Sunday, December 25, 2011

RamVijay Adhyay - 40

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

जयजय निगमागमतनू अखिला ॥ वृंदारकवंद्या अजित अमला ॥ असुरसंहारणा परम मंगला ॥ अचळ अढळ अविनाशा ॥१॥
मन्मथवारणविदारक मृगेंद्रा ॥ क्रोधजलदविदारक समीरा ॥ मदतमनाशक भास्करा ॥ परात्परा परमानंदा ॥२॥
मत्सरतृणदाहका वैश्वानरा ॥ मायाचक्रचाळका विश्वंभरा ॥ दंभनगच्छेदका वज्रधरा ॥ भूमिजावरा भयनाशना ॥३॥
अहंद्विपंचमुखदर्पहरणा ॥ मोहघटश्रोत्रसंहारणा ॥ शोकशक्रजितगर्वविदारणा ॥ ऊर्मिलारमणाग्रजा श्रीरामा ॥४॥
तंव कृपेच्या समस्त ॥ संपत आला रामविजय ग्रंथ ॥ शेवटींचा अध्याय रसभरित ॥ वदवीं कैसा असे तो ॥५॥
गतकथाध्यायीं ॥ निरूपण ॥ संपले लहुकुशाख्यान ॥ जानकी आणूनियां यज्ञ ॥ अश्वमेघ संपविला ॥६॥
याउपरी एके दिनीं ॥ सिंहासनी बैसला कोदंडपाणी ॥ बंधुवर्ग कर जोडूनी ॥ स्वस्थानीं उभे राहिले ॥७॥
तों कृतांतभगिनीतीरवासी ॥ द्विज प्रजा पातल्या वेगेंसी ॥ जैसे सुर क्षीरसागरासी ॥ जाती गाऱ्हाणें सांगावया ॥८॥
तंव भक्तजनसभाभूषित ॥ मुक्तमंडपीं बैसला रघुनाथ ॥ जो कोटि कंदर्पांचा तात ॥ दीनबंधु गुणसिंधु ॥९॥
दूत जाणविती रघुराया ॥ प्रजानन आले भेटावया ॥ येऊं द्या म्हणे लवलाह्या ॥ कोणी पीडिल्या माझ्या प्रजा ॥१०॥
तों मुक्तमंडपासमोर ॥ पातले तेंव्हा प्रजांचे भार ॥ करूनियां जयजयकार ॥ नमस्कार सर्व घालिती ॥११॥
उभे ठाकले समोर ॥ भ्रूसंकेतें विचारी जगदोद्धार ॥ म्हणती यमुनातीरीं क्रूर ॥ महालवणासुर माजला ॥१२॥
महापातकी अत्यंत क्रूर ॥ मुरदैत्याचा कुमर ॥ भानुजेचें पैलतीर ॥ तेथें असुर असे सदा ॥१३॥
प्रजा गाई आणि ब्राह्मण ॥ चांडाळ भक्षितो नित्य मारून ॥ रघुराया तयासी वधून ॥ समस्त जन सुखी करी ॥१४॥
ऐसें ऐकतां कोदंडपाणी ॥ कोदंड आणवी तयेक्षणीं ॥ आरक्तता उदेली नयनी ॥ क्रोध मनीं न सांवरे ॥१५॥
तों शत्रुघ्न पुढें येऊनी ॥ मस्तक ठेविलें श्रीरामचरणीं ॥ म्हणे मज आज्ञा दीजे ये क्षणीं ॥ लवणासुर वधावया ॥१६॥
घेऊनियां चतुरंग दळ । वेगें जाय म्हणे तमालनीळ ॥ लवणासुर वधोनि तत्काळ ॥ प्रजा सुखें राखिजे ॥१७॥
मंत्रशक्ति दिव्य बाण ॥ बंधूस देत रघुनंदन ॥ सीतावधाचे चरण वंदोन ॥ वीर शत्रुघ्न चालिला ॥१८॥
संग्रामसंकेतभेरी ॥ सेवकीं ठोकिल्या ते अवसरीं ॥ तीन अक्षौहिणी दळ बाहेरी ॥ परम वेगें निघालें ॥१९॥
नौका आणूनिया अपार ॥ भानुकन्येचें लंघिले तीर ॥ तो चहूंकडून अपार ॥ ऋषीश्वर पातले ॥२०॥
ऋषी म्हणत हा दैत्य दारुण ॥ पूर्वीं मांधात राजयासी मरण ॥ हस्तें याच्या आलें जाण ॥ बळेंकरून नाटोपे ॥२१॥
शत्रुघ्न बोले तेव्हां वचन ॥ याचें सांगा कैसे मरण ॥ ऋषी म्हणती उमारमण ॥ येणें पूर्वीं आराधिला ॥२२॥
शंकरें स्वहातींचा दिधला शूळ ॥ तेणें बळें संहारीं विश्व सकळ ॥ तरी तो शूळ घेतां तत्काळ ॥ मरण त्यास तेणेंचि पैं ॥२३॥
तो शूळ ठेवूनियां मंदिरीं ॥ आहारालागी हिंडे दिवस रात्रीं ॥ श्वापदें गोब्राह्मण मारी ॥ शोधूनियां साक्षेपें ॥२४॥
तरी तो काळ साधून ॥ आधीं घ्यावें तयाचें दर्शन ॥ शूळ हातीं चढतांचि पूर्ण ॥ बळ क्षीण नव्हे तयाचें ॥२५॥
त्याचिया भयेंकरून ॥ ओस पडिलें मथुरापट्टण ॥ तें शत्रुघ्नें ओलांडून ॥ काळ साधून चालिला ॥२६॥
लवणासुर नसतां सदनीं ॥ मंदिर तयाचे पाहे उघडोनी ॥ तो शुळ ठेविलासे पूजोनी ॥ उचली तेक्षणीं दाशरथी ॥२७॥
शूळ घेऊनि कैकयीनंदन ॥ दळभारेंसी सिद्ध पूर्ण ॥ उभा ठाकला तों लवण ॥ वनींहून परतला ॥२८॥
गाई ब्राह्मण मारून ॥ प्रेतभार मस्तकीं घेऊन ॥ तों वेष्टिलें देखे सदन ॥ मानववीरदळेंसी ॥२९॥
नयनीं देखतां मानवभार ॥ परम आनंदला लवणासुर ॥ म्हणे ईश्वर मज आहार सदाप्रति पाठविला ॥३०॥
कृतावंत हाक फोडूनी ॥ लवणें शत्रुघ्नासी देखोनी ॥ परम क्रोधें आला धांवूनी ॥ तों शूळ हिरोनी नेलासे ॥३१॥
मग क्रोधावला दारुण ॥ म्हणे तूं मनुष्याचा नंदन ॥ तुज मारून अयोध्यापट्टण ॥ क्षणमात्रें घेईन आतां ॥३२॥
माझा मातुल रावण ॥ रामें मारिला कपटेंकरून ॥ परी त्या राघवासी वधून ॥ सीता आणीन बळेंचि ॥३३॥
तुम्हां चौघांस मारून ॥ मातुळाचा सूड घेईन ॥ आजि प्रथम अवदान ॥ तुझें घेईन शत्रुघ्ना ॥३४॥
लवणासी म्हणे शत्रुघ्न ॥ मशका तुज येथेंच वधीन ॥ जैसा मारावया मत्कुण ॥ उशीर कांही न लागेचि ॥३५॥
वृक्ष उपटोनि सत्वर ॥ वेगीं धांवला लवणासुर ॥ तों शत्रुघ्नें सोडिला शर ॥ चापावरी लावूनियां ॥३६॥
तेणें तो वृक्ष छेदिला ॥ असुरें पर्वत भिरकाविला ॥ तोही कैकयीनंदनें फोडिला ॥ क्षणमात्र न लागतां ॥३७॥
कोट्यानकोटी बाण ॥ शत्रुघ्नें मोकलिले दारुण ॥ परी तो न मानीच लवण ॥ बाण तृणवत तयासी ॥३८॥
जैसा कां वर्षे घन ॥ तैसे टाकी वृक्ष पाषाण ॥ ते बाण वरी फोडोन ॥ वीर शत्रुघ्न टाकीतसे ॥३९॥
मग शत्रुघ्नें तये वेळां ॥ बाण विचारून काढिला ॥ जो कमळासनें निर्मिला ॥ मधुकैटभवधालागीं ॥४०॥
विधीनें तो बाण तत्वतां ॥ रघुपतीसी दिधला होता ॥ तो लवणवधासी निघतां ॥ रामें दिधला शत्रुघ्ना ॥४१॥
तो बाण शत्रुघ्नें योजिला ॥ जैसी प्रकटली प्रळयचपळा ॥ तैसा चापापासोनि सुटला ॥ वेगें आला लवणावरी ॥४२॥
तेणें डळमळिलें भूमंडळ ॥ देवांस विमानीं सुटला पळ ॥ वज्रें चूर्ण होय अचळ ॥ तैसा हृदयीं भेदला ॥४३॥
मेरूवरूनि पडे ऐरावत ॥ तैसा जाहला असुरदेहपात ॥ प्राण निघोनि गेला त्वरित ॥ पडिले प्रेत धरणीवरी ॥४४॥
विजयी जाहला शत्रुघ्न ॥ सुमनें वर्षती सुरगण ॥ तत्काळ मथुरापट्टण ॥ प्रजा नेऊन भरियेले ॥४५॥
जैसें अयोध्यापुर सुंदर ॥ तैसेंच मथुरा जाण नगर ॥ देश भरला समग्र ॥ दुःख दरिद्र पळालें ॥४६॥
जय पावला शत्रुघ्न ॥ कळलें रघुपतीस वर्तमान ॥ छत्र चामरादि संपूर्ण ॥ राजचिन्हें पाठविली ॥४७॥
शत्रुघ्नावरी धरून छत्र ॥ केला मथुरेचा नृपवर ॥ समुद्रापर्यंत समग्र ॥ देश तयासी दीधला ॥४८॥
तों अयोध्येमाजी ते वेळें ॥ एक नवल परम वर्तले ॥ एकादश सहस्र वर्षे केले ॥ अयोध्येचें राज्य श्रीरामें ॥४९॥
रामराज्यामाजी मृत्य ॥ अकाळीं नसेच सत्य ॥ तंव तेथे एक ब्राह्मणसुत ॥ मरण अकस्मात पावला ॥५०॥

झालें त्याचे व्रतबंधन ॥ तों सवेंच पावला मरण ॥ तंव पित्यानें उचलोन ॥ राजद्वारा आणिला ॥५१॥
राघवास म्हणे ब्राह्मण ॥ त्वां काय केलें दोषाचरण ॥ अकाळीं बाळ पावला मरण ॥ करी प्रयत्न लवकरी ॥५२॥
परम चिंताक्रांत रघुनाथ ॥ तंव पातला कमलोद्भवसुत ॥ सीताकांतें वृत्तांत ॥ नारदासी सांगितला ॥५३॥
नारद म्हणे जानकीपती ॥ कोणी तप करितो शूद्रयाती ॥ त्या पापेंकरूनि निश्चितीं ॥ ऋृषिकुमर निमाला ॥५४॥
तप करणें हा ब्राह्मणांचा धर्म ॥ इतरांसी तो सहजचि अधर्म ॥ शूद्र तप आचरतां परम ॥ अकाळीं मरण होय पैं ॥५५॥
ऐसें बोलतां ब्रह्मनंदन ॥ राम चिंती पुष्पकविमान ॥ तें तत्काळ आलें धांवोन ॥ राघवें बाहिलें म्हणोनियां ॥५६॥
प्रधान सेनेसहित तत्काळ ॥ वरी आरूढे तमालनीळ ॥ शोधूं लागला पृथ्वीमंडळ ॥ गुहा अचळ कठीण स्थानें ॥५७॥
जो जो तपस्वी दृष्टी दिसे ॥ तयास कोणी जाती राघव पुसे ॥ तंव ते बोलती त्याचिसरसे ॥ श्रेष्ठवर्ण ब्राह्मण ॥५८॥
तयांसी राघव नमून ॥ करी मग तयांचे पूजन ॥ याचपरी उर्वीं संपूर्ण ॥ रघुनंदन शोधितसे ॥५९॥
दक्षिणपंथें शोधी श्रीराम ॥ तों लागले निबिड परम ॥ गिरीकंदरीं एक अधम ॥ किरात तप करीतसे ॥६०॥
तेणें आरंभिले धूम्रपान ॥ तयास पुसे जनकजारमण ॥ म्हणे कोण वेद कोण वर्ण ॥ तप किमर्थ आरंभिले ॥६१॥
तंव तो म्हणे मी किरात ॥ स्वर्गानिमित्त तप करितों येथ ॥ ऐकतां कोपला जानकीनाथ ॥ म्हणे हा आचरत परम अधर्म ॥६२॥
बाण तीक्ष्ण परम चपळ ॥ छेछिलें त्याचें कंठनाळ ॥ तो उद्धरूनि तत्काळ ॥ स्वर्गलोक पावला ॥६३॥
तो विमानीं बैसोन अमरनाथ ॥ रघुनाथासी येऊनि भेटत ॥ म्हणे बरा वधिला किरात ॥ पुरले मनोरथ देवांचे ॥६४॥
सीतावल्लभा रघुनंदना ॥ पुराणपुरुषा गुणसंपन्ना ॥ मज कांहीं सांगावी आज्ञा ॥ ते मी सिद्धी पाववीन ॥६५॥
रघुनाथ म्हणे ऋषिनंदन ॥ अयोध्येंत पावला मरण ॥ तयासी द्यावें जीवदान ॥ सहस्रनयन अवश्य म्हणे ॥६६॥
इंद्रआज्ञेंकरून ॥ परतला ऋषिपुत्राचा प्राण ॥ जैसा ग्रामासी जातां पंथीहून ॥ येत परतोन माघारा ॥६७॥
बहुतांचे सुत त्यावेगळे ॥ पूर्वीं होते जे निमाले ॥ तेही इंद्रें आणोनि दिधले ॥ तद्रूप तैसेच पूर्ववत ॥६८॥
उसनी जेवीं वस्तु नेत ॥ ती परतोनि तैसीच देत ॥ तैसे तयांचे त्यांसी सुत ॥ अमरेश्वरें दीधले ॥६९॥
असो इकडे अयोध्यापती ॥ अगस्तीच्या काननाप्रती ॥ जाता जाहला सहजगती ॥ वनें उपवनें विलोकित ॥७०॥
तों पुढें दोन पक्षी येऊन ॥ राघवासी घालिती लोटांगण ॥ म्हणती आमचा वाद निवडोन ॥ पुढें जावें राघवेंद्रा ॥७१॥
तें रघुत्तमें ऐकोन ॥ स्थिर केले विमान ॥ तों उलूक गृध्र दोघेजण ॥ बोलते जाहले तेधवां ॥७२॥
दिवाभीत बोले वचन ॥ गृह माझे पूर्वींहून ॥ हा गृध्र मज दवडून ॥ बळेंच येथे नांदतो ॥७३॥
मग गृध्र वचन बोलत ॥ उगेंच पीडितो दिवाभीत ॥ गृह माझें यथार्थ ॥ बहुकाळ येथेंचि ॥७४॥
प्रधानास म्हणे सीतावर ॥ यांचा वाद निवडावा सत्वर ॥ सत्य निवडोन मंदिर ॥ ज्याचें त्यास देइंजे ॥७५॥
तों गृध्र बोले पापमती ॥ जंव येथें पृथ्वी नव्हती ॥ तों या वृक्षावरी निश्चितीं ॥ गृह माझें म्यां रचियेलें ॥७६॥
दिवाभीत बोले वचन ॥ ईश्वरें पृथ्वी केली निर्माण ॥ मग वृक्ष वाढला पूर्ण ॥ म्यां सदन निर्मिलें तैं ॥७७॥
प्रधान म्हणे गृध्र सत्य ॥ बहुत काळाच्या गोष्टी सांगत ॥ ऐकोनि हांसिन्नला रघुनाथ ॥ म्हणे केवीं हा अर्थ निवडिला ॥७८॥
पृथ्वी वृक्षासी आधार ॥ नीडासी आश्रय तरुवर ॥ दुरात्मा गृध्र साचार ॥ उलूकालागीं पीडितसे ॥७९॥
निवडूनि यथार्थ व्यवहार ॥ राम उलूकासी देत मंदिर ॥ म्हणे हा गृध्र चांडाळ थोर ॥ यासी वधीन मी आतां ॥८०॥
बाण काढिला तये क्षणीं ॥ तंव गर्जिली तेथें आकाशवाणी ॥ म्हणे हे राम कोदंडपाणी ॥ यासी न मारीं सर्वथा ॥८१॥
हा पूर्वी भूपति ब्रह्मदत्त ॥ गौतम ऋषीचा अंकित ॥ तों याचे सदना अकस्मात ॥ भोजना आला गौतम ऋृषि ॥८२॥
तयासी येणें मांस वाढिले ॥ देखतां गुरूचे मन क्षोभले ॥ तत्काळ यासी शापिलें ॥ गृध्र होय म्हणूनियां ॥८३॥
मग हा लागला गुरुचरणी ॥ उःशाप बोले गौतम मुनि ॥ रामदर्शन होतां ते क्षणीं ॥ जासी उद्धरून स्वर्गातें ॥८४॥
ऐसें देववाणी बोलत ॥ तों विमान पातलें अकस्मात ॥ दिव्य देह पावल ब्रह्मदत्त ॥ भावें नमीत रामचंद्रा ॥८५॥
स्तवोनियां कोदंडपाणी ॥ तत्काळ बैसला विमानीं ॥ रघुवीरप्रतापेंकरूनी ॥ स्वर्गी सुखी राहिला ॥८६॥
असो कलशोद्भवाचे आश्रमासी ॥ येता जाहला अयोध्यावासी ॥ साष्टांग नमून ऋषिसी ॥ राघव उभा राहिला ॥८७॥
बहुत करून आदर ॥ आश्रमीं पूजिला रघुवीर ॥ हस्तकंकण एक सुंदर ॥ ऋषीनें दिधलें राघवा ॥८८॥
पृथ्वीचे मोल संपूर्ण ॥ ऐसें एक एक जडलें रत्न ॥ तें सीतावल्लभें देखोन ॥ घटोद्भवाप्रति पुसतसे ॥८९॥
म्हणे यासी निर्मिता चतुरानन ॥ स्वर्गीची वस्तु प्रभाघन ॥ मनुष्यांसी दुर्लभ पूर्ण ॥ तुम्हांस कैसी लाधली ॥९०॥
मग अगस्ति ते कथा सांगत ॥ पैल ते सरोवरीं पाहें प्रेत ॥ वैदर्भदेशींचा नृपनाथ ॥ पुण्यवंत तपोराशी ॥९१॥
दानें केलीं अपरिमित ॥ रामा तप आचरला बहुत ॥ परी अन्नदान किंचित ॥ घडलें नाही यापासूनि ॥९२॥
स्वर्गास गेला तो नृपनाथ ॥ परी क्षुधेनें पीडिला अत्यंत ॥ मग तयासी म्हणे पह्यजात ॥ नाहीं भक्षार्थ तुज येथें ॥९३॥
नाही केलें अन्नदान ॥ येथें न पाविले दिधल्याविण ॥ तरी तूं भूतळाप्रति जाऊन ॥ आपलें प्रेत भक्षीं कां ॥९४॥
तूं भक्षितां नित्यकाळ ॥ मांस वाढेल बहुसाल ॥ मग तो विमानीं बैसोन भूपाळ ॥ नित्यकाळ येत तेथें ॥९५॥
तों तें आपुलें प्रेत भक्षून ॥ स्वर्गासी जाय परतोन ॥ अन्नोदकाएवढे दान ॥ दुजें नाहीं राघवा ॥९६॥
भाग्य ते वैराग्य निश्चित ॥ दैवत एक सद्गुरुनाथ ॥ शांतिसुखाहून अद्भुत ॥ दुजें सुख नसेचि ॥९७॥
तिथींमाजी द्वादशी श्रेष्ठ ॥ कीं मंत्रांत गायत्री वरिष्ठ ॥ कीं तीर्थामाजीं सुभट ॥ प्रयागराज थोर जैसा ॥९८॥
तैसें दानांमाजी अन्नदान ॥ राघवा अत्यंत श्रेष्ठ पूर्ण ॥ असो त्या रायासी कमलासन ॥ बोलता झाला ते काळीं ॥९९॥
म्हणे अगस्तीचे होतां दर्शन ॥ तुझें कर्म खंडेल गहन ॥ तंव एके दिवशीं येऊन ॥ प्रेत भक्षी नृपवर ॥१००॥

तें म्यां अकस्मात देखिलें ॥ कृपेनें हृदय माझें द्रवलें ॥ मग म्यां वरदान दीधले ॥ कर्म खंडले तयाचे ॥१॥
मग तो वैदर्भराजा तेथून ॥ करी स्वर्गी अमृतपान ॥ तेणें गुरुपूजेसी संपूर्ण ॥ मज हे कंकण समर्पिले ॥२॥
देवांचे अंश रत्नावरी ॥ चिंतित मनोरथ सिद्ध करी ॥ ऐसें ऐकोनि अयोध्याविहारी ॥ घाली करीं कंकण तें ॥३॥
राघव म्हणे महाऋषी ॥ दंडकारण्य म्हणती यासी ॥ याची पूर्वकथा आहे कैसी ॥ ते मजपासी सांगिजे ॥४॥
अगस्ति म्हणे मित्रकुळीं देख ॥ मनूचा पुत्रइक्ष्वाक ॥ तयाचा पुत्र दंडक ॥ तो निघाला मृगयेसी ॥५॥
तों काननी ऋषिआश्रम बहुत ॥ दंडक जाय पहात पहात ॥ तंव भृगुऋषि नव्हता मंदिरीं ॥
घरीं तयाची होती कुमारी ॥ अरजा नाम तियेचें ॥७॥
देखोनियां एकांत ॥ कामातुर होत तो नृपनाथ ॥ परी ते बाळ असे अत्यंत ॥ दशवर्षांची कुमारिका ॥८॥
दंडकें धरूनियां बळें ॥ ऋषिकन्येप्रति भोगिलें ॥ शरीर तिचे अचेतन पडलें ॥ दंडक गेला तेथोनी ॥९॥
भृगु आश्रमासी आला त्वरित ॥ देखा कन्या पडली मूर्च्छित ॥ ऋषी वार्ता सांगता समस्त ॥ दंडके अनर्थ केला हा ॥११०॥
ऋषी क्षोभला जैसा कृतांत दंडकासी तेव्हां शापित ॥ म्हणे सेना प्रजा देश समस्त ॥ वनें पट्टणें सर्वही ॥११॥
वृक्ष तोय तृण धान्य ॥ तुझे वंशासहित प्रधान ॥ चांडाळा जाय रे भस्म होऊन ॥ सप्त दिन न लागतां ॥१२॥
ऐसें बोलतां विप्रोत्तम ॥ सर्वही जाहले तेव्हां भस्म ॥ नाहीं उरलें वृक्षाचें नाम ॥ पक्षी तोय मग कैंचें ॥१३॥
बहुत काळपर्यंत ॥ शून्य देश पडिला समस्त ॥ पुढें नारदें कलह बहुत पर्वतांमाजी लाविला ॥१४॥
मेरु आणि विंध्याचळ ॥ उंचावले भांडती सबळ ॥ खळबलें सूर्यमंडळ ॥ सृष्टि सकळ हडबडली ॥१५॥
विंध्याद्रिं नाटोपे साचार ॥ सूर्याविण पडला अंधकार ॥ मग मिळोनि ऋषि निर्जर ॥ मजप्रति येऊनि प्रार्थिती ॥१६॥
तुजविण विंध्याचळ ॥ नाटोपे कोणासी परम खळ ॥ तूं दक्षिणेसी जायीं तात्काळ ॥ तीर्थयात्रा करावया ॥१७॥
मग ती वारणसी टाकून त्वरित ॥ दक्षिणेंस आलों ऋषींसहित ॥ मज देखतां विंध्याचळ पडत ॥ पृथ्वीवरी आडवा ॥१८॥
तयासी मी बोलिलों वचन ॥ जों मी माघारा येईं परतोन ॥ तोंवरी न उठावें येथून ॥ उठल्या शापीन क्षणार्धें ॥१९॥
शापधाकें पर्वत ॥ अद्यापि न उठेचि यथार्थ ॥ मग उगवला आदित्य ॥ लोक समस्त सुखी जाहले ॥१२०॥
तें हें दंडकारण्य ओस ॥ ऋषीसह म्यां केला वास ॥ इंद्रासी सांगून बहुवस ॥ मेघवृष्टि करविली ॥२१॥
आणि धनधान्य बीजें बहुत ॥ तींही वर्षला अमरनाथ ॥ मग देश वसला अद्भुत ॥ दोष दुष्काळ निमाला ॥२२॥
तैंपासूनि दंडकारण्य ॥ राघवा म्हणती यालागून ॥ असो यावरी आज्ञा घेऊन ॥ रघुनंदन निघाला ॥२३॥
पुष्पकारूढ रघुवीर ॥ अयोध्येसी पातला सत्वर ॥ तों ऋषीश्वर घेऊन कुमर ॥ रामदर्शना पातले ॥२४॥
म्हणती धन्य धन्य रघुत्तमा केले ॥ मृतपुत्रां माघारें आणिलें ॥ यशाचें पर्वत उंचावले ॥ मेरूहून आगळे बहुत ॥२५॥
मुक्तमंडपीं रघुनाथ ॥ शोभला तेव्हां जानकीसहित ॥ भोंवते बंधु तिष्ठत ॥ पुढें हनुमंत उभा सदा ॥२६॥
श्रीरामविजय ग्रंथ पावन ॥ उत्तराकांड सुरस गहन ॥ पुढें निजधामा गेला रघुनंदन ॥ हें अनुसंधान न वर्णावें ॥२७॥
तों माध्यान्हीं प्रगटोनि रघुनाथ ॥ म्हणे येथोनि करी ग्रंथ समाप्त ॥ अवतार संपला हे चरित्र ॥ रामविजयी न सांगावे ॥२८॥
मी जन्ममरणाविरहित ॥ अभंग अक्षय शाश्वत ॥ तोच मी ब्रह्मानंद पंढरीनाथ ॥ भीमातीरीं उभा असे ॥२९॥
टाकूनियां चाप शर ॥ दोनी जधनीं ठेवूनि कर ॥ समपाद समनेत्र ॥ उभा साचार मी येथें ॥१३०॥
ऐसी आज्ञा होतां सत्वर ॥ श्रीधरें घातला नमस्कार ॥ करूनियां जयजयकार ॥ रामविजय ग्रंथ संपविला ॥३१॥
चाळीस अध्याय ग्रंथ तत्वतां ॥ तुजप्रति पावों पंढरीनाथा ॥ ब्रह्मानंदा विश्वभरिता ॥ जगदात्मया जगद्रुरो ॥३२॥
वाल्मीकिकृत मूळ ग्रंथ ॥ हनुमंतकाव्य गोड बहुत ॥ आणिकही ग्रंथीं सत्यवतीसुत ॥ रामकथा बोलिला ॥३३॥
तेथींचीं संमतें घेऊनी ॥ पंढरीनाथें कृपा करूनी ॥ सांगितलें कर्णीं येऊनी ॥ तेंच लिहिले साक्षेपें ॥३४॥
रामविजय वरद ग्रंथ ॥ कर्ता याचा पंढरीनाथ ॥ श्रीधर नाम हें निमित्त ॥ पुढें केलें उगेंचि ॥३५॥
या ग्रंथासी वरदान ॥ पंढरीनाथें दीधलें आपण ॥ वाचिती पढती जे अनुदिन ॥ होय ज्ञान अद्भुत तयां ॥३६॥
ओढवतां संकट महाविघ्न ॥ करितां एक तरी आवर्तन ॥ तात्काळ संकट जाय निरसोन ॥ वातेंकरून अभ्र जैसे ॥३७॥
पांच आवर्तनें करितां पूर्ण ॥ जाती महाव्याधी निरसोन ॥ संतति संपत्ति संपूर्ण ॥ पावेल सत्य निर्धारी ॥३८॥
होऊनियां शुचिर्भूत ॥ दहा आवर्तनें करितां सत्य ॥ पोटीं होईल दिव्य सुत ॥ रधुनाथभक्त प्रतापी ॥३९॥
जरी नव्हे श्रवण पठण ॥ नित्य करितां ग्रंथपूजन ॥ तरी ते घरींचें संकट पूर्ण हनुमंत येऊनि निवारिल ॥१४०॥
अद्यापि चिरंजीव हनुमंत ॥ जे रघुनाथकथा वाचिती भक्त ॥ त्यांस अंतर्बाह्य रक्षित ॥ उभा तिष्ठत त्यांजवळी ॥४१॥
करितां रामकथा श्रवण ॥ सप्रेम सदा वायुनंदन ॥ ग्रंथ वाची त्यापुढें येऊन ॥ कर जोडोनियां उभा राहे ॥४२॥
शुचिर्भूत होऊनी ॥ रामविजय उसां घेऊनी ॥ निद्रा करितां स्वप्नी ॥ मारुति दर्शन देतसे पैं ॥४३॥
ऐसा या ग्रंथाचा चमत्कार ॥ जाणती रामउपासक नर ॥ आधि व्याधि दुःख दरिद्र ॥ जाय सर्वत्र ग्रंथसंग्रहें ॥४४॥
बाळकांड आठ अध्यायवरी ॥ अयोध्याकांड अध्याय चारी ॥ चार अध्याय निर्धारी ॥ अरण्यकांड प्रचंड ॥४५॥
दोन अध्यायीं किष्किंधाकांड ॥ तेथोनि पांच अध्याय रसवितंड ॥ ते सुंदरकांड प्रचंड ॥ लीलाचरित्र मारुतीचें ॥४६॥
दहा अध्याय संपूर्ण ॥ युद्धकांड रसाळ गहन ॥ सात अध्याय परम पावन ॥ उत्तरकांड जाणावें ॥४७॥
ऐसें अध्याय अवघे चाळीस ॥ मिळून रामविजय जाहला सुरस ॥ श्रवण करितां आसपास ॥ ब्रह्मानंद उचंबळे ॥४८॥
प्रथम अध्यायी मंगलाचरण ॥ गणेशसरस्वतीगुरुस्तवन ॥ वाल्मीकाची उत्त्पत्ति सांगोन ॥ प्रथममाध्याय संपविला ॥४९॥
बंधूसमवेत निश्चिंती ॥ सांगितली रावणाची उत्पत्ती ॥ दशरथलग्नाची गती ॥ द्वितीयाध्यायीं निरूपिली ॥१५०॥

श्रावणवध श़ृंगीचें आगमन ॥ याग दशरथें केला पूर्ण ॥ त्यावरी हनुमंतजन्मकथन ॥ तृतीयाध्यायीं हेचि कथा ॥५१॥
कौसल्या सुमित्रा कैकयीप्रती ॥ डोहाळे पुसों गेला नृपती ॥ श्रीरामध्यान जन्मस्थिती ॥ चतुर्थाध्यायीं हेचि कथा ॥५२॥
श्रीरामाचे मौंजीबंधन ॥ ब्रह्मचर्य तीर्थाटन ॥ विश्वामित्र मागे रघुनंदन ॥ हें निरूपण पंचमाध्यायीं ॥५३॥
योगवासिष्ठकथन ॥ मायेनें गाधिज केला दीन ॥ वेदांतभागनिरूपण ॥ सहावा संपूर्ण जाणावा ॥५४॥
ताटिका मर्दूनि याग रक्षिला ॥ अहल्योद्धार पुढें केला सातव्यामाजी संपूर्ण ॥५५॥
आठव्यामाजी सीतास्वयंवर ॥ आपमानिला दशकंधर ॥ लग्न लागलें जिंकिला फरशधर ॥ आला रघुवीर अयोध्येसी ॥५६॥
राज्यीं बैसतां रघुनाथ ॥ कैकयीनें केला अनर्थ ॥ त्याकरितां दुःखी दशरथ ॥ नवमाध्यायीं हेंचि कथा ॥५७॥
श्रीराम वनासी निघाला ॥ कौसल्येनें शोक केला ॥ जान्हवीतीरा श्रीराम आला ॥ दशमाध्यायीं हेचि कथा ॥५८॥
मग दशरथें त्यागिला प्राण ॥ भरत आला मातुलगृहाहून ॥ भक्तिरस दिव्य निरूपण ॥ गोड बहुत अकरावा ॥५९॥
चित्रकूटीं भेटला रघुनंदन ॥ भरतें बहुत केलें स्तवन ॥ नंदिग्रामीं भरत स्थापन ॥ हें निरूपण बाराव्यांत ॥१६०॥
बहुत ऋषींचे दर्शन घेता जाहला रघुनंदन ॥ अगस्तीचा महिमा पूर्ण ॥ तेराव्यांत कथियेला ॥६१॥
शूर्पणखा विटंबून ॥ वधिले त्रिशिरा खरदूषण ॥ दशमुखासी वर्तमान ॥ हेचि कथा चवदाव्यांत ॥६२॥
मृग वधूं गेला रघुनंदन ॥ सीता घेऊनि गेला रावण ॥ जटायु वधिला कपटेंकरून ॥ पंधराव्यांत हेचि कथा ॥६३॥
सीताविरहे राम व्यापिला ॥ त्यावरी जटायु उद्धरिला ॥ पंपासरावरीं आला ॥ सोळाव्यांत हेचि कथा ॥६४॥
वाळिसुग्रीवांची उत्पत्ती ॥ मग शक्रसुत वधी रघुपति ॥ सत्रावें अध्यायी निश्चिती ॥ कथा हेचि निश्चयें ॥६५॥
तारेप्रति बोध करून ॥ शुद्धीस गेले वानरगण ॥ समुद्रातीरीं संपातीदर्शन ॥ हें निरूपण अठराव्यांत ॥६६॥
समुद्र उल्लंघून लंका शोधून ॥ रावणसभा विटंबून ॥ विजयी जाहला वायुनंदन ॥ हें चरित्र एकुणिसाव्यांत ॥६७॥
हनुमंतास सीतादर्शन ॥ विध्वंसिलें अशोकवन ॥ वधिला अखया आणि राक्षस संपूर्ण ॥ हेचि कथा विसाव्यांत ॥ ६८॥
इंद्रजिताचें विटंबन ॥ रावणा छळूनि लंकादहन ॥ किष्किंधेसी आला अंजनीनंदन ॥ हेचि कथा एकविसाव्यांत ॥६९॥
ब्रह्मपाशबंधन ॥ मिष घेऊनि वायुनंदन ॥ सागरीं पुच्छ विझवून ॥ सुवेळेसी पातला ॥१७०॥
ब्रह्मपत्र वाचून ॥ समुद्रतीरास आला रघुनंदन ॥ मग बिभीषणें बोधिला रावण ॥ हेचि कथा बाविसाव्यांत ॥७१॥
मग बिभीषण भेटे श्रीरामास येऊन ॥ सागरदर्शन सेतुबंधन ॥ सुवेळेसी आला सीतारमण ॥ हें निरूपण तेविसाव्यांत ॥७२॥
कापट्य दाविलें सीतेसी ॥ मंदोदरी भेटली जनककन्येसी ॥ मग सुग्रीवे त्रासिले रावणासी ॥ कथा हेच चाविसाव्यांत ॥७३॥
अंगदें बोधिला रावण ॥ अपार युद्ध जाहले दारुण ॥ नागपाशीं बांधिले रामलक्ष्मण ॥ हे लीला पंचविसाव्यांत ॥७४॥
प्रहस्तवध मंदोदरीनीति ॥ मग युद्धा आला लंकापति ॥ तो पराभव पावला निश्चतीं ॥ हे चरित्र सव्विसाव्यांत ॥७५॥
जागा केला कुंभकर्ण ॥ त्यावरी युद्ध जाहले दारुण ॥ समरीं घटश्रोत्रें दिधला प्राण ॥ हें निरूपण सत्ताविसाव्यांत ॥७६॥
नरांतकादि सहाजण पाडिले ॥ शक्रजितें शरजाल सोडिलें ॥ मारुती द्रोणाचळ आणि ते वेळे ॥ अठ्ठाविसाव्यांत हेंचि कथा ॥७७॥
निकुंभिलेसी जाऊन ॥ वानरीं होम विध्वंसून ॥ शक्रजितासी मारी लक्ष्मण ॥ एकुणतिसाव्यांत हेचि कथा ॥७७॥
तिसाव्यांत सुलोचना गहिंवर ॥ एकतिसाव्यांत अहिमहिसंहार ॥ शक्ति भेदोनी निर्धार ॥ बत्तिसावा संपूर्ण पैं ॥७९॥
रावणाचा होम विध्वंसून ॥ अपार माजविलें तेव्हां रण ॥ रावण वधोनि स्थापिला बिभीषण ॥ हे चरित्र तेतिसाव्यांत ॥१८०॥
जानकीनें दिव्य देऊन ॥ मग इंद्र वर्षला अमृतपर्जन्य ॥ देवस्थाना गेले स्तवून ॥ हे कथा संपूर्ण चौतिसाव्यांत ॥८१॥
पुष्पकी बैसोन रघुनंदन ॥ घेतलें अगस्तीचें दर्शन ॥ त्यावरी भरतभेटी पूर्ण ॥ हें चरित्र पस्तिसाव्यांत ॥८२॥
नंदिग्रामीं राहिला राघवेश ॥ मग केला अयोध्याप्रवेश ॥ राज्यीं स्थापून रामास वानर गेले स्वस्थाना ॥८३॥
छत्तिसावें अध्यायीं जाण ॥ हेचि कथा असे पूर्णं ॥ एकोणचाळीस अध्यायीं कौतुक गहन ॥ लहूकुशाख्यान गोड पैं ॥८४॥
चाळिसाव्यांत रघुवीरें ॥ मृत्यु पावलीं ऋषींचीं कुमरें ॥ किरात वधोनियां त्वरें ॥ बाळें माघारी आणिली ॥८५॥
चाळीस अध्यायपर्यंत ॥ रामविजय सपूर्ण ग्रंथ ॥ श्रवणमननें पुरे अर्थ ॥ जाणती पंडित विवेकी ॥८६॥
रामविजय ग्रंथ नृपती ॥ चाळिस अध्याय वीर निश्चितीं ॥ दोषदळ संहारिती ॥ प्रचंड प्रतापी वीर हे ॥८७॥
कीं रामविजय ग्रंथ सुंदर ॥ हें चाळीस खणांचे दिव्य मंदिर ॥ सीतेसहीत रघुवीर ॥ क्रीडा करित तेथें पैं ॥८८॥
कीं हें चाळिस खणांचे वृंदावन ॥ रघुनाथकथा तुळसी पूर्ण ॥ दृष्टांत ती पत्रें जाण ॥ आवर्तन प्रदक्षिणा भक्त करिती ॥८९॥
रामविजय ग्रंथ मंदिर ॥ चाळीस कोठड्या अति सुंदर ॥ साहित्य द्रव्य अपार ॥ माजी भरलें न गणवें ॥१९०॥
कीं ग्रंथ हा वासरमणी ॥ वेष्टिला असे दृटांत किरणीं ॥ कीं साहित्य तारागणीं ॥ ग्रंथचंद्र वेष्टिला ॥९१॥
कीं ग्रंथ हाचि रघुवीर ॥ दृष्टांत हे त्याचे वानर ॥ मारूनि अहंदशकंधर ॥ विजयरूप सर्वदा ॥९२॥
रामविजय मांदुस आळी ॥ आंत होती चाळीस कोहळीं ॥ नररत्नद्रव्यें पूर्ण भरली ॥ मज दिधली ब्रह्मानंदें ॥९३॥
पळालें भवदुःखदरिद्र ॥ भाग्य घरा आलें अपार ॥ कीं ग्रंथ हा पंढरीनगर ॥ दृष्टांत अपार यात्रा तेथें ॥९४॥
रामविजय रत्नखाणी ॥ वर्णितां धन्य जाहली वाणी ॥ ब्रह्मानंदकृपेकरूनीं ॥ ग्रंथ सिद्धीस पावविला ॥९५॥
आनंदसांप्रदाय पूर्ण ॥ वाढत आले मुळींचे ज्ञान ॥ सृष्टीचे आदिकाळी कमलासन ॥ उपदेशिला नारायणें ॥९६॥
पद्मोद्भवें तेंचि ज्ञान ॥ अत्रीस दिधलें संपूर्ण ॥ त्याचे पोटीं आदिपुरुष जाण ॥ दत्तात्रेय अवतरला ॥९७॥
दत्तात्रेयें ज्ञान शुद्ध ॥ सांगूनि बोधिला सदानंद ॥ तेथूनि रामानंद प्रसिद्ध ॥ यतीश्वर अगाध पैं ॥९८॥
तेथोनि मंगलानंद ईश्वर ॥ गंभीर ज्ञानानंद दिवाकर ॥ सहजानंद योगेश्वर ॥ कल्याणधामवासी जो ॥९९॥
तेथूनि पूर्णानंद महायतिराज ॥ जो तपोज्ञानें तेजःपुंज ॥ तेथोनि दत्तानंद यति सहज ॥ पूर्ण दत्तात्रेय अवतार ॥२००॥
त्या दत्तात्रेयाचे उदरीं शुद्ध ॥ पूर्ण अवतरला ब्रह्मानंद ॥ पिता आणि गुरु प्रसिद्ध ॥ तोचि माझा जाणिजे ॥१॥
पंढरीहूनि चार योजनें दूरीं ॥ नैऋत्यकोनीं नाझरें नगरी ॥ तेथील देशलेखक निर्धारी ॥ ब्रह्मानंद पूर्वाश्रमीं ॥२॥
मग पंढरीस येऊन ॥ विधीनें केलें संन्यासग्रहण ॥ भीमातीरीं समाधिस्थ पूर्ण ॥ ब्रह्मानंद यतिराव ॥३॥
तों ब्रह्मानंद पूर्ण पिता ॥ सावित्री नामें माझी माता ॥ श्रीधरें वंदोनियां उभयतां ॥ रामविजय ग्रंथ संपविला ॥४॥
शके सोळाशे पंचवीस ॥ सुभानु नाम संवत्सरास ॥ भानुसप्तमी शुद्ध विशेष ॥ श्रावणमास विख्यात पैं ॥५॥
पंढीरीक्षेत्रीं निश्चयेंसीं ॥ ग्रंथ संपविला ते दिवशीं ॥ लेखक आणि श्रोतयांसी ॥ कल्याण असो सर्वदा ॥६॥
सुभानु संवत्सर भानुवार ॥ भानुवंशीं जन्मला रघुवीर ॥ भानु आणि रोहिणीवर ॥ तोंवरी ग्रंथ असो हा ॥७॥
ब्रह्मानंद पांडुरंगा ॥ श्रीधरवरदा पूर्ण अभंगा ॥ पुराणपुरुषा भक्तभवभंगा ॥ श्रोता वक्ता तूंचि पैं ॥८॥
स्वस्ति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत पंडित चतुर ॥ चत्वारिंशत्तमोध्याय गोड हा ॥२०८॥

श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥


No comments:

Post a Comment