ॥ हनुमंत वंदी ते काळीं ॥४४॥
पुढती विलोकी रामवदन ॥ हृदयीं रेंखिलें तैसेंचि ध्यान ॥ श्रीराम सद्रद होऊन ॥ बोलता जाहला ते काळीं ॥४५॥
कधीं येशील परतोन ॥ मग म्हणे वायुनंदन ॥ एक मास सरतां पूर्ण ॥ सीतादर्शन घेऊनि येतों ॥४६॥
ऐसें बोलून हनुमंत ॥ यशस्वी पूर्ण अयोध्यानाथ ॥ आनंदें गर्जोनि अकस्मात ॥ गगनपंथें उडाला ॥४७॥
जैसा योगभ्रष्ट जन्म पावत ॥ मागुतीं स्वरूपीं ऐक्य होत ॥ तैसे कपि वाट पाहात ॥ वायुसुत आला तेथें ॥४८॥
रामस्मरणें अवघे गर्जती ॥ सपक्ष नग जैसे उडती ॥ तैसे निराळमार्गे सर्व जाती ॥ अगस्तिदिशा लक्षोनी ॥४९॥
चपळ पाणिद्वयचरण ॥ गगनीं झेंपावती हरिगण ॥ यशस्वी अयोध्याप्रभु म्हणोन ॥ वारंवार गर्जती ॥१५०॥

अंतरिक्षीं जाती कपिगण ॥ तों देखिलें शापदग्ध वन ॥ वानरांचीं किरणें अडखळून ॥ मुरकुंडी वळोन पडियेले ॥५१॥
मागुती उड्डाण घेऊं जाती ॥ समस्तांच्या आकर्षिल्या शक्ती ॥ एकाकडे एक पाहती ॥ तटस्थ मारुति जाहला ॥५२॥
ऐसें काय कारण व्हावयासी ॥ तरी तेथें पूर्वीं दंडक ऋषी ॥ महातापसी तेजोराशी ॥ पुत्र त्यासी एक होता ॥५३॥
अष्टादश वरुषांचा सुत ॥ वनीं क्रीडतां अकस्मात ॥ वनदेवता अद्भुत ॥ भयानक धांविन्नली ॥५४॥
तिनें भक्षिला ऋषिनंदन ॥ दंडक तें जाणोन ॥ शापिलें तेव्हां तें कानन ॥ महाक्रोधेंकरूनियां ॥५५॥
जो या वनीं संचरेल पाणी ॥ तो मरण पावेल तेचि क्षणीं ॥ कपी सावध रामस्मरणीं ॥ म्हणोनि प्राण वांचले ॥५६॥
असो तो दंडकाचा नंदन ॥ विशाळ ब्रह्मराक्षस होऊन ॥ नित्य भक्षी जीव मारून ॥ द्वादशयोजनें भोंवते ॥५७॥
तेणें देखोन वानर ॥ मुख पसरोनि भयंकर ॥ भक्षावया आला सत्वर ॥ कपिवीर गजबजिले ॥५८॥
ऐसें देखोन वालिकुमर ॥ परमप्रतापी प्रचंडवीर ॥ निःशंक धांवोनि सत्वर ॥ राक्षस चरणीं धरियेला ॥५९॥
गगनीं गरगरां भोवंडिला ॥ उर्वीवरी आपटिला ॥ शरीर चूर जाहलें ते वेळां ॥ मृन्मयघटशकलासारिखें ॥१६०॥
ऐसा तो दंडकाचा पुत्र ॥ पावला तात्काळ पूर्वशरीर ॥ मग तेणें आपुला समाचार ॥ वानरांसी सांगितला ॥६१॥
वंदोनियां वानरगणा ॥ तात्काळ गेला पितृदर्शना ॥ पुढें रामदूतां पंथ सुचेना ॥ दिशा समजेना कोणती ॥६२॥
वृक्ष फळ ना जळ ॥ दग्ध वन दिसे सकळ ॥ क्षुधेतृषेनें सकळ ॥ वानर तेव्हां चडफडती ॥६३॥
ओंढवलें परम कठिण ॥ शोधिती शुष्क विपिन ॥ तंव एका विवरांतून ॥ पक्षीफळें आणिती ॥६४॥
त्या विवरद्वारीं येऊन ॥ थोकले तेव्हां वानरगण ॥ एक योजन लंबायमान ॥ तमेंकरून पूर्ण तें ॥६५॥
पुढें जाहला वायुकुमर ॥ मागें येती समस्त वानर ॥ जैसी संतांची कांस मुमुक्षु नर ॥ धरिती आत्मसाधनासी ॥६६॥
कीं वेदाध्ययनेंकरून ॥ वर्तती जैसे विद्वज्जन ॥ कीं खड्रधारें तीर्थस्नान ॥ करूनि स्वर्गस्थ होती तैसे ॥६७॥
हनुमंताच्या आधारें समस्त ॥ तैसे वानर विराजत ॥ परी कासाविस जाहले तेथ ॥ मूर्च्छा येऊनि पडती पै ॥६८॥
श्वासोच्छ्वास कोंडोन ॥ आकर्षिले सर्वांचे प्राण ॥ मग हनुमंतें पुच्छेंकरून ॥ सकळ बांधोन उचलिले ॥६९॥
योजन एक क्रमोनि विवर ॥ मारुति गेला सत्वर ॥ पुढें प्रकाश देखिला अपार ॥ वन सुंदर सफळ तें ॥१७०॥
पुष्पफळभारें द्रुम ॥ वाढिन्नले भेदीत व्योम ॥ त्या वृक्षांवरी प्लंगम ॥ चढावया शकती ना ॥७१॥
शरीर जाहले परम क्षीण ॥ यालागीं ऊर्ध्व न होती किरण ॥ तों सुप्रभा खेचरी येऊन ॥ उभी ठाकली तेधवां ॥७२॥
तियेप्रति पुसे वायुनंदन ॥ हेममय नगर पूर्ण ॥ फळोदक अमृतासमान ॥ कवणें हें स्थान निर्मिलें ॥७३॥
सुप्रभा सांगे पूर्ववृत्तांत ॥ ये स्थळीं होता मय दैत्य ॥ तेणें करून अद्भुत ॥ विष्णुसुत प्रसन्न केला ॥७४॥
त्याकारणें हें स्थान ॥ विरिंचीनें निर्मिलें येऊन ॥ त्यासी दिधलें वरदान ॥ विवरामाजी चिरंजीव तूं ॥७५॥
विवराबाहेर येतां जाण ॥ तात्काळचि पावसी मरण ॥ तो नानाकौटिल्यविंदान ॥ मंत्रहवन जाणतसे ॥७६॥
बहुत तप आचरोन ॥ दैत्यांचें इच्छी कल्याण ॥ मग इंद्रें विधीस प्रार्थून ॥ हेमा नारी निर्मिली ॥७७॥
स्वरूपें लावण्यें आगळी ॥ त्या विवरांत प्रवेशली ॥ मयदैत्यें देखिली ते वेळीं ॥ देखोनि तियेसी भूलला ॥७८॥
म्हणे मज तू वरी वो सुंदरी ॥ ते म्हणे चाल विवराबाहेरी ॥ मरण विसरोन दुराचारी ॥ उर्वीवरी पातला ॥७९॥
तों इंद्रें घालोनि वज्रप्रहार ॥ तेथेंचि मारिला मयासुर ॥ मग हेमेलागीं नगर ॥ ब्रह्मदेवें दिधलें ॥१८०॥
मग कित्येक काळ क्रमोनि देखा ॥ हेमा गेली सत्यलोका ॥ मी तिची परिचारिका ॥ वननगर रक्षीतसें ॥८१॥
देवां दुर्गम हें स्थान ॥ मज हेमा बोलिली वचन ॥ येथें येतील वानरगण ॥ तुज उद्धरोनि जाती ते ॥८२॥
हनुमंत सांगे पूर्ववृत्तांत ॥ सीताशुद्धीसी जातों समस्त ॥ क्षुधाक्रांत तृषाक्रांत ॥ या विवरांत प्रवेशलों ॥८३॥
मग तिनें घातला नमस्कार ॥ फळें पुष्पें आणोनि सत्वर ॥ वानरांसहित वायुकुमर ॥ षोडशोपचारीं पूजिला ॥८४॥
फळें उदक सेवून ॥ तृप्त जाहले वानरगण ॥ मग परतले तेथून ॥ परी विवरद्वार न सांपडे ॥८५॥
मग सुप्रभेसी म्हणे हनुमंत ॥ माते आम्हां दावीं शुद्ध पंथ ॥ तेव्हां ते खेचरी बोलत ॥ नेत्र समस्त झांका तुम्ही ॥८६॥
ऐसें ऐकतांचि वचन ॥ समस्तीं विवरीं झांकिले नयन ॥ सुमुहूर्ती एक मंत्र जपोन ॥ काय तेव्हां बोलिली ॥८७॥
मग म्हणे उघडा नेत्र ॥ तों समुद्रतीरीं उभे वानर ॥ सुप्रभा न दिसे साचार ॥ नवल थोर वर्तलें ॥८८॥
कपी आश्र्चर्य करिती ते क्षणीं ॥ जैसे संसारदुःखें वेष्टिले प्राणी ॥ त्यांसी निजज्ञान उपदेशूनि ॥ सद्रुरु काढी बाहेर ॥८९॥
कीं जळते घरींहून काढिलें ॥ कीं पूरीं बुडतां वांचविलें ॥ कीं शिर छेदितां सोडविलें ॥ तैसें केलें सुप्रभेनें ॥१९०॥
कृपाळु तो रविकुळभूषण ॥ तेणेंच ते दीधली धाडोन ॥ समुद्रतीरीं वानरगण ॥ ब्रह्मानंदें नाचती ॥९१॥
इकडे तें विवर त्यजूनि सुप्रभा ॥ किष्किंधेसी जाऊन सीतावल्लभा ॥ भेटली कौसल्यागर्भा ॥ दृष्टीभरोन न्याहाळित ॥९२॥
म्हणे ब्रह्मानंदा आत्मयारामा ॥ मज पावन करीं मेघश्यामा ॥ तीस ज्ञान सांगोन वदरिकाश्रमा ॥ राघवेंद्रें पाठविली ॥९३॥
काळांतरें बदरिकाश्रमीं ॥ देह ठेवोनि कैवल्यधामीं ॥ जैसा आर्द्रघट मिळे भूमीं ॥ तैसीच स्वरूपीं समरसली ॥९४॥
इकडे समुद्रतीरीं वानर ॥ चिंताक्रांत करिती विचार ॥ म्हणती शुद्धि न लागे अणुमात्र ॥ कैसा प्रकार करावा ॥९५॥
एक म्हणती परतोनि जावें ॥ काय रघुवीरांते सांगावें ॥ आमुचेनि हें कदा नोहे ॥ सीताशुद्धि म्हणोनियां ॥९६॥
तरी आतां द्यावे जी प्राण ॥ परी न जावें परतोन ॥ व्यर्थ वांचोन ॥ प्रेतवत संसारीं ॥९७॥
मग आणोन काष्ठभार ॥ ढीग रचिले पर्वताकार ॥ तात्काळचि वैश्र्वानर ॥ वानरवीरीं चेतविला ॥९८॥
तों जांबुवंत बोले वचन ॥ मीच आधीं सेवीन कृशान ॥ यावरी अंजनीगर्भरत्न ॥ ऋृक्षपतीप्रती बोले ॥९९॥
म्हणे जांबुवंता सर्वज्ञा ॥ मजप्रती द्यावी आधीं आज्ञा ॥ यावरी तो ऋृक्षराणा ॥ प्रत्युत्तर देतसे ॥२००॥

मी बहु वडील तुम्हांहून ॥ मज आधीं देइंजे हा मान ॥ मग बोले वायुनंदन ॥वडील आयुष्यें मी असे ॥१॥
जयाचे गांठीं आयुष्य फार ॥ तोचि वृद्ध म्हणावा साचार ॥ ज्याचें मरण जवळी निर्धार ॥ तोच धाकुटा बोलिजे ॥२॥
तुझें आयुष्य मागें सरलें ॥ माझें बहुत पुढें उरलें ॥ ज्याचे गांठीचें धन वेंचलें ॥ तरी भाग्यवंत नव्हे तो ॥३॥
असो मग जांबुवंताप्रती ॥ समस्त वानर विनविती ॥ श्रीराममुद्रांकित मारुति ॥ त्यासी आज्ञा देइंजे ॥४॥
मग हनुमंतें झांकून नेत्र ॥ हृदयीं आठविला कामांतकमित्र ॥ जो जीमूतवर्ण कोमलगात्र ॥ अति पवित्र नाम ज्याचें ॥५॥
स्मरण करूनि हनुमंत ॥ लोटला तेव्हां अग्निआंत ॥ उडीसरसा अग्नि शांत ॥ परम अद्भुत वर्तलें ॥६॥
वानर म्हणती कच्चें जाहलें ॥ काष्ठढीग पुढती रचिले ॥ आकाश कवळिलें ज्वाळें ॥ दिशा धूमें दाटल्या ॥७॥
सपक्ष नग येत अकस्मात ॥ तैसा लोटला हनुमंत ॥ तात्काळ जाहला अग्नि शांत ॥ न दिसे किंचित कोठें पैं ॥८॥
ऐसेंच केले तीन वेळ ॥ परी न मरे अंजनीबाळ ॥ आश्र्चर्य करिती कपी सकळ ॥ वर्णिती बळ मारुतीचें ॥९॥
कपी म्हणती हनुमंता ॥ आम्हांसी मरो दे तरी आतां ॥ येरू म्हणे सागरीं तत्वतां ॥ प्राण देऊं चला हो ॥२१०॥
तेथोन निघाले वानर ॥ तों समीप देखिला सरितेश्र्वर ॥ चिंताक्रांत वायुकुमर ॥ ध्यानस्थ बैसला एकीकडे ॥११॥
वरकड ते वानरगण ॥ चिंतातुर करिती शयन ॥ तों संपाती मुख पसरून ॥ भक्षावया पातला ॥१२॥
अरुणपुत्र तो पक्षी थोर ॥ जटायूचा ज्येष्ठ सहोदर ॥ मुख पसरोनि भयंकर ॥ वानरांसी भेडसावी ॥१३॥
जवळ देखोनि संपाती ॥ कपी एकमेकांसी बोलती ॥ जटायूसारिखा निश्र्चितीं ॥ दिसतसे द्विजराज हा ॥१४॥
म्हणती अनायासेंकरून ॥ आम्हांसी आलें जवळी मरण ॥ मग आठवून रघुनंदन ॥ नामस्मरणें गर्जती ॥१५॥
ज्याचें नाम घेतां संकटीं ॥ निर्विघ्न होय सकळ सृष्टी ॥ अपाय ते उपाय शेवटीं ॥ दुःख तें सुख होय ॥१६॥
असो नामघोषें कपी गर्जती ॥ तों पक्ष फुटले सपातीप्रती ॥ तेणें लोटांगण घातले क्षितीं ॥ जयजयकारेंकरूनियां ॥१७॥
म्हणे धन्य धन्य तुम्ही वानर ॥ केला माझा आजि उद्धार ॥ कोठें आहे रघुवीर ॥ माझा सहोदर तेथें असे ॥१८॥
बहुत दिवस जाहले ॥ परी त्याचा समाचार न कळे ॥ तों कपिवर बोलिले ॥ जटायु मारिला रावणें ॥१९॥
पितृव्य म्हणोनि रघुनाथ ॥ जटायूसी होता मानित ॥ त्याची उत्तरक्रिया समस्त ॥ राघवें केली निजांगें ॥२२०॥
जटायूचें सार्थक केलें ॥ संपातीनें आंग धरणीवरी टाकिलें ॥ म्हणे अहा ओखटें जाहलें ॥ दिशा शून्य बंधूविणें ॥२१॥
सूर्यमंडळ पहावयालागोनि ॥ दोघे गेलों होतो उडोनि ॥ तैं म्यां पक्षांखाली घालूनि ॥ जिवलग आपुला वांचविला ॥२२॥
माझे पक्ष दग्ध जाहले ते वेळीं ॥ मग म्यां भयें हांक फोडिली ॥ सूर्यरथीं अरुणें ऐकिली ॥ स्नेहेंकरूनि कळवळला ॥२३॥
मग सूर्यासी प्रार्थून ॥ वर दिधला मजलागून ॥ रामदूतांचें होतां दर्शन ॥ पक्ष संपूर्ण फुटतील ॥२४॥
जैसा पक्षहीन पर्वत ॥ तैसा पडिलों होतों येथ ॥ आजि पक्ष आले अकस्मात ॥ तुमच्या प्रतापें करूनियां ॥२५॥
हा चंद्रगिरि पर्वत ॥ ऐथें चंद्रनामा आहे महंत ॥ तो सद्रुरु माझा यथार्थ ॥ मज वेदांतज्ञान सांगे ॥२६॥
असो संपाती पुसे वानरातें ॥ कोठें जातां येणें पंथें ॥ कपी म्हणती सीताशुद्धीतें ॥ करूं जातों पक्षींद्रा ॥२७॥
संपाती मग बोलत ॥ पैल ते लंका दिसत ॥ सीता सती अशोकवनांत ॥ बैसली असे ध्यानस्थ ॥२८॥
तरी तुम्हीं समस्त वानरीं ॥ बैसावें माझिये पृष्ठीवरी ॥ नेऊन घालीन पैलपारीं ॥ लंकेमाजी येधवां ॥२९॥
अथवा एकोत्तरशत माझे सुत ॥ पृथक् पृथक् बैसा समस्त ॥ मग म्हणे जांबुवंत ॥ मार्गचि सांग आम्हांतें ॥२३०॥
संपाती बोले वचन ॥ ऐलतीरीं मलयागिरिचंदन ॥ त्याची शाखा शतयोजन ॥ लंकेमाजी प्रवेशली ॥३१॥
परी तेथें कृष्णसर्प असती ॥ तेथें तुमची न चले गती ॥ शतयोजन सरितापती ॥ लंकेसी परिघ आडवा ॥३२॥
नमस्कार करोनि वानरांसी ॥ संपाती गेला निजाश्रमासी ॥ मग कपी बैसले विचारासी ॥ जांबुवंतासहित पैं ॥३३॥
सागराचें जीवन ॥ रुंद असे शतयोजन ॥ उडावया सामर्थ्य पूर्ण ॥ कोणा किती सांगा तें ॥३४॥
परस्परें ते वानर ॥ करिती उडावयाचा विचार ॥ शतयोजनें समुद्र ॥ उडवे कोणासी एकदां ॥३५॥
जांबुवंत म्हणे मी जाईन ॥ परी भागले माझे चरण ॥ मी आणि वैद्य सुषेण ॥ दोघेजण श्रमलों बहु ॥३६॥
बळीचिये अद्भुत ॥ त्रिविक्रम जाहला वैकुंठनाथ ॥ सात प्रदक्षिणा एके दिवसांत ॥ केल्या आम्ही साक्षेपें ॥३७॥
तेणें भागले बहुत चरण ॥ त्याहीवरी वृद्धपण ॥ आणिक एकदां मेरूवरून ॥ उडी घातली म्यां तळवटीं ॥३८॥
तेव्हां सूर्यरथींचें चक्र ॥ मांडीस झगटलें जेवीं वज्र ॥ तेणें व्यथा अहोरात्र ॥ वृद्धपणीं जाचीतसे ॥३९॥
याकरितां नवजाय उड्डाण ॥ मग बोले वालिनंदन ॥ मी तेथें जाईन उडोन ॥ परी बाळ नेणतें ॥२४०॥
वानर म्हणती करावें काय ॥ या पैलतीरा कोण जाय ॥ जांबुवंत म्हणे वायुतनय ॥ याचे पाय धरा आतां ॥४१॥
तंव तो अंजनीचा नंदन ॥ करीत बैसला रामध्यान ॥ वानर घालिती लोटांगण ॥ करिती स्तवन मारुतीचें ॥४२॥
वानर म्हणती हनुमंतासी ॥ तूं सांग सखया किती उडसी ॥ हंसें आलें मारुतीसी ॥ काय तयांसी बोलिला ॥४३॥
अंजनी जैं मज प्रसवली ॥ बाळभूक बहु लागली । तैं लक्ष योजनें उडी घातली ॥ गभस्तीवरी अकस्मात ॥४४॥
ऐसें वचन ऐकिलें ॥ वानर चरणीं लागले ॥ राघवें बळ संपूर्ण ओळखिलें ॥ तरीच मुद्रा दीधली ॥४५॥
तरी आपुलें कार्य आतां ॥ सत्वर साधीं हनुमंता ॥ ऐसें म्हणतां कपिनाथा ॥ स्फुरण आलें ते काळीं ॥४६॥
हनुमंत म्हणे वानरासी ॥ तुम्हीं पर्वत धरा पोटेंसी ॥ माझिया अंगवातें घंघाटेंसीं ॥ समुद्रांत पडाल कीं ॥४७॥
झाडें खोडें वानर कवळित ॥ महेंद्रपर्वतीं चढे हनुमंत ॥ जांबुवंतादि वानर समस्त ॥ कौतुक पाहती मारुतीचें ॥४८॥
अघवे जे कां वानर ॥ त्यांसी पुसोन वायुकुमर ॥ आधीं पुच्छाचा फडत्कार ॥ गाजविला हनुमंतें ॥४९॥
हृदयीं केलें रामस्मरण ॥ शक्तिदाता तूं म्हणोन ॥ अहंकर्ता भाव गाळून ॥ मन निमग्न रघुनाथीं ॥२५०॥
तो परात्पर राजहंस ॥ जो रविकुळदिनेश ॥ ब्रह्मानंद पुराणपुरुष ॥ हृदयीं आठविला मारुतीनें ॥५१॥
रामविजय ग्रंथ वरिष्ठ ॥ षड्रसान्नांचें भरलें ताट ॥ ज्यांसी श्रवणाची क्षुधा उत्कट ॥ ते जेवोत आदरें ॥५२॥
किष्किंधाकांड येथें संपलें ॥ पुढें सुंदरकांड आरंभिलें ॥ ग्रंथाचें पूर्वार्ध जाहलें ॥ उत्तरार्ध परिसा आतां ॥५३॥
ब्रह्मानंदा जानकीजीवना ॥ श्रीधरवरदा जगद्भूषणा ॥ अज अजिता अव्यय निर्गुणा ॥ अक्षय अभंग अव्यया ॥५४॥
स्वति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मिकीनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ अष्टादशाध्याय गोड हा ॥२५५॥

॥श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु॥  

 


No comments:

Post a Comment