Thursday, March 3, 2011

Geetai - Adhyay 1

Chapter - I : Yoga of Despondency.

In the background of Gita is a war, between two families, ready to start. Arjuna the main hero on one side, looks at the family members, elders and friends on the other side and experiences a strong sense of frustration for infighting in the family. Although he was a great warrior, he merely broke-down by thinking on the utter futility of this war and in that moment of depression he asks his mentor about what he should do. The answer given by Shri Krishna is equally unexpected. He says your present reluctance to fight is illusion. Your problem is not regarding fight but the fight against my relatives, my brothers, my friends. Krishna says that your real fight has to be against Cr' and 'My) rather than the fight outside. It is in this context of how to come out of our ego i.e. 'I' and the result of the ego i.e. C Mv' that all the seventeen chapters have been commented upon.



अध्याय []

धृतराष्ट्र म्हणाला

त्या पवित्र कुरू-क्षेत्री पांडूचे आणि आमुचे ।
युध्दार्थ जमले तेंव्हा वर्तले काय संजया ॥ १ ॥

संजय म्हणाला

पाहिली पांडवी सेना सज्ज दुर्योधने तिथे ।
मग गेला गुरूपाशी त्यांस हे वाक्य बोलिला ॥ २॥

गुरूजी तुमचा शिष्य शाहणा द्रुपदात्मज ।
विशाळ रचिले त्याने पहा पांडव सैन्य हे ॥ ३ ॥

ह्यात शूर धनुर्धारी युद्धी भीमार्जुनासम ।
महा-रथी तो द्रुपद विराट-नृप सात्यकि ॥ ४ ॥

धृष्टकेतु तसा शूर काश्य तो चेकितान हि ।
पुरूजित कुंतिभोजीय आणि शैब्य नरोत्तम ॥ ५ ॥

उत्तमौजा हि तो वीर युधामन्यु हि विक्रमी ।
सौभद्र आणि ते पुत्र द्रौपदीचे महा-रथी ॥ ६॥

आता जे आमुच्यातील सैन्याचे मुख्य नायक ।
सांगतो जाणण्यासाठी घ्यावे लक्षात आपण ॥ ७ ॥

स्वतां आपण हे भीष्म यशस्वी कृप कर्ण तो ।
अश्वत्थामा सौमदत्ति जयद्रथ विकर्ण हि ॥ ८ ॥

अनेक दुसरे वीर माझ्यासाठी मरावया ।
सजले सर्व शस्त्रांनी झुंजणारे प्रवीण जे ॥ ९ ॥

अफाट आमुचे सैन्य भीष्मांनी रक्षिले असे ।
मोजके पांडवांचे हे भीमाने रक्षिले असे ॥ १० ॥

राहूनि आपुल्या स्थानी जेथे ज्यास नियोजिले ।
चहूंकडूनि भीष्मांस रक्षाल सगळेजण ॥ ११ ॥

हर्षवीत चि तो त्यास सिंह-नाद करूनिया ।
प्रतापी वृद्ध भीष्मांनी मोठ्याने शंख फुंकिला ॥ १२ ॥

तत्क्षणी शंखभैर्यादि रणवाद्ये विचित्र चि ।
एकत्र झडली तेंव्हा झाला शब्द भयंकर ॥ १३ ॥

इकडे शुभ्र घोड्यांच्या मोठ्या भव्य रथातुनी ।
माधवे अर्जुने दिव्य फुंकिले शंख आपुले ॥ १४ ॥

पांच-जन्य हृषिकेशे देव-दत्त धनंजये ।
पौंड्र तो फुंकिला भीमे महाशंख महा-बळे ॥ १५ ॥

तेंव्हा अनंत-विजय धर्मराज युधिष्ठीरे ।
नकुळे सहदेवे हि सुघोष मणि-पुष्पक ॥ १६ ॥

मग काश्य धनुर्धारी शिखंडी हि महा-रथी ।
विराट आणि सेनानी तसा अजित सात्यकि ॥ १७ ॥

राजा द्रुपद सौभद्र द्रौपदीचे हि पुत्र ते ।
सर्वांनी फुंकिले शंख आपुले वेगवेगळे ॥ १८ ॥

त्या घोषे कौरवांची तो हृदये चि विदारिली ।
भरूनि भूमि आकाश गाजला तो भयंकर ॥ १९ ॥

मग नीट उभे सारे पुन्हा कौरव राहिले ।
चालणार पुढे शस्त्रे इतुक्यात कपि-ध्वज ॥ २० ॥
हाती धनुष्य घेउनि बोले कृष्णास वाक्य हे ।

अर्जुन म्हणाला

दोन्ही सैन्यामधे कृष्णा माझा रथ उभा करी ॥ २१ ॥

म्हणजे कोण पाहीन राखिती युद्धकामना ।
आज ह्या रणसंग्रामी कोणाशी झुंजणे मज ॥ २२ ॥

झुंजते वीर ते सारे घेतो पाहूनि येथ मी ।
युद्धी त्या हत-बुद्धींचे ज करू पाहती प्रिय ॥ २३ ॥

संजय म्हणाला

अर्जुनाचे असे वाक्य कृष्णे ऐकूनि शीघ्र चि ।
दोन्ही सैन्यांमधे केला उभा उत्तम तो रथ ॥ २४ ॥

मग लक्षूनिया नीट भीष्म द्रोण नृपास तो ।
म्हणे हे जमले पार्था पहा कौरव सर्व तू ॥ २५ ॥

तेथ अर्जुन तो पाहे उभे सारे व्यवस्थित ।
आजे काके तसे मामे सासरे सोयरे सखे ॥ २६ ॥
गुरुबंधु मुले नातू दोन्ही सैन्यात सारखे ।

असे पाहूनि तो सारे सज्ज बांधव आपुले ।
अत्यंत करुणाग्रस्त विषादे वाक्य बोलिला ॥ २७ ॥

[२]

अर्जुन म्हणाला

कृष्णा स्व-जन हे सारे युद्धी उत्सुक पाहुनी ।
गात्रे चि गळती माझी होतसे तोंड कोरडॅ ॥ २८ ॥

शरीरी सुटतो कंप उभे रोमांच राहती ।
गांडीव न टिके हाती सगळी जळते त्वचा ॥ २९ ॥

न शके चि उभा राहू मन हे भ्रमले जसे ।। ३० ॥

कृष्णा मी पाहतो सारी विपरित चि लक्षणे ।
कल्याण न दिसे युद्धी स्व-जनांस वधूनिया ॥ ३१ ॥

नको जय नको राज्य नकोत मज ती सुखे ।
राज्य भोगे मिळे काय किंवा काय जगूनि हि ॥ ३२ ॥

ज्यांच्यासाठी अपेक्षावी राज्य भोग सुखे हि ती ।
सजले ते चि युद्धास धना-प्राणास सोडुनी ॥ ३३ ॥

आजे बाप मुले नातू आमुचे दिसती इथे ।
सासरे मेहुणे मामे संबंधी आणि हे गुरू ॥ ३४ ॥

न मारू इच्छितो ह्यांस मारितील जरी मज ।
विश्व-साम्राज्य सोडीन पृथ्वीचा पाड तो किती ॥ ३५ ॥

ह्या कौरवांस मारूनि कायसे आमुचे प्रिय ।
अत्याचारी जरी झाले ह्यांस मारूनि पाप चि ॥ ३६ ॥

म्हणूनि घात बंधूंचा आम्हा योग्य नव्हे चि तो ।
आम्ही स्व-जन मारूनि सुखी व्हावे कसे बरे ॥ ३७ ॥

लोभाने नासली बुद्धि त्यामुळे हे न पाहती ।
मित्र-द्रोही कसे पाप काय दोष कुल-क्षयी ॥ ३८ ॥

परी हे पाप टाळावे आम्हा का समजू नये ।
कुल-क्षयी महा-दोष कृष्णा उघड पाहता ॥ ३९ ॥

कुल-क्षये लया जाती कुल-धर्म सनातन ।
धर्म-नाशे कुळी सर्व अधर्म पसरे मग ॥ ४०॥

अधर्म माजतो तेंव्हा भ्रष्ट होती कुल-स्त्रिया ।
स्त्रिया बिघडता कृष्णा घडतो वर्ण-संकर ॥ ४१ ॥

संकरे नरका जाय कुलघ्नांसह ते कुळ ।
पितरांचा अधःपात होतसे श्राद्ध लोपुनी ॥ ४२ ॥

ह्या दोषांनी कुलघ्नांच्या होऊनी वर्ण-संकर ।
जातींचे बुडती धर्म कुळाचे हि सनातन ॥ ४३ ॥

ज्यांनी बुडविले धर्म कुळाचे त्यांस निश्चित ।
नरकी राहणे लागे आलो ऐकत हे असे ॥ ४४ ॥

अरेरे केवढे पाप आम्ही आरंभिले असे ।
लोभे राज्य-सुखासाठी मारावे स्व-जनांस जे ॥ ४५ ॥

त्याहुनि शस्त्र सोडूनि उगा राहीन ते बरे ।
मारोत मग हे युद्धी शस्त्रांनी मज कौरव ॥ ४६ ॥

संजय म्हणाला

असे रणात बोलूनि शोकावेगात अर्जुन ।
धनुष्य-बाण टाकूनि रथी बैसूनि राहिला ॥ ४७ ॥

अध्याय पहिला संपूर्ण

No comments:

Post a Comment